Ads 468x60px

Saturday, March 14, 2020

४) माय लेकरं - बाप

                   वडिलांनी आतापर्यंत माझ्यासाठी काहीही न करणे ही त्यांनी माझ्यासाठी केलेली सर्वात मोठी गोष्ट आहे. घरातील कर्ता पुरुष व्यसनाधीन असेल तर त्या कुटुंबातील स्त्रीला संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागते, व्यसनाधीनतेचा विळख्यात असलेल्या अनेक कुटुंबाची अशी रडकथा आहे. माझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे  वडिलांनी जरी माझ्यासाठी काही केलं नसले तरी इतरांप्रमाणे त्यांनी वडिलकीचा हक्क कधीही गाजवला नाही किंवा स्वतःचे कोणतेही निर्णय माझ्यावर लादले नाहीत.  अगदी लहानपणापासून ते आजपर्यंतच्या आयुष्यात त्यांनी कधीही माझ्या कोणत्याही निर्णयात कधीही कसलाही हस्तक्षेप केला  नाही. आजही घरात मी एखाद्या कामाबद्दल बोलत असतो तेव्हा माझं म्हणणं पूर्ण व्हायच्या आत "बापू बोलतोय तेच बरोबर आहे" असे म्हणत त्यांनी मला तात्काळ पाठिंबा दिलेला असतो. त्यांच्या दृष्टीने मी जे करतो ते सगळं बरोबरच असते.
                 वडिलांना आम्ही भाऊ म्हणतो, भाऊंना चार बहिणी व ते असे पाच जण, भाऊ एकुलते एक वारस.आजोबांना बैल पाळण्याचा शौक होता, त्यासाठी ते बाजारातून लहान गोर्‍हा आणून त्यास व्यवस्थित सांभाळून शेतीचे कामे शिकवत. त्यांचा हा उपक्रम सतत चालू असे त्यापैकी जो चांगला असेल तो घरच्या कामासाठी ठेऊन बाकीचे विकायचे. अर्थात त्यामुळे बैलपोळयाला सर्वात डौलदार बैलजोडी आमचीच असायची.आजही कोणी वयस्कर व्यक्ती भेटली तर ओळख सांगितल्या बरोबर  त्या व्यक्तीचा पहिला प्रश्न "तुमची बैलं आहेत का अजून?."  हाच असतो. घरी बैल बारदाना चांगला असल्याने घरच्या शेतीशिवाय वाट्याने अनेकांची शेती केली जात असे. वडील शेतीच्या सर्व कामांत निष्णात होते. मग ते नांगराचे तास असो वा साऱ्याचा दंड असो सारं काही आखीवरेखीव असायचे. कामाला वेळ लागला तरी चालेल पण कामात चालढकल त्यांना चालणार नाही. 
               माझ्या दोन्ही आई गावातील,  त्यामुळे गावातील सर्व परिचित लोक वडिलांना दाजी म्हणूनच बोलवत (पुढे हा वारसा मी चालवला). वडील म्हणजे एकदम देवमाणूस, कधी कोणाशी भांडण नाही, कोणाशी कसला वाद नाही. भावकीतही बांधाला बांध, सामाईक विहीर, उभ्या पिकाला गाईगुरांची वर्दळ लागायची पण भाऊ कधी कोणाला एक शब्दाने बोलणार नाही. दोन्ही आईंना असलं काही खपायचं नाही, त्या भांडायच्या पण भाऊ म्हणायचे " तेवढे नुकसान झालं म्हणून आपल्याला काही कमी पडणार आहे का?". कोणी कितीही त्रास दिला तरी भाऊ कोणाला ही काही बोलायचे नाहीत याचा दोन्ही आईंना फार राग असायचा. जगासाठी चांगली असलेली व्यक्ती त्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी तितकीच चांगली असेल असं नसते. दादांना(आजोबा) आपले कुटुंब पुढे नेण्याची, प्रगती करण्याची फार जिद्द, इरशिर(ईर्ष्या) होती. भाऊंच्या मध्ये ती अजिबात नव्हती, त्यांनी भविष्याचा विचार कधीच केला नाही स्वतःच्या नाही अन दुसऱ्याच्याही नाही. 
             भाऊंना व्यसन जरी असले तरी कष्ट करण्यात ते कुठे कमी नव्हते, घरची आणि बाहेरचीही अनेक जणांची शेती करत असल्याने भाऊंनी त्यांच्या लहानपणापासून फार कष्ट केलेत. चांगले काम, प्रामाणिकपणा यामुळे त्यांना  भाड्यातोड्याचीही अनेक कामे मिळायची. एवढे सगळे करूनही प्रगतीच्या ऐवजी दिवसेंदिवस अधोगतीच होत होती. त्यासाठी कोणत्याही गोष्टीस जबाबदार धरता येणार नाही कारण पाचवीला पुजलेला दुष्काळ, बेभरवशाची बाजारपेठ त्यामुळे कोरडवाहू शेतीतून प्रगती हे एक दिवास्वप्नच होतं. भाऊंकडे थोडी दूरदृष्टी असती, कोणाचे तरी थोडं पाठबळ असते तर निदान आहे तेवढी शेती टिकवता आली असती.भाऊंकडे काळ्या मातीतून सोनं पिकवायची कला होती पण दूरदृष्टीचा अभाव आणि व्यसनापायी साऱ्याचीच माती झाली.
              भाऊंना शेतीबरोबरच, पाळीव प्राण्यांची फार आवड, त्यातल्या त्यात गाई-बैलांवर त्यांचा फार जीव, जन्मल्याबरोबर कालवड असो वा खोंड त्यांच नामकरण होणारचं, भाऊ माणसांशी कमी बोलतील पण प्राण्यांशी गप्पा मारणार. आज त्यांचे वय ऐंशीपार झाले असले तरी या वयातही ते नियमित गाईला रानात घेऊन जाणारच पण आता वयोमानानुसार त्यांना जमणार नाही, रस्त्याने जाता येता ओढाताणीत पडून काही दुखापत व्हायला नको म्हणून आम्ही तीनेक महिन्यांपूर्वी गाई विकली. अर्थात गाय विकण्यास भाऊंचा विरोध होता, त्यामुळे गाय विकल्यापासून थोडेदिवस भाऊ नाराज होते. माझ्या जन्मापूर्वी आमची संत्र्याची बाग होती, सामाईक असल्यातरी विहिरींना पाणी असल्यामुळे ज्वारीबाजरी बरोबर कांदा, माळवं असायचं. भावकी आणि धावपळ करायला कोणी नसल्याने जवळपास गेल्या दोन दशकांपासून आम्ही सामाईक हिस्यातून स्वतःहूनच बेदखल झाले आहोत. आपली स्वतःची विहीर, पाईपलाईन, फळबाग असावी अशी भाऊंची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. पण सध्या शेतीचा वाद कोर्टात असल्यामुळे तूर्तास हे सगळे बाजूला पडलंय. सध्यातरी कोर्टाचा निकाल लवकर लागून  हा वाद मिटावा व भाऊंची इच्छा लवकर पुरी व्हावी एवढीच अपेक्षा करू शकतो.  ज्यादिवशी शेतीचा वाद मिटेल त्यावेळी मी तात्काळ विहीर,पाईपलाईन आणि फळबाग लागवड करणार हे निश्चित. आई-बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यापेक्षा दुसरे मोठे कोणतं सुख असू शकते. 

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!