Ads 468x60px

Sunday, October 15, 2017

एक पत्र भुजबळसाहेबांना....

          बऱ्याच दिवसांपासून आपल्याबद्दल लिहायचे मनात होते, पण आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहितोय. हो वाढदिवसाचे निमित्तच, कारण मी कोणाला कधी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाही. शिवाय सध्याची आपली अवस्था पहाता कोणी आपणांस शुभेच्छा देण्याचा धोका पत्करेल असे वाटत नाही. तुमच्याबद्दल लिहितोय म्ह्णून काही लोकांना माझा विटाळ होऊ शकतो पण म्हणून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकीय त्यापेक्षाही सामाजिक क्षेत्रातील आपल्या योगदानाकडे कानाडोळा करणे करंटेपणाचे ठरेल.
        आपण सामान्य शिवसैनिकांपासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा महापौर व इतरही महत्वाची पदे शिवसेनेतील २५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत भूषवली. आपण १९८५ मध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार व दोनच महिन्यांनी सेनेचे मुंबई महानगरपालिकेचे पहिले महापौर झालात. शिवसेनेने  आपल्याला भरभरून दिले एवढंच काय तर सत्ता आली तर आपणच मुख्यमंत्री होणार अशी सर्वानाच खात्री होती. तरीही आपण सेनेला जय महाराष्ट केलंत. अजाणत्या वयात बाळासाहेब आणि शिवसेनेबद्दल आम्हालाही सुप्त आकर्षण होते, त्यामुळे आमच्या लेखी तुम्ही गद्दारचं होता, ज्यांनी शिवसेना सोडणे फक्त राजकीय दृष्टिकोनातून पाहिले त्यांना त्यामागची सामाजिक कारणे, प्रेरणा तर ज्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले त्यांना त्यामागची राजकीय कारणे व प्रेरणा लक्षात आपल्या नाहीत. ज्या काळात सेना सोडणे म्हणजे मोठ्या संकटाला प्रसंगी मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे होते. त्याकाळात फक्त सामाजिक वा फक्त राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिवसेना सोडली नसून सामाजिक आणि राजकीय या दोन्हींच्या घुसमटीतून सोडली असण्याची शक्यता जास्त वाटते.
          आपण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालात कारण त्यांचे आणि आपले विचार जुळत होते. मराठीचा मुद्दा-बॉम्बे चे मुंबई नामकरण आपल्याच महापौर पदाच्या काळात व आपल्या पुढाकाराने झाले, सुंदर मुंबई मराठी मुंबई अभियान चालवून त्याची सुरूवात म्हणून हुतात्मा स्मारकाजवळ उद्यान शिल्प उभारले.  कर्नाटक-महाराष्ट्र्र सीमावाद- वेष बदलून नेतृत्व केलं प्रसंगी तुरुंगवास भोगला. हिंदुत्ववाद- रिडल्स प्रकरणात दलितांच्या मोर्च्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भव्य मोर्च्याचे आयोजन केले. त्याला प्रतिउत्तर म्हणून दलितांनी अतिभव्य मोर्चा काढला व मोर्चाचा संयम सुटून आपण उभारलेल्या  हुतात्मा स्मारकाची मोडतोड  करण्यात आली. आपणही हुतात्मा स्मारकाचे शुद्धीकरण करून आगीत तेलच ओतले. अनेक प्रस्थापित नेत्यांना मागे सारून आपण शिवसेनेत अगदी वरचे भक्कम स्थान निर्माण केले. एखादी व्यक्ती लोकप्रिय झाली कि त्याचे पंख छाटले जातात याचा आपण पहिल्यांदा अनुभव १९८९ मध्ये घेतलात. १९८९ च्या शिवसेनेच्या पुणे अधिवेशनात ग्रामीण भागात काम करण्यासाठी शेतकरी सेना नावाची संस्था स्थापन करण्याची घोषणा केली व त्या संघटनेची सूत्रे आपल्याच हातात दिली जातील याबाबत कोणाच्याही मनात तिळमात्र शंका नव्हती. खुद्द बाळासाहेबांनीच तसे सूचित केले होते, मात्र ऐनवेळी अनपेक्षितपणे नंदू घाटे यांना शेतकरी आघाडीचे प्रमुख केले. आपण शिवसेनेचा मुंबईबाहेर विस्तार करण्यात मोठा हातभार लावला याबाबत कोणाचेही दुमत नाही, त्याच आशेवर १९९० मध्ये शिवसेना सत्तेवर येईल असा आशावाद होता पण सत्ता मिळाली नाही मात्र ५२ आमदारांच्या बळावर शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले पण तुम्हाला डावलून मनोहर जोशींना विरोधी पक्षनेतेपद तर आपली दुसऱयांदा मुंबई महापौर पदावर बोळवण करण्यात आली. बहुदा सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री पदाची अशीच हुलकावणी मिळेल अशी शंका आपल्या मनात निश्चित आली असेल. अर्थात आपण मुख्यमंत्री झाला असता तरी आपणास रिमोट कंट्रोलवरच काम करायला लागले असते हे उघडच होते.
       इंदिरा गांधीजींनी बासनात गुंडाळलेला मंडल आयोग  व्ही. पी. सिंग सरकारने १९९० मध्ये लागून करण्याची घोषणा केली. बाळासाहेबांनी आयोगाला कडाडून विरोध केला. बाळासाहेबांनी आपली भूमिका मांडण्याआधीच  आपण मात्र मंडल आयोगाच्या बाजूने असल्याचे जाहीर केले. यावर आपली व बाळासाहेबांची खडाजंगी देखील झाली. अखेर आपल्या राजकीय, सामाजिक घुसमटीवर फुंकर घालून पवारसाहेबांनी आपल्याला काँग्रेस मध्ये खेचले. पुढे आपण महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली व त्यामाध्यमातून देखिल मंडल आयोग लागू करण्याबाबत दबाव निर्माण केला.  मंडल आयोगाच्या शिफारशी २३ मार्च १९९४ पासून सरकारी नोकऱ्या व शिक्षण क्षेत्रात लागू झालया. मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र्र हे देशातील पहिले राज्य होते. तत्कालीन मुख्यमंत्री पवारसाहेबांसोबतच याचे श्रेय आपणांस ही जाते. आपले हे योगदान बहुजन वर्ग कायम स्मरणात ठेवील. आपण कट्टर हिंदुत्ववादी, गोडसेंचे गुणगान गाणारे, पुरोगाम्यांवर आगपाखड करणारे, काहीशी दलित विरोधी भूमिका असणारे आपण उपरतीने म्हणा किंवा नाईलाजाने म्हणा बदललात. धार्मिक, जातीयवादी विचार बहुजनाना मारक आहेत व फुले-शाहू-आंबेडकर विचार समाजात रुजवल्याशिवाय प्रगती होणार नाही हे जाणले.  समता परिषदेच्या माध्यमातून आपण दलित- ओबीसी सामाजिक एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रतिगामित्वाकडून पुरोगामीत्वाकडेचा प्रवास आपल्या वैचारिक प्रगल्भतेची साक्ष होती. 
                        लहानपणासूनच आपल्याला प्रचंड संघर्ष करावा लागला ,  लहानपणीच आपण आई-वडिलांच्या मायेचं छत्र हरवले. आईचा फोटो पाहण्याचे भाग्य देखील आपणास लाभले नाही. पुढे विविध  पक्षात आपले  सामर्थ्य वाढले कि पंख छाटण्याचे काम करण्यात आले. तेलगी घोटाळ्यात आपले नाव आले, आपण सहीसलामत बाहेर पडलात पण बदनामी व्हायची ती झालीच. पक्षात पीछेहाट झालीच. आताही  महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणात एक वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात आहात. आपण जी कामे केली मग ते फ्लाय ओव्हर असोत वा महाराष्ट्र्र सदन अगदी विरोधी पक्षांनी देखील आपल्या कामाचे कौतुक केले.  अगदी कधी काळी आपल्या जीवावर उठलेल्या शिवसेनेने देखील महाराष्ट्र सदनाचे कौतुक केले.  बाळासाहेबांना तांत्रिक का होईना अटक करण्याची हिम्मत आपण दाखवलीत असं महाराष्ट्रात कोणी करू शकले नसते. बाळासाहेबांवर आपल्या इतकी टीका कोणीच केली नसेल पण तरीही शेवटी आपल्या मनात शिवसेनेबद्दल व बाळासाहेबांबद्दल तसेच शिवसैनिकांना व बाळासाहेबांना  ही आपल्याबद्ल कायम एक सॉफ्ट कॉर्नर होता. त्यामुळेच शेवटी आपली व बाळासाहेबांची मातोश्रीवर भेट होऊ शकली.  शिवसेना सोडल्यानंतर आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा खटला आपण मागे घेतला तेव्हा अनेक शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी आले. ही आपल्या कामाची पोच होती. आपण गुन्हेगार असाल किंवा नसाल पण आपल्याला बळीचा बकरा बनवला आहे असे साऱ्या महाराष्ट्राला वाटते आहे. घोटाळे करणारे आपण पहिले नाही किंवा शेवटचे ही नाहीत ना आपला  घोटाळा सगळ्यात मोठा आहे. असे असताना फक्त आपणच तुरुंगात आहात. चौकशी टाळावी म्हणून लोक देश सोडून पलायन करतात आपण मात्र चौकशीसाठी परदेशातून भारतात आलात व चौकशीला पूर्ण सहकार्य केलं पण तरी चौकशी करायला येऊन थेट आपणांस अटकच केली. आपण जर दोषी असाल तर आपणास योग्य ती शिक्षा निश्चित होवो. मात्र तसे नसेल तर सध्या सूडबुद्धीने चालवलेली आपली अवहेलना थांबावी एवढीच इच्छा. कुजबुज अशीही ही ऐकायला येतेय कि महाराष्ट्र्र सदनात फक्त शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले, शाहू महाराज, भारतरत्न आंबेडकरांचेच पुतळे बसवले इतरांचे नाही तसेच दमणगंगा-पिंजाळ आणि तापी-नारपार या दोन नदीजोड प्रकल्पांद्वारे गुजरातला महाराष्ट्राचे पाणी देण्यास आपण विरोध केला होता. आपण एकटे असले तरी आपला विरोध किती जोरदार असतो हे १९८५ ला आपण शिवसेनेचे एकमेव आमदार असताना साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. 
                      आपल्यासारख्या झुंझार नेत्यावर वयाच्या सत्तरीत अशी वेळ येणे आणि आपले असे इतके हतबल होणे आपल्या विरोधकांना देखील पहावत नाही. आज महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झालेली असताना आपले तुरुंगात खितपत पडणे दुर्दैवी आहे. आपले जी बदनामी झाली, जे हाल झाले ते व्हायला नको होते. ज्याप्रमाणे पवारसाहेबांच्या अनुभवाचा फायदा अगदी विरोधकांना होतोय तसाच आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना झाला तर त्यात गैर ते काय? आपण चुकला असाल, आपल्याकडून काही गुन्हा घडलाही असेल पण आपण केलेला संघर्ष,  अतुलनीय आहे. आपली ही रोमांचकारी कारकीर्द इतरांना निश्चित मार्गदर्शक ठरेल, आपल्या जीवनाच्या धड्यातुन  काय घ्यायचं आणि काय नाही हे ज्याचे त्यांनी ठरवायचे.    
    आपणांस सत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (उगीचच गैरसमज होऊ नये म्हणून लक्ष,कोटी,अनंत असे शब्द वापरले नाहीत). 
                                                          ....संतोबा (संतोष गांजुरे)
   

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!