Ads 468x60px

Saturday, March 14, 2020

१) माय लेकरं - पार्श्वभूमी-१

               जवळपास बारा वर्षांपेक्षा अधिक काळ मी शिक्षणानिमित्त कोल्हापूरला आणि नोकरीनिमित्त मुंबईला असल्याने व त्याआधी शाळा कॉलेजच्याव्यतिरिक्त घराबाहेर फारसा फिरकत नसल्याने मला माझ्या स्वतःच्या गावात-पारगांवमध्येही फारसे लोक ओळखत नाहीत. काही दिवसांपूर्वी काही कामानिमित्त गावातील एका व्यक्तीस भेटायचे होते अर्थात त्यांनी मला पाहून ओळखले नाहीच पण ओळख सांगताच त्यांच्या डोळ्यातून अक्षरश: पाणी आलं. हा माझ्यासाठी नेहमीचाच अनुभव होता. पण त्या व्यक्तीबद्दलच्या वाईट ऐकीव अनुभवातून त्या व्यक्तीबद्दलचे माझे मत काहीसे नकारात्मक होते. त्यामुळे मला थोडेसे आश्चर्य वाटले, पण कोणतीही व्यक्ती वाईट नसते तर त्या व्यक्तीचे काही निर्णय, कामे चुकीची असू शकतात. चांगले-वाईट असणे हे केवळ एखाद्या घटनेपुरते मर्यादित असते याची जाणीव मला त्या व्यक्तीच्या डोळ्यातून आलेल्या अश्रूंनी करून दिली. लोकांच्या असे भावनिक व्हायला आणि डोळ्यांतून अश्रू यायला कारण म्हणजे माझ्या आईने अफाट केलेले कष्ट आणि आयुष्यभर खाललेल्या खस्ता. मी चांगल्या नोकरीला लागलो आहे, आईने केलेल्या कष्टाचं चीज झालं या भावनेतून लोकांच्या डोळ्यांतून समाधानाचे अश्रू येत असतात.
               खरंतर आईच्या खडतर संघर्षाची सुरुवात अगदी तिच्या लहानपणापासूनच झाली, आई लहान असतानाच काही आजाराने आजी वारली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यात आईचे छत्र हरवलेले. एकूण तिघीं बहिणी व एक भाऊ अशी चौघे भावंडे. त्या काळात मुलींची लग्ने लवकर व्हायची, थोरल्या मावशीचे लग्न झाल्यानंतर घरची सर्व जबाबदारी आईवर आली. घरदार सांभाळून सर्वांना मजुरीला जावे लागे. पारगांव पासून अगदी दिवे घाटा पर्यंत पायी चालत जाऊन खड्डे खोदण्याचे काम आईने केले, तसेच घरदार सांभाळून मावशी व मामाचा सांभाळ केला. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मामा व्यतिरिक्त इतरांना काहीही शिक्षण मिळाले नाही. सर्व कुटुंबाची शेतमजुरी आणि दुष्काळी कामे यावरच गुजराण होत होती. आजोबा(नाना) देखील प्रचंड कष्ट करायचे अगदी खड्डे खोदणे, खडी फोडणे, बोरींग लावण्यापासून ते गुळाचे गुऱ्हाळ चालवण्यापर्यंत सर्व कामे केली, त्या गुऱ्हाळावरूनच त्यांना गुळवे हे नाव पडले. नारायण गुळवे नावाने ते जास्त परिचित झाले.
              माहेरची ही अशी बिकट परिस्थिती, अशा परिस्थितीत मुलीचं लग्न कसे करायचे हा मोठा यक्षप्रश्न. हा प्रश्न सोडवणारे स्थळ आईसाठी सांगून आले. स्थळ दुसावट्याचे असले तरी गावातील होते त्यामुळे देण्याघेण्याचा मोठा प्रश्न नव्हता शिवाय एकाच गावात असल्याने माहेरी पण लक्ष देता येणार होते त्यामुळे नानांचा (आजोबा) होकारच होता पण स्थळ दुसावट्याचे असल्याने भविष्यात आपल्याला काय भोगावे लागणार आहे याची प्रचिती आईला आली होती. साहजिकच त्यामुळे आईचा नकार होता पण नाईलाजाने आणि थोरामोठ्यांच्या आग्रहाने आई लग्न करून सासरी आली. सासरी बऱ्यापैकी शेती, बैल-बारदाना, गाई, बकरी असा सारा लवाजमा होता. फार श्रीमंत नसले तरी मुबलक धनधान्य होते. कमी होती ती वंशाच्या दिव्याची आणि वंशाला दिवा हवा याचसाठी दुसऱ्या लग्नाचा घाट घातला होता.त्यामुळे अपेक्षा एकदम स्पष्टच होती. लग्नासाठी दादांची (आजोबा) जास्त आग्रही होते, वडिलांची मात्र दुसऱ्या लग्नाची अजिबात इच्छा नव्हती त्यांनाही सर्वांच्या आग्रहाने लग्न करण्यास भाग पडले.
              लग्नानंतर आईच्या गळ्यात शेतीकामासोबतच बकरी चरण्यासाठी नेण्याची जबाबदारी पडली. घरात धान्य असले तरी रोज खायला कोंड्याची भाकरी मिळायची. दिवसभर कष्ट त्याचबरोबर रात्री चुलीवरच्या स्वयंपाकाचे दिव्य, इकडून तिकडून गोळा केलेले सरपण, त्याचा प्रचंड धूर, पावसाळ्यात तर केवळ चूल पेटवणे हेच मोठे दिव्य असायचे एवढं सगळे करून घरातील धुसफूस, वादाने दोन घास सुखाने खाता यायचे नाही. सकाळी ह्या विहिरीचा उपासा झालाय तर त्या विहिरीला कासरा पुरत नाही म्हणून या विहिरीवरून त्या विहिरीवर अशी पाण्यासाठी वणवण करावी लागायची.  कष्ट, सासुरवास, त्याच जोडीला दोघी सवतींची धुसफूस होती. त्यामुळे सासर-माहेर हा प्रवास सतत चालू होता आणि त्याबरोबर चालू होता कष्टाचा प्रवास त्यात सासर-माहेर असा भेद नव्हता. कष्ट सर्वांच्याच वाट्याला कमी अधिक प्रमाणात असले तरी सोबत चार -दोन सुखाचे क्षणही तिच्या वाट्याला येत नव्हते. शारिरीक कष्टाबरोबरच मानसिक कोंढमारा ही होत होता. आला दिवस कसातरी ढकलणे एवढंच तिच्या हातात होते.
              या सर्व गदारोळात वंशाला दिवा मिळण्याचा मुख्य उद्देश होता त्यास एक तपानंतर यश आले. सर्व कुटुंब, पै पाहुणे, आत्या, काका, मामा, मावश्या सर्वांना आनंद झाला. एवढ्या उशिरा का होईना पण घरादाराला वारस मिळाल्याचे सर्वांनाच कौतुक होते. सर्वांना आनंद झाला म्हणून आनंदाने नाव संतोष ठेवले. आनंद सगळ्यांना झाला असला तरी माझी सारी जबाबदारी मात्र आईवरच होती. तिच्या हालअपेष्टामध्ये फार काही बदल पडला नाही. नेहमीचे भांडणतंटे, धुसफूस यामुळे आईला बराच काळ माहेरीच रहावे लागत असे. मामा नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्यामुळे (नानांची)आजोबा आणि शेतीची जबाबदारी आईच्या वाट्याला आली. शेतात खुरपणी,काढणी वगैरे काही कामे असली की वडिल एखाद्या दिवशी यायचे आणि आई विनातक्रार कामाला जायची. सासर असो वा माहेर दोन्हीकडे फक्त कष्टच वाट्याला आले होते. आई कष्ट दोन्हीकडे करत असली तरी तिला घरखर्च मात्र मोलमजुरी करूनच भागवावा लागत होता.

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!