Ads 468x60px

Friday, October 21, 2022

एक पत्र गडकरीसाहेबांना.

 प्रति,

 मा. नितीन गडकरीसाहेब,

रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री भारत सरकार.

विषय - शहरातील वाहतूकव्यवस्थेचा बोजवारा.

               सर्वप्रथम मी आपली माफी मागतो की प्रबळ राजकीय इच्छशक्तीच्या जोरावर दोन शहरांमधील अंतर कमी करण्याचा धडाका लावणाऱ्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवनवीन योजना कार्यान्वित करून लोकांचा प्रवास सुखाचा करण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कर्तृत्ववान मंत्री महोदयांना शहरातील, गल्लीबोळातील न फुटणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी मी पत्र लिहीत आहे. ही अडचण जरी चिल्लर वाटत असली तरी रस्त्यावरच्या खड्डयांनी आणि अगणित स्पिडब्रेकर्सनीं सर्वसामान्य जनतेची गाडी आणि बॉडी चिल्लर प्रमाणे खुळखुळी केली आहे. आज आपण दिल्ली-मुंबई प्रवास १२ तासांवर आणायचा प्रयत्न करत असताना शहरातल्या शहरात एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी १५-२० किलोमीटर अंतरासाठी दीड-दोन तास लागत आहेत. लोकांचा दिवसातील सरासरी दोन-तीन तासांचा वेळ प्रवासातच जातो. सद्या इतर कोणापेक्षाही आपल्याला  जास्त पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याची इच्छा आहे असे दिसत आहे, केवळ त्यामुळेच मध्यंतरी आपण पुण्यात हवाईबस आणण्याबद्दलचे सूतोवाच केले होते. आजपर्यंत जनतेला स्वप्न विकून सत्ता मिळवणारे भरपूर झालेत पण जनतेच्या स्वप्नांना पंख लावून देणारे नेते केवळ आपण आहात. आपली कामगिरी निश्चितच धडाकेबाज आहे त्यामुळे सर्वपक्षीयलोकांमध्ये आपल्याबद्दल आदर आहे.  आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे, स्पष्टवक्तेपणामुळे आणि सर्वांसोबत असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळे आपल्या आणि दिल्ली मध्ये मात्र दुरावा वाढल्याचे चित्र आहे. नेहमी सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जात असला तरी सह्याद्रीला सापत्न वागणूक मिळते हे काही नवीन नाही.

            असो, आपल्याला रोज भेडसावणाऱ्या समस्या बाजूला ठेवून जिथे आपल्या हातात काहीही नाही अशा राष्ट्रीय स्तरावरच्या समस्यांबद्दल आपल्याला तावातावाने वाद घालण्याची वाईट खोड आहे. आपण जो ज्वलंत आणि त्रासदायक मुद्दा आहे त्याबद्दल बोलू. प्रत्येकजण दररोजच्या वाहतूकोंडीमुळे त्रस्त आहे, त्यातून काही मार्ग निघण्याची चिन्हे नाहीत आणि त्यादिशेने कोणी प्रयत्न करत आहे असेही दिसत नाही. वाहतूककोंडीसाठी सगळ्यात जबाबदार आहे ते खड्ड्यांनी खिळखिळे झालेले, अतिक्रमणाने वेढलेले रस्ते, पहिल्या पावसाच्या केवळ चाहुलीने बंद पडणारे सिग्नल्स आणि जोडीला विविधतेने नटलेले गतिरोधक. ज्याप्रमाणे जगात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीप्रमाणे नसतो त्याप्रमाणे रस्त्यावरचे गतिरोधक एकसारखे नसतात हे स्पीडबेकर्स  कमी आणि गाडी-बॉडी ब्रेकर जास्त  वाटतात. शिवाय लोकं हवे तिथे हवे तसे गतिरोधक बनवत असतात. घरापासून मला पाचशे मीटर अंतरावर असलेल्या पुणे सोलापूर रोडला जाईपर्यंत दहा गतिरोधक लागत, काही गतिरोधक रेडिमेड आहेत तरी ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. गतिरोधक वेग कमी करण्यासाठी असतात, वेग कमी नाही केला तर गाडी रस्त्यावर थोडी आदळेल व वेग कमी केला तर आदळणार नाही अशा पद्धतीने गतिरोधक बनवायला हवेत पण कितीही वेग कमी केला तरी गाडी गतिरोधकांवरून आदळतेच. कित्येक अवजड वाहने खड्डेयुक्त रस्त्यांमुळे रस्त्याच्या मधोमध बंद पडून वाहतुककोंडीत भर घालत असतात. याशिवाय बेशिस्त वाहनचालक त्यात भर घालत असतात, त्यात दुचाकीस्वार आणि रिक्षावाले आघाडीवर असतात, सर्वात जास्त घाई त्यांनाच असते. बहुतेक चौकात सिग्नलच्या लगतच बस आणि रिक्षा थांबा असतो त्यात भरीस भर आपला अमूल्य वेळ वाचवण्यासाठी रिक्षावाले राँगसाईडने येतात त्यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते अजून निमुळते होत जातात त्यामुळे सिग्नल सुटला तरी निमुळते रस्ते आणि खड्ड्यांमुळे वाहने कासवगतीने पुढे सरकत राहतात.

                      मुंढवा ब्रिजवर तर हे नेहमीचेच आहे. मुंढवा ब्रीज आणि चौकातील सिग्नल पार करण्यासाठी अर्धा किलोमीटरहून कमी अंतरासाठी  जाताना सरासरी अर्धा तास आणि येताना तेवढाच वेळ लागतो. रोज ऑफिसला जाण्यासाठी पंधरा किलोमीटर अंतरासाठी रोज दीड तास लागतो. गाडी कोणतीही असली तरी सरासरी दहाच्यावार स्पीड जात नाही. हे रोजच असलेले तरी लोकं नाईलाजाने अंगवळणी पडल्याप्रमाणे रडत कढत ये-जा करत असतात पण असल्या कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिका आणि रुग्णांचे काय, कित्येक जीव या जीवघेण्याकोंडीत तडफडून गेले असतील , कित्येक संसार या वाहतूक कोंडी मुळे उघड्यावर पडले असतील. पुनर्जन्मावर काही लोकांचा विश्वास असेल नसेल पण खड्ड्यांचा पुनर्जन्म यावर बहुतांश लोकांचा विश्वास नक्कीच असेल कारण एकदा मलमपट्टी केलेले खड्डे चार दोन दिवसात हळूहळू मूळ रूपात दिसू लागतात आणि काही दिवसातच परत जसे होते तसे मूळ रूप धारण करतात. थोडाजरी पाऊस सुरू झाला की महाराष्ट्रातील कोणत्याही भागातले रस्त्यावरील खड्डयांचे फोटो पाहिले की ते आपल्याच रस्त्यावरचे आहेत काही असे वाटावे, इतकी त्या खड्ड्यांच्या विविधेत एकता असते आणि ट्रॅफिक सिग्नलचे तर बोलायलाच नको इतके ते हवामान खात्यापेक्षा बिनचूक अंदाजाने , अगदी पावसाळी वातावरण जरी निर्माण झाले  तरी झाले तरी ते बंद पडतात.या वाहतूककोंडी आणि फुटफुटांवर ठिगळं लावलेल्या रस्त्यावरून प्रवास करायचा म्हणला तरी अंगावर अक्षरशः काटा येतो, अनेकांना त्यामुळे पाठ आणि मणक्याचे दुखणे चालू झाले आहेत त्यातील मी एक आहे.   

                    वाहतूक कोंडीसाठी वाहतूक पोलिसांना जबाबदार ठरवणे त्यांच्यावर अन्यायकारक आहे.  बिचारे  भरचौकात, कधी भरपावसात तर कधी उन्हातान्हात, कर्णकर्कश गोंगाटात, श्वास गुदमरणाऱ्या प्रदूषित हवेत उभे राहून त्यांच्यापरीने कर्तव्ये बजावत असतात. खरंतर ते हुकुमाचे ताबेदार आहेत शासन - प्रशासन त्यांना जे आदेश देईल त्याचे ते पालन करतात. आपणच त्यांना दंड वसुलीचे टार्गेट देत असू तर त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे. वाहतूक पोलिसांची कार्यक्षमता आपण त्यांनी गोळा केलेल्या दंडाच्या रकमेवरून ठरवतो की त्यांनी वाहतूक किती चांगल्या प्रकारे सुरळीत ठेवली यावर ठरवतो हे महत्वाचे आहे. जर त्यांच्या कामाचे मूल्यमापन त्यांनी जमा केलेल्या दंडाच्या रकमेवर ठरवत असू तर पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न का करतील?.त्यामुळे एका बाजूलाट्रॅफिकचा बोजवारा उडत असताना वाहतूक पोलीस वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आहेत की फक्त दंड गोळा करण्यासाठी आहेत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला न पडला तर नवलच. वाहतूक सुरळीत चालावी म्हणून दंड वसुलीचे टार्गेट न ठेवता, कोण किती चांगल्याप्रकारे वाहतूककोंडीची परिस्थिती हाताळतोय, ती न होण्यासाठी प्रयत्न करतोय यावरून त्यांच्या कामाचे मूल्यमापन करावे आणि त्यानुसार त्यांना योग्य तो प्रोत्साहन भत्ता द्यावा असे केल्याने अधिकारी,कर्मचारीवर्गाची वाहतूककोंडीकडे आणि वाहतूकनियंत्रणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलायला मदत होईल.

             बऱ्याच जणांचे असे म्हणणे आहे की, रस्त्यांचे नियमित ऑडिट केले पाहिजे. पण सगळ्यांना माहिती आहे कोणाला कसे मॅनेज करता येते. खरंतर ऑडिटसाठी कोणा एजन्सीला नेमण्याची गरज नाही, आणि त्यासाठी पैसेही खर्च करण्याची गरज नाही. रस्त्याच्या ऑडिटसाठी पाऊसापेक्षा जास्त चांगला ऑडिटर दुसरा कोणीही नाही, शिवाय रस्त्याबरोबर तो ट्रॅफिक सिग्नलचेही ऑडिट चांगल्याप्रकारे करतो. रस्ते बनवणाऱ्या, दुरुस्त करणाऱ्या ठेकेदाराची किमान २०% रक्कम रस्त्यांचे पावसाने ऑडिट केल्यानंतर ते पास झाल्यानंतरच अदा करण्यात यावी अन्यथा पास न झाल्यास दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात यावी. सध्या पुण्यात पावसांमुळे रस्ते जलमय होऊन प्रचंड वाहतूककोंडी होत आहे, ज्याप्रमाणे आपण हवाईबसचा विचार करत आहात तसे आता जलवाहतूक करता येतेय का त्याची चाचपणी करा म्हणजे खड्डे पडायचा, ते बुजवण्याचा त्रास नको. सर्वसामान्य जनतेला पायभूत सुविधांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे पण शासन प्रशासनाला त्याचे काही देणेघेणे आहे का तेच कळत नाही. हडपसर परिसरातील  स्वच्छतेची आणि छोटेमोठे खड्डे बुजवण्याची सिरम इन्स्टिट्यूटचा आदर पूनावला ग्रुप APCCI (Adar poonawalla Clean city initiative) जेवढी काळजी घेतो तेवढी काळजी महानगरपालिकेने घेतली तरी वेगळे चित्र दिसेल पण राजकारण्यांना एकमेकांची उणीधुनी काढण्यातून आणि स्वतःवर झालेल्या तथाकथित अन्यायाचे रडगाणे गाण्यातून जनतेच्या मूलभूत गरजा आणि अडचणींकडे लक्ष देण्यास वेळ तरी मिळायला हवा आणि तो वेळ जेव्हा मिळेल तो सुदिनच म्हणावा लागेल. 

                                                               संतोबा....

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!