Ads 468x60px

Sunday, October 13, 2019

नातीगोती-२

हा एवढा आक्रोश, हा विलाप कशासाठी,
अन कशासाठी ही सगळी ढोंगं.
आता मी मेलोय, मी मेलोय,
मी मरतच होतो आयुष्यभर.
तुमच्या अपेक्षांचे ओझं पेलत,
अन्‌ जबाबदारीचा डोंगर उचलत.
झुकत होतो तुमच्या मानपानासाठी,
अन्‌ झटत होतो कायम नात्यांसाठी.
तरी घोटतच होती नाती, गळा आयुष्यभर.
जे तुम्हाला भेटणार नाही ते देत होतो,
स्वतः मात्र तडजोडी करत होतो.
वाढत जात होत्या तुमच्या अटीशर्ती,
पण कधीच होत नव्हती अपेक्षापूर्ती.
खरंतर भिरकावून द्यायला हवी होती,
त्याचवेळी ही असली मतलबी नाती.
पण आता मी मेलोय, मेलोय कायमस्वरूपी,
सुखी जगू दिलं नाही,शांत मरु तरी द्या.
कशाला हे रडणं-पडणं, हे ढोंगच सगळं.
आयुष्यभर छळलं, तेव्हा का न कळलं.
मी देणं तुम्ही घेणं, हिशोब नाही ठेवले.
सारं लुटले, झालो जरी मी कफल्लक.
आता न कसली उधारी, न शिल्लक.
सारं माफ तुम्हाला, जा घरी निवांत,
जळू द्या शेवटचं मला, द्या थोडा एकांत
अन्यथा, उठेन या धगधगत्या चितेमधून,
अन्‌ देईन ही पेटती लाकडे तुम्हांवर भिरकावून.
                                                संतोबा...

Wednesday, October 9, 2019

नातीगोती

विसरुनी सारे हेवेदावे,
नातीगोती जपावी मनोभावे.
असावा त्यात मायेचा ओलावा,
राग,लोभ,मत्सर कधी नसावा.
सत्याची सदा कास धरावी,
स्वार्थाची ना आस असावी.
फायद्याची ना बात करावी,
कायद्याची ना साथ करावी.
नात्यात नसावे कसले बंधन,
केवळ असावे प्रेमाचे कोंदण.
संकटी व्हावे एकमेकां आधार,
नाही भरवसा, जीवन क्षणभंगुर,
देणंघेणं, व्यवहार असावा चोख,
कधी नसावी त्यात कसली मेख.
हिशोब असावा असा रोकडा,
त्याने कधी न व्हावा झगडा.
खावे,प्यावे सुखी रहावे,
सुखा-समाधानाने जगावे.
दोन क्षण निवांत बसावे,
मायेचे चार शब्द बोलावे.
कोण काय सोबत नेती,
सारे काही इथेच सोडती.
म्हणोनी कार्य ऐसें निर्मळ करावे,
मरूनी किर्तीरूपी निरंतर उरावे.
                                           संतोबा...

Wednesday, October 2, 2019

भाषण १- महाराष्ट्र विधानसभा - २०१९

               नमस्कार, २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला मी उभा आहे, मला माहित आहे मी पडणार आहे एवढेच काय माझं डिपॉझिटही जप्त होईल. कारण माझ्याकडे ना कसली राजकीय पार्श्वभूमी आहे, ना माझ्यावर कुणा गॉडफादरचा हात आहे. ना माझ्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे ना कोणी हक्काचा मतदार आहे.  मला ना भडकावून जातीपातीच्या अस्मिता सांभाळता येतात, ना कार्यकर्त्यांच्या उन्मादाला खतपाणी घालायला येते.  मी ना कोणाच्या जयंत्या साजऱ्या करतो ना कोणत्या जातींच्या मेळाव्याला जातो. मला ना कोणाची बदनामी करता येते ना कोणाचे उदात्तीकरण करता येते. मला ना ओघवते बोलता येते, ना मला फर्राटेदार भाषण करता येते. मला ना कुणा अनोळखी व्यक्तीच्या, ज्याचं नावसुद्धा माहिती नाही अशा व्यक्तीच्या मयतीला जाऊन त्याचे गुणगान गाता येते. ना कोणाच्याही लग्नात जाऊन वऱ्हाडी मंडळींना ताटकळत ठेवत वधूवरांस राजकीय आशीर्वाद देता येतो. 

         अशा अनेक गोष्टी ज्या सध्याच्या राजकारणपूरक आहेत त्या माझ्याकडे नाहीत तरी मी लढणार आहे, संघर्ष करणार आहे. कदाचित माझ्याकडे नसलेल्या गोष्टीच मला सहाय्यभूत ठरतील. हा जो निवडणूक लढण्याचा निर्णय आहे तो पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधातून आहे. त्याचबरोबर तो हा प्रकल्प राबवताना शासनाने जी स्थानिक भूमिपुत्रांची मुस्कटदाबी करून बळीराजाबरोबरच पर्यावरण उद्ध्वस्त करून भांडवलशाहीचा फायदा करून देण्याचा जो घाट घातला आहे त्याचा निषेध म्हणूनही आहे. अर्थात ही तत्कालिक कारणे असली तरी किती दिवस आपण दगडापेक्षा वीट मऊ म्हणून प्रस्थापितांच्या पिढ्यांनपिढ्यांचे नेतृत्व स्वीकारणार आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. पिढ्यांनपिढ्यां नेतृत्व करणारे आज सरंजाम झाले आहेत. त्यांना सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काहीही देणंघेणं नाही. त्यांना फक्त आपली संस्थाने मजबूत करायची आहेत, स्वतःच्या येणाऱ्या पिढ्यांची सोय करायची आहे. ही संस्थाने जेवढी मजबूत तेवढी लोकशाहीस हानिकारक. सर्वसामान्यांचे भले व्हायचे असेल तर सत्तेचे आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण होणं गरजेचे आहे व यासाठी सर्वसामान्य जनतेने स्वतः शासन प्रशासनात कोणत्या न कोणत्या मार्गाने सहभागी होणे गरजेचे आहे.

            एक जागरूक मतदार म्हणून आपण एक सक्षम, कार्यक्षम सरकार निवडून देण्याचे कार्य पार पाडू शकतो. सरकार नेहमी आपले अपयश झाकण्यासाठी प्रादेशिक, भाषिक अशा विविध अस्मितांना खतपाणी घालत असते पण आपण त्यात वाहवत जाऊ नये. सरकार कोणाचे ही असू देत धार्मिक, जातीय, भाषिक, प्रादेशिक अस्मितेला बळी न पडता  मूलभूत गरजांसोबतच पायाभूत सुविधा, सामाजिक सुरक्षिततेची पूर्तता करून घेण्यासाठी सरकारवर सतत दबाव ठेवला पाहिजे.  दुबळा विरोधी पक्ष असेल आणि सरकार निरंकुश असेल तर त्याचे तात्काळ दुष्परिणाम नोकरदार आणि कष्टकरी वर्गाला भोगावे लागतात.बेरोजगारी,गुन्हेगारी वाढीस लागते, पर्यायाने सामाजिक स्वास्थ्य बिघडते, श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत जातो म्हणून जातपात-धर्म न पाहता ज्यांना आपल्या प्रश्नांची जाण आहे असे आपल्यातीलच लोकप्रतिनिधी विधानभवनात गेले पाहिजेत.

         माझा कोणत्याही पक्षाशी, संघटनेशी कसलाही संबंध नाही. माझी विचारसरणी जरी पुरोगामीत्वाकडे, समताधिष्ठित समाजव्यवस्थेकडे झुकणारी असली तरी मी कोणत्याही विचारसरणीचा कट्टर पुरस्कर्ता वा विरोधक नाही. मी फक्त प्रयत्नवादी आहे, इतर कोणताही वादी नाहीये. काम करण्याची माझी स्वतःची पद्धत आणि विचार करण्याची  स्वतंत्र विचारशैली आहे. माझा कोणताही छुपा अजेंडा नाहीये. आमचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक डी. के. सावंत सर यांच्याकडून मी राज्यशास्त्राचे धडे गिरवले आणि त्यातूनच राजकारणाबद्दल आकर्षण आणि आवड निर्माण झाली. राजकारण गलिच्छ आहे म्हणत किती दिवस हेटाळणी करत आपण राजकारणाप्रती अस्पृश्यता बाळगणार आहोत?.  खरंतर राजकारण हे दैवी कार्य आहे. आपल्या दूरदृष्टीने लोकोपयोगी निर्णय घेऊन गोर-गरीब, दिन-दुबळ्या, शोषित-वंचित लोकांच्या जीवनात बदल घडवण्याची ताकद राजकारणात आहे. सगळ्यांना न्याय देण्याचे, सगळ्यांची सुरक्षितता, स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे कार्य राजकारणाच्या माध्यमातून केलं जाऊ शकते. शाश्वत आणि सर्वांगीण बदल घडवायचा तर हाती सत्ता असणे गरजेचे आहे सत्तेशिवाय शहाणपण नाही असे म्हणतात ते उगीच नाही.

          हा लढा ,संघर्ष अगदी हत्ती आणि मुंगी सारखा एकदम विजोड, एकतर्फी वाटणारा आहे पण म्हणून तो लढायचा नाही का? हा लढा लढावाच लागेल अन्यथा सरंजामशाही, भांडवलशाही डोईजड होतील, लोकशाही धोक्यात येईल आणि आपण स्वातंत्र्य हरवून बसू. आज जर आपण लढण्यासाठी, हक्कांसाठी रस्त्यावर उतरलो नाही तर भविष्यात भीक मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. प्रस्थापित, संस्थानिकांच्या विरोधात आवाज उठवावा लागेल अन्यथा ते आपल्याला गृहीत धरतील आणि मनमानी कारभार करत राहतील. मी उभा राहतोय ते मत मागायला नाही तर मत मांडायला. मी कोणाच्या विरोधात नाही तर माझ्या स्वतःच्या बाजूने उभा राहतोय.मी कोणाचा बदला घ्यायला नाही तर बदल घडवायला उभा राहतोय. मला खात्री आहे आज ना उद्या मी यशस्वी होईल आणि हक्काने विधानभवनात जाईल.

                               🙏जय महाराष्ट्र🙏
       

Thursday, September 26, 2019

श्रद्धांजली

       
              श्री. तानाजी किसन गायकवाड(दादा) वय ६३ वर्षे यांचे गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांचे मुळगाव पुरंदर तालुक्यातील पारगांव मेमाणे, पारगांवमध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर व शेती आहे मात्र नोकरीनिमित्त जवळपास तीन पिढ्यापासून गायकवाड कुटूंब महादेवनगरमध्ये वास्तव्यास आहे.

         श्री तानाजी गायकवाड हे सिरम इन्स्टिट्यूट मध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून चाळीसहून अधिक वर्षे कार्यरत होते आणि सिरम इन्स्टिट्यूटमध्ये शेवटपर्यंत त्यांनी जबाबदारीने व निस्वार्थ भावनेने सेवा बजावली. त्यांचे वडील किसनराव गायकवाड हे कंपनीच्या स्थापनेपासून पुनावाला ग्रुप मध्ये कार्यरत होते. सध्या त्यांची मुले श्रीकांत व सनी हे दोघे अधिकारी म्हणून सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. अशा प्रकारे तीन पिढ्यापासून हे कुटुंबीय पुनावाला ग्रुपशी जोडले गेले आहे. चोख आणि प्रामाणिक काम यामुळे मा. श्री. सायरस पुनावाला यांचा प्रचंड विश्वास या कुटुंबावर आहे. कामाप्रतीची गुणवत्ता, सचोटी आणि प्रामाणिकपणा या जोरावर श्री. पुनावाला कुटुंबीयांशी त्यांचे घनिष्ट संबंध निर्माण झाले.

           त्याबरोबरच श्री. तानाजी गायकवाड यांनी महादेवनगर नागरी पतसंस्थेचे चेअरमनपद भूषवले होते. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गरजूंना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी अनेक गरजू तरुणांना रोजगार, नोकरी मिळवून देण्यासाठी हातभार लावला. त्याचबरोबर अनेक कौटुंबिक कार्यात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला व जबाबदारीने अनेक कार्ये पार पाडली. पै-पाहुण्यांना अडीअडचणीच्या काळात सढळ हस्ते मदत केली तसेच त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन केले.

       त्यांच्या पश्चात पत्नी छाया, मुले श्रीकांत व सनी, मुलगी माधुरी, तसेच वरदराज आणि राजवीर ही नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांनी दोन्ही मुले व मुलगी यांची लग्न कार्ये चांगल्या प्रकारे पार पाडली व तिघेही आपआपल्या संसारात सुखी आहेत. दादांनी  आयुष्यात सर्व जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्या, सर्वांनाच त्यांचा सहवास हवाहवासा वाटे मात्र आजाराचे निमित्त झाले, सर्वांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र दुर्दैवाने गुरुवारी दुपारी दोनच्या दरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. ईश्वरी सत्तेसमोर नाईलाज आहे. दादा नेहमी विचारांनी, तत्त्वांनी आणि संस्कारांनी आपल्यात असतील पण भौतिकदृष्ट्या आपणास त्यांचा सहवास लाभणार नाही हे कटू सत्य आपणास स्वीकारावेच लागेल.

     दादांच्या पुण्यआत्म्यास चिरशांती आणि सदगती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


Friday, September 20, 2019

बापमाणूस

       कोणत्याही पदापेक्षा काही लोक मोठे असतात त्यापैकीच दादा एक.  दादा भावकीच्या नात्याने मामा, मी शिक्षण आणि नोकरी निमित्त बाहेर असल्याने आणि त्यांचेही गावाकडे जास्त येणेंजाणे नसल्याने माझा त्यांच्यासोबत किंवा कुटुंबासोबत कधी संबंध आला नव्हता. माझे माधुरीशी लग्न झाल्यावर मामा-भाच्याच्या नात्याचे सासरे-जावयाच्या नात्यात रुपांतर झाले पण त्यांना सासरे किंवा मामा म्हणायला कधी माझी जीभ रेटली नाही. स्वतःच्या मुलांप्रमाणे किंबहुना जास्तच प्रेम त्यांनी माझ्यावर केले. आमची कसलीही अपेक्षा नव्हती त्यामुळे लग्नाच्यावेळी देण्याघेण्याबद्दल कसलीही बैठक झाली नाही तरी दादांनी सगळे आम्ही बघतो म्हणून सांगितले. इतर ठिकाणी पगार आणि प्रॉपर्टीचा पहिला प्रश्न विचारला जायचा मात्र दादांनी लग्नापूर्वी वा नंतरही ना माझ्या पगाराची ना प्रॉपर्टीची चौकशी केली. त्यावेळेसच मला त्यांचे वेगळेपण जाणवले. 
    
               कशाचीही अपेक्षा नसताना आणि काहीही न मागता दादांनी सारं काही दिले पण त्यांनी जे प्रेम,आपुलकी आणि मानपान दिला त्याला तोडच नाही. घरी चिकन,मटण काहीही जेवण बनवले की जेवायला घरी या म्हणून फोन येणार. मला एकवेळ दुष्मनाच्या घरी जेवायला काही वाटणार नाही पण नातेवाईकाच्या घरी जेवायचं म्हणजे दडपणच यायचं कारण नातेवाईक कधी काय उकरून काढतील त्याचा नेम नसतो. त्यामुळे सुरुवातीला माझा नकारच असायचा. मी काहीतरी कारण सांगून नाही म्हणलं की सनी, श्रीकांत आणि ते नसतील तर कोणीतरी पुढच्या दहा-पंधरा मिनिटांत माझ्यासाठी डबा घेऊन हजर असायचे आणि हे नेहमीच होऊ लागले शेवटी आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून मी स्वतःच जेवायला जाऊ लागलो, त्याच प्रमाण इतकं होते की बाकीच्या लोकांना मी घरजावई झालो की काय असा संशय यावा. जावयाची नेहमीची उठबस राहिली की दशमग्रह होतो असे म्हणतात पण मी रोज जरी घरी गेलो तरी माझी सर्व पद्धतशीरपणे उठबस व्हावी हा त्यांचा हट्टहास असे. 
   
            लग्नाच्या दीड वर्षांनंतर वरदराजचा जन्म झाला. त्याच्यावर तर त्यांचा खूप जीव होता आणि त्यांना त्याचे खूप कौतूक होते. थोरल्या मेहुण्यांचे(श्रीकांत) लग्न झाले त्यावेळेस ठरवलं की आता जाणे येणे कमी करायचे. नव्या पाहुण्यारावळ्यात हे सततचे येणेजाणे बरं दिसणार नाही शिवाय त्यांच्या नवीन सूनबाई कशा असतील याची कल्पना नाही. पण सर्व काही जसं आहे तसेच चालू राहिले. पुढे राजवीरचा जन्म झाला, धाकट्या मेहुण्यांचे(सनी)लग्न झाले पण त्यांच्या प्रेमात तसूभरही फरक पडला नाही उलट ते वाढत गेले. सुदैवाने त्यांच्या दोन्ही सुनबाई आणि त्यांच्या माहेरची मंडळी अतिशय सुसंस्कृत आणि माणुसकी असणारी आहेत त्यामुळे त्यांच्यात वावरताना मला कधी अवघडल्यासारखे झाले नाही.
       
           दादा एक निस्वार्थ, सामाजिक भान असलेले एक मनमिळावू व्यक्तिमत्त्व. ह्याच सामाजिक भानातून आणि निस्वार्थ भावनेतून दादांनी कित्येक गरजू तरुणांना नोकरी मिळवून देण्यास हातभार लावला, कित्येकांना निस्वार्थीपणे कसलीही अपेक्षा न करता सढळ हस्ते मदत केलीच शिवाय त्या मदतीचा कधी हिशोब ठेवला नाही. दादांची सामाजिक श्रीमंतीची ना तुलना होऊ शकते ना ती मोजता येऊ शकते. ह्या सामाजिक श्रीमंतीचा अनुभव मात्र वेळोवेळी आपण घेऊ शकतो. सिरम इन्स्टिट्यूटसारख्या जागतिक दर्जाच्या आणि आशियातील एक नंबर असलेल्या फार्मा कंपनीत कर्मचारी, अधिकारी  ते अगदी मालकापर्यंत सर्वांशी घनिष्ट संबंध असताना आणि अनेक अधिकार असताना गैरफायदा सोडाच पण फायदा घ्यायचाही विचार कधी दादांनी केला नाही. कर्म हाच त्यांचा धर्म होता, कंपनी हे त्यांचे दुसरे घरचं होते. स्वतः किती आजारी असले तरी विचार मात्र कंपनीचाच असायचा. शेवटच्या क्षणापर्यंत कंपनीच्या भरभराटीसाठी मोलाचा हातभार लावला.
           
               गेल्या काही दिवसांपासून दादांची प्रकृती बरी नव्हती. जवळपास आठवडाभर सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, दादांनीही आठवडाभर जिद्दीने लढा दिला पण दुर्दैवाने काल १९-०९-१९ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दादा भौतिक रूपाने आपल्याला सोडून गेले. दादांसारखा बापमाणसाचे छत्र हरवल्याचे दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही. एखाद्याच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला, जीवनात पोकळी निर्माण झाली म्हणजे नक्की काय याची जाणीव आता व्हायला लागली आहे. दादा शरीररूपाने जरी आपल्यात नसतील तरी त्यांचे संस्कार, तत्व, विचार हे आम्हांस कायम प्रेरणा देत राहतील. दादां नेहमीच प्रेमळ आठवणी रूपाने आपल्या हृदयात अजरामर असतील. 

💐दादांना गांजुरे,गायकवाड परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐

Saturday, September 14, 2019

माझा जाहीरनामा - विधानसभा निवडणूक-२०१९

१) मी कायम सर्वांगीण विकासास प्राधान्य देईन मात्र विध्वंसक विकासाला माझा नेहमीच विरोध राहील.
अ) हजारो एकर जमिनीचे वाळवंट करून पुरंदरचा इतिहास-भूगोल बदलणाऱ्या, पर्यावरणाची अपरिमित हानी करणाऱ्या आणि स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्राणपणाने विरोध करील.
ब) शेती उद्योगास आर्थिक स्थैर्य आणि साह्य मिळण्यासाठी जोडधंदा गरजेचा आहे त्यास प्रोत्साहन आणि सहाय्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शेतमाल नाशवंत असल्याने मिळेल त्या किंमतीत विकावा लागतो म्हणून फळप्रक्रिया सारख्या शेतीपूरक लघुउद्योगांना प्राधान्य देऊन शिवारातील मालावर शिवारात प्रक्रिया करून त्याचे आयुर्मान आणि किंमत वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालवल्या जातील आणि कोठेही सुडाचे राजकारण न करता सर्वांना योग्य प्रकारे पाणी वाटप केले जाईल.

२) पुरोगामी महाराष्ट्राचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करीन.
अ) जातीय अस्मितेचे अवडंबर माजवणार नाही,कोणत्याही जातीय कार्यक्रमात हजेरी लावणार नाही आणि जातीच्या नावाने दिलेला पुरस्कार स्विकारणार नाही. जातीव्यवस्था हे भारतीय समाजाचे कधीही न बदलणारे भीषण वास्तव आहे. केवळ आडनावे बदलून/लपवून किंवा आंतरजातीय विवाह करून जातीव्यवस्था संपुष्टात येणार नाही, आंतरजातीय विवाहाने फारतर मुलींची जात बदलेल इतकंच. दुर्दैवाने नजीकच्या काळात तरी जातीयव्यवस्था संपूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता दिसत नसली तरी जातीजातींमधील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दरी सांधून जातिभेदाची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करेन.
ब) सर्वांना शिक्षण मिळेल तसेच आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही अर्ध्यातून शाळा सोडवी लागणार नाही अशी तजवीज केली जाईल. बसच्या पासला पैसे नाहीत म्हणून अडीचशे-तीनशे रुपयांसाठी कोणासही आत्महत्या करावी लागणार नाही याची काळजी घेईन तसेच शालेय शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करेन.

३) मी राजकारण आणि समाजकारण यांची सरमिसळ करणार नाही.
अ) राज्यशासनाच्या विविध योजना मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहोचवण्याची आणि त्यांची व्यस्थित अंमलबजावणी करण्याची काळजी घेईन. मतदारसंघातील विविध समस्या सभागृहात जबाबदारीने मांडण्याचा प्रयत्न करीन तसेच जनतेच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा सरकारपुढे मांडण्यात येतील. शेतकरी, कामगारवर्गासाठी जाचक वाटणाऱ्या कायद्यात योग्य त्या दुरुस्ती सुचवण्यात येतील.
ब) कोणत्याही खाजगी कार्यक्रमास(लग्न समारंभ, नामकरण विधी, वाढदिवस, मयत, दशक्रियाविधी इ.).  उपस्थित राहणार नाही. सत्कार आणि दोन शब्दाच्या नावाखाली कार्यक्रमास जमलेला जनसमुदायाला रखडवणार नाही. मी मतदारसंघात रक्षाबंधनाला साडी, दिवाळीला फराळ वाटून जनतेच्या आत्मसन्माला, स्वाभिमानाला ठेच पोहचवणार नाही. त्यापेक्षा जीवनमान कसे उंचावेल आणि सणवार साजरा करण्यासाठी कोणाच्याही मेहेरबानीवर अवलंबून रहावे लागणार नाही यासाठी प्रयत्न करेन . तीर्थयात्रा, हळदी-कुंकू समारंभ इ. आयोजित करून लोकांच्या श्रद्धेचा, अस्मितेचा बाजार मांडून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणार नाही.

४)स्त्री स्वावलंबन आणि मानव समतेचा पुरस्कार करेन.
अ) स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीला आणि तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला पुरुषप्रधान संस्कृती बरोबरच तिचे परावलंबित्व जबाबदार आहे, स्रियांना फक्त शिक्षणच न देता शिकवून स्वतःच्या पायावर उभे करणे गरजेचे आहे. स्रिया ज्यावेळी स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकतील त्यावेळीच त्या सक्षम आणि सबल होतील. केवळ कायदे करून त्यांना हक्क आणि सन्मान मिळणार नाहीत. स्रियांना व्यावसायिक शिक्षण,नोकरी आणि उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहन आणि सहाय्य देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
ब) स्त्रीपुरुष समानता ही संकल्पनाच चुकीची आहे, स्त्री -पुरुषांमध्ये भेदभावच करता येऊ शकत नाही. दोघांनाही जीवन जगण्याचे समान हक्क नैसर्गिकरित्या प्राप्त आहेत, शिवाय जास्तीच्या जबाबदारीसाठी स्रियांना जास्तीचे हक्क आपसूकच मिळायला हवेत. व्यक्तिव्यक्तीत स्त्री-पुरुष, जातीधर्माच्या आधारे भेदभाव करता येणार नाही. मी भेदभाव विरहित, समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करेन.

५)कोणतीही गोष्ट मोफत देण्याचे प्रलोभन न देता, कष्टाचा योग्य तो मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न करीन.
अ) निवडणूकपूर्व अनेकजण अनेक गोष्टी मोफत देण्याच्या घोषणा देत असतात मात्र कोणतीही गोष्ट फुकट मिळत नसते, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्याची वसुली ही केलीच जाते. मी असल्या थिल्लर घोषणा करण्यापेक्षा लोकांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील राहील.
ब) सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून करून तरुण पिढी इथे तिथे सतरंज्या न उचलता स्वतःच रोजगार मिळवून सन्मानाने कुटुंबाचे पालन पोषण आणि गरजा पूर्ण करतील आणि कोणाच्याही मेहरबानीवर विसंबून राहणार नाही.

६)आमदार निधीचा सुयोग्य विनियोग आणि राज्य सरकारच्या योजनांची योग्य अंमलबजावणी.
अ)मतदार संघात बैठका घेऊन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने
मतदारसंघात कोणती महत्त्वाची कामे व्हायला हवीत हे जाणून घेऊन जास्त गरजेची कामे आमदार निधीचा सुयोग्य वापर करून पूर्ण करण्यात येतील.या कामाचा ठेका नातेवाईक, कार्यकर्ते यांना न देता योग्य त्या ठेकेदाराला काम देण्यात येईल.काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा व खर्चाचा तपशील जाहीर करण्यात येईल. मी माझ्या अखत्यारीत येणाऱ्या कामाव्यतिरिक्त इतर(स्थानिक स्वराज्य संस्थांच्या) कामांत हस्तक्षेप करणार नाही आणि त्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार नाही.
ब) राज्य सरकारच्या जास्तीत जास्त योजना राबवण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच मतदारसंघात राबवल्या जाणाऱ्या राज्य सरकारच्या योजनांचे सर्व तपशील - मंजूर निधी, खर्च, योजनेचे फायदे आणि परिणाम इ. सत्य माहिती जाहीर केली जाईल.

७) कृषी पर्यटनास चालना तसेच शहरी नोकरदार आणि ग्रामीण शेतकरी यांच्यामधील गैरसमजाची दरी सांधण्यासाठी प्रयत्न.
अ) शेतकऱ्यांना टॅक्स भरावा लागत नाही, दर निवडणूका आधी कर्ज माफी मिळते, अनेक सवलती,अनुदान आणि नुकसान भरपाई मिळते असे अनेक गैरसमज शेतकऱ्यांबाबत शहरी नोकरदारांमध्ये आहेत. तसेच नोकरदारांना एसीमध्ये आरामात बसून महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो, कंपन्याकडून सर्व सुखसुविधा मिळतात असा समज कष्टकरी वर्गाचा झालेला असतो.
खरंतर हे दोन्ही वर्ग हे शोषित आहेत. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कष्टाला सीमा नाही, त्या कष्टाचा योग्य मोबदला ही मिळत नाही. त्याप्रमाणेच आता १० ते ५ काम ही नोकरीची संकल्पना कालबाह्य झाली असून रोजची टार्गेट पूर्ण करण्यासाठी दहा-बारा तास काम करावे लागते आणि त्याचा काही वेगळा मोबदला भेटत नाही,त्या कष्टाचा मेवा भलतेच खाऊन जातात. मुलांचे शिक्षण,घराचे हप्ते आणि वाढत्या महागाई तोंड देत कुटुंब चालवण्याची तारेवरची कसरत नोकरदार वर्गाला करावी लागते आहे.
ब) कृषी पर्यटनास प्रोत्साहन देऊन या दोन्ही वर्गातील अदृश्य वैरभाव संपवून सामाजिक ऋणानुबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरून दोन्ही वर्गांना एकमेकांच्या समस्यांची जाणीव तर होईलच शिवाय नोकरदारवर्गास महिन्यातून चार-दोन दिवस का होईना निसर्गाच्या सानिध्यात घालवता येतील, त्याबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या कामात थोडीफार मदत करता येईल. शिवाय स्वकष्टाने पिकवलेले अन्न खाल्ल्याचे समाधान लाभेल. शेतकऱ्यांना देखील थोडा का होईना माल दलालाविना थेट विकता येईल व वाहतूक, दलाली खर्च वाचून चार अधिकचे पैसे मिळतील. मी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना मध्यस्थ, दलालविरहित व्यापार साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न करेन.
                           
                                                                                                     संतोष बबन गांजुरे.
                                                                                     स्वतंत्र उमेदवार- महाराष्ट्र विधानसभा २०१९.

Sunday, July 14, 2019

मैत्र जिवाभावाचे!!!

                आजच्या धावपळीच्या युगात माणूस एकलकोंडा होत चालला आहे. तंत्रज्ञानामुळे जग मुठीत आलयं पण त्यातील माणसे, आठवणी, नाती निसटून गेलीत.  पण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक वर्षांपासून शिक्षणानंतर विविध कारणांनी दुरावलेली लोकं पुन्हा एकत्र येत आहेत. रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नातं फार जवळचे असते. नातेवाईकांकडे गेले की दुःखावरच्या खपल्या काढल्या जातात. शेतीचं काय,कोर्ट केसचा निकाल काय, फ्लॅट, गाडी, नोकरी नको ते विषय काढले जातात पण मैत्रीचं नाते टाईम मशीन सारखे असते, क्षणभरात ते तुम्हाला शाळा, कॉलेजात घेऊन जाते. परवा बऱ्याच दिवसांनी एका मित्राचा कॉल आला, पहिलाच प्रश्न होता काय रे ती आठवतेय का? पण सध्या मी काय करतोय हे महत्वाचे असल्याने, "सध्या ती काय करते" हे न विचारता विषयाला सराईतपणे कलाटणी दिली. मात्र तरी मन पस्तिशीतून विशीकडे क्षणभरात पोहचलेच.
            जीवनाच्या विविध टप्प्यावर अनेक मित्र व त्यांचे ग्रुप्स निर्माण झालेत. ज्यावेळी पारगांवातील, शाळेतील मित्रांसोबत असतो त्यावेळी ते दिवस आठवतात ज्यावेळेस चिंचा, बोरे, आंबा, जांभूळ, पेरू हे विकत घेऊन खायच्या गोष्टी आहेत याची कल्पनाही नसायची. दिवस दिवस क्रिकेट खेळणे, तासनतास पोहणे. पावसात चिंब भिजणे, पाऊस थांबल्याबरोबर माळरानावर खळखळणार पाणी पाहायला जाणे, त्या वाहत्या पाण्यावर धरणे बांधणे,  शाळेतील गंमती जमती, शिक्षक त्यांची विविध लकबी, त्यांच्या केलेल्या नकला सगळ्यांची उजळणी होऊन तो कधीही न येणारा काळ जिवंत होतो. कॉलेजात इतर गावांतील मुलांमुळे मित्र परिवार विस्तारला. तिथल्या वेगळ्याच गंमती, शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीपासून अगदी बसस्थानक नियंत्रकाच्या "सासवड-सुपा बस क्रमांक ४५१७ फलाट क्रमांक आठला लागलेली आहे". या उद्घघोषणेपर्यंत सारं काही मनाच्या एका कोपऱ्यात कोरलेलं आहेत. पुढे डिप्लोमासाठी कोल्हापूरला जावं लागल्यावर सगळ्याच गोष्टी सोबत जुळवून घ्यावं लागले पण आवडत्या राज्यशास्त्र, सहकार, शिक्षणशास्त्र सोडून अजिबात न उमगणाऱ्या फिजिक्स, मैथ्सशी कधीच जुळवून घेता आले नाही. पण ते सारं काही आयुष्याला कलाटणी देणारे होते.
               काळाच्या ओघात खूप काही बदललंय, खूप काही नष्ट झालंय. पण त्या आठवणी कुठे तरी खोलवर रुतून बसल्या आहेत. शाळा, कॉलेजात बेंच, हॉस्टेलच्या रूम्सच नाही तर त्यावेळेसचा काळही एकमेकांशी शेअर केला होता. आजकाल तंत्रज्ञानाच्या अविष्काराने सारं काही सहज शेअर करता येत असले तरी आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर  केलेल्या संघर्षाच्या,उपद्व्यापाच्या अनेक कडू गोड आठवणी असणारी आमची शेवटचीच पिढी असेल की काय असे वाटतंय. या आठवणी अशाच जपल्या पाहिजेत आणि जमेल त्यावेळेस एकत्र जमून त्याची उजळणी केली पाहिजे. आजच्या धक्काधक्कीच्या तेच क्षण तुम्हाला नवचैतन्य प्राप्त करून देतील आणि कोणत्याही बऱ्यावाईट काळात जगण्याचे बळही देतील. 
                                                                 संतोबा.....

Saturday, June 8, 2019

मी आणि माझी अहंकारीक वचने - १६

वर्तमानात मार्गक्रमण करत असताना, आपण भूतकाळात डोकावत असू तर भविष्यात आपण निश्चित अडखळणारच. जे होते, जे झालंय, त्यापेक्षा जे चाललं आहे आणि जे होणार आहे ते महत्वाचे.

##########################################
स्वकर्तुत्वाने यशस्वी होताना, बदनामीची भीती बाळगून चालत नाही. जे आपल्याशी बरोबरी करू शकत नाहीत, ते निश्चितपणे आपली बदनामी करतात.

##########################################
कधी कधी पात्रता नसणे ही एखाद्या पदाची पात्रता असू शकते. यामध्ये पात्र व्यक्तींवर अन्याय वगैरे नसून उच्चपदस्थाने आपल्या पदाला धोका होऊ नये म्हणून घेतलेली ती काळजी असते.

##########################################
अनायासे मिळालेल्या गोष्टींच्याप्रतीची (आई-वडील,देश,धर्म,वंश,भाषा,प्रांत इ.) जबाबदारी, आपण त्या गोष्टींचे उदात्तीकरण करून साळसूदपणे झटकत असतो.

##########################################
कितीही चांगली असो वा वाईट असो, कोणत्याही एकाच गोष्टीशी (विचारसरणी, व्यक्ती, आदर्श,पक्ष इ.) आपल्या निष्ठा बांधील नसाव्यात. अन्यथा ही एकनिष्ठता कट्टरवादाकडे झुकते आणि कोणताही कट्टरता वाद हा वाईटच असतो.
                                                                                                                                                             संतोबा...

मी आणि माझी अहंकारीक वचने - १५

राजकारणाला समाजकारणाची बाधा झाल्यापासून राजकारणाची वाताहत झाली आहे!

########################################
उन्माद आणि कट्टरता ही अशी दुधारी तलवार आहे जी विरोधकांसोबतच 
समर्थकांनादेखील घायाळ करते...

########################################
निवडणुका हा भारतीय लोकशाहीचा सर्वात पवित्र सण आहे. मतदानाचा हक्क बजावून त्यात मोठ्या उत्साहाने सामील होऊ. सर्वांगिण सार्वभौमत्व टिकवण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे.  द्वेषाचे आणि फुक्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांना नाकारून सामाजिक भान असलेल्या, सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्यांना निवडून देऊया. तसेच वांझोटया अस्मितावाली दूतोंडी गांडूळ परत आढळ'णार नाहीत याची काळजी घेऊ .

########################################
फक्त प्रतीके बदलणे म्हणजे बदल नव्हे ही तर केवळ तडजोड.

########################################
लेकराने भोकाड पसरले की बालहट्ट पुरवावाच लागतो. पण बेरकी बाप त्यातूनही त्याला धडा शिकवतोच.

                                                                                                                                                  संतोबा...

मी आणि माझी अहंकारीक वचने - १४

तुम्ही सगळे चांगलेच आहात, पण फक्त तुम्हीच चांगले आहात हा गैरसमज तेवढा दूर करा!

########################################
तायडे खरंय, 
येवढ्याशा आघाताने तू उन्मळून पडली असतीस, मात्र माझ्यासाठी ही क्षुल्लक गोष्ट आहे. 
तुला जेवढा आनंद झालाय, तेवढं दुःख मला झालेलं नाहीये. आणि तुझा हा असला आनंद, मला पाहवतही नाही. 
त्यामुळे यापुढे तू नेहमी जळतच राहशील, याची काळजी मी घेईन!!!

########################################
सहानुभूती आणि कौतुकाच्या प्र'गतीरोधकावर कधीही अडखळू नये. तसेही अपयशी ठरल्यावर सहानुभूती आणि मेल्यावर कौतुक आपसूकच वाट्याला येते.

########################################
घडलेल्या बऱ्या-वाईट घटनांमधून योग्य तो धडा घेतला नाही तर निकाल नकोसाच लागतो!!!

########################################
आयुष्य जगताना प्रत्येकाचा, प्रत्येक गोष्टींचा प्राधान्यक्रम वेगळा असू शकतो मात्र,
झालास का पास? किती टक्के?
भेटली का नोकरी, टेम्पररी की पर्मनंट?
घेतला का फ्लॅट, वन बीएचके की टू बीएचके ?
कोणती गाडी, टू व्हीलर की फोर व्हीलर?
कुठं जुळतंय का, अरेंज की लव्ह मॅरेज?
हलला का पाळणा, पेढा की बर्फी?
ऍडमिशन, स्कुल,पॅटर्न,प्रोमोशन,पगार अशी न संपणारी प्रश्नांची यादी.
या साचेबद्द प्रश्नांमुळे आयुष्य एकसुरी होते, आणि जगायचेच राहून जाते. अशा प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी रोज मरावं लागते. ज्याला खरोखर मनमुराद आयुष्य जगायचे त्याने अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या फार जास्त भानगडीत न पडता, रोज आपण जगतोय की मरतोय या प्रश्नांचे उत्तर शोधावं.

                                                                                                                                                        संतोबा...

माहेरवाशीण!!!

काय होतंय, काही कळत नाही.
रोजचा बेधुंद गंध, दरवळत नाही.
प्रेमाचा इंद्रधनु, रंग उधळत नाही.
रात्र सरत नाही,दिवस पुरत नाही.
तुझ्याविण बाकी काही उरत नाही.
काय होतंय, काही कळत नाही.
सारं काही शांत,शब्द बोलत नाही.
कोणी हसत नाही, कोणी रुसत नाही.
कोणी चिढत नाही, कोणी रागावत नाही.
तुझ्या आठवणीइतकं, कोणी छळत नाही.
काय होतंय, काही कळत नाही.
सगळं शोधातोय, काहीच मिळत नाही.
काही सुकत नाही, काही वाळत नाही.
काय हवं काय नको, कोणी विचारत नाही.
खरंय, तुझ्या वाचून माझं पान हलत नाही.
काय होतंय, काही कळत नाही.
सारेच साथीला, तुजसम ठाम सोबत नाही.
आहेत चिक्कार, तुजसम कोणी जगात नाही.
कितीदा खूणवावे, तुज काही समजत नाही.
कितीदा बोलवावे तुज, तू काही येत नाही.
काय होतंय, काही कळत नाही.
कितीदा पहावे तुज, मन तृप्त होत नाही.
तुझवीण एकटं मला, आता राहवत नाही.
तू आणि फक्त तू, बाकी काही आठवत नाही.
उद्या परत ये, म्हणू नको कोणी पाठवत नाही.
                                             संतोबा…

आई दादांच्या विवाह वर्धापनदिनाच्या निमित्ताने!!!

आई दादांच्या
सुखी सहजीवनास,
झाली वर्षे अडतीस.
म्हणूनी हा दिन खास,
जणू काय सुखाची रास.
एवढाची एक असे ध्यास,
सदा लाभो आपला सहवास.
आई-दादांनी,
सांभाळले घरदार.
केला सुखाचा संसार,
दिला सर्वांना आधार.
असा केला कारभार,
नावाजती लहान थोर.
आई-दादांनी,
असे दिले आम्हांस संस्कार,
न विसरू आम्ही ते क्षणभर.
आनंदाने बहरले सारे घरदार,
त्यात बागडती वरदराज, राजवीर.
आई दादांनी,
जपली नातीगोती,
पाळल्या रीतीभाती.
न सोडली तत्व, ना नीती,
सर्वांसमवेत साधली प्रगती.
आई दादा,
दीर्घायुष्य तुम्हा लाभू दे,
आरोग्य तुम्हांस लाभू दे.
आशीर्वाद आम्हांवरी राहू दे,
प्रेमवर्षावात आम्हां न्हाऊ दे.

                                     संतोबा...

लूट!!!

अरे भावड्या क्या बताऊँ,
कितना लुटा हैं जमानेने मुझे।
कुछ अपनों ने लुटा हैं,
कुछ गैरोंने लुटा हैं।
रिश्ते नाते के चक्कर में,
सब कुछ फटा हैं।
खून के रिश्ते सिलाते-सिलाते,
खून-पसीने की कमाई,
पानी जैसे बहाई हैं।
क्या कहे बेगाने दुश्मन को,
अपने तो दुश्मन से सवाई हैं।
अरे भावड्या अब तू बता,
मेहनत की कमाई से,
कुछ भी बचता नहीं।
बिना मेहनत के तो,
कुछ मिलता ही नहीं।
आखिर कमाऊँ तो कैसे कमाऊँ।
अप्राइजल की आस लगाऊँ तो,
रेटिंग्स के नियम बदल जाते हैं।
शेअर मार्केट मे पैसे लगाऊँ,
तो शेअर्स गिर जाते हैं|
ड्रीम इलेव्हन मे पैसे लगाऊँ,
तो प्लेअर्स बदल जाते हैं|
और अगर डर्बी मे पैसे लगाऊँ,
तो घोडे गधे बन जातें हैं|
                               - संतोबा

सावित्रीमाई!!!

              माई, आज १० मार्च २०१९. तू आम्हाला पोरकं करून आज १२२ वर्षे पूर्ण झालीत. पण तू दिलेला ज्ञानाचा, संघर्षाचा वारसा आजही आम्हाला प्रेरणा देत आहे. ज्या काळात जाती-पाती, भेदभाव यांचाच बोलाबाला होता. गोरगरिबांना, स्त्रियांना समाजात दुय्यम दर्जाचे स्थान होते. त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जात असे, त्यांचे माणूस म्हणून जगणे ही मान्य नव्हते. त्या काळात तात्यासाहेबांना केवळ शिक्षणच या पीडितांना तारेल याची जाणीव होती. म्हणूनच त्यांनी म्हणले आहे,
            "विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
            नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
            वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
म्हणून त्यांनी शिक्षणाची सुरुवात स्वतःच्या घरापासूनच करत माई पहिल्यांदा तुला शिक्षण दिले. एवढेच नव्हे तर त्या शिक्षणाचा उपयोग, पीडित समाजाला सुशिक्षित करण्यासाठी तुला प्रोत्साहन दिले. त्या काळातील एकंदरीत परिस्थिती पाहता तुझ्या कार्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
               माई, तुम्ही हे कार्य केले नसते तर आज शिक्षण मिळालेच नसते, अशातला भाग नाही. पण आपण पाहतो एखाद्या कुटुंबात एक जरी व्यक्ती शिकली तर त्या कुटुंबाचा उत्कर्ष होतो, पण एखादी व्यक्ती दुर्गुणी निघाली तर ते संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. केवळ एका व्यक्तीचा त्या कुटुंबावर समाजावर बरा वाईट प्रभाव पडत असतो.तुम्ही तर सामाजिक सुधारणांची व शिक्षणाची ज्ञानगंगा कित्येक पिढ्या आधी आणली आणि ती सर्वसामान्य गरजू लोकांपर्यंत पोहोचवली. केवळ तुमच्यामुळे कित्येक पिढ्यांचा उत्कर्ष झाला. कोट्यवधी लोकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडला. बहुतांश सर्वच थोर कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या समाजातूनच टोकाचा विरोध सहन करावा लागला कारण त्या समाजावर पिढ्यानपिढ्या कित्येक रूढी परंपरा लादलेल्या होत्या व कालांतराने त्या रुढी परंपरा त्यांच्या अस्मितेचा भाग झालेला होत्या. त्याच अस्मितेतून "आमच्यात लग्नाची हळद निघायच्या आत जरी एखादी मुलगी विधवा झाली तरी तिला पुन्हा लग्न करता येत नाही" असे मोठ्या तोऱ्यात सांगितले जायचे. तात्यासाहेबांनी असल्या अनेक क्रूर रूढी परंपरावर आसूड ओढले, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार, केशवपन, सती प्रथेस विरोध केला. चूल आणि मुल एवढ्याशा विश्वात बंदिस्त केलेल्या स्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला, त्यामुळे बहुसंख्य समाज, स्वजातीय अगदी कुटुंबातील व्यक्तीही विरोधात गेल्या. मात्र आपण प्रत्येक गोष्टीत तात्यासाहेबांना सोबत केलीत, त्यांच्याबरोरीने कार्य केलंत. त्यांच्या पश्चात ही आपण हे कार्य मोठ्या हिरीरीने पुढे नेले. म्हणूनच तात्यासाहेबांच्या कार्यासमोर माई तुझे कार्य कधी झाकळले गेले नाही तर ते अधिक प्रखरतेने उजळून निघाले.
                  थोर व्यक्तींनी जात,धर्म न बघता कार्य केले. मात्र त्यांच्या पश्चात आज त्यांना त्या त्या जातीतील लोकांनी त्या थोर व्यक्तींना आपले स्वतःचे मतलब साध्य करण्यासाठी जातीत बंदिस्त केले आहे. ज्यांना जयंती,पुण्यतिथीतला फरक कळत नाही. ज्यांना ना त्या थोर व्यक्तीची पूर्ण माहीत आहे ना त्यांच्या कार्याची ओळख ना आत्मीयता आहे ते लोक आपले इप्सित साध्य करताना, फुक्या अस्मितेपायी जाती-जातींचे कळप निर्माण करत आहेत. केवळ आपल्या जातीत कोणी थोर व्यक्ती जन्माला आला होता म्हणून एकाच जातीचे म्हणून कोणी त्यांचे वारस ठरत नाही. आपण एकाच मातीत,जातीत,गावात जन्माला आलो म्हणून मी तुझा वारस ठरत नाही, अगदी मी तुझ्या पोटी जन्माला आलो असतो आणि आपले विचार, कार्य मला झेपले नसते तरी मी आपला वारस ठरलो नसतो पण हे काही स्वतःला वारस म्हणवणाऱ्या निर्बुद्ध वारसांना हे कळत नाही. त्यातूनच मग त्या त्या जातीची संघटना स्थापन होते, त्या थोर व्यक्तीला पुरस्कार देण्याची, पुतळा उभारण्याची, एखाद्या मोठ्या प्रकल्पास नाव देण्याची मागणी केली जाते. याचाच परिपाक म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर आम्ही यांना हा पुरस्कार देऊ, त्यांचा पुतळा उभारू, नामांतरण करू अशी अनेक पोकळ आश्वासने दिली जातात. थोर व्यक्तींनी कार्य पुरस्कारासाठी, पुतळ्यासाठी वा नावांसाठी केलेले नसते. खरंतर थोर व्यक्तींना पुरस्कार देणे हा त्या पुरस्काराचा गौरव असतो.
            माई, तू हे पवित्र कार्य करताना प्रसंगी समाजाचा विरोध पत्करला, दगडगोटे, शेणाच्या गोळ्यांचा मार खाल्ला. त्यावेळेसचा समाज अज्ञानी होता. त्याला वर्षानुवर्ष काल्पनिक गोष्टींची भीती घालून अनेक रूढी परंपरांच्या जोखडाखाली दाबले गेले होते. पण आज इतक्या वर्षांनंतर समाज सुशिक्षित होऊन देखील जातीय अस्मितेतून बाहेर पडू शकला नाही. त्यामुळे आपल्याच जातीतील व्यक्ती कशा थोर आहेत आपलीच जात कशी श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी इतर जातींमध्ये थोर व्यक्तींची बदनामी करणे अद्यापही अव्याहत चालू आहे. माई, आजही नानाविविध प्रकारे तुम्हां उभयंताची बदनामी केली जाते. त्यांना सडेतोड उत्तर देणे अवघड नाही पण असल्या पोकळ कार्यात वेळ आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा आपले कार्य पुढे नेण्यास कणभर जरी हातभार लागला तर कुठे आपला वारस म्हणून घेण्यात अभिमान वाटेल.
              माई, कोणी तुला क्रांतीज्योती म्हणत असेल तर कोणी पहिली मुख्याध्यपिका म्हणत असेल अर्थात हे सर्व सत्य असले तरी तू आमच्यासाठी आमची आई आहेस. म्हणूनच आज जेव्हा, अनेक मुली अनेक क्षेत्रात नाव कमावत आहेत त्या "आम्ही, सावित्रीच्या लेकी" असे अभिमानाने सांगत असतात, त्यावेळी निश्चित तुझा ऊर अभिमानाने भरून येत असेल!!!
                                       माई तुझ्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

                                                                                                      संतोबा...

अमोल कोल्हे - लोकसभा निवडणुक २०१९

                 साधारण सात वर्षांपूर्वी दादरला 'साहेब' चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने प्लाझाला अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (DrAmol Kolhe) यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली होती. अभिनेते संजय मोहिते(Sanjay Mohite) व मी शो टायमिंगच्या तास-दीड तास आधीच पोहचलो होतो, पुढच्या दहा-पंधरा मिनिटांत अमोल कोल्हे देखील पोहचले. जवळपास तासभर आम्हां तिघांना चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला, अर्थात बहुतांश वेळ मी फक्त श्रोता म्हणूनच भूमिका पाडली. राजा शिवछत्रपती मालिकेत कोल्हेनीं छत्रपती शिवाजी महाराज तर संजूने बहिर्जी नाईकांची(दीड डझन वेगवेगळ्या रूपातील) अजरामर भूमिका पार पाडल्या होत्या. त्याचबरोबर ऑन ड्युटी चोवीस तास, राजमाता जिजाऊ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यातूनच त्यांची गट्ट मैत्री जुळली. अनेकदा सोबत अभिनय केल्याने दोघांकडे अनेक आठवणीचे भांडार होते. त्यामुळे चित्रीकरणावेळच्या आठवणी, चालू,आगामी प्रोजेक्ट्स इ. बद्दल सविस्तर चर्चा झाली.
                जवळपास चार वर्षे संजू सोबत रहात असल्याने, त्याची नाटक, सिनेमाबद्दलची आपुलकी आणि जीवतोड मेहनत पहात होतो. नाटक, सिनेमा हे त्याचे केवळ उदरभरणाचे साधन नव्हते तर ती त्याचा आत्मा तीच त्याची ओळख होती. प्रत्येक गोष्ट मनापासून करायची , आपले शंभर टक्के योगदान द्यायचे एवढंच त्याला माहित. कधी यश,प्रसिद्धी मिळाली म्हणून गर्व, अहंकाराची बाधा झाली नाही. परिस्थिती कशीही असो त्याची कायमच मातीशी,समाजाशी नाळ जुळलेली राहिली आहे आणि म्हणून आयुष्यात स्टेजवर दोन शब्दही न बोलू शकलेला मी त्याला फुकटचे सल्ले देऊ शकत होतो.
त्या चर्चेत अशाच मेहनती, मातीशी,समाजाशी नाळ जुळलेल्या, प्रत्येक गोष्टीत आपले शंभर टक्के योगदान देणाऱ्या अमोल कोल्हेचीं ओळख झाली. एकाचवेळी अनेक भूमिका करत असतानाच एका गोंडस परीचा पिता म्हणून कराव्या लागणाऱ्या कसरतीबद्दल ते सांगत होते. त्यांना अभिनयाबरोबर जिमची आवड असल्याने फक्त दुपारी वेळ मिळत असल्याने त्यांनी दुपारी १२ ते २ जिम केली पण त्यात खंड पडू दिला नव्हता.माणूस ध्येयवेडा असल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.अमोल कोल्हे ध्येयवेडे आहेत म्हणून शैक्षणिक कारकिर्दीत गुणवत्ता यादीत झळकले, डॉक्टर झाले, यशस्वी अभिनेता झाले. .२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अमोल कोल्हेनां उमेदवारी मिळाली आणि मला या सर्व आठवणींची उजळणी झाली. आता नेते म्हणूनही निश्चितच ते यशस्वी होतील यात शंका नाही.
                 राजकारणात अमोल कोल्हे जरी आधीपासून असले तरी आणि त्यांनी पक्ष सोडल्याच्या आणि लगोलग लोकसभेची उमेदवारी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली. नेत्यांपेक्षा समर्थक सोशल मीडियावर हीन पातळीवर जाऊन टीका करू लागलेत. कालपर्यंत वंदनीय असलेले आज अचानक गद्दार ठरवले गेले. आडनाव, व्यवसाय इत्यादींवरून टीका करण्यात आली. याचा दुसरा अर्थ असा की ते जर खरचं एवढे चांगले नसते तर त्यांना अनुल्लेखाने सुद्धा मारता आले असते पण घाव वर्मी बसला होता. एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर टीका करता येईना म्हणून आडनाव, व्यवसाय जातीचा आधार घ्यावा लागत आहे. कोल्हेनीं अभिनेता म्हणून अजरामर भूमिका साकारल्या. नेता, राजकारणी म्हणूनही ते शंभर टक्के आपले योगदान देतील आणि ते देता यावे म्हणून ते अभिनयातून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ते खात्रीपूर्वक पुरोगामी महाराष्ट्राला साजेल असे राजकारण करतील आणि दुर्दैवाने कधी वैचारिक तडजोड करण्याची वेळ आलीच तर राजकारण सोडण्यासाठी क्षणभराचा देखील विलंब लावणार नाहीत.
             अमोल कोल्हेनां समर्थन ते सुशिक्षित, सुसंस्कारी, सर्वसमावेशक आहेत म्हणून तर आहेच पण पक्ष सोडला म्हणून त्यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका करण्यात येत आहे म्हणून जास्त आहे. अनेकांना घराणेशाही,अशिक्षित, गुंड, भ्रष्टाचारी नेते, ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका वाटतेय त्यांना फार मोठी संधी आहे अमोल कोल्हेनसारख्या उच्चशिक्षित, गुणवत्ता यादीत झळकलेल्या हुशार, सर्वसामान्य कुटुंबातील, सामाजिक भान असलेल्या एका निर्मळ मनाच्या अभिनेत्याला नेता बनवण्याची. अमोल कोल्हेनां मत देऊ नये असे एकही कारण नाहीये. निवडणुका हा भारतीय लोकशाहीचा सर्वात पवित्र सण आहे त्यात द्वेषाचे, फुक्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांना नाकारून, सामाजिक भान असलेल्या, सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्यांना निवडून देऊया.
                                                                                         
                                                                                          संतोबा...

पाऊस!!!

नको पाहू वेळ-काळ, नको पाहू मुहूर्त.
कसलीया जमीन, केलिया कष्टाची शर्त.
चातकापरी आस तुझी, हाक ऐक आर्त.
थेंब एकेक, आम्हांस जणू प्रसाद-तिर्थ.
बरसशील वेळेवर तू, विश्वास असे सार्थ.
                                        असे अपुले, जन्मोजन्मीचे ऋणानुबंध.
                                        लागू दे जीवा कळ, बरसुनी जा बेधुंद.
                                        दरवळू दे, मायमातीच्या तृप्तीचा सुगंध.
                                        नको मज अजूनी काही, सारं आता बंद.
                                        राबूनी शिवार फुलवतो, असा एक छंद.
तू बेभान, मनसोक्त बरसावं.
नदी-नाल्यातून पाणी खळखळावं.
शिवार फुलावं, माळवं पिकावं.
हिरवेगार पिकं ते, जोमाने यावं.
पानापानातूनी, नवचैतन्य बहरावं.
                                        मुक्या पशुपक्षांची तहानभूक भागावी.
                                       ओसाड माळरानी हिरवळ फुलावी.
                                        पाण्यासाठीची वणवण थांबावी.
                                        विहिरी-बारवा काठोकाठ भरावी.
                                        थकलेल्या बळी राजाची चिंता मिटावी.
दे एक वचन, न थांबवशील बरसणं
तू प्रसन्न हो एवढंच एक मागणं.
तूच आहे साऱ्या जगाचं जगणं.
तुझंवीण साऱ्यांचे होईल मरणं.
म्हणोनि सदा तुझ आम्ही शरण.
                                                                   संतोबा...
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!