Ads 468x60px

Thursday, February 6, 2014

मी मुख्यमंत्री .....!

                उद्या माझा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. कसलीही पार्श्‍वभूमी नाही, मंत्रीपदाचा अनुभव नाही.आमदारकीची ही केवळ दुसरीच टर्म. आणि अचानक हा मुख्यमंत्रीपदाचा जॅकपॉट. त्यामुळे सगळीकडे माझाच उदोउदो चालू आहे. प्रत्येक न्यूज चॅनेलवर माझा कोणालाच माहीत नसलेला आतापर्यंतचा जीवनपट उलगडून दाखविण्याची अहमिका लागली आहे, काय करणार प्रश्‍न टीआरपी चा आहे. आणि मी या घडीला सर्वात जास्त  चर्चेचा विषय आहे. दररोज बातम्या मिळवणे, नाही मिळाल्या तर बातम्या तयार करणे हे मीडियाचे उद्योग.सगळी कशी भडक वर्णने, लोकांना बातम्या कळतात पण माहिती काहीच मिळत नाही. आज एवढ्या सहजासहजी एवढी मोठी लॉटरी लागली म्हणल्यावर कोण अशी सुवर्णसंधी विनाकारण सोडेल. मीही त्यांना नाराज न करता सकाळपासूनच विविध न्यूज चॅनेलसना मुलाखती देण्याचा आणि पत्रकार परिषदांचा सपाटा लावला होता, शेवटी जनतेच्या सेवेसाठीच तर आम्ही येथे आहोत.  
                पत्रकारांच्या, जनतेच्या विविध प्रश्नांना मुरब्बी राजकारण्याप्रमाणे उत्तरे देणे चालू होते, प्रश्न कितीही खोचक असला तरी शांत डोक्याने सर्व प्रश्नांची देत होतो. मला लहानपणापासूनच राजकारण्यांवर टीका करणार्‍यांचा प्रचंड राग येतो. आजकाल प्रत्येक बर्‍या-वाईट गोष्टींसाठी राजकारण्यांना जबाबदार धरण्याची (फॅशन) रीत जन्माला आली आहे. तशातच एका माथेफिरू पत्रकाराने प्रश्नांची सरबत्ती चालू केली. म्हणे आजकालचे राजकारणी वैचारिक दिवाळखोर झालेत. आपल्या पदाच्या जबाबदारीची जाण आणि कर्तव्याचे भान आजच्या राजकारण्यांना नाही. सर्व भ्रष्ट आहेत आणि त्यामुळे देशाची अधोगती होत आहे. उद्या मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला वार्षिक ७ लाख रुपये पगार, अमाप सोयीसुविधा मिळणार त्या स्वीकारणे योग्य आहे का? त्याबरोबरच मी मुख्यमंत्रीपदासाठी किती पैसा ओतला याचाही हिशोब त्याला पाहिजे होता. काही अंशी त्याचे बरोबर असले तरी माझा पारा चढला, पण उद्याचा एक जबाबदार मुख्यमंत्री या नात्याने मह्त्प्रयासाने रागावर नियंत्रण ठेऊन मुत्सद्दीपणे जशी द्यावीत तशी उत्तरे देऊन पत्रकार परिषद आटोपती घेतली. पण तो पत्रकार आणि माझा राजकीय प्रवास काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हता.
                फार नाही दहा-पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट, माझा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला. अनेक राजकारण्यांनी वर्षानुवर्षे शेतकर्‍यांच्या आत्महत्या,कर्जमाफी, कंगालपणाचे भांडवल करून आपआपले मतदारसंघ काबीज केले पण शेतकर्‍यांच्या नशिबी शेवटी आश्वासनाच्या उष्ट्या पत्रावळ्याच आल्या. खरे तर शेतकर्‍यांना कर्जमाफिची काही एक गरज नाहिये,आपला शेतकरी कष्टाळू आहे भिकारी नव्हे! त्यांना फ़क्त योग्य वीज,पाणी, बाजारपेठ द्या, कर्जमाफीच्या कुबड्यांची त्यांना बिल्कूल आवश्यकता नाही. बरं कर्जमाफी दिली तर ती पोहचते का त्यांचापर्यंत का मध्येच तिला पाय फुटतात.जाऊ द्या कार्यकर्ते तर गब्बर होतात ना!शेतकर्‍यांच्या आत्महत्तेशी आपले काय घेणे देणे अशीच राजकारण्यांची रीत! मुलभूत सोईसुविधाकडे लक्ष द्यायचे सोडून हे सणावाराला साड्या वाटणार, दिवाळीला साखर वाटणार, निवडणुका जवळ आला की सर्वांना फुकटात तीर्थयात्रेला नेणार.अहो ज्याचे हातावर पोट आहे अशी व्यक्तीसुद्धा  तीर्थयात्रेला जाणे शक्य नसेल तर जाणार्‍याजवळ स्वकमाईतून नारळासाठी पैसे देते. दुसर्‍याच्या कमाईचा नारळ पावणार नाही म्हणून. मग फुकटात तीर्थयात्रा करणार्‍यास देव कसा पावणार?
                दुसर्‍यांकडून बदलाची अपेक्षा करणे हा स्वत:च्या बुद्धीचा व कर्तुत्वाचा अपमान असतो, त्यामुळे न पटणार्‍या गोष्टींना विरोध करण्याचा सोडून मी त्यांच्याशी लढायचे ठरवले. विविध माध्यमांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्‍न केला, बदल घडवण्यासाठी जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्‍न केला शेवटी आमदाराकीची निवडणूकदेखील लढवली पण मला हजार मतेसुद्धा मिळाली नाहीत. शुद्ध हेतू असताना आणि एवढी मेहनत करूनदेखील एका गावगुंडासामोर झालेला माझा लाजिरवाणा पराभव माझ्या जिव्हारी लागला होता. ज्या लोकांसाठी लढतोय तेच आपल्यासोबत नाही, त्यांना काय चांगले काय वाईट हे कळत नाही म्हणल्यावर सगळे संपल्यासारखे होते, पण पराभव स्वीकारणे माझ्या रक्तातच नाही. पराभवाचे विश्लेषण केले आणि मग कुठे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचे, कुठे महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकरांचा उदोउदो करायचा हे शिकलो. कोणत्या गोष्टीला कधी पाठिंबा द्यायचा व कधी विरोध करायचा हेही शिकलो. हे सर्व करताना मला आतून वेदना व्हायच्या पण मी हेच करणार होतो कारण जिंकण्यासाठी मी तत्वांचे सत्व तात्पुरते बाजूला ठेवण्याचे ठरवले होते.
                मी विधानसभेला जिंकून येणे हे आपले लोक किती भावनाप्रधान आहेत याचा मूर्तीमंत उदाहरण. जिंकण्यासाठी मला माझ्याशीच किती तडजोड करावी लागली हे मात्र माझे मलाच माहीत. मला माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी खूप काही चांगले करायचेय आणि मी ते करणारच, त्यासाठी कायकाय पणाला लावलेय याची कल्पना देखील कोणी करू शकणार नाही. मी काही पैसा कमण्यासाठी राजकारण करत नाही त्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यासाठी आयुष्य पणाला लावायची काय गरज?आणि तो दीडदमडीचा पत्रकार मला मुख्यमंत्री म्हणून मिळणार्‍या पगाराबद्दल प्रश्न विचारतो, यापेक्षा जास्त पगार तर पदवीधारकास बहुराष्ट्रीय कंपनीत सुरवातीलाच मिळतो, पण राजकारण्यांना दोष देणे हा आपण आपला मुलभूत हक्कच समजतो अगदी घरात बायको आपली ऐकत नाही त्याचा राग सुद्धा राजकारण्यांवर काढण्याची आपली मानसिकता. तो पत्रकार मला पैशांमध्ये मोजू पहात होता म्हणून मी जरा चिडलो होतो मात्र आता बर्‍यापैकी सावरलोय. पण मला एक कळत नाहीए आता जवळपास दोन तास होत आलेत त्या घटनेला, पण अद्याप त्या पत्रकाराच्या अपघाताची बातमी अजून कशी नाही आली बरे.

Sunday, February 2, 2014

औट घटकेची सुटका!!!


            दिवस मावळतीला निघाला होता आणि पशु-पक्षी आपल्या घरट्याकडे. मी ही शेतातील थोडे फार काम संपवून घरी आलो होतो. मलाही घाई झाली होती स्वत:च्या घराकडून स्वत:च्या घराकडे जाण्याची, पटापट तयारी करून फॉर्चूनर घेऊन मुंबईकडे जायला निघालो. लहान असताना कधीतरी धुरळा उडवत येणारी गाडी पाहिली की आपणही मोठेपणी अशाच एखाद्या गाडीतून धुरळा उडवत जाऊ असे वाटायचे पण आता ते शक्य नव्हते आता सगळे रस्ते चकाचक झाले होते. गाव ओलांडून थोडा पुढे गेलो तर एक आजी-आजोबा बस थांब्यावर एसटीची वाट पाहत थांबले होते, पण शेवटची एसटी गेल्यामुळे मिळेल त्या गाडीने जाऊ असा विचार करून ते माझ्या गाडीला हात करत होते. नेहमीप्रमाणे मी वेगानेच गाडी चालवत होतो, इतरांच्याप्रमाणेच मीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्याच वेगाने पुढे निघून गेलो. कोणाला लिफ्ट द्यायला ती काही सार्वजनिक मालमत्ता थोडीच होती.

            आजी-आजोबांना ओलांडून एक-दोन किलोमीटर पुढे आलो पण त्या दोघांची छबी माझ्याडोळ्यासमोरून जात नव्हती उलट ती जास्तच क्लेशदायक वाटू लागली. शेवटी काहीही विचार न करता सरळ गाडी माघारी फिरवली. खूप लांब नाही अगदी सहा महिन्यापुर्वी आमचीही हीच अवस्था होती, आम्हीही असेच लाल डब्ब्याची वाट पहात तासनतास उभा राहत असे आणि आज त्याचा आम्हाला विसर पडला हे खरोखर लज्जास्पद होते. मी पुन्हा यू टर्न घेऊन आजी आजोबांना गाडीत घेतले. मनावरचे ओझे एकदम कमी झाले. त्यांना कुठे जायचे ते विचारले तर त्यांना काळेवाडीला जायचे होते पण सासवडला सोडले तरी चालणार होते पण मला तसेहि पुढे जायचे होते त्यामुळे मी तुम्हाला काळेवाडीला सोडतो फक्त कुठे उतरायचे ते सांगा म्हणालो कारण काळेवाडी, ढुमेवाडी यामध्ये नेहमी माझा गोंधळ उडतो. आता गाडी जरा कमी वेगाने चालवणे भाग होते, " कुठल्या गावचा बाळ तू" आजोबा अनोळखी असले तरी प्रश्न अपेक्षितच होता. थोडा विचार केला आजोबांचे पुढचे काय प्रश्न असतील हे ही लक्षात आले आणि ठरवले त्यांच्या सर्व न विचारलेल्या प्रश्नांचीसुद्धा उत्तरे द्यायची. तसे प्रश्न विचारलेले मला आवडत नाही. सात-आठ मिनिटे होती तेवढेच माझेही मन हलके होईल.

            मी याच गावचा गेल्या सात-आठ वर्षापासून मुंबईला असतो, कंप्यूटर इंजिनियर आहे पण याच वर्षी नोकरी सोडली आहे.सर्व सरळ मार्गी प्रयत्न करून देखील काहीच मनासारखे होत नव्हते, पण चुकीचे काही करायला मन तयार नव्हते. शेवटी सोडली नोकरी कारण तिच्यामुळेच माझ्या अनेक आवडत्या गोष्टींना मुरड घालावी लागत होती आणि तिचा जास्त काही फायदाही होत नव्हता खाऊन-पिऊन सुखी एवढेच. तेवढ्या पगारात कोणी मुलगी द्यायला देखील तयार नव्हते. मला माझ्यापेक्षा लोकांसाठी काहीतरी चांगले करायचे होते. नोकरी सोडली पण पुढे काही करायचे ते निश्चित नव्हते. महिना-दोन महिने पुरतील एवढे पैसे होते ज्यासाठी मुंबईला आलो होतो त्यासर्व गोष्टी करायच्या ठरवल्या. स्वत:चे पोट भरण्याची कला प्रत्येकाकडेच असते माझ्याकडे निश्चितच इतरांपेक्षा ती जास्त असेल त्यामुळेच सगळे काही अनपेक्षितपणे मनासारखे होऊ लागले. हे आधीच केले असते तर असा विचार मनात आला पण त्या अनुभवाची जी शिदोरी मिळाली ती पुढील आयुष्यात निश्चित उपयोगी पडणारी आहे. सध्या माझे तरी खूप छान चालले आहे.घरी आई वडील आहेत, चार-पाच एकर शेती आहे. आठ-पंधरा दिवसांनी येतो शेतीची खूप आवड आहे पण जास्त काही करत नाही बरे वाटते आईला भेटल्यावर जेवढा आनंद भेटतो तेवढाच आनंद होतो पण हा आनंद आता थोड्या दिवसांचा.... पुढेचे शब्दच फुटेनासे झाले जणू अश्रुसोबत शब्दही थिजले.     

            बाळ असे बोलू नये, थोड्या दिवसाचा का?आजोबांनी मिनिटभराच्या शांततेचा भंग करत विचारले. आजोबा ती माझी वडीलोपार्जित जमीन असली तरी कायद्याने त्यावर वडिलांप्रमाणे आत्यांचा,बहिनींचा हिस्सा आहे आणि त्या तो घेणारच आहेत. मला ते पटत नसले तरी माझा त्याला विरोध नाही तसेच त्याबदल्यात जमिनीचा मोबदला देणे माझ्या आवाक्यात नाही त्यामुळे ती जमीन जाणारच आहे. "अरे मग एखादा तुकडा विकून त्यांना दे काही हिस्सा काहीच न राहण्यापेक्षा थोडी तरी शिल्लक राहील." आजोबांचा अजून एक सल्ला. आजोबा बरोबर आहे तुमचे पण ही जमीन माझी आई आहे तिला विकण्याचे पाप  मी नाही करू शकणार नाही भले सगळी जमीन गेली तरी चालेल पण अशी भडवेगिरी करायला मला जमणार नाही. आता आजोबांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, भिजलेल्या शब्दात आजोबा म्हणाले "बरोबर आहे,पोरा ही घरोघरची कहाणी आहे मी सुद्धा त्याच कारणासाठी माझ्या मुलीला भेटायला चाललोय बघू काही ऐकले तर ऐकले. मलाही एकुलता एक मुलगा आहे तोही तुझ्यासारखाच आहे पण मलाच हे मान्य नाही. कायदा गाढव असतो हेच खरे. आजोबा कायदा कधी गाढव नसतो आपण त्याला तसा बनवतो. कायदा सर्वसामान्यसमाजासाठी अन्यायाविरोधात लढण्यासाठी सर्वात शक्तिमान शस्र आहे पण आपण त्याचा गैरवापर करतो इतकेच.एव्हाना आम्ही काळेवाडीला पोहचलो, आजोबांनी ३० रुपये दिले इतरवेळी असे कोणी पैसे देण्याचा प्रयत्‍न केला असता तर खूप राग आला असता पण आता माझ्या स्टेटसपेक्षा आजोबांचा स्वाभिमान जास्त वरचढ होता आणि तो मला दुखावायचा नव्हता. आजोबांचा निरोप घेऊन मी पुढच्या प्रवासाला निघालो. 

            खूप एकटेपणा जाणवू लागला, कोणीतरी जोडीला असायला हवे होते असे तीव्रतेने वाटत होते. माझा आवडता मुंबई-पुणे प्रवास आज जीवघेणा वाटू लागला होता. इतरांना भले मी स्थितप्रज्ञ वाटत असेल पण एकांतात मनाचे बुरूज क्षणात असे काही कोसळतात की ते सावरताना भरलेल्या जखमा पुन्हा ठसठसू लागतात. स्मृतिपटलावर कोरलले त्यागाचे क्षण गडद होऊ लागले होते. प्रत्येक गोष्ट नेहमी हसत मुखाने स्विकारली त्यामुळे मला सर्वजण गृहीतच धरत गेले आणि माझा हरएक त्याग सुद्धा.सर्वजण जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते तेव्हाही आणि आता काही का होईना असताना मी काय कमावले हेच बघतात पण मी काय-काय आणि कसे गमावलेय ह्याचा विचारसुद्धा कोणाच्या मनात येत नाही. मनात आले तर पुन्हा सर्वकाही क्षणात मिळवू शकतो पण आता खूप पुढे आलो आहे, आता पुन्हा त्याच गोष्टीत मला अडकायचे नाही......

लग्न काही ठरत नाही

वय वाढत जातं, 
लग्न काही ठरत नाही.
आईशिवाय घरात,
कोणीच काही बोलत नाही.
भाऊ अडलाय, बाबा थकलाय,
 सारं काही कळतं.  
पण राजकुमारीचं लग्न,
असंच कोणाशी का जुळतं.  
तुझं माझं करता,  
वाढत  जातो अपेक्षांचा डोंगर.
प्रेमाला व्यवहाराची,  
लाभते किनार.  
तारुण्य ओसरत जातं.  
स्वप्न वास्तवातील दरी,  
सांधता सांधत नाही.  
दिव्यातील वातीचं प्रयोजन,  
कळता कळत नाही.  
कांदा पोह्यामध्ये,  
पडू लागतो खंड.
क्षणाक्षणाला तनमन
करू लागते बंड  
सखीचं बाळ कवटाळता,  
गुदमरून जातो श्वास.  
नकाराचा जोश संपून,  
होकाराची लागते आस.

नाट्यरंग--२) योनीच्या मनीच्या गुजगोष्टी.

       रवींद्र नाट्यमंदिर माझ्या ऑफीसच्या लगतच आहे, एक दोनदा खाद्यमहोत्सवानिमित्त आत गेलो होतो, पण नाटक पाहायला पहिल्यांदाच चाललो होतो सोबत संजू असल्यामुळे ओळखीचे कोणी तरी भेटणारच याची खात्री होती आणि ओळखीचे भेटलेही. तिकीटासाठी बरीच मोठी रांग होती, बहुतेक तिकीट भेटणार नाही असे वाटत होते पण भेटले. आमच्या मागे असणार्‍यांना मात्र तसेच घरी जावे लागले. तोपर्यंत नाटकाचे खूप जास्त काही प्रयोग झाले नव्हते त्यामुळे नाटकाविषयी फारसे काही ऐकले नव्हते. इतरांची ही तीच परिस्थिती होती पण नाटकापेक्षा त्याच्या नाममहिम्यावर आकृष्ट होऊन बरेच जण आले असणार यात शंका नव्हती. अर्थात आम्हीही त्यास अपवाद नव्हता पण आमचा हेतू वेगळा आणि शुद्ध होता याबाबत शंका नसावी.
                नाट्यगृह अगदीच छोटे आहे त्यामुळे स्टेज वैगेरे काही नाही, अगदी कट्यावर बसून गप्पा मारतोय असा भास व्हावा, आणि त्यामुळेच ते नाटकाच्या प्रकृतीला पोषक वाटत होते. प्रत्येकजण काही ना काही अपेक्षा घेऊनच नाटक पाहायला येत असतो, इतर नाटकापेक्षा सगळ्याच बाबतीत हे काहीसे वेगळे होते. काही लोक त्यातील स्पष्ट उल्लेख पटत नसल्याने उठुनही जात होते.मी काही तथाकथित पांढरपेशा नाही त्यामुळे त्या शिव्या, स्पष्ट उल्लेख मला खटकत नव्हता, आम्ही दोघेही (मी भावी)कलाकार असल्याने नाटकाच्या संहितेच्या दृष्टीकोनातून त्याचे महत्वही जाणून होतो. पण नाटक जसजसे पुढे जाऊ लागले तसा आमचाही भ्रमनिरास होऊ लागला. असा विषय आणि तोही इतक्या मोकळेपणाने रंगमंचावर सादर करणे खरेच कौतुकास्पद होते पण हेतू शुद्ध व्यावसायिक वाटत होता.
                हे नाटक पाहून जवळपास वर्ष होत आलेय, त्यानंतर मिळत्याजुळत्या नावाची, विषयाची तीन-चार नाटके आली.अनेक टीका करणारे लेख वाचनात आले. माझा आक्षेप त्यातील शिव्या, कधी स्पष्ट तर कधी अश्लील उल्लेखांना नाहीतर एवढे सर्व करून तिचे गुज पुरुषांपर्यंत पोहचवण्यात आलेल्या अपयशाला आहे, व्यावसायिक दृष्टीकोण असल्यामुळे त्यात भडकपणा जास्त जाणवतो, अगदी कोणीतरी हैदोससारख्या पुस्तकातील उतारेच वाचतेय असे वाटत राहते.शरद करमरकरच्या माध्यमातून जे ज्ञान द्यायचा प्रयत्न केला आहे तो अगदीच अनावश्यक वाटला.काही वेळा अज्ञानात सुख असते याचे भान ठेवायला होते, संहितेपेक्षा नितीमत्ता वरचढ असायला हवी. काय कसे करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, काही अव्यक्त भावना, अज्ञात गोष्टी उलगडण्याचा मोह टाळायला पाहिजे होता. एका पवित्र, नाजूक गोष्टीची शब्दबंबाळ व्यथा तिलाच रक्तबंबाळ करत होती. हा पांढरपेशी धंदेवाईकपणा होता आणि त्यानंतर आलेली अशा पद्धतीची नाटके त्याचेच फलित.विचारांना काहीतरी खाद्य मिळेल या अपेक्षेने गेलो पण भ्रमनिरासच झाला.....

नाट्यरंग- १) विच्छा माझी पुरी करा


      चित्रपटगृह किंवा नाट्यगृहात जाऊन चित्रपट वा नाटक पाहण्याचा शौक आम्हांस बिल्कुल नाही. मराठी चित्रपट, नाटक चालावीत, जगावीत असे आम्हांस वाटते खूप पण त्यासाठी प्रयत्न काहीच नाही. कोणी अगदी आग्रहाने चल म्हणाले तरी आम्ही जात नाही पण आमचे मित्र संजय मोहिते हे स्व:त कलाकार असल्याने आणि त्यांची मुख्य भूमिका असलेले नाटक असल्याने आम्ही नकार तरी कसा देणार. "विच्छा माझी पुरी करा" या नाटकानेच माझी नाट्यगृहात जाऊन नाटक पाहण्याची नसलेली इच्छा पुरी झाली. नाटक पाहिल्यानंतर नाट्यगृहात जाऊन ते पाहण्यात काय वेगळाच आनंद असतो याची जाणीव झाली त्याचबरोबर उद्‌घाटनाचा प्रयोग असल्याने अनेक नामवंत कलाकारांना प्रत्यक्षात भेटता आले. एक कलाकार म्हणून संजयबद्दल सुरुवातीपासूनच आदर होत आणि ह्या नाटाकाने द्विगुणीत झाला, अर्थात तो फारसा दिसून येत नाही. मी सल्ले देण्यात,मस्ती करण्यात नेहमीच त्याच्या वरचढ असतो अर्थात हा त्याचा मोठेपणा.
            सन्माननीय प्रेक्षक म्हणून चार-सहा प्रयोग मित्रांना फुकटात दाखविताना माझा वांझोटा अभिमान उगीचच उफाळून यायचा. मला सर्व फुकटात असले तरी आता त्या फुकटाची लाज वाटू लागली होती. कारण दोन अडीच तास रंगमंचावर दमदार अभिनयाने मनोरंजनासोबत सामाजिक प्रबोधन करणार्‍या कलाकारांची वैयक्तिक आयुष्यातील फरपट मी जवळून पहात होतो. फुकटात नाटक पाहणे त्या कलाकाराच्या अभिनयाचा अपमानच नव्हे तर माझ्या सामाजिक बांधिलकीशीही प्रतारणा होती. स्टेटस म्हणून तीनशे रुपयाचा शर्ट दीड-दोन हजाराला विकत घेताना काहीच वाटत नाही पण १५०-२०० चे तिकीट काढून नाटक-चित्रपट पाहायला जिवावर येते.
            कित्येक कलाकारांच्या आयुष्याची राखरांगोळी झालेली आपण नेहमी पाहतो.कलाकारांना आपण तारे म्हणतो ते त्यांना शोभण्यासारखेच आहे. रात्री तारे चमकतात तोपर्यंतच त्यांचे अस्तित्व, रात्र संपली की ते अस्तित्वशून्य होतात, आपल्यालाही त्यांची अनुपस्थिती सूर्यप्रकाशात जाणवत नाही. कलाकारांचेही तसेच आहे,  ऐन उमेदीच्या काळात तार्‍याप्रमाणेच समाजाच्या सुख-दुखावर मनोरंजनाची फुंकर घालून हास्य पसरवणार्‍या बर्‍याचशा कलाकारांच्या उत्तरार्धातील आयुष्याची राख पैलतीरी पोहचण्यासाठी कोणाच्यातरी मेहेरबानीची आवश्यकता लागते. अभिनय हा त्यांचा व्यवसाय नसतो त्यांचे वेड असते. प्रत्येक क्षेत्रात असे  ध्येयवेडे असतात अशा वेड्यांचे कर्तुत्व अजरामर होतेच पण जिवंतपणीसुद्धा त्यांचे अस्तित्व तळपत राहायला हवे.
             एका चित्रपटासाठी १०० कोटी घेणार्‍या कालाकारांबद्दल मी बोलत नाही त्यांच्या सहकारी कलाकारांचे मानधन पहा, आपल्या मराठीत तर कलाकारांची जास्तच होरपळ होत असते. "फॉरेनची पाटलीण" या चित्रपटातील पक्या भावोजी या प्रसिद्ध भूमिकेसाठी संजूला अवघे चाळीस हजार मानधन भेटले होते हे एकूण मला आश्चर्याचा दुख:द धक्का बसला होता. कला, संस्कृती टिकवणे हे आपले स्वत:चे अस्तित्व टिकवण्याहून वेगळे नाही. मी आता महिन्या-पंधरा दिवसाला एखादा चित्रपट वा नाटक पाहायचे ठरवले आहे आणि ते ही तिकीट काढून. आणि तुम्ही...
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!