Ads 468x60px

Saturday, July 9, 2022

मी उपमुख्यमंत्री.

                    साधारणपणे १९९३ ची घटना असेल, त्यावेळेस मी इयत्ता चौथीमध्ये शिकत होतो. आज पारगांवमध्ये ज्याठिकाणी तलाठी ऑफिस आहे त्याठिकाणी आमचा चौथीचा वर्ग भरत असे. आम्हांला शिकवायला भोसले गुरुजी होते, भोसले गुरुजींनी पवार सगळ्यात हुशार म्हणून मुख्यमंत्री, मनोज सहलमंत्री, काळूराम सफाईमंत्री अशी बहुतेक हुशारीवर आणि काहीअंशी आगाऊपणावर आधारित खातेवाटप केले होते. रोज सकाळी मुख्यमंत्री तुकाराम पवार सर्वांचा गृहपाठ तपासतील, वर्ग आणि व्हारांड्याच्या साफसफाईची जबाबदारी सफाईमंत्री काळूरामची. मडकी कशी बनवतात हे प्रत्यक्ष जाऊन पाहण्यासाठी चालत पाच मिनिटांच्या अंतरावर ठरलेल्या सहलीचे नेतृत्व सहलमंत्री मनोजकडे. अर्थात मला कोणतीही जबाबदारी दिली नव्हती. मला तशी अपेक्षाही नव्हती, किंबहुना ती तशी कोणालाच नव्हती.  हे असे मंत्रिमंडळ बनवण्याची संकल्पना अचानक ठरली व तात्काळ त्यांस मूर्तरूप दिले गेले, त्यामुळे कोणाच्या नाराजीचा प्रश्नच नव्हता. 

               अशाप्रकारे खातेवाटप सुरळीत पार पडले असे वाटत असताना मुलींच्या बाजूने गलका चालू झाला, माझ्या मैत्रिणींनी हट्टच धरला की संतोषला काही ना काही पद द्या.    ३५-४० पटसंख्या असलेल्या वर्गात काय आणि किती पदे देणार, गुरुजींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्या  ऐकायलाच तयार नव्हत्या.  शेवटी नारीशक्तीपुढे गुरुजी हतबल झाले व थोडा विचार करून भोसले गुरुजींनी माझ्यासाठी उपमुख्यमंत्रीपद निर्माण केले व ज्यादिवशी तुकाराम सुट्टीवर असेल त्यादिवशी त्याची मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडायची असे ठरले. तुकाराम बहुदा कधीच गैरहजर नसायचा आणि माझे उपमुख्यमंत्रीपद हे कायमच नामधारी राहिले.गेल्या काही काळापासून उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपदाला वरचढ ठरत असताना थोडाफार आनंद वाटतोय तो केवळ ह्याच एका नामधारीपणाच्या टोचणीमुळे.राज्याचा विचार करता उपमुख्यमंत्री पद घटनात्मक नाही आणि अनिवार्यही नाही,  केवळ खातेवाटपात समतोल राखण्यासाठी, मुख्यमंत्रीपदाची दावेदारी करणाऱ्याची नाराजी दूर करण्यासाठी आणि राजकीय स्थैर्य आणण्यासाठी त्याचा साधारणपणे उपयोग केला जातो.

              आजकाल लोकं पद मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात, बहुदा सामजिक प्रतिष्ठा,प्रसिद्धी, इतरांवर वर्चस्व गाजवण्याची संधी ह्यासाठी सगळा खटाटोप असतो आणि पदाचा मूळ उद्देश बाजूला पडतो. प्रतिष्ठा ही पदाला असते त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला तो त्या पदावर बसलेला आहे तोपर्यंतच ती प्रतिष्ठा, मानसन्मान मिळतो. प्रत्येक पदाचे काही अधिकार आणि कर्तव्ये असतात,  त्याला योग्य न्याय दिला तर त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला मानसन्मान मिळतो. अगदी ती व्यक्ती त्या पदावरून पायउतार झाल्यानंतर देखील आयुष्यभरासाठी त्यांस आदर मिळतो. पण ज्या व्यक्तीच्या कर्तुत्व आणि वर्तणुकीमुळे त्या पदाची प्रतिष्ठा वाढते अशा व्यक्तींबद्दलचा आदर आणि सन्मान पिढ्यानपिढ्या टिकतो. पण एखादी कुवत नसलेली व तडजोड किंवा अपरिहार्यता म्हणून पदावर बसवलेली व्यक्ती तिच्या वर्तणुकीने चेष्टेचा विषय होतो, अशा व्यक्तीची खिल्ली उडवली जाते मग तो मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो वा राष्ट्रपती. कोणाच्या तरी मर्जीने, मिंधे होऊन पद मिळवले तर त्या व्यक्तीच्या हातचे बाहुलं बनून राहावे लागते, सर्व काही दुसऱ्याचा इशाऱ्यावर करावे लागते. अशा व्यक्तीची नामधारी म्हणून केवळ रबर स्टॅम्प सारखी गत होते.अशावेळी ना त्या पदाचा उपभोग घेता येतो ना त्या पदाला योग्य न्याय देता येतो. 

          मला नक्की आठवत नाही कोणत्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात तो धडा होता पण त्या धड्याने मला आयुष्यभरासाठी जमिनीवर राहण्याचा धडा मात्र दिला. बहुधा तो पाठ एखाद्या सरकारी अधिकाऱ्यावर असावा, तो ज्यावेळी अधिकारीपदावर होता तेव्हा त्याच्या हाताखाली असलेला कर्मचारी त्याला रोज आदबीने सलाम करायचा, चहापाणी काही हवं नको ते सर्व पहायचा. एकेदिवशी तो अधिकारी निवृत झाल्यानंतर रस्त्यात त्याची गाठ समोरून सायकलवर येणाऱ्या त्या कर्मचाऱ्यासोबत होते, नेहमी अधिकारी समोर दिसल्यावर मोठया आदबीने सायकलवरून उतरून सलाम करणारा तोच कर्मचारी त्यादिवशी मोठ्या गुर्मीत सायकलवर उतरून त्याच्या समोर सिगारेट सुलगावीत मोठ्या तोऱ्यात निघून जातो याचे त्या अधिकाऱ्यास आश्चर्य व वाईट वाटते. या जिव्हारी लागलेल्या घटनेचे पुनरावलोकन करता त्यांच्या कार्यकाळात त्या कर्मचाऱ्याशी अधिकारी म्हणून केलेली वर्तणुक चुकीची असल्याची उपरती होते. ते अधिकारी आणि कर्मचारी असे नाते होते अधिकरपद जाताच ते संपुष्टात आले. व्यक्ती-व्यक्तींमध्ये कोणत्याही पदाच्या , आर्थिक,सामजिक स्तराच्या आधारे भेदभाव करू नये. मी आजही माझ्या कार्यालयीन मेल मध्ये माझ्या पदाचा उल्लेख कधीच करत नाही.

              आजकाल जिथेतिथे केवळ राजकारणच नाही तर प्रत्येक क्षेत्रात पदासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच खेळले जाते. ज्या गोष्टी साध्य करण्यासाठी त्या पदाचे प्रयोजन केलेले असते त्यालाच हरताळ फासला जातो. पदाची लालसा असणे वाईट नाही, पण त्यासाठी आपली त्या पदासाठी असलेली योग्यता - अयोग्यता विचारात न घेता घोडेबाजार, साठमारी, विश्वासघात करून या ना त्याप्रकारे पद हस्तगत केले जाते.  पदाचा गैरवापर करून आपला आणि समर्थकांचा फायदा करून घेतला जातो, प्रतिस्पर्धकांना नेस्तनाबूत केले जाते. काळाच्या परिपेक्षात पाचदहा वर्षे फार नाहीत आणि कोणतेही पद सार्वभौम नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट नीतीनियमाने, नैतिक अधिष्ठान असलेले डावपेच खेळून मिळवावे. कावेबाजपणे, पाताळयंत्रीपणे, कुटील डावपेच खेळून काही मिळवले आणि आपण कितीही नीतिमत्तेने वागल्याची भलामण केली तरी आपण कसे वागलो त्याचे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर, वर्तणुकीवर उमटत असते.आपण कितीही लपवाछपवी, सारवासारव केली तरी कधी ना कधी सत्य समोर येतेच. सर्व काही हस्तगत करून इतरांच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत होत नसेल, चारचौघांत उजळ माथ्याने फिरता येत नसेल आणि आपल्या विजयापेक्षा प्रतिस्पर्ध्याच्या पराभवाची चर्चा होत असेल तर तो आपला पराभवच नाही का?.

                 संतोबा...

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!