Ads 468x60px

Wednesday, July 6, 2022

मानसिक आरोग्य

                आजकालच्या धक्काधक्कीच्या, धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य ही ढासळत चालले आहे. शारीरिक आरोग्याबाबत आपण फार सजग नसलो तरी एका ठराविक मर्यादेनंतर आपण शारीरिक आरोग्याची काळजी घेतो. पण मानसिक आरोग्याबाबत आपले नेहमीच दुर्लक्ष होते, किंबहुना मानसिक आरोग्य बिघडवणारी परिस्थिती कशी हाताळायची हेच कळत नाही. कौटुंबिक कलह, वडिलोपार्जित संपत्तीतील वाद नात्यातील क्लिष्टता, नोकरी धंद्यातील कामाचा दबाव, सामाजिक प्रतिष्ठेचा दबाव आपले मानसिक आरोग्य बिघडवत असतात आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर देखील पडत असतो. आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे मात्र बऱ्याचदा मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे बाह्य घटक/व्यक्ती असतात जे आपल्या नियंत्रणात नसतात. अशावेळी आपल्याला त्यांना व्यवस्थित हाताळायला आले पाहिजे. 

               कौटुंबिक कलह आणि नात्यातील क्लिष्टता हे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे सगळ्यात प्रमुख घटक आहेत. त्यात प्रामुख्याने दोन पिढ्यांमधील विसंवाद.वडिलोपार्जित संपत्तीचे वाद, नात्यामधील कर्तव्ये आणि हक्क यांचा असमतोल,  बदलत्या परिस्थितीत दोन कुटुंबांमधील आर्थिक, सामाजिक स्थर रुंदावणारी दरी. स्वतःच्या व इतरांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे. जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग, विश्वासघात.  नात्यांमधील मानपान, गैरसमज या गोष्टींचा समावेश होतो. हे सगळं मिटवण्यासाठी आपण कितीही सामोपचाराची समजूतदारपणाची भूमिका घेतली तरी त्याला फारसं यश येत नाही. बहुतेकांना हक्काची जाण असते पण जबाबदारीचे भान नसते, त्यांना कर्तव्यामध्ये वाटा नको असतो पण हक्कांमध्ये दुसऱ्याचा वाटा असू शकतो याची समज नसते आणि त्याच गैरसमजापोटी बऱ्याचदा आडमुठेपणाची भूमिका घेतली जाते. काही वेळा कोर्टकचेऱ्या करण्याची वेळ येते, त्यामधून काहीच साध्य होत नाही याउलट वेळ, पैसा आणि मानसिक स्वास्थ्य धुळीस  मिळते. अशा कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात.

             नात्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे सोपे नसते, अशावेळी आपण नात्यांमध्ये दुजाभाव करायचा नाही, सगळ्यांना आपले समजायचे, त्यांनी आपल्याला आपले समजायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, त्यासाठी आपण आपले मानसिक आरोग्य खराब करायचे नाही. त्यांनी आपल्याला आपले समजावे हा अट्टहास आपण सोडून द्यायचा. कारण स्वभावाला औषध नसते. जेव्हा दोन पिढ्यांमध्ये विसंवाद होतो त्यावेळी आपण त्यांच्याजागी आपल्याला ठेऊन विचार करावा, त्यांचा संघर्ष, अनुभव हा वेगळ्या पातळीवरचा असतो. वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस जनरेशन गॅपची समस्या जटील बनत चालली आहे. आपण आयुष्यभर फक्त बेरीज करत राहायची आणि केवळ त्या बेरजेत अडथळा आणणाऱ्यांची वजाबाकी करायची.  आपले आचारविचार कोणावरही लादायचे नाही, नात्यांना बंधनात बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना योग्य ती मोकळी दिली तर ती जास्त निरोगी राहतील. आपण कुटुंबाचा आधार बनून इतरांना परावलंबी बनवण्यापेक्षा, कुटुंबाचा पाया बनण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्वाँना स्वकर्तृत्वावर भरारी घेता येईल. महत्वाचे म्हणजे जसे आहात तसे रहा, आदर्शवादाचा झेंडा मिरवत कोणाचा गॉडफादर बनण्याचा प्रयत्न करू नका. कोणालाही सदा सर्वकाळ खुश ठेवता येत नाही, कोणासाठी कितीही केलं तरी पलटायचे असते त्यावेळी ते पलटतातच शिवाय त्यासाठी बिनबुडाची कारणे देत सगळा दोष आपल्यालाच माथी मारून, यथेच्छ बदनामी करून नामानिराळे होतात. त्यामुळे लोकांच्या मनातून उतरण्याची चिंता करू नका, स्वतःच्या मनातून उतरणार नाही याची दक्षता तेवढी घ्या.

              आजकाल पैसा, संपत्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. पैसा, संपत्ती नसेल तर आपल्यालाही समाजात काही किंमत राहत नाही. पैसा कमावण्यासाठी त्यासाठी लोकं वाट्टेल त्या थराला जातात. पैसा मिळवणे गरजेचेच आहे पण त्यासाठी वाट्टेल त्या थराला जायची वा काही धूर्त डावपेच खेळायची गरज नाही. पैशासाठी कोणाची लाचारी पत्करण्याची वा कोणाचे मिंधे होण्याचीही गरज नाही. कोणाच्या हातचे बाहुले बनण्यापेक्षा नितीनियमाने जेवढा कमवता येईल तेवढा पैसा कमवा व सुखासमाधानाने रहा. फुकट मिळणारी झोपही पैशाने विकत घेता येत नाही म्हणून असे कोणते कृत्य करू नका ज्याने तुमची झोप उडेल. आयुष्यात अनेक प्रसंग येतात जिथे वादातील आपल्याच हक्काच्या गोष्टी आपले जिवलग लांड्यालबाड्या करून लुबाडू पाहतात. अशावेळी जेवढे सामोपचाराने मिटवता येईल तेवढे मिटवण्याचा प्रयत्न करा नसेल मिटत तर इतर कायदेशीर मार्गाने मिटवण्याचा प्रयत्न करा. एवढं सगळं करून पदरी काही पडण्याची शक्यता नसेल किंवा हे लढण्यात जे मिळणार आहे त्यापेक्षा जास्त  वेळ आणि पैसा खर्च होणार असेल तर  जे तर तो नाद सोडून द्यावा. तो वेळ आणि पैसा इतर ठिकाणी गुंतवा त्याचा परतावा निश्चित जास्त आणि समाधन देणारा असेल.पानगळ झाल्याशिवाय नवी पालवी फुटत नाही. कधी कधी काही गोष्टी निर्व्याजपणे सोडता आल्या पाहिजेत, मग ती संपत्ती असो वा नाती. हे जमलं तर मानसिक ताणतणाव आश्चर्यकाकरीत्या गायब होतो शिवाय तुम्ही त्यागले ते कोणत्या न कोणत्या रूपात सव्याज परत मिळेल.  आपण मानपान करायचा आणि त्यांनी मनमानी करायची हे जास्त काळ सहन करून चालत नाही, योग्यवेळी अशांना आपल्या आयुष्यातून बाद करणे जास्त योग्य असते, अशावेळी जास्त फायद्यातोट्याचा विचार करून चालत नाही. आपल्याशी वाईट वागणाऱ्यांबद्दल कुठलीही बदल्याची भावना मनात ठेऊ नये. बदल्याची भावना समोरच्यापेक्षा आपल्या स्वतःला जास्त त्रास देते इतरांना त्रास नको म्हणून त्यांच्या चुकांना क्षमा करायचे नाही तर आपल्याला त्रास नको म्हणून त्यांच्या चुकांना माफ करायचे. माफ करून ते जर सुधारण्यासारखे नसतील तर त्यांना आयुष्यातून कायमस्वरूपी बाजूला करणे श्रेयस्कर समजायचे.

          समाजात वावरताना, नोकरी धंद्यात अनेकदा आपण अडचणीत सापडतो, काही गोष्टीबद्दल आपल्या मनात एकप्रकारची भिती बसलेली असते. भित्या पाठी ब्रह्मराक्षस असे म्हणतात, त्याप्रमाणे त्या भितीमुळे आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो, तो मानसिक ताण आपल्या पेलवत नाही ना कोणाला सांगताही येत नाही. त्यावेळी आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव असे ठरवून ज्या गोष्टींची भिती वाटतेय त्यांना सरळ भिडायचे. जी गोष्ट घडण्याची भिती वाटते ती घडली असे समजायचे. कसलेही ओझे घेऊन जगायचे नाही मग ती भिती असो कोणाचे उपकार तात्काळ त्यातून बाहेर पडायचे.  कधीही कोणाची बरोबरी करण्याच्या भानगडीत पडू नये कधीही कोणाशी तुलना करू नये. तुमच्याकडे काय नाही हे पाहताना तुमच्याकडे जे काही आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण तुमच्याकडे जे काय आहे ते मिळावं अशी ही कित्येक जणांची स्वप्न असतील. जे नाही ते मिळवण्याच्या नादात जे आहे त्याचा उपभोग घेण्यास विसरू नका. या जगात कोणीच सार्वभौम नाही प्रत्येक जण कोणाला न कोणाला बांधील आहे. प्रत्येकाला कोणती ना कोणती नियमावली पाळावीच लागते. या जगी सर्व सुखी असा कोणीही नाही, प्रत्येकाला तो ज्या पायरीवर आहे त्या प्रकारची सुख आणि दुःख त्याच्या आयुष्यात असतात त्यामुळे कोणाच्या सुखदुःखाचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ देऊ नये.  शेवटी कितीही मिळवले तरी कमीच आहे आपण कोण आहोत हे पाहण्यापेक्षा आणि इतर कोणाशी आपली तुलना करण्यापेक्षा या ब्रम्हांडात ही आपली अखंड पृथ्वी एक धुलिकणा एवढी आहे हे लक्षात घ्या. कधी हे मिळवायचे ते मिळवायचे असा विचार करताना  "ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?" असं म्हणणारा प्यासा मधील गुरुदत्त डोळ्यांसमोरून तरळून जातो.


                                                संतोबा...

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!