Ads 468x60px

Sunday, February 2, 2014

यंदा कर्तव्य आहे --३) दुनियादारी


          बरेच दिवस टाळाटाळ केली पण आता शेवटी कांदा-पोह्याची सुरूवात करणे भाग होते,घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून अशी म्हण का आहे याचा कटू अनुभव येऊ लागला होता. आता या दोन्ही गोष्टी मला मृगजळाप्रमाणे भासू लागल्या होत्या. नेहमीच वेळ संपत आल्यावर माझी सुरूवात होते. आताही वेळ उलटून चालली आहे आणि आम्ही वधुसंशोधनास सुरूवात केली आहे. काही वर्षापूर्वी आईला वाटायचे एकुलता एक मुलगा आहे, चांगला शिकलेला आहे, रूपानेही राजबिंडा आहे. घरी बागायती शेती आहे, गावाकडे का होईना पण स्वत:चे घर आहे. हुशार, निर्व्यसनी, कमावता आहे. त्यामुळे आपल्याला हवी तशी सून मिळेल असा भाबडा विश्वास तिला होता. पण आता खूप उशीर झाला आहे असे तिला वाटतेय त्यामुळे तिला आता फक्त सून हवी आहे, स्वप्नांशी तिने तडजोड केली आहे. पण मी काय करू आता इकडे आड तिकडे विहीर. ज्या गोष्टी मला माझ्या मनाविरुद्ध स्वीकाराव्या लागल्यात त्याचा खूप त्रास भोगलाय मी. आता ही तसेच होईल का? माहीत नाही. योग नाही आला की भोग भोगावेच लागतात..
                मनाची तयारी म्हणून सहजच मॅट्रिमोनी साइट्सवर नोंदणी केली पण मुलींच्या अवास्तव अपेक्षा पाहून आमचा आत्मविश्वास पार गळफटला. इतर मुले मुलीचे नाव,गाव,फोटो पाहत असतील पण मी फक्त अपेक्षा काय ते पहात होतो.साइट्सवरुन जुळवायचा प्रश्नच नव्हता कारण मी स्वत:च ठरवून असे काही केले असते तर कुठेही काही नसताना अफवांचे अमाप पीक वाढले असते. मी लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करत नाही पण या गोष्टींचा पुढेही त्रास होईल म्हणून अजून काही काहीच नाही केले. त्यामुळे वधुसंशोधनाची जबाबदारी घरच्यांवर-नातेवाईकांवरच सोडली. पण आता सुरवात झाल्यावर प्रत्येकाला शिक्षणापासून नोकरीपर्यंत, पगारापासून प्रॉपर्टीपर्यंत इतरही बरीचशी माहिती पुन्हा-पुन्हा देताना फार ऑकवर्ड वाटू लागले पण पर्याय नव्हता. विवाहविषयक साइट्सवर एकदा माहिती देणे ठीक आहे पण इथे प्रत्येकवेळी तीच ती माहिती पुन्हा देऊन उठाव नसलेल्या माळव्यासारखी माझी अवस्था झाली होती. मुली विषयी काही माहिती विचारली की दिसायला चांगली आहे एवढेच मोघम उत्तर मिळत असे.
                हो नाही करता पाच-सहा मुली पाहून झाल्या आहेत. मी निर्णय अंतःप्रेरणेने घेत असल्याने अपेक्षा अशा नव्हत्या त्यामुळे कोणी विचारले की मुलीबद्दल काय अपेक्षा आहेत तर मी काही नाहीत असे सरळ उत्तर देई. पण माझ्या उत्तराने ती व्यक्ती संभ्रमात पडे. ह्याच्यामध्ये काही दोष तर नाही की अगदीच अडलाय असे तर नाही ना? असे कदाचित त्या व्यक्तीस वाटत असावे. हे माझ्या लक्षात आल्यावर अनुरूप असावी असे डिप्लोमॅटिक उत्तर देऊ लागलो. पहिल्यांदा कांदा-पोह्यासाठी जाताना खूप चिंतेत होतो कारण मला ती नाही आवडली तर नकार देता येईल की नाही. की काहीच विशेष अपेक्षा नसल्याने इतरांचे ऐकून होकार देईल. पण सुदैवाने तसे काही झाले नाही, पहिला कार्यक्रम उरकल्यानंतर आता मात्र ती भीती मनातून गेली.
                पहिल्या तिन्ही मुलींमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे त्यांना पाहून हा पाहण्याचा कार्यक्रम आहे की मयताचा हेच कळत नव्हते अगदी निर्विकार चेहरे. कसली उत्सुकता वैगेर काहीच आणि त्यांच्या घरचेही तसेच. त्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे ती हसतमुख असावी ही माझी प्राथमिक अपेक्षा आहे. एखाद्या ठिकाणी किवा कोणाच्या घरी गेल्यानंतर आधी असलेला आनंद माझ्यामुळे जर द्विगुणीत होत नसेल तर अशा ठिकाणी जायचे मी टाळतो. इथे तर पहिल्यांदाच मी आल्याचे कोणाला सोयर ना सुतक. त्यामुळे तात्काळ माझा नकार निश्चित झाला. कसलीच माहिती नसताना मी थेट पाहायला जायचो.त्यानंतर पाहिलेल्या दोन मुली सर्वसामान्यच होत्या पण मला भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता, त्यांचा बोलण्यातून मला हवा असलेला आपलेपणा जाणवत होता. त्यामुळे मी कसला ही विचार न करता होकार दिला. त्यांचाही होकार होता पण माझ्या मिळकतीवरुन नकार देण्याचा करंटेपणा त्यांचा घरच्यांनी केला. त्यांनी ज्या अशाश्वत कारणांसाठी नकार दिला  ते पचवणे मला जड जात होते.
                मी  संवेदनशील असल्यामुळे त्या नकारामुळे परत मनाची तयारी करायला महिना-दोन महिने लागायचे. मात्र त्या मुलींविषयी माझ्या मनात बिल्कूल रोष नव्हता उलट त्यांचाबद्दल चांगल्या भावना होत्या. एक तर नकार त्यांचा नव्हता तर घरच्यांचा होता आणि घरच्यांचा इच्छेचा मान राखण्याची आपली परंपराच आहे. पण त्यांच्या काळजीवाहू नातेवाईकांना ज्यांनी चिल्लर गोष्टीसाठी मला नकार दिला आहे त्यांना एक दिवस नकाराचा पश्चाताप करायला नाही लागला तर नवलच म्हणावे लागेल.

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!