Ads 468x60px

Sunday, December 25, 2016

प्रकल्पग्रस्त- एक शासकीय आजार!!!

              ग्रस्त म्हणजे एखाद्या आजाराने,विकाराने, व्याधीने त्रस्त व्यक्ती किंवा समाज. जसे की क्षयग्रस्त, कॅन्सरग्रस्त किंवा मोठ्या नैसर्गिक संकटात सापडलेले भूकंपग्रस्त,पूरग्रस्त,दुष्काळग्रस्त. याप्रमाणेच प्रकल्पग्रस्त हा एक शासकीय आजार आणि एक मोठे संकट आहे. ग्रस्त आणि त्यालाच समानार्थी शब्द म्हणजे बाधीत दोघांचा अर्थ एकच हे शब्द कोणत्याही शब्दाला जोडून आले तरी परिणाम दुःखदच असतो. आणि ग्रस्त हा शब्द सार्थ आहे, कारण आजवर शेकडो प्रकल्प झाले पण बहुतेक ठिकाणी ज्यांच्या जमिनी-घरे गेली त्यांना पूर्ण मदत केली नाही उलट त्यांना बेघर,उपरे होऊन पिढ्यानपिढ्या हक्कासाठी संघर्ष करावा लागला.  त्यांना ना मोबदला मिळाला ना त्यांचे पुनर्वसन झाले, झाले तर फक्त शोषण, अपमान. प्रकल्पात उद्योगपती, भूमाफिया व इतर धनदांडग्यांचाच फायदा होतो. स्थानिक विस्थापित होतात आणि उपरे प्रस्थापित होतात.  जर प्रकल्पात स्थानिक पिढीत लोकांचा फायदा होत असता तर प्रत्येक ठिकाणी प्रकल्पाला विरोध का झाला असता? उलट फायदा असता तर स्वागतच झाले असते. तसेच त्यांना प्रकल्पबाधित  किंवा प्रकल्पग्रस्त म्हणण्याऐवजी प्रकल्पलाभधारक हा शब्द प्रचलित नसता झाला का?.   
          भूत ही संकल्पना असली तरी एखाद्या भीतीने,दबावाने सैरभैर झालेल्या व्यक्तीला आपण भूतबाधा झाली असे म्हणतो अशीच भूतबाधा प्रस्थापित विमानतळामुळे पारगांव-मेमाणे आणि पंचक्रोशीतील भूमिपुत्रांची झालेली आहे. विमानतळाची घोषणा झाल्यापासून भूमिपुत्रांची तहान-भूक विसरून या एकाच विषयाने झोप उडवली आहे. हे विमानतळाचे भूत आपल्या मानगुटीवरून कसे उतरेल, त्यावर काय उतारा आहे. त्यासाठी गावात रोज सभा होत आहेत. आंदोलन , उपोषणे , काळ्या गुढ्या उभारून निषेध अशी अनेक अहिंसक हत्यारे उपसली आहेत,  पण कशाचीच मात्रा विमानतळ घालवण्यासाठी लागू पडलेली नाही. प्रसारमाध्यमे आणि सामाजिक कार्यकर्त्यानीं या विरोधाची दखल घेतली असली तरी अद्यापपर्यंत या विरोधाची दखल शासन, प्रशासनाने घेतलेली नाही. उलट शासन,प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी विमानतळ व्हावे आणि तेही त्यांनी ठरवलेल्या ठिकाणी यासाठी हट्टाला पेटले आहेत. त्यासाठी लोकांमध्ये फूट पाडणे, अडवणूक करणे , गैरसमज पसरवणे, बदनामी करणे असे अनेक उपदव्याप चालवले आहेत. 
           असं असले तरी पारगांव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा निर्धार पक्का आहे. कितीही भरपाई दिली तरी काळया आईचा सौदा करायचा नाही, प्रकल्पग्रस्त, ऊपरे व्हायचं नाही प्रसंगी जीव गेलातरी बेहत्तर. गावातील तरुण कामधंदा सोडून जिद्दीने विमानतळाला विरोध करण्यासाठी एकजूट झाले आहेत प्रसंगी नोकरीचा राजीनामा देण्यासही आहेत. आता जर विरोध नाही केला, आंदोलने नाही केली तर आयुष्यभर प्रकल्पग्रस्ताचा शिक्का कपाळी बसेल आणि आयुष्यभर उपरे होऊन  सरकार दरबारी दयेचा कटोरा घेऊन भरपाईची भीक मागवी लागेल याची जाणीव सर्वांना आहे. कोणाचे हित कशात आहे हे ज्याचे त्याला कळते. प्रकल्पाचे महत्व सांगत असताना ते त्याचे फायदे सांगत आहेत की तोटे याचेही भान त्यांना नसते. प्रकल्पात भागीदारी मिळेल वैगेरे विनोद केले जातात. प्रकल्प झाल्यावर भागीदारी सोडा तिथे कोणाला उभे पण करणार नाहीत. ऐकिव आणि गैरसमजावर आधारित माहितीवर आपला संबंध नसताना, परिणामांची जाण नसताना नको ते सल्ले देणे हे असंवेदनशीलपणाचे लक्षणच नाही तर प्रकल्पग्रस्तांवर होणार्‍या अन्यायातील पापाची भागीदारी पण आहे. त्यांचे असे बिनबुडाचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही विषाची परीक्षा का द्यावी.
            कायदा बऱ्यापैकी भूमीपुत्रांच्या बाजूने असला तरी  प्रत्येक ठिकाणी चार-दोन अशी उपद्रवी लोकं असतात ज्यांना आपल्या दुःखापेक्षा , दुसऱ्याच्या दुःखाचा आनंद जास्त असतो. नेते वैयक्तिक हेवेदावे, स्थानिक राजकारणातील मतभेदांचा व्यवस्थित अंदाज घेऊन आपलं सावज हेरत असतात. सुरुवातीला त्यांच्याकडून विरोधाचे नाटक करून ऐनवेळेस त्यांच्याकडून विरोधाची धार बोथट  केली जाते. लोकांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जाते. हा धोका टाळण्यासाठी  प्रकल्पविरोधी लढ्याचे नेतृत्व एकहाती किंवा मूठभर लोकांच्या हातात न देता सामूहिकपणे नेतृत्व करणे गरजेचे आहे.कोणीही क्षणिक लाभासाठी कोणाच्या हाताचे बाहुले बनू नये विमानासाठी इमान कोणी विकू नये. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रकल्प नाही झाला तर विकास नाही होणार असे कधी होत नसते.
        देशातील शेतकरी, कष्टकरी समाज कदाचित दुय्यम नागरिक असावेत असे वाटते कारण जगण्याच्या संघर्षासाठी हजारोंच्या संख्येने निघणारे, मोर्चे, आंदोलने यांची नेते, मंत्री, मुख्यमंत्री  दखल घेत नाहीत पण एखाद्या सेलेब्रिटीला ठेच  जरी लागली तरी त्यांना भेटण्यासाठी वेळ असतो. पैसा, प्रसिद्धी, श्रेयवादाच्या हव्यासापोटी सत्ताधारी हे विसरून जातात कि, त्यांना सत्ता लोकशाहीच्या माध्यमातून मिळाली आहे, वंशपरंपरेने आलेली राजसत्ता नाहिये. ही सत्ता आज ना उद्या जाणारच आहे याचे भान सत्ताधारयांनी ठेऊन सर्वसमावेशक विकास केला तर सगळ्यांचाच फायद्याचा आहे.
                         ....संतोबा   (संतोष गांजुरे)

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!