Ads 468x60px

Sunday, June 23, 2013

एक पत्र राजसाहेबांना….

       राजसाहेब आपली वक्तृत्वशैली असो वा जीवनशैली त्याचे प्रचंड आकर्षण आजच्या तरुणाईला आहे, तर इतराना कौतूक.मग तो विरोधी पक्षातील असो वा अमराठी!!! अर्थात आम्हीही त्यास अपवाद नाही आहोत. पण ते वैचारिक साम्यतेमुळे. साहेब कोणत्याविषयावर काय बोलतील, कोणावर टीका करतील,कोणाचे कौतूक करतील याचे अचूक अंदाज आम्ही बांधत असू, ते इतके अचूक असत की काही मित्रांना मी भाषणे लिहून देतो की काय अशी शंका येत. पण आता साहेबांची मोहिनी ओसरत चालली आहे, आमचे अंदाज ही चुकू लागलेत. जसा पक्षाचा विकास वेगाने झाला तशाच लोकांच्या अपेक्षाही वाढल्या पण त्यांचा भ्रमनिरासच झाला.
       समर्थकांसह विरोधकांचेही लक्ष नाशिकवर केंद्रित झालेय. होणारच कारण नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत आलाय, महापालिकेत सत्ता आहे. पण विकासाची कुठे सुरूवात आहे असे दिसत नाही. लोकांचा भ्रमनिरास होतोय आणि याची आपणास निश्चित जाणीव आहे. वेळोवेळी पुरेसा कालावधी पुर्ण झाला नाही, पूर्ण सत्ता नाही अशी कारणे आपण देत आहात. नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत असतानामहापालिकेत सत्ता असताना आपण अशी कारणे देणे शोभत नाही. सत्तेत असल्याशिवाय कामे होत नाही हे पटत नाहीत कारण विरोधी पक्षातीलही काही आमदार-खासदार आहेत जे सत्तेत नसताना जोमाने काम करत आहेत मग इतराना का अडचण यावी. आपण एक-दोन वर्ष पाळणा नाही हलला तर अनेक शंका घ्यायला. अनाहूत सल्ले द्यायला सुरूवात करतो. मग एक वर्षानंतर काही कामांची अपेक्षा करणे निरर्थक नक्कीच नाही. लोकांसाठी स्वत:ची संस्कृती,अस्मिता टिकवण्याबरोबरच विकासही महत्वाचा आहे. बायको नुसती सुंदर असून चालत नाही तिला मुलंही व्हायला हवीत ना?
       मोदींनी ठेका दिल्याप्रमाणे गुजरातेतून जशा विकासाच्या बातम्या येतात तशाच बातम्या नाशिकमधून येतील अशी आमची भोळी अशा होती, होती अशासाठी की आता वर्ष उलटून गेले पण तिकडे विशेष काही होतेय याची जराशीही कुणकुण लागत नाहीये. गुजरातेत काय,किती आणि खरच विकास झालाय हे आम्ही थोडेच पाहिलय? पण सगळेच उदोउदो करतायेत आणि आपण स्वत: गुजरातचा विकास पाहून आला आहात आणि तोंडभरून स्तुतीही केले आहे म्हणजे नक्कीच विकास होतोय असे मानायला हरकत नाही. पण आपल्या नाशिकमधून,महाराष्ट्रातून अशा बातम्या कधी येणार?
       आमच्या पुरंदरमध्ये विजयबापू शिवतारे या शिवसेनेच्या वाघाने , नजरेत भरेल असा कामे करण्याचा सपाटा लावला आहे, ते ही विरोधी पक्षातच आहेत आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात!! त्यांची कामे बघून बारामतीकराना घाम फुटलाय म्हणे. निवडणुकीच्यावेळी आमच्या मातोश्रींनी कोणाला मत देऊ असे विचारले तर आम्ही रेल्वे इंजिनवर शिक्का मार म्हणालो माझा पक्ष आहे. शेजारी-पाजारी, सगेसोयरे म्हणाले घड्याळावर शिक्का मार आपला पाहुणा आहे. आईने बेधडक धनुष्यबाणावर शिक्का मारला. तोपर्यंत धनुष्यबाणाचा पुरंदरशी संबंध फक्त अनामत रक्कम जप्त होण्याइतपतच होता यावेळी इतरांची अनामत रक्कम जप्त झाली!! आज आम्हाला आमच्या मातोश्रींचा अभिमान वाटतोय. ती अशिक्षित आहे पण अडाणी नाही.त्यामुळे आपल्याकडे सत्ता नाही, पुरेसा कालावधी मिळाला नाही, अशी कारणे आपल्यासारख्या डॅशिंग नेत्याकडून अपेक्षित नाहीत.
       आता विधानसभा निवडणूका जवळच आल्यात काही दिवसात आपण सभा घ्यायला सुरवात कराल. पण खरे सांगतो साहेब सभा ऐकण्याची ती ओढ शिल्लक नाही राहिली. मान्य आहे बरेचशे वैचारिक दिवाळखोर नेते आहेत त्यांच्यावर आपण टीका-टिप्पणी करता त्यांची खिल्ली उडवता नक्कल करता. आम्ही ते शेकडो वेळा पाहिलेय पुन्हा पुन्हा, पण आता ते पाहून आम्हाला हसू येत नाही. त्या नेत्यानी सुद्धा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी काही ना काही कामे केलीत, काही तजवीज केलीये. याउलट आपल्या नेत्यांची- कार्यकर्त्यांची नावे खंडणी वसुली,खून,मारामारी, बलात्कार अशा अनेक गुन्हेगारी खटल्यात येतायेत. आणि आपण सभामधून एकहाती सत्तेची मागणी करताय. जनतेच राहू दे बाजूला पण कार्यकर्त्यांचे काय त्यांना अपेक्षित उर्जा मिळालीच नाही कसे काम करणार ते. सत्तेची पहिली पायरी म्हणून नाशिक कडून काही अपेक्षा होत्या पण सर्वांच्या पदरी निराशाच पडलीये. आपल्या टीकेचा, कारणांचा आम्हाला उबग आला आहे.
       त्यामुळे उद्या कोणीही एखादा टग्या उठून साहेबांना रड्या म्हणेन , आम्हाला ते बिल्कूल आवडणार नाही पण त्याचा विरोध तरी आम्ही कसा करायचा?.....


Saturday, June 22, 2013

साहेब

                आमचे स्वप्न काय हे ऐकून बर्याच जणांसाठी तो चेष्टेचा विषय बनतो,कारण ते आहेच तसे स्वप्नवत
आम्हाला आमची कोणतीही गोष्ठ सर्वसामन्य असलेली आवडत नाही मग आमचे स्वप्न तरी सामान्य कसे असेल?याच स्वप्नापायी आम्हाला मुंबईची अनामिक ओढ लागली अगदी आमचे पहिले प्रेम म्हणजे मुंबई!!!
                आज २० नोव्हेंबर २०१२ ला आम्हाला मुंबईत पाउल ठेऊन  वर्षे झालीपण खरे सांगायचे तर या सहा 
वर्षात आम्हांस खास असे काही करता आले नाहीप्रयत्न केले पण अपेक्षित यश कधीच लाभले नाहीत्याची कधी आम्ही पर्वा केली नाही कारण आमचे स्वप्न पूर्ण होणे किती खडतर आहे आणि त्याला किती कालावधी लागेल 
याची आम्हांस पूर्ण जाणीव आहेपण मुंबईत आल्यानंतर एक ना एक दिवस आमची बाळासाहेबांसोबत भेट   होईल अशी आशा नव्हे खात्रीच होते पण हा योग जुळून येण्याआधीच परवा साहेबांनी हे जग सोडलेआम्ही   निश्चितच आमच्या प्रयत्नात कमी पडलो आणि साहेबांचा आशिर्वाद नाही लाभला याची आम्हांस आता खंत  वाटते आहे पण नशिबानेच निदान अंत्ययात्रेत का होईना डोळेभरून साहेबांचे अंतिम दर्शन झाले हाच आशीर्वाद समजून   आम्ही आमचे पुढील प्रयत्न चालू ठेऊ.
    आम्ही नक्की काय प्रयत्न केले हा सर्वाना प्रश्न पडला असेल पण याचे उत्तर माझे स्वप्न पूर्ण झाल्यानंतरच भेटेल आणि त्यावेळीच त्याला काही तरी अर्थ प्राप्त झाला असेलदुर्दैवाने यासाठी आपणांस आणखी काही दशके वाट  पहावी लागेल.....


Saturday, June 15, 2013

मी आणि माझी अहंकारीक वचने --- ५

आयुष्यभर अपराधीपणाचे ओझे वाहण्यापेक्षा अपराध छोटा असो वा मोठा तो तत्काळ मान्य करणे केव्हाही श्रेयस्कर!!!
***********************************************************************
माझा तुमच्या देवावर विश्वास नाहीये, मी असा दगड शोधतोय ज्यावर मला डोळे झाकून विश्वास ठेवता येईल. भले माझ्या यशानंतर तुम्ही त्याचा देव केला तरी चालेल!!!!!!!!!!!!!
************************************************************************
जगासाठी आपण चांगले असणे ही आपल्या स्वत:साठी सर्वात वाईट गोष्ट आहे.
************************************************************************
ज्यांनी आपल्या ध्येयाशी तडजोड केली आहे ते सर्वजण त्यांच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीनेही यशस्वीच आहेत....
************************************************************************
सर्व गोष्टी जर माझ्या मनासारख्या झाल्या असत्या तर आज मी काहीच करू शकलो नसतो
************************************************************************
विवाहित मुलीचे आई-वडिलांप्रती असलेले प्रेम वळवाच्या पावसासारखे असते, वर्षातून एखादेवेळेसच अवचित येणारा वळीव सोसाट्याचा वारा,मेघांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटांसह येऊन आपल्या आगमनाची वर्दी अखंड आसमंताला देत क्षणात धो-धो बरसून नाहीसा होतो, नंतर सारे कसे शांत सुने-सुने........
तर मुलाचे प्रेम म्युनिसिपालीटीच्या पाण्याच्या नळासारखे.... सर्वांची रोजचीच तक्रार असते पण त्याशिवाय जगताही येत नाही...
************************************************************************

Wednesday, November 14, 2012

ये ना सजनी


ये ना ये ना सजनी
एकांताच्या रणरणत्या ऊन्ही,
जिंकूनी मज घे ना
हळव्या या क्षणी मिठीत ये ना.

ये ना ये ना सजनी
मी तुझाच तुझाच जाणुनी,
श्वास-श्वासात गुंफूनी एक हो ना
थरथरत्या ओठांस आधार दे ना.

ये ना ये ना सजनी
ओल्या माझ्या स्वप्नातील अप्सरा बनूनी,
मोहरल्या स्पर्शात बोल ना
प्रेमाचे गोड गुपीत खोल ना.
  
ये ना ये ना सजनी
मज अतृप्ता घडे अमृताचे घेऊनी,
झिंगूनी नशेत प्रणयाच्या
पाठी बेधुंद क्षणाच्या आठवणी सोड ना.

ये ना ये ना सजनी
आरस्पानी सौंदार्याची खाण लेऊनी,
बिलगूनी मज बेशलाक विसाव ना
स्वर्गसुखाच्या लहरीत चिंब हो ना.

( एक प्रयत्न फसलेला. पण त्यासाठीसुध्दा दोन दिवस खर्च केले. जाउ दे हा पहिलाच प्रयत्न होता. तरीसुध्दा काहीसा बदल करून हे सुध्दा यशस्वी होईल याची खात्री आहे.)

ब्रेक-अप

(फॅशनेबल/राजेशाही म्हणता येईल अशा वेषातील प्रेमी युगुल, प्रेयसी थोडी बावरलेली तर प्रियकराचा दु:खी असल्याचा व सर्व काही संपले असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न ....
प्रियकर विंगेतून धीरगंभीरपणे चालत येत आहे, मागून प्रेयसी धावत धावत नाटकी स्वरात प्रियकराचा हात धरून विनवणी करतेय...)
प्रेयसी- नाही नाही, नाथा हे शक्य नाही!!!तुम्ही मला सोडून जाणे कदापि  शक्य नाही . मी तुम्हाला माझे सर्वस्व अर्पण केले आहे, काय दिले नाही मी तुम्हाला घासातील घास दिला,श्वासातील श्वास दिला आणि तुम्ही माझ्या भावनांची काहीही कदर न करता मला सोडून चालला आहात.
प्रियकर- असे कसे म्हणू शकतेस तू? तुझ्या प्रत्येक घासामागे पैशांची रास माझी होती, अन् प्रत्येक श्वासमागे स्वर्गसुखाची आस होती, आणि भावनाबद्दल बोलशील तर तिच्यासाठीच तर तुला सोडून चाललो आहे ना!
प्रेयसी- म्हणजे माझ्याच जीवाभावाच्या मैत्रिणिने माझा घात केला तर...
प्रियकर- घात नव्हे राणी साथ, साथ दिली तिने मला प्रत्येक नाजूक क्षणी....
प्रेयसी- (कानावर हात ठेवून दु:खावेगाने) बस्स करा आता, मला हे नाही ऐकवत. कोणत्या जन्मीचा सूड उगवत आहात तुम्ही माझ्यावर. चंद्राला साक्षी ठेऊन आपण काय काय नाही केले.
प्रियकर - नाही नाही ते केले..
प्रेयसी - याच चंद्राला साक्षी ठेऊन तुम्ही मला सात जन्म साथ देण्याचे वचन दिले होते.
प्रियकर - हो दिले होते, सात जन्मी साथ देण्याचे वचन दिले होते आणि मी ते पाळणार ही आहे,पण सात जन्मात किती दिवस साथ द्यायची हे नव्हते सांगितले, या जन्मासाठीचा तुझा कोटा संपलेला आहे.
प्रेयसी - नाथ एवढा अन्याय नका करू माझ्यावर, पौर्णिमेच्या चंद्राला साक्षी ठेऊन प्रेमाची बरसात केली आणि आज आमावस्येच्या अंधार्‍या रात्री माझ्या जीवनात अंधार करून तुम्ही चालला आहात.
प्रियकर - अंधार तर तुझ्यामुळे झाला होता माझ्या जीवनात, पण मला आता भावना भेटली आणि मला खर्‍या प्रेमाचा साक्षात्कार झाला . तू मला सर्वस्व अर्पण करण्याचे नाटक करून माझ्यावर वर्चस्व प्रस्थापित केले.
प्रेयसी - (अतिशय रागाने) ये येडओझ्या, ज्या भावनाच्या जीवावर तू उड्या मारत आहेस ना ती माझ्याच सांगण्यावरुन
तुझ्यावर प्रेमाचे नाटक करत आहे....
प्रियकर - नाही,नाही हवे तर येडओझ्या अशी प्रतीकात्मक शिवी देण्यापेक्षा खरी शिवी दे पण हे खोटे आहे,हे कबूल कर.
प्रेयसी - नाही हे खरेच आहे, मला माझ्या स्वप्नातील राजकुमार केव्हाच भेटला आहे, आणि तुझ्यावरच्या खोट्या प्रेमापायी तुझी तात्पुरती सोय करून तुझ्या प्रेमाची परतफेड करण्याचा प्रयत्न करत होते, पण तू जास्तच उडायला लागला म्हणून खरे बोलायची वेळ आली.
प्रियकर - मग तू तो भेटला त्याचवेळी मला का नाही सोडले?
प्रेयसी - सोडणार होते पण अड्जस्ट होत होते म्हणून तुला सोडवत नव्हते!!!!!! शेवटी कितीही अनुभव असला तरी असे तडकाफडकी सोडणे अजून जमत अजून नाही मला.
प्रियकर - म्हणजे मी तुझे पहिले प्रेम नव्हतो, तो स्पर्श पहिला नव्हता आणि तो अनुभवही!!!! मला वाटले मीच ओपनिंग केलीय.
प्रेयसी - ओपनिंग,ओपनिंग काय बोंबलतोय. बॉल जवळ येईपर्यंत तरी तुझी बॅट हातात टिकते का? तुला साधे जुने बॉल हाताळता येत नाही आणि निघाला ओपनिंग करायला! त्या नव्या कोर्‍या बाउन्सी पिच आणि लालभडक कडक बॉल समोर भल्याभल्यांची हेल्मेट घालून फाटते तिथे तुझी काय दशा झाली असती याची कल्पना आहे का तुला?
प्रियकर - ते काहीही असू दे पण तू विश्वासघात केला आहेस.
प्रेयसी - नाही नाही मी विश्वासचा घात नाही केला उलट तोच मला सोडून गेला! त्याचमुळे भावना आणि माझ्यामध्ये १ ऐवजी
२ चा गॅप पडला आहे. माझे ११ झाले आहेत तर तिचे ९ .
प्रियकर - हे ऐकण्यापुर्वी माझे कान का फाटले नाहीत.
प्रेयसी - नीट बघ कान नाहीतर दुसरे काहीतरी फाटले असेल.
प्रियकर - ते काय फाटले आहे ते माझे मी बघेन तुझा माझा आता काहीही संबंध राहिला नाहीए.
प्रेयसी - हो ना खरेच आपले संबंध जास्त काळ नाही टिकले, तुझ्या आग्रहाखातर तुला नाथ म्हणता म्हणता मला जगन्नाथ भेटला, वाटले आता तुला भावनाचा नववा नवनाथ बनवेन तुही सुखी होशील पण तुला अज्ञानातील सुख नाही मानवले त्याला मी काय करणार .आता भावना करेन आठव्या दशरथाबरोबर कंटिन्यू नाहीतर मी जगन्नाथला सोडेपर्यंत राहीन आठव्याच्या आठवणीत काही दिवस.
प्रियकर- काय या आजकालच्या मुली...भावनाकडे दशरथ आहे,तुला जगन्नाथ भेटला आहे आता मी काय करू???
आकाशवाणी -- अपना हाथ जगन्नाथ!!!!!!!!!!(प्रियकर डोक्याला हात लाऊन खाली बसतो)
प्रियकर --- पुन्हा एकदा ..... 


(हे स्किट स्टार प्रवाहवरील 'ढिंका चिका' साठी लिहिले होते पण मलाच ते फसलेय असे वाटल्याने नाही पाठवले!!!!)

Wednesday, November 7, 2012

बायकोचा प्रियकर !!!



        येथून जवळच आमचे घर आहे पण या बागेतील एका कोपर्‍यात बसणे आणि समोर रंगबेरंगी आकर्षक रोषणाई केलेल्या बारकडे एकटक पाहत विचारात हरवणे हा एक महिन्यापासूनचा दिनक्रमच ठरलाय. ऑफीस सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी जाण्याऐवजी आजकाल आमची पाउले या बागेकडे वळतात.घरी जावे तरी कोणासाठी? हा प्रश्न आम्हाला घरी आतुरतेने वाट पाहणारी सुंदर,प्रेमळ बायको, दोन वर्षाची आमची सुंदर राजकन्या असताना पडावा याचे सर्वानाच काय मलाही आश्चर्य वाटतेय.
असे काय बिघडले की अचानक एवढा दुरावा वाढला? बर्‍याचवेळा अज्ञानात सुख असते असे म्हणतात, आतापर्यंत आमच्या बायकोचे आमच्यावर प्रचंड जीवपाड प्रेम आहे या अज्ञानात आम्ही होतो पण सुखी होतो. आता ही गोष्ठ उघड तरी कशी करावी कारण आपल्याकडे गुन्हेगारापेक्षा पिडीतालाच दोष देण्याची पध्दत आहे. काल परवापर्यंत मी एक आदर्शवत नवरा होतो, पण आता आमच्या बायकोच्या बाहेरख्यालीपणामुळे माझा काही दोष नसताना काहीबाबतीत आमच्यावरही दोष येईलच. आमचा दोष एवढाच की एक दिवस ऑफिसमध्ये एक मुलगी प्रेमभंग झाला म्हणून एक विश्वासू सहकारी म्हणून आमच्याजवळ रडरड रडली आणि आम्ही तिचे सांत्वन करता करता तिचा प्रेमात पडलो आणि लग्नही केले एवढेच!!!
                आम्ही अगदीच काही गर्भश्रीमंत नाही आहोत तेव्हा सुरवातीलाच आम्ही आमच्या बायकोला माझ्या मिठीतच स्वर्ग आहे  अशी वल्गना केली पण बायकोच्या "माझ्यासाठी हा स्वर्ग ठीक आहे पण, आपल्या होणार्‍या बाळासाठी तर हवा ना?" या प्रतीउत्तराने निरूत्तर होऊन आम्ही पूर्वीपेक्षा जास्त जोमाने कामास लागलो.एव्हाना आमच्या बायकोने एका सुंदर राजकन्येला जन्म दिला. आता आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि आम्ही पूर्वीपेक्षा जास्त तडफेने काम करू लागलो.  रात्री थकून-भागून आल्यावर शांत झोपलेल्या आमच्या निरागस राजकन्येला पाहून आमचा थकवा कुठच्याकुठे पळून जात होता. हो पण बायकोकडे थोडे दुर्लक्ष झाले पण त्याला पर्याय नव्हता. आम्ही आता आई-बाप झालो होतो त्यामुळे एवढी तडजोड करणे भागच होते. पण दुर्दैवाने असे म्हणावे लागेल आम्ही बाप झालो पण आमच्या बायकोला आई नाही होता आले. तिने दुसर्‍याच्या मिठीत स्वर्ग शोधला. जिच्या प्रेमभंगाच्या दुखाःच्या भळभळत्या जखमेवर फुंकर घातली नव्हे ती बरी केली तिने तीच जखम खरवडून आम्हास दान केली.
         मला खरेच  माझी बायको बाहेरख्याली  आहे या गोष्टीवर बिल्कुल विश्वास नाही बसला. पण काही न शोधता पुराव्यांच्या एवढ्या पुरवण्या साचल्या की त्या तपासण्यावाचून पर्यायच शिल्लक नाही राहिला. सरतेशेवटी काल आम्ही तिच्या प्रियकराला भेटायला गेलो आणि आमच्या पायाखालची जमिनच हादरली..!!! त्यांचे हे लफडे सुमारे दोन वर्षापासून चालू होते त्यावेळी तो अविवाहित होता आणि त्याची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आणि तयारी होती पण आमच्या बायकोला फ्क्त संबंध हवे होते जबाबदारी नव्हे!!! त्याच्या लग्नानंतर त्याने बर्‍याचदा हे संबंध तोडायचा प्रयत्न केले पण तिच्या हट्टासमोर त्याचे काही चालले नाही. तो ही बिचारा हैराण झालाय, आम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली पण जिथे आमच्याच कंबरेची लंगोटी सुटलीये तिथे दुसर्‍याची लाज कशी झाकणार!!!!
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढे सर्व माहीत आहे तर एकदाचा सोक्षमोक्ष का नाही लावून टाकत या प्रकरणाचा. बरोबर आहे तुमचे पण त्याचे असे आहे की आम्हाला कोणी कितीही दुखावले तरी कोणाशीही सूडबुध्दीने वागायचे नाही असे संस्कार आहेत आमच्यावर दुसरे असे की आमचे विचारपूर्वक घेतलेले आणि अविचाराने घेतलेले दोन्ही प्रकारचे निर्णय फसतात म्हणून आम्ही आत्मप्रेरणेने (इन्स्टिंक्ट) निर्णय घेतो पण गेले महिनाभर याबाबतीत आमचे अंतर्मन आम्हास काहीच कौल देत नव्हते पण आम्ही मात्र काही झाले तरी बायकोला त्रास होईल असे वागणार नव्हतो. हो एक सांगायचे राहिलेच या माझ्या या महिन्याभरच्या कठीण कालखंडात आमच्या वर्गमैत्रीणने आम्हास खूप आधार दिला.
 आताच तासाभरापुर्वी ती येथून निघून गेली आहे कदाचित आमच्या आयुष्यातून देखील कायमची. आमच्या महिन्याभराच्या सहवासात तिच्या हे लक्षात आले की पुर्वीप्रमाणे रागाच्याभरात आम्ही निर्णय नाही घेत आणि आम्ही सर्वच बाबतीत सुसंस्कृत आदर्शवत बनलो आहे तसा पुर्वीही होतोच पण आता आमचे विचार संकुचित राहीले नव्हते. याच मैत्रिणिने आम्हाला पुर्वी मागणी घातली होती, आमच्यापेक्षा काकणभर सरस असताना देखील आम्ही तिला नकार दिला होता. हिनेच आम्हाला बायकोच्या या गोष्टीची कल्पना दिली. पण आता आमच्यातील बदल पाहून न राहून ती रडू लागली व मला माझ्या बायकोपासून दूर करण्यासाठी व मला मिळवण्यासाठी जो काही कट तिने तिच्या मित्राच्या सहाय्याने रचला होता तो तिनेच उघड केला.
तिची कबुली ऐकून क्षणभर मी निशब्द झालो पण लगेच सावरलो. तिला वाटले असेल मी तिच्यावर रागावेन पण का मी का रागवावे ? त्या काळात मला जर कोणी नकार दिला असता तर मीही तो पचवू शकलो नसतो, आणि काय केले असते हेही नाही सांगू शकत. दुसरे असे की हा महिनाभराचा काळ एकप्रकारे माझ्या परीक्षेचा काळ होता आणि मला असे वाटतेय मी निश्चित पास झालोय. आणि त्याबदल्यात मला आता  या  पुढील सुंदर आयुष्य भेटले आहे. मनावर खूप ताण होता तो एका क्षणात दूर झाला आहे. आता मी घरी निघतोय खूप दिवस बायकोला स्वर्गसुखाची अनुभूती दिली नव्हती आज अभूतपूर्व अशी स्वर्ग सैर घडवणार आहे, एवढेच नव्हे तर आता रोज स्वर्गाची सैर करण्याचे ठरवले आहे.

  शेवटी आम्हाला आमच्या बायकोच्या नसलेल्या प्रियकराचे आभार मानायलाच हवेत!!! नाही का?

Tuesday, October 30, 2012

लाल डब्बा


             लाल डब्ब्याशी तसा महाविद्यालयीन काळापासूनच घनिष्ट संबंध त्याकाळी ४५१७ हा आमचा परवलीचा शब्द बनला होता. महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी याच क्रमांकाची सासवड-सुपा पारगाव मार्गे जाणारी एसटी बस प्लॅटफॉर्म क्र.८ ला लागायची, अन् ही चुकली तर किमान तासभर तरी वाट पाहण्याव्यतिरिक्त पर्याय नसायचा. अर्थात धावतपळत का होईना सर्वांचा ही एसटी बस पकडण्याचा प्रयत्न असे.

अर्थात सर्वांनाच अशी घाई असे अशातला भाग नाही,काहीजण महाविद्यालयातील हिरवळीवर एवढे लुब्ध असायचे की दुपार कधी सरुन जायची याचे त्यांना भानच नसायचे,आमचे कनिष्ठ महाविद्यालय असल्याने गणवेश सक्तीचा होता आणि तो आमच्या सोईचाही होता.आम्ही कला शाखेत असल्याने वर्गात भरपूर आकाशी निळ्या रंगाची हिरवळ असायची. आणि या हिरवळीचा पूर्णपणे निचरा होईपर्यंत बरेच जण महविद्यालयाच्या,आणि बसस्थानकाच्या परिसरात घुटमळायचे. आम्ही कधी नाही घुटमळलो. तेव्हा त्याचे काही नाही वाटले पण आता कधी-कधी एकांतात वैषम्यही वाटते. यदाकदाचित....बरं ते असो!!!!

यथावकाश आमचे अर्धवट शिक्षण संपवून नोकरी मिळवण्याच्या खटपटीस लागलो आणि तीही आम्हांस स्वप्ननगरीतच हवी होती.  त्यास आमच्या परममित्राच्या कृपेने दीड-दोन वर्षांनी का होईना अपेक्षित यश लाभले. मधल्या काळात लाल डब्याशी तुटलेला संबंध काही अंशी पुन्हा जोडला गेला,अर्थार्जन बेताचे असल्याने येणे-जाणे ही बेताचेच होते आणि लाल डब्याला पर्यायही नव्हता. रुळावरील आगगाडीचा पर्याय होता पण तो आमच्या प्रकृतीला मानवणारा नव्हता.
           
होता होता आमचीही गाडी व्यवस्थित रुळावर धावू लागली. त्यातच वातानुकुलित शिवनेरी बसची सेवा सुरू झाली.वातानुकुलित शिवनेरी बसचा  आरामदायी प्रवास सुरू झाला. पण दोन-तीन वर्षानंतर हा प्रवासही आम्हाला अस्वस्थ करू लागला. एकतर आमची इतर गोष्टीबरोबर शारीरिक प्रगतीही मजबूत झाल्यामुळे त्या आरामदायी सीटवरही अवघडल्या सारखे वाटू लागले. लाल डब्यात खिडकीशी बसून वार्‍याची फडफडणारी झुळुक अंगावर घेण्यात एक वेगळीच मजा यायची. विविध फुलांचा मिश्रित मंद सुगंध बाहेरच्या निसर्गाशी संवाद साधण्यास भाग पाडायचा. बंद डब्यामध्ये तो संवाद हरवला होता. बाहेरील प्रत्येक गोष्टीबद्दल दुरावा वाढू लागला होता,अगदी गुदमरायला व्हायचे. नीरव शांतता असल्याने फोन वर बोलायला नको वाटायचे, फोन ऑफीसमधून असेल तर नाईलाज व्हायचा पण एखाद्या जवळच्या मित्राचा असेल तर मात्र आम्ही बिलकुल घ्यायचो नाही कारण मित्र जेवढा जवळचा तेवढा आमचा आवाज वाढतो असा अनुभव. अश्या ह्या निर्जीव प्रवासाला जीव कंटाळला होता. त्यात सरकारनेही अनेकदा भाडेवाढ केल्याने आधीच महाग असलेला प्रवास अजूनच महाग झाला. त्यानंतर आम्ही खूपवेळा ठरवले बस्स झाला हा शिवनेरीचा प्रवास प्रत्येकवेळी आम्ही निघताना आज लाल डब्ब्यानेच जायचे असा पण करायचो पण तरी सुद्धा प्रत्यक्षात पुढे शिवनेरी पाहिली की आमचा हा पण नेहमीच बारगळायचा जवळपास वर्षभरतरी असेच चालू होते.



शेवटी नाइलाजानेच आमचा संकल्प सिध्दीस गेला. नाइलाजाने यासाठी की दरम्यानच्या काळात आता आमची पत वाढली आहे असा गैरसमज आमच्या मनात निर्माण झाला होता व या फसव्या प्रतिष्ठेला धक्का पोहाचेल अशी भीती वाटत होती पण ती फक्त बसमध्ये बसेपर्यंत. कारण आजपर्यंत अजून एका गोष्टीला मी मुकत होतो तो म्हणजे बसचा वाहक. बसचा वाहक म्हणले की त्याची प्रवाशांशी विविध कारणाने होणारे वाद हेच चित्र आपल्या डोळ्यासमोर प्रथम उभे राहते पण तोही काही कमी मनोरंजक अनुभव नसतो.पण आता हे चित्र निश्चितच बदलले आहे. आता जास्तीत जास्त प्रवासी एसटी ने यावे यासाठी त्यांचा चांगला प्रयत्न असतो. मला राहून राहून त्यांच्या बदललेल्या या व्यावसायिक वृत्तीचे फार कौतुक वाटते.
  तेवढ्यात एक सुंदर तरुणी सहा वर्षाच्या प्रवासात प्रथमच आमच्या शेजारी येऊन बसली. आतापर्यंत लहान वाटणार्‍या त्या सीट्स अचानक मोठ्या वाटू लागल्या कारण तिच्या व आमच्यामध्ये एक माणूस सहज बसू शकेल एवढी जागा शिल्लक होती.

आता ठरवलय "वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन,'

' गाव तेथे एसटी' असे ब्रीद वाक्य मिरविणा-या एसटी महामंडळाला आणि त्यांच्या कर्मचारयांना मानाचा मुजरा!!!

---संतोष गांजुरे


 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!