Ads 468x60px

Featured Posts

Monday, January 26, 2026

मराठी भैय्ये अर्थात खानदानी आईबापांच्या लावारिस अवलादी

स्वातंत्र्यानंतर भारतात राज्यांची पुनर्रचना भाषेच्या आधारावर करण्याच्या मागणीने जोर धरला. States Reorganisation Act 1956 अंतर्गत अनेक राज्ये भाषेवर आधारित झाली, पण महाराष्ट्र-गुजरातसाठी द्वैभाषिक मुंबई राज्य (Bilingual Bombay State) निर्माण झाले. मुंबई हे आर्थिक केंद्र असल्याने गुजराती व्यापारी वर्ग, काँग्रेसमधील काही नेते आणि केंद्र सरकारला मुंबई केंद्रशासित ठेवायची होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह गुजराती, पारशी, मारवाडी इत्यादी लोकांनी मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध केला. या सर्व विरोधांमुळे संयुक्त महाराष्ट्र समितीने (एस. एम. जोशी, एस. ए. डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे इत्यादी) तीव्र आंदोलन केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दीर्घ आणि रक्तरंजित लढ्याचा विजय झाला, १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर अखेर १ मे १९६० रोजी बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट अंतर्गत मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. भाषिक प्रांतवार रचनेनुसार मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. मराठी अस्मितेसाठी आणि मुंबईसाठी १०६ हुतात्म्यांचे बलिदान द्यावे लागले, हे बलिदान आजही मराठी माणसाच्या एकात्मतेचे आणि भाषिक अस्मितेचे, अभिमानाचे प्रतीक आहे. मोठ्या संघर्षाने अस्तित्वात आलेला महाराष्ट्र हा नेहमीच प्रगतिशील मार्गावर चालत आला आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रभागी आहे किंबहुना अनेक क्षेत्रांची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवलेली आहे. महाराष्ट्राला अनेक समाजसुधारकांचा, संतांचा, सुसंस्कृत राज्यकर्त्यांचा वारसा लाभलेला आहे. अनेक राज्यकर्ते, समाजसुधारक, संत, राजकारणी, उद्योगपतींनी महाराष्ट्र आणि पर्यायाने देश घडवलेला आहे. सर्वांचा परिपाक म्हणून इतर राज्यांच्या तुलनेने सर्व घटकांसाठी राहण्यासाठी सुरक्षित राज्य आहे म्हणून देशभरातील लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात स्थिरस्थावर होत आहेत.
अलीकडच्या साधारणपणे एकदोन दशकापासून महाराष्ट्राची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या पीछेहाट होत आहे तरी देखील अजूनही महाराष्ट्राची कोणत्याच बाबतीत देशातील इतर राज्यांबरोबर तुलना होऊ शकत नाही. अनेक राज्यातील लोक येथे स्थलांतरित होतात, ते येथे केवळ पोटापाण्यासाठी येतात अशातला भाग नाही तर एक सुरक्षित, सन्मानजनक जीवन जगण्यासाठी येतात. असे हे सर्व असताना महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अवकाशात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. सगळं काही असूनही एक त्याच्या आयुष्यात रितेपणा आलेला आहे. सर्वच बाबतीत मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा दैदिप्यमान वारसा असताना त्याला दुसऱ्याच्या कलंकित विकृतीची भुरळ पडली आहे. मराठी माणसाने काय केलं नाही? मराठी माणसाने स्वराज्य उभं केलं, अगदी अटकेपर झेंडे रोवले. लोकशाहीत स्वराज्याच्या धरतीवर लोककल्याणकारी राज्य चालवण्यासाठी राज्यघटना लिहिली. स्वतंत्र भारताच्या पहिल्या नोटेवर सही केली, मुलींना अन्याय्य रूढी परंपरेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी देशातील पहिली मुलींची शाळा काढली. त्या शाळेत शिकवणारी पहिली महिला शिक्षिका बनली. देशभरातील कामगारांना रविवारची हक्काची आठवडी सुट्टी मिळवून दिली. इथल्या संतांनी वारकरी संप्रदायाची पताका पंजाबपर्यंत नेली, त्यांनी अन्याय रूढी, परंपरावर, चमत्कारावर टीका करून समतेचा मार्ग दाखवला. मराठी माणसाने साहित्य, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात नावलौकिक कमावला आहे. असे असताना काही मराठी भैय्यांच्या मनात स्वतः बद्दल, स्वतःच्या भाषेबद्दल, संस्कृती आणि एकूणच सर्व गोष्टीविषयी न्यूनगंड निर्माण झाला आहे. त्याला स्वतःचा दैदिप्यमान वारसा अडगळीत टाकून, दुसऱ्याचा विकृत वारसा अंगीकारण्याची विपरीत बुद्धी झाली आहे.
नैसर्गिकपणे आपल्याला चांगल्या गोष्टींचे आकर्षण असते, आज आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा अधिक चांगले मिळावे असा आपला प्रयत्न असतो. चांगल्या राहणीमानासाठी अन् एकूणच आपले जीवनमान उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्यासाठी आपण त्या-त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांना आपला आदर्श मानत असतो. मराठी भैय्ये कदाचित या गोष्टीला अपवाद आहे की काय असे आता वाटू लागले आहे. ज्या गोष्टींचा अभिमान बाळगायला हवा त्या गोष्टींची लाज मराठी भैय्यांना वाटत आहे. ज्यांच्यामुळे कार्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आला, ज्यांच्यामुळे कार्यामुळे आपल्याला सामाजिक सुरक्षितता लाभली, ज्यांच्यामुळे कार्यामुळे आपली वैयक्तिक प्रगती झाली, ज्यांच्यामुळे कार्यामुळे आपल्याला पोटापाण्यासाठी आपल्या भागातून परागंदा व्हायला न लागता आपल्या राज्यात स्वाभिमानाने जगता येतेय, ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात चांगला बदल झालेला आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञ रहाण्याऐवजी त्यांचा द्वेष करण्याची चढाओढ त्यांच्यामध्ये लागलेली आहे. अनेक उच्चशिक्षित आणि सुरक्षित जीवन जगणाऱ्या अनेकांना अल्पशिक्षित, विध्वंसक, दूरदृष्टीचा अभाव असलेले, घटनाबाह्य, अनैतिक कार्य करणारे टपोरी नेते अचानक हिरो वाटू लागले आहेत. महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि संत यांचे कार्य त्यांना मातीमोल वाटू लागले आहे. मातृभाषेत बोलणे त्यांना कमीपणाचे वाटू लागले आहे. इथल्या मराठी भाषेवर, नात्यांवर, सणांवर, देवदेवतांवर उत्तरेकडील सांस्कृतिक आक्रमण त्याने स्विकारून ते अंगिकारले आहे. त्याला तिथल्या राहणीमानाची भुरळ पडली आहे. त्याने स्वतःच स्वतःच्या अस्मिता पायदळी तुडवल्या आहेत आणि आता त्याचे अस्तित्व नष्ट होण्याची वेळ आली आहे तरी तो निर्धास्त आहे.
एका सुसंस्कृत, खानदानी, प्रगतीशील, पुरोगामी राज्यात भिकेचे डोहाळे लागलेल्या या लावारिस औलादींची वाढती पैदास मन विषण्ण करणारी आहे. हे मराठी भैय्ये कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ आहेत. मानवाला हिंसा, बदला, द्वेष करण्यास प्रोत्साहन देणारी कट्टरवादी विचारसरणी आकर्षित करते. मराठी भैय्यांनाही तिचीच भुरळ पडली आहे, त्यांना आपण कोणत्या गोष्टीं डोक्यावर घेऊन नाचत आहोत याचे साधे भान सुद्धा राहिलेले नाही. मराठी भैय्यांना गायपट्ट्यातील नेत्यांचे, संस्कृतीचे, सणावारांचे, प्रथा परंपरांचे आकर्षण निर्माण झाले आहे. त्यांना आता पंढरीचा विठ्ठल नको, जेजुरीचा खंडोबा नको, कोल्हापूरची अंबाबाई नको अन् तुळजापूरची तुळजाभवानी नको त्याला ढोंगी, पाखंडी बाबांची ओढ लागलीय. त्यांना आता दसरा दिवाळी नको अन् भोंडला नको त्यांना आता गरबा पाहिजे अन् करवा चोथ पाहिजे कदाचित काही वर्षांनी छटपूजा महाराष्ट्राचा मुख्य सण असेल. या सर्व वाताहतीला येथील मराठी राजकारणी आणि त्यांचे चेलेचपाटे जबाबदार आहे, त्याचबरोबर आपला पराकोटीचा परधार्जिणेपणाही जबाबदार आहे. परप्रांतीयांची संख्या उत्तोरत्तर वाढत गेली आणि निवडणुकीत त्यांच्या मतांचा टक्का निर्णायकी ठरू लागल्यावर राजकीय पक्षांकडून अन् नेत्यांकडून परप्रांतीयांचे लांगुलचालन चालू झाले. मतांच्या बेगमीसाठी राजकारण्यांनी परके उरावर घेतलेत अन् घरचे वाऱ्यावर सोडलेत. त्याचाच परिपाक म्हणून मराठा आंदोलनावेळी हॉटेल, पाणी, शौचालये बंद ठेवून आपल्याच महाराष्ट्रातील आंदोलकांची मुंबईत कोंडी केली पण छटपूजेसाठी परप्रांतीयांसाठी पायघड्या घातल्या त्यांची व्यवस्थित सोय केली.
देशातील अनेक दिग्गज राजकारणी, उद्योजक, आणि बऱ्याच अमहाराष्ट्रीयन लोकांना महाराष्ट्राबद्दल असूया आणि द्वेष आहे त्यामुळे त्यांचे जाणीवपूर्वक मराठी माणसांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न कित्येक वर्षांपासून चालू आहेत. स्थलांतरित परप्रांतीय मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला कमी लेखतात. महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळवले जात आहेत, महाराष्ट्रातील महत्त्वाची आर्थिक केंद्रे दुसऱ्या राज्यात हलवली जात आहेत. महाराष्ट्रातील प्रकल्पाची ठेके(कंत्राटे) दुसऱ्या राज्यातील ठेकेदारांना दिले जात आहेत. मराठी लोकांना आळशी, कौशल्यहीन म्हणून नोकऱ्या नाकारल्या जातात. 'No jobs for Marathi' म्हणून जाहिराती दिल्या जातात. मराठी माणसांना घरे नाकारली जातात. मराठी लोकं मांसाहार करतात म्हणून घाणेरडी आहेत अशी हेटाळणी करत मानहानी केली जाते, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मामाच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा आहे म्हणून मराठी लोकांवर प्रचंड खालच्या दर्जाची टीका केली जाते. हे इतके डोईजड होत चालले आहे की आता युपीबिहार वाले मुंबईत स्थानिक झालेत आणि सातारा, सांगली, कोल्हापूरकर परप्रांतीय झालेत. सातारा, सांगली, कोल्हापूरच्या लोकांना मुंबईत नोकऱ्या दिल्या जाऊ नयेत असे उत्तर भारतीय सेनेचा अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला खुलेआम बोलतो. महाराष्ट्र काबीज करण्याची, महाराष्ट्रावर वर्चस्व गाजवण्याची चिथावणी देतो. बदला घेण्याची भाषा करतो, शस्त्रास्त्र असणाऱ्यांना आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण देतो. अनेक परप्रांतीय इथे गुन्हे करून जातात, अनेक अनैतिक धंदे करतात, भेसळ करतात. नैतिकता नीतिमत्ता यांच्या गावी नसते. पण यांच्यावर काही कारवाई होत नाही. यांना आवर घालणे शासन-प्रशासनाच्या आवाक्याबाहेर आहे की शासन-प्रशासनाचाच ह्यांना आशीर्वाद आहे हेच कळत नाही. मराठी भाषेची, महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि मराठी माणसाच्या कर्तृत्वाची जाणूनबुजून मानहानी होत असताना इथल्या राज्यकर्त्यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान पायदळी तुडवणारांच्या विरोधात ठाम भूमिका घ्यायची सोडून त्यांचीच बाजू घेत आहेत. अनेक लाचार, गद्दार, कणाहीन नेते महाराष्ट्रात हिंदी अधिकृत करण्याच्या कटात सामील झालेत. मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीपेक्षा, स्वाभिमानापेक्षा त्यांची पक्षनिष्ठा मोठी झाली आहे. विविध पक्षाचे नेते, प्रवक्ते हिंदीची तळी उचलताना दिसत आहेतच पण त्यांचे सतरंजी उचले कार्यकर्ते दुप्पट जोमाने समर्थन करताना दिसत आहेत.
या मराठी भैय्यांना वठणीवर आणण्यासाठी आपण दोन गोष्टी करू शकतो, एक म्हणजे जे चालले आहे ते तसेच चालू द्यावे त्याला विरोध करू नये. सारं उद्ध्वस्त होऊ द्यावे. पायाभूत सुविधांचा, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडू द्यावा. शाळा बंद होऊ द्याव्यात, शिक्षणाच्या अभावाने, गुन्हेगारी, बेरोजगारी फोफावू द्यावी. मराठी भैय्यांना ज्या प्रदेशाचे आकर्षण आहे तशी परिस्थिती इथे निर्माण होऊ द्यावी. पुढे जे होईल ते त्यांना भोगू द्यावे. आपल्याच राज्यात त्यांना दुय्यम वागणूक मिळू द्यावी. त्यांच्या नेत्यांच्या इच्छेनेनुसार महाराष्ट्राचे तुकडे पडत असताना, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे कारस्थान चालू असताना आपण त्याला विरोध करू नये. यामध्ये अडचण अशी आहे की हे सगळे भोग मराठी भैय्यांसोबत आपल्याला आणि सर्वसामान्य जनतेलाही भोगावे लागतील. प्रतिगामी कट्टरवादांमुळे मराठी भैय्यांच्या भावना बोथट झाल्यामुळे त्यांना कदाचित त्रास होणार नाही पण सर्वसामान्य मराठी जनतेला मात्र सर्वांना प्रचंड त्रास होईल. सारं काही उद्ध्वस्त व्हायला फार वेळ लागणार नाही. सारं उद्ध्वस्त झाल्यानंतर पुन्हा ही व्यवस्था उभारण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागेल. कोणतीही गोष्ट, व्यवस्था उद्ध्वस्त व्हायला फार वेळ लागत नाही आणि ती उद्ध्वस्त करायला फार हुशार असण्याची गरज नसते. पण एखादी व्यवस्था उभारण्यासाठी दूरदृष्टीची गरज आणि बराच कालावधी लागतो. कायम प्रयत्नशील राहून सतत ती व्यवस्था दिवसेंदिवस परिपक्व करावी लागते. महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, येथील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवस्था उद्ध्वस्त झाली तर ती पुन्हा उभारण्यासाठी पिढ्या खर्ची पडतील आणि ते आपल्याला कोणालाच परवडणारे नाही.
दुसरी गोष्ट आपण निश्चित करू शकतो आणि तीच आपण करायला हवी. साधारपणे चार-दोन कर्तृत्ववान पिढ्यानंतर एखादी पिढी निष्क्रीय, नालायक उपजते, जी बापजाद्यांनी रक्ताच पाणी करून कमावलेले संचित, इज्जत उधळून मोकळी होते. आताची ही पिढी नादान, बेजबाबदार आहे असे समजून आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल. महाराष्ट्र अन् महाराष्ट्राचा वैभवशाली, दैदिप्यमान वारसा वाचवणे, आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्य अन् स्वायत्ततेचे रक्षण करणे, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व्यवस्था सुधारणे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे. यासाठी आपल्याला या मराठी भैय्यांना आणि सर्वसामान्य लोकांना सतत सत्याची, वास्तवाची जाणीव करून देत राहिले पाहिजे. ते ज्यांच्या नादी लागलेत त्या विचारसणीच्या व्यवस्थेतील फोलपणा अन् त्या व्यवस्थेत त्यांचे, सर्वसामान्य लोकांचे काय स्थान असेल याची जाणीव त्यांना करून देणे गरजेचे आहे. घर, कार्यालय, कार्यक्रमात जिथे भेटतील तिथे आप्तेष्ट, मित्रमंडळी, सहकारी यांच्याशी याविषयी बोलून त्यांच्यात जागृतता निर्माण करणे गरजेचे आहे. हा छत्रपतींचा लढवय्या महाराष्ट्र आहे, ईमानी, लढवय्ये मावळे महाराजांच्या सोबतीने स्वराज्याच्या शत्रूसोबत लढले. धाकल्या महाराजांनंतर अनेक सरदार, सरंजाम आपल्याला गढ्या, वतनदाऱ्या वाचवण्यासाठी गुजरातेत जन्मलेल्या औरंगजेबाच्या दरबारात कुर्निसात करत होते त्यावेळी हे कडवे मावळे स्वराज्याच्या रक्षणासाठी लढले, कटून धारातीर्थी पडत होते पण त्यांनी स्वराज्य औरंग्याच्या घशात जाऊ दिले नाही. शेवटी स्वराज्यद्रोही औरंग्या इथेच मेला अन् इथेच गाडला गेला. आताही बडे बडे महाराष्ट्राचे नेते म्हणवणारे सरंजाम सत्तेच्या वळचणीला जाऊन आपापली वतनदारी वाचवण्यासाठी दिल्लीश्वरांचे तळवे चाटत आहेत, त्या गद्दार महाराष्ट्रद्रोह्यांना बाजूला ठेऊन आपण महाराष्ट्र, मराठी अन् महाराष्ट्र वाचवायचा निर्धार करूया त्यासाठी आपण तीव्र संघर्ष करू. आपला कोणाला विरोध नाही, ना आपण कोणाचा द्वेष करतोय. आपला संघर्ष आपल्या अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी आहे. या संघर्षात आपण सर्व एकत्र येऊन एकजुटीने लढूया, या लढ्यात आपण निश्चित यशस्वी होऊ याची खात्री आहे.
जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र!!!
संतोबा...

Sunday, January 25, 2026

भूमिका - १

आमचा कोणालाही विरोध नाही. आम्ही सत्य, अहिंसा, समता, स्वातंत्र्यता, न्याय या उच्च मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे आहोत. पण ही मूल्ये पायदळी तुडवणारे यांना आमचा तीव्र विरोध असेल. कारण एक मूल्ये एकतर्फी जपली जाऊ शकत नाही आणि ती एकतर्फी जपण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न मूल्ये जपणाऱ्याच्या आणि एकूणच सर्वसमाजाच्या अधःपतनाला, दुर्दशेला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून जे मतलबी, कृतघ्न, खोटारडे, विश्वासघातकी, गद्दार, ढोंगी, पाखंडी, समाजद्रोही, वर्चस्ववादी, विषमतावादी, हिंस्त्र, अन्यायी आहेत त्या सर्वांना आणि अनैतिक, बेकायदेशीर, अन्यायकारक गोष्टींना आमचा ठाम विरोध आहे. 

आमचा परप्रांतियांना विरोध नाही.
तुम्ही पोटापाण्यासाठी तुमचे सर्वस्व सोडून आला आहात, काम करा आणि आपला उदरनिर्वाह करा पण इथे येऊन आमच्यावर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करु नका. तुम्ही आमच्या ताटातील दोन घास खात आहात आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण आमचे ताटच जर हिसकावून घेणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. 

आमचा अमराठींना विरोध नाही.
तुम्ही वर्षा दोनवर्षांसाठी महाराष्ट्रात पोट भरायला आला आहात तर मराठी शिकायलाच हवं, मराठीत बोलायलाच हवं असे काही नाही पण तुम्ही पिढ्या अन् पिढ्या इथे राहणार आणि मराठी शिकणार नाही, बोलणार नाही आणि उलट मराठीला कमीपणा दाखवणार, मराठी लोकांशी उर्मटपणाने वागणार हे चालणार नाही.

आमचा कोणत्याही उद्योगपतींना विरोध नाही.
तुम्ही उद्योगधंदे उभारा, अमाप संपत्ती कमवा आमची हरकत नाही पण तुम्ही ताकदीच्या जोरावर कायद्यातील पळवाटा काढून नैसर्गिक साधन संपत्तीची वाट लावणार असला, राष्ट्रीय संपत्ती लुबाडणार असेल तर ते आम्हाला चालणार नाही. तुम्ही सार्वजनिक संपत्ती लुबाडून उभ्या केलेल्या साम्राज्याचे सर्वसामान्य जनतेला गुलाम बनवलेले आम्हाला चालणार नाही.

आमचा कोणत्याही संघटनेला विरोध नाही.  
तुम्ही समाजात जागरूकता निर्माण करा. लोककल्याणासाठी सरकारवर दबाव टाका, आम्ही तुमचे स्वागत करू. पण लोकांची दिशाभूल करून, त्यांच्या खऱ्या प्राथमिकता बाजूला ठेवून, त्यांना वांझोट्या गोष्टीत गुरफटवून राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले आम्हाला चालणार नाही.

आमचा कोणत्याही विचारसरणीला विरोध नाही.  
तुम्ही तुमच्या विचारांचे उदात्तीकरण करा, प्रचार-प्रसार करा – आमची हरकत नाही. पण कावेबाजपणा करून आमच्या तरुण पिढीचे वर्तमान उद्ध्वस्त करणे आणि भविष्य अंधकारमय करणे आम्ही कधीच खपवून घेणार नाही.

आमचा कोणत्या नेत्याला विरोध नाही 
तुम्ही अखंड विश्वाचे नेते व्हा, देशात कायदा-सुव्यवस्था व लोककल्याणकारी राज्य प्रस्थापित करा–आम्ही समर्थन देऊ. पण सत्ता टिकवण्यासाठी 'फोडा आणि राज्य करा' ही युक्ती वापरून समाजात फूट पाडलेली, यादवी माजवलेली आणि अशांतता पसरवलेली आम्हाला चालणार नाही.

आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही.  
तुम्ही जगातील सर्वात मोठा पक्ष व्हा, कायम सत्तेत राहा – आमची हरकत नाही. पण भांडवलदारांची दलाली करून  सर्व साधनसंपत्तीचे केंद्रीकरण करून, जनतेला देशोधडीला लावून, समाजकल्याणकारी व्यवस्था उद्ध्वस्त करून,  सर्वसामान्यांना भांडवलदारांचे गुलाम करण्याच्या तुमच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र विरोध करू. 

आमचा कोणत्याही देशाला विरोध नाही.  
तुम्ही स्वतःच्या देशाची प्रगती करा किंवा त्यात अनागोंदी माजवा  आम्हाला त्याच्याशी काही देणंघेणं नाही.  पण आमच्या देशात छुप्या कारवाया, भेकड हल्ले करणे,  देशाच्या स्वातंत्र्यावर आणि स्वायत्ततेवर आक्रमण करणे आम्ही कदापी सहन करणार नाही.

आमचा कोणत्या व्यक्तीला विरोध नाही 
तुम्ही इतरांना हानी न पोहोचवता स्वतःचे जीवन जगण्याचा उपभोग जरूर घ्या पण तुम्ही तुमच्या व्यक्तिस्वातत्र्यांचा उपभोग घेतना दुसऱ्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्रमण करणार असाल तर ते खपवून घेतले जाणार नाही.

आमचा कोणत्या जातीला विरोध नाही.
तुम्ही तुमच्या जातीचा अभिमान बाळगा, थोरवी गा, एकत्र येऊन प्रगती करा त्यासाठी काही हरकत नाही.पण फक्त 'या जातीत जन्मलो म्हणून मी श्रेष्ठ' असा दावा करून इतरांना कमी लेखणे, कंपुशाही करून फक्त आपल्याच जातीतील लोकांना संधी देऊन बाकीच्यांना संधीपासून दूर ठेवणे हे आम्ही सहन करणार नाही.

आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही.  
धर्माने माणसाला चांगले आचरण, नैतिकता आणि न्यायाने जगण्याचे मार्गदर्शन करावे. 'वसुधैव कुटुंबकम्' या तत्त्वाने प्रेम, बंधुभाव, सुख-शांती पसरवावी – आम्ही त्याचे स्वागत करू. पण धर्माच्या नावाने भेदाभेद, हिंसा आणि अशांतता पसरवली जाईल, तर असा धर्म आम्हाला मान्य नाही.

आमचा कोणत्याही धर्माच्या ठेकेदाराला विरोध नाही.  
तुम्ही तुमच्या धर्माच्या श्रेष्ठत्वाचे गुणगान गा, त्याचा प्रचार, प्रसार करा – आम्हाला हरकत नाही. पण सर्वसामान्य लोकांच्या गरिबी, आजार, बेरोजगारी, भावनिक असुरक्षिततेचा गैरफायदा घेऊन त्यांना भीती, आमिष दाखवून, चमत्काराच्या नावाने हातचलाखी करून लुबाडणे आम्ही कधीच चालवून घेणार नाही.

                                                                           संतोबा...

Tuesday, December 23, 2025

विचारधारा आणि द्वेषधारा.

                 माणसांमाणसांत भेदाभेद न करता अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी, चांगला बदल स्विकारणारा सर्वसमावेशक प्रवाही आणि प्रभावी विचार म्हणजे विचारधारा. वंशश्रेष्ठत्वाचा अहंकारातून माणसांमाणसांत भेदाभेद करणारा, विकृत नरसंहार करण्याची इच्छा बाळगणारा रक्तपिसासू विचार म्हणजे द्वेषधारा. नैसर्गिक हक्क आणि न्यायाचा स्विकार म्हणजे विचारधारा तर त्यास नकार म्हणजे द्वेषधारा. विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध, तर्कनिष्ठ मांडणीच्या आधारे प्रगतीचा मार्ग दाखवणारी पद्धत म्हणजे विचारधारा. भ्रामक, काल्पनिक अंधश्रध्देच्या जोखडाखाली बहुसंख्य जनतेला अडकवून स्वतः वंशपरंपरागत विशेषाधिकार पदरात पाडून घेणारी व्यवस्था म्हणजे द्वेषधारा. द्वेषधारा मूठभर लोकांच्या विशेषाधिकाराच्या संवर्धनासाठी बहुसंख्य लोकांना मानसिक गुलामगिरी बंदिस्त करण्याचा कावेबाजपणा करते. विचारधारा पिढ्यान् पिढ्यांच्या अन्याय रूढी- परंपरांना झुगारून सर्वसामान्य जनतेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी झटत असते. द्वेषधारा विरोधकांचा तिरस्कार करते, त्यांना संपवण्याचा प्रयत्न करते. विचारधारा विरोधकांनाही मार्गदर्शन करते, त्यांच्याही हिताचा विचार करते. द्वेषधारावाले कधीही सकारात्मक कार्य करू शकत नाही, अगदी आपण बरोबर आहोत हे पटवून देण्यासाठी सुद्धा ते दुसरे कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. जबाबदारी झटकण्यात द्वेषधारावाल्यांचा हातखंडा असतो. अस्मिताचे भांडवल करून आपले दुकान कसे चालवायचे याचे कसब त्यांनी आत्मसात केलेले असते. थोडक्यात असे म्हणता येईल विचारधारा ही प्रागतिक पुरोगामी तर द्वेषधारा ही अधोगतीक प्रतिगामी असते. 
                        विचारधारा बहुतेकदा समाजकल्याणाच्या चिंतनातून उगम पावते. त्यासाठी सखोल अभ्यास, सर्वांगीण बाजूचा विचार करावा लागतो. पारंपारिक, कालबाह्य, अन्याय्य गोष्टींना छेद देत नवीन समाजकल्याणाचा विचार रुजवावा लागतो. विचारधारा समानता, सामाजिक न्याय आणि सामूहिक हिताचा विचार करते.विचारधारा समाजाला दिशा देते, समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करते आणि लोकांना जोडण्याचे काम करते. विचारधारा ही सकारात्मक शक्ती आहे जी समाजाच्या उन्नतीसाठी आणि न्यायासाठी काम करते. विचारधारा ही संपूर्ण समाजाच्या हिताची असते अगदी विचारधारेला विरोध करणाऱ्याच्याही हिताची असते. द्वेषधारा बहुतेकदा भेदभाव, ईर्षा, पूर्वग्रह किंवा वर्चस्ववादातील संघर्षांमधून उगम पावते (वर्णभेद, जातीयवाद, धार्मिक कट्टरता). द्वेषधारा समाजात दुही निर्माण करते, नकारात्मक वातावरण निर्माण करते. द्वेषधारा नकारात्मक आहे, ती विनाश घडवते, सामूहिक दंगली किंवा युद्धांना जन्म देते. द्वेषधारा कोणाचा ना कोणाचा तिरस्कार करून हिंसा करण्यास प्रोत्साहन देत असते. द्वेषभावनेने भारलेली व्यक्ती कायम समोरच्याच्या चुका शोधते, दुसऱ्यांच्याबाबत कायम संशयी असते. सततच्या तिरस्कारामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास गमावते. अशी व्यक्ती समोरच्याशी एकटी लढू शकत नाही, त्यासाठी तिला समद्वेषीविचारी समूहाचा आधार लागतो. त्याचप्रमाणे द्वेषधारेला निर्बुद्ध झुंडींची गरज असते, झुंडीशिवाय द्वेषधारेचे अस्तित्व शून्य असते. दुसरीकडे ठाम विचारधारेचा व्यक्ती कितीही मोठ्या झुंडीला एकट्याने सामोरे जाण्याचे सामर्थ्य बाळगून असतो.
                       द्वेषधारा कधीही कोणाचे कायमस्वरुपी कल्याण करू शकत नाही. द्वेषधारा प्रत्येकासाठी घातकच असते, आज जे लोक अशा विचारधारेचे समर्थन करतात आणि या विचारधारेच्या बरहुकूम काम करणाऱ्या लोकांच्या कोणत्याही द्वेषपूर्ण कृतीचे, विकृतीचे समर्थन करतात त्यांना आज ना उद्या त्यांना तशाच विकृतीला बळी पडावे लागणार असते. प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचा शेर याचे चपखल उदाहरण देतो "लगेगी आग तो आएंगे कई घर जद मे, यहा पे सिर्फ हमारा मकान थोडी है..!". द्वेषधारा म्हणजे उन्माद अन् विचारधारा म्हणजे संवाद. द्वेषधारा आपसूकच आत्मसात केली जाते कारण त्यासाठी काही तर्क, विचार करण्याची गरज नसते. त्यामुळे द्वेषधारेच्या उन्मादी, विखारी प्रचाराला बहुसंख्य लोक सहज बळी पडतात आणि त्यांच्या निर्बुद्ध झुंडी निर्माण होतात. जिथे झुंडी होतात तिथे विवेक हरवतो. या उन्मादी झुंडी सारासार विचार न करता एखाद्या झोंबीप्रमाणे सारं काही उद्ध्वस्त करतात. त्यांची विकृत कृत्ये सोडा अगदी त्यांच्या वागण्याबोलण्यातही सुसंगतता नसते, ते ज्यांचा विरोध करतात त्यांचाच त्यांना नाईलाजाने का होईना उदोउदो करावा लागतो. उदाहरणार्थ भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या समतावादी विचारांमुळे आणि कार्यांमुळे काही राजकीय, सामाजिक संघटनांकडून प्रचंड द्वेष केला जातो. या द्वेषी लोकांचे आदर्श एवढे खुजे आहेत की त्यांचे कितीही उदात्तीकरण केले तरी आणि ते त्यांच्यासाठी कितीही पूजनीय असले तरी त्यांच्या अंधभक्तांच्या कोंडाळ्या बाहेर जगजाहीर त्यांचा उदोउदो ते करू शकत नाही. जेव्हा हे द्वेष करणारे लोक परदेशात जातात तेव्हा देशात ते ज्यांचा द्वेष करतात त्यांचाच परदेशात उदोउदो करतात कारण या महापुरुषांचे कार्य एवढे उत्तुंग आहे की जगभरात त्यांना मान्यता आहे. विविध देशाचे प्रतिनिधी आपल्या देशात येतात तेव्हा त्यांना गांधीजींच्या समाधी स्थळावर राजघाटावर घेऊन जातात, बुद्धाची प्रतिमा, फुले - आंबेडकरांची पुस्तके भेट देतात पण चुकूनही द्वेषधारासमर्थक अनुयायांच्या आदर्शांचा उल्लेख करत नाहीत एवढे त्याचे आदर्श खुजे असतात. 
                       द्वेषधारा प्रवर्तक आणि समर्थक दुतोंडी गांडूळांसारखी असतात. दुसऱ्यावर अन्याय करताना कसलाही विधिनिषेध न बाळगणारे, नितीनियम पायदळी तुडवणारे, दुसऱ्यांवर अन्याय होत असताना, दुसऱ्यांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असताना त्या शोषितांची खिल्ली उडवणारे, एखादी घटना त्यांच्या अंगलट आल्यावर त्यांना लगेच मानवाधिकार, लोकशाही आणि संविधान आठवते. व्हिक्टिम कार्ड खेळण्यात त्यांचा हातखंडा असतो. त्यांना दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. खरंतर विचारधारा आणि द्वेषधारा यांचे मूठभर प्रवर्तक असतात, सर्वसामान्य लोक आपापल्या वैचारिक कुवतीनुसार विचारधारा आणि द्वेषधारेचे समर्थक बनतात. द्वेषधारेच्या प्रवर्तकांनाही विचारधारेचे महत्व आणि द्वेषधारेचा फोलपणा माहीत असतो. ते स्वतः विचारधारेच्या मार्गाचे पालन करून आपला फायदा करून घेतात पण आपल्या समर्थकांना द्वेषधारेचे पालन करण्यास भाग पाडतात. त्यांना वांझोट्या, निरुत्पादक गोष्टीत गुंतवून सार्वजनिक संसाधनांचा वापर करण्यातील स्पर्धा संपवून आपला स्वार्थ साधून घेतात. द्वेषधारेचे प्रवर्तक मूलभूत गरजा,आरोग्य, शिक्षण, रोजगार, याबद्दल बोलणार नाहीत, ते तुम्हाला शिक्षण घ्या, व्यवसाय करा, त्यासाठीचे कला कौशल्य आत्मसात करा असे सांगणार नाही. ते तुम्हाला कोणाला तरी तुमच्या दुरावस्थेला जबाबदार ठरवून त्यांचा द्वेष करायला भाग पाडतील. ते लोकांना पाखंडी त्यांचे तारणहार म्हणून भासवतील, त्यांची सेवा करायला भाग पाडतील , दानधर्म करायला सांगतील, पाखंडी, अनिष्ट रूढी यांचे पालन करायला भाग पाडतील.
                      नरसंहार, विध्वंस करणाऱ्या रक्तपिसासूपेक्षा रचनात्मक कार्य करणाऱ्या, नवनिर्मिती करणाऱ्याला कायम लक्षात ठेवलं जाते. पिढ्यान् पिढ्यासाठी त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असते. त्यांच्या कर्तुत्वाचा प्रकाशात कित्येक पिढ्यांचे जीवन उजळून निघते. असे असले तरी द्वेषधारेच्या समर्थकांच्या तुलनेत विचारधारेचे समर्थक फार कमी असतात. सांख्यिकदृष्ट्या एकजूट असल्याने लोक सामाजिक स्वीकृतीसाठी द्वेषधारेच्या गटाच्या विचारांशी लोकं जुळवून घेतात. विचारधारा विनाकारण लोकानुनयन करत नाही. त्यामुळे विचारधारा स्विकारण्यासाठी आपला विवेक जागृत करावा लागतो, स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा लागतो. त्यासाठी पुरावे, तर्क आणि वस्तुनिष्ठतेनुसार विचार करणे, निर्णय घेणे आवश्यक असते आणि पूर्ण तार्किक विचार करायला वेळ आणि मेहनत लागते. मेंदू उत्क्रांतीने जलद आणि भावनिक विचारासाठी तयार झाला आहे, ना की पूर्ण तार्किकतेसाठी. मानवी मेंदूचे दोन भाग असतात : सिस्टम १(जलद, भावनिक, स्वयंचलित) आणि सिस्टम २ (हळू, तार्किक, प्रयत्नपूर्ण). बहुतेक वेळा सिस्टम १ चालते, कारण सिस्टम २ वापरणे ऊर्जा खूप खर्च करते (मेंदूला ग्लुकोज लागते). भावना (राग, भीती, प्रेम) तर्काला मागे टाकतात. उदाहरणार्थ आपल्या आवडत्या व्यक्तीच्या चुकीला समर्थन देणे. विचारधारा परिवर्तनीय, प्रवाही असते ती कायम नवनवीन चांगला बदल स्विकारत असतात. द्वेषधारा मात्र द्वेष, भेदाभेद, वर्चस्ववाद, वंशश्रेष्ठत्ववादाच्या डबक्यातून बाहेर पडू शकली नाही. समाजातील विवेकवादी लोकांचे कर्तव्य आहे की तरुण पिढीला त्यांच्या प्रगतीसाठी, व्यक्तीस्वातंत्र्यासाठी, मूलभूत हक्कांसाठी कोण झटले आहेत आणि कोणी विरोध केला आहे याची सतत जाणीव करून द्यायला हवी. त्यांना विचारधारेच्या मार्गावर आणून विवेकवादी बनवणे गरजेचे आहे. अर्थात या गोष्टीला वेळ लागले किंबहुना ही निरंतर चालणारी प्रकिया आहे आणि या प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांना सामावून घेणे वैयक्तिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी गरजेचे आहे.
                                                 संतोबा...

Monday, December 22, 2025

कावेबाज पाखंडी धर्ममार्तंड


                       आयुष्यातील-भविष्यातील अनिश्चितता. गूढ-रहस्यमयी, अनाकलनीय गोष्टींचा न होणारा उलगडा. अनामिक संकटांची भीती, मोठ्या संकटातून  अविश्वासनीयरित्या सुखरूपपणे बाहेर पडल्यानंतर आलेली  कृतज्ञतेची भावना. सततच्या अपयशातून आलेली हतबलता. आर्थिक - सामाजिक दुर्बलतेमुळे आलेली ओळखशून्यता. कळत-नकळत घडलेल्या चुकीमुळे,अपराधामुळे आलेल्या अपराधीपणाच्या भावनेतून सुटका व्हावी म्हणून तसेच अलौकिक सुखाच्या प्राप्तीच्या ओढीतून. तसेच कौटुंबिक वारसा, प्रथा, परंपरा यांचा प्रभाव, अन् समाजाने आपापल्या स्वीकारावे, समाजाचे पाठबळ मिळावे या भावनेतून आणि हे सारं नाकारले तर समाजातून बहिष्कृत होण्याचा दबाव आणि त्यायोगे होणाऱ्या टीकेपासून वाचण्यासाठी आणि अशा अनेक अपरिहार्यतेतून  सर्वसामान्य लोकं रूढी, परंपरा पर्यायाने धार्मिकतेकडे ओढली जातात. सर्वसामान्य माणसांच्या या भावनांचा, विश्वासाचा अन् बिकट परिस्थितीचा गैरफायदा हे त्या त्या धर्मातील पाखंडी धर्ममार्तंड घेत असतात. जगातील बहुतेक सर्वच धर्माचे धर्ममार्तंड आपापल्या धर्माच्या उदात्तीकरणासाठी काहीतरी अतार्किक,अनाकलनीय, आभासी गोष्टी आपल्या ओघवत्या वाणीने प्रसवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतात. निसर्गात अनेक चमत्कारिक, रहस्यमय गोष्टी आहेत तसेच कधी चमत्कारिक, रहस्यमय घटना घडत असतात. या चमत्कारिक, रहस्यमय गोष्टी , घटनांचा संबंध आपल्या धर्माशी जोडून आपला धर्म सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा करतात. असा हा सर्वश्रेष्ठ धर्म कायमच धोक्यात असतो आणि तो वाचवण्यासाठी धर्ममार्तंड सर्वसामान्य लोकांना आवाहन करत असतात. निस्वार्थ सेवाभावाला धर्माचा पाया बनवणे हे धर्ममार्तंडांचे मुख्य ध्येय असते.
                     खरंतर या पाखंडी धर्ममार्तंडांना धर्माशी आणि त्या धर्माच्या अनुयायांच्या अडचणींशी काही देणंघेणं नसते. त्यांना धर्माचा आणि त्यांच्या अनुयायांचा वापर करून आपला स्वार्थ साधून घ्यायचा असतो. ते स्वर्ग दाखवतील पण मार्ग दाखवणार नाहीत. देवाधर्माचे अवडंबर माजवून फक्त पाखंडी धर्ममार्तंडांचा फायदा होतो. सर्वधर्मांमध्ये सर्वधर्मसमभाव असेल किंवा नसेल पण सर्वधर्मीय बहुसंख्य पाखंडी धर्ममार्तंडांमध्ये स्वतःच्याच धर्माच्या अनुयायांना लुबाडण्याची कला वादातीत असते. हे धर्ममार्तंड काल्पनिक आख्यायिका रचून, अख्ख्या समाजाला पिढ्यान् पिढ्यां आपल्या नियंत्रणाखाली ठेवतात. स्वतःच्या कुळातील मूठभर लोकांना जन्मजात श्रेष्ठ ठरवतात आणि बहुसंख्यांना कायमस्वरुपी जन्मजात दुय्यम ठरवले जाते. आश्चर्य म्हणजे हे सर्व त्या बहुसंख्य समाजच्या एवढे अंगवळणी पडते आहे की हाच बहुसंख्य समाज त्या अन्यायाला पिढ्यान् पिढ्यां दैवी कर्तव्य मानून इमानेइतबारे निभावतो. धर्म संकटात नसतो पण धर्माच्या नावाने दुकानदारी चालवणारे संकटात यायला लागले की त्या धर्माचे धर्ममार्तंड त्या त्या धर्मातील सर्वसामान्य लोकांना परधर्मियांमुळे आपला धर्म संकटात आहे आणि तुम्ही जागृत नाही असा दोषारोपण करत सर्वसामान्य लोकांना डिवचत असतात. जेणेकरून त्यांना हवी ती स्फोटक परिस्थिती निर्माण करता येईल आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना आपली पोळी भाजता येईल. धर्माच्या आचरणाने माणसाच्या अंगी नैतिकता, कृतज्ञता, नीतिमत्ता, आध्यात्मिक शांतता यायला हवी पण धर्ममार्तंड मात्र त्यास अपवाद असतात कारण धर्म हा त्यांचा धंदा असल्यामुळे त्यांच्या धंद्याच्या आड येणाऱ्या कोणालाही ते सोडत नाही भले तो धर्माचा अन कट्टर अनुयायी का असेना. एवढेच काय ज्या धर्माचा या धर्ममार्तंडांनी ठेका घेतला आहे त्याच धर्माचा संस्थापक जरी प्रकट झाला आणि त्याने या धर्ममार्तंडाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले, विरोध केला तर त्या धर्मसंस्थापकाला देखील ते संपवल्याशिवाय राहणार नाही. अनुयायांपेक्षा धर्म मोठा आहे, धर्माने त्याच्या अनुयायांना सदमार्ग दाखवून वाचवायला हवं, पण धर्ममार्तंडाच्या कृपेने धर्मच कायम धोक्यात असतो आणि त्याला वाचविण्याची जबाबदारी धर्माच्या अनुयायांवर असते. 
                    धर्म धोक्यात आहे म्हणून पाखंडी धर्ममार्तंडाचे ऐकून धर्माच्या अनुयायांनो तुम्ही धर्म वाचवायला गेलात की तुम्ही अडचणीत याल. कारण बहुसंख्य धर्ममार्तंडांमध्ये ढोंगीपणा, दुटप्पीपणा ठासून भरलेला असतो. डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवणारे अनुयायी हे त्यांचे भांडवल आहे. तुम्हाला जगण्यासाठी शाश्वत आणि आवश्यक असणाऱ्या गोष्टींबद्दल ते बोलणार नाही आणि त्यादृष्टीने काही प्रयत्नही करणार नाही. ते तुम्ही काय खाऊ -पिऊ नये, कोणते कपडे घालू नये याबद्दल बोलतील पण ते तुमच्या मूलभूत प्रश्नांबद्दल कधी बोलणार नाहीत. ते रोजगार, महागाई, शिक्षण, भ्रष्टाचार, गोरगरीबांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलणार नाहीत ते बिघडलेल्या सामाजिक व्यवस्था, शासनप्रशासनाच्या मनमानीवर बोलणार नाहीत. कसलेही प्रश्न न विचारता मनोभावे सेवा करणारे अनुयायी धर्ममार्तंडाची संपत्ती आहे, त्यात वाढ होणे त्यांच्या फायद्याचे आहे. अनुयायांच्या जीवनातील अनिश्चितता, भिती आणि चमत्कारांचे आमिष हे ह्या त्यांच्या धंद्याचे भांडवल आहे. त्यामुळे अनुयायांनी स्थिरस्थावर, सुखी, स्वावलंबी होणे त्यांना हितकारक नाही. दर्जेदार शैक्षणिक व्यवस्था ही सामाजिक समतेचा आणि शाश्वत उन्नतीचा मार्ग आहे. आर्थिक स्थैर्य हे स्वाभिमानी,स्वावलंबी जीवनाचा पाया आहे. तुमचं ज्यामुळे भलं होऊ शकणार आहे, तुमचे आयुष्य सुखासमाधानाचे होऊ शकणार आहे अशा शिक्षण, आर्थिक स्थैर्य अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याऐवजी तुमच्या मनात या भौतिक गोष्टींबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण करतात. पैशाअभावी माणूस हतबल होतो आणि हतबल माणूस नाईलाजाने कोणालाही शरण जातो. जीवनातील अनिश्चितता हे त्यांच्या जगण्याचे भांडवल आहे. भौतिकसुख हे तुमच्या मोक्ष प्राप्तीतील मोठा अडथळा आहे हे तुमच्या मनावर ठसवण्यात त्यांचा हातखंडा असतो. पैसा कमावणे, गुंतवणूक करणे हे त्यामुळे पाप समजले जाते. स्थिरस्थावर असणाऱ्या लोकांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करण्यात ते यशस्वी होतात.                
                     धर्ममार्तंड तुम्हाला साधन संपत्तीचा मोह सोडण्याचा उपदेश करत असतात मात्र जगभरातील अनेक धार्मिक संस्था, धार्मिक समुदाय यांच्याकडे मात्र प्रचंड संपत्ती असते. याबाबतीत आफ्रिकन धर्मोपदेशक(Bishop) डेस्मंड टूटू यांनी मजेशीररीत्या एक विसंगत वाटू शकणारे पण वास्तववादी सत्य कथन केले आहे, ते म्हणतात, ज्यावेळी धर्ममार्तंड आमच्याकडे आले त्यावेळी त्यांच्याकडे धर्मग्रंथ होता आणि आमच्याकडे जमिनी होत्या. त्यांनी आम्हाला प्रार्थना करण्यास सांगितली, आम्ही डोळे मिटून प्रार्थना केली. आम्ही जेव्हा डोळे उघडले त्यावेळी आमच्या हातात धर्मग्रंथ होता आणि त्यांच्याकडे जमिनी होत्या.  'When the missionaries came to Africa, they had the Bible and we had the land. They said, ‘Let us pray.’ We closed our eyes. When we opened them, we had the Bible, and they had the land.’   खरंतर अध्यात्मिकेमुळे अनासक्ती यायला हवी होती पण पाखंडी धर्ममार्तंड अनुयायांना साधन संपत्तीच्या मोहापासून दूर राहायला सांगून स्वतः करोडोंची संपत्ती बाळगतात, महागड्या गाड्या, वस्तूंचा वापर करतात, ऐशो आरामात राहतात. खरंतर  संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात पाखंडी लोकांचे अचूक वर्णन केले आहे.
                                      लोकां सांगे ब्रम्हज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥१॥
                                       तेणें ज्ञान कां सांगावें । ज्ञानासारिखें वर्तावें ॥२॥
                                       नित्य वाची ज्ञानेश्वरी । दारीं भिकार्‍यासी मारी ॥३॥
                                       तुका म्हणे ऐसे धर्ममार्तंड । आम्ही देखिले उदंड ॥४॥
ह्या पाखंडी लोकांची मजल फक्त अफाट संपत्ती कमावण्या आणि उपभोगण्यापर्यंतच आहे असे नाही तर अनेक विकृत दुष्कृत्ये हे लोक करत असतात. जगभरात अनेक धर्ममार्तंडावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
               सर्वधर्मीयांनी हे लक्षात घ्यायला हवं की धर्म आणि धर्ममार्तंड हे वेगवेगळे आहेत. हे धर्ममार्तंड धर्माचे दलाल झाले आहेत त्यांच्याकडून तुमची लूट होऊ नये म्हणून सर्वांनी सजग राहिले पाहिजे. खरंतर हे धर्ममार्तंड धर्माला बंदिस्त करतात आणि धर्माच्या अनुयायांवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध घालतात. धर्म, धर्ममार्तंड आपले असो वा दुसऱ्याचे त्यांना आपल्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे पण धर्माच्या दलालांना तुमच्या श्रद्धेचा बाजार मांडू देऊ नका. तुमची विचारशक्ती जागृत करा, तुमच्या मेंदूचा वापर दुसऱ्याला करू देऊ नका. आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या भल्याबुऱ्याचा विचार करा. चांगले शिक्षण घ्या, नोकरी व्यवसायात पारंगत व्हा, स्वावलंबी व्हा. नितीनियमाने संपत्ती कमवून आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर व्हा. दान धर्म करण्याची भावना निर्माण झाली तर गरजवंताना मदत करा, आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवून समाजातील दीनदुबळ्या घटकांना आत्मसन्मानाने जगता येईल यासाठी प्रयत्न करा. नेहमी सत्याची, न्यायाची बाजू घ्या, अन्यायाला विरोध करा. आपआपला धर्मसमृद्ध करण्यासाठी आपआपल्या धर्मातील वाईट प्रवृत्ती ठेचून काढा, कालबाह्य झालेल्या गोष्टी सोडून द्या. कालबाह्य गोष्टींना चिकटून राहून धर्माचे डबके होऊ देऊ नका. नवीन चांगल्या लोककल्याणकारी गोष्टींचा स्वीकार करून धर्म प्रवाही ठेवा.आपल्या धर्मातील लोक सुखी, समाधानी, समृद्ध झाली तर आपलाच धर्म आपोआप समृद्ध होईल. अनुयायांनी निर्भय, सुखी, समाधानी, समृद्ध, स्वावलंबी ,नीतीवान असणे यापेक्षा दैवीकृपा वेगळी काय असू शकते?.

                               संतोबा.....

Sunday, December 7, 2025

सत्तासूत्र

                        प्राचीन काळापासून जगभरातील बलाढ्य साम्राज्यांचे सम्राट, हुकुमशहा, भांडवलदार, राज्यकर्ते आपली सत्ता आणि वर्चस्व टिकवण्यासाठी आणि जनतेने आपल्या मनमानी कारभाराविरोधात बंड करू नये यासाठी विविध युक्त्या, तंत्र वापरून जनतेला आपल्या अधिपत्याखाली ठेवत आले आहेत. प्राचीन आणि मोठया असलेल्या रोमन साम्राज्यात(इ.स.पू. २७) भाकरी आणि मनोरंजन ही युक्ती वापरली जायची(Bread and Circuses (Panem et Circenses)). सत्ताधारी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवत. जनतेसाठी ग्लॅडिएटर लढाया, रथांच्या शर्यती यांसारखे मोठे सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करत. अशा कार्यक्रमांमुळे जनता आपल्या मूलभूत समस्यांपासून विचलित होऊन उदरनिर्वाहासाठी सत्ताधाऱ्यांवर अवलंबून रहात. मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदत देऊन जनतेला सत्ताधाऱ्यांचे मिंधे बनवल्यावर त्यांना सत्ताधाऱ्यांची जी हुजुरी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्याच बरोबर धर्म, जात, प्रदेश आणि सामाजिक वर्गाधारित फूट पाडून आपापसात लढवत ठेवण्याचा फोडा आणि राज्य करा (Divide et impera" (डिव्हाइड एट इम्पेरा)) या युक्तीचा वापर करत रोमन साम्राज्य परकीय प्रांतांमध्ये स्थानिक गटांना एकमेकांविरुद्ध लढवून रोम साम्राज्याविरोधात बंड होऊ न देण्याची काळजी घेत. तसेच कायदेशीर हेराफेरी (Legal Manipulation) ज्यामध्ये सत्ताधारी सत्ता बळकट करण्यासाठी कायद्यात बदल करतात आणि आपल्या समर्थकांना अधिकचा लाभ मिळवून देतात. तसेच प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना लढायची संधी सुद्धा देत नाही, विरोधकांनी जिंकणे तर दूरची गोष्ट. उदाहरणार्थ रोममध्ये नागरिकत्वाचे विशेषाधिकार फक्त काहींनाच दिले गेले. जनतेला लुबाडून आपल्या गोतावळ्याचा हितसंबंध जोपासत फक्त त्यांचीच भरभराट करणारे आणि जनतेची वाताहत करणारे सत्ताधारी जनतेला भुलवण्यासाठी काहीतरी भव्यदिव्य करून त्याचे प्रदर्शन करून जनतेला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. भव्य इमारती, पुतळे, संग्रहालये, सार्वजनिक समारंभ, किंवा शासकीय प्रकल्पांद्वारे आपली शक्ती आणि वर्चस्व दाखवतात, ज्यामुळे जनता त्यांच्यावर प्रभावित होते. इजिप्तमधील पिरॅमिड्स, फ्रान्समधील व्हर्सायचा राजवाडा आणि अनेक देशात उभारलेली भव्य राष्ट्रीय स्मारके,धार्मिक स्थळे भव्यता आणि प्रदर्शनाचे (Spectacle and Grandeur) उदाहरण आहे.            

                सत्तेचा खुंटा मजबूत करण्याचे अजून एक प्रभावी तंत्र म्हणजे प्रचारतंत्र (Propaganda). हे तंत्र समाज आणि लोकमानस आपल्या दिशेने वळवण्याचे एक कौशल्यपूर्ण साधन आहे. यामध्ये विशिष्ट विचारधारा, अजेंडा(कार्यसूची) पुढे रेटण्यासाठी आणि लोकांच्या मतांवर आणि विचारांवर प्रभाव पडण्यासाठी हेतुपुरस्सर अर्धसत्य, वाढीव माहिती आणि अफवा पसरवल्या जातात. फक्त आपल्या विचारसरणीला पूरक माहिती देणे, आपल्याविरोधी माहिती टाळणे. विरोधकांवर सातत्याने हल्ला करणे अशा गोष्टी केल्या जातात. याचा उद्देश विशिष्ट विचारसरणी, राजकीय अजेंडा किंवा हितसंबंधांना चालना देणे हा असतो. भीती, देशभक्ती, आनंद यांसारख्या तीव्र अस्मितावादी भावना जागृत केल्या जातात. हा प्रचार वस्तुनिष्ठ नसतो आणि यामध्ये विशिष्ट धारणांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडक तथ्ये सादर केली जातात. तसेच तर्कसंगत प्रतिसाद देण्याऐवजी भावनिक भाषा वापरली जाते आणि जटिल समस्या सोप्या करून सादर केल्या जातात. उद्देश हा की लोकांनी एक विशिष्ट दृष्टिकोन स्विकारावा आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आपल्यासोबत राहावे. या तंत्राचा सर्वात प्रभावी वापर हिटलरने जर्मनीमध्ये केला (गोबेल्स नीती). प्रचारतंत्राचा पुढचा आणि सर्वात प्रभावी भाग म्हणून सम्राट, सत्ताधीश हा ईश्वरी अवतार (non-biological) आहे, त्याला खुद्द देवाने लोकोद्धारासाठी पाठवले आहे असा प्रचार करायचा. आणि तो जे काही करतोय ते दैवी कार्य आहे तो प्रजेला किंवा कोणत्याही मानवी सत्तेला जबाबदार नाही.  त्यामुळे राज्याची कितीही दुरावस्था झाली तरी राजाला ईश्वराचा प्रतिनिधी मानल्यामुळे आपल्याला जे काही भोगावे लागतेय एका उदात्त हेतूसाठी, त्याच्या विरोधात जाणे म्हणजे देवाच्या इच्छेविरुद्ध जाणे अशी भावना जनतेत निर्माण होऊन मोठ्या भक्तिभावाने जनता सर्व भोग भोगत असते आणि राजा राज्य उपभोगत असतो. प्राचीन इजिप्तमध्ये फारोला देव मानले जायचे. मध्ययुगात युरोपात याप्रकारे राजांचा "दैवी हक्क" (Divine Right of Kings) प्रचारला गेला आणि राज्यांनी आपल्या अनियंत्रित राज्यकारभाराचा नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त करून दिले.

              सत्ताधारी आपल्या अधिकारांचा वापर करून आपल्या निष्ठावान समर्थकांना आणि प्रभावी घटकांना जसे की उद्योजक, प्रसार माध्यमे, कलाकार यांना कवडीमोल दराने जमिनी, मोठमोठी कंत्राटे, पुरस्कार, आर्थिक लाभ देऊन त्यांची निष्ठा खरेदी करतात. त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालून त्यांना संरक्षण देतात(Clientelism and Patronage) त्याबदल्यात हे लोक सत्ताधाऱ्यांची तळी उचलून परस्पर हितसंबंध जोपासतात . वैयक्तिक स्तरावर क्लायंटलिझम जबरदस्तीद्वारे देखील केला जाऊ शकतो जिथे नागरिकांना विशिष्ट राजकारणी किंवा पक्षाला मतदान न केल्यास वस्तू किंवा सेवा खंडित करण्याची धमकी दिली जाते. हे सत्तेचे दलाल आपल्या मिळकतीमधील छोटासा हिस्सा सत्कार्यासाठी खर्च करून आपली प्रतिमा उजळवत असतात. शोषित लोकं या सर्वांचा जयघोष करत राहतात त्यांना हे कळत नाही की फक्त त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेचा एक भाग त्यांना परत मिळत आहे आणि शासक आणि सत्तेचे दलाल ते जनतेच्या हिश्यातून घेतल्याशिवाय परत जनतेला देऊ शकत नाही. थोडक्यात ही मूठभर लोकं मणभर मेवा खातात आणि कणभर मेव्याच्या उष्ट्या पत्रावळ्या ढीगभर जनतेच्या वाट्याला येतात.प्राचीन रोममध्ये, सम्राटांनी आपल्या निष्ठावानांना जमिनी आणि विशेषाधिकार दिले. मध्ययुगात सामंतांनी आपल्या समर्थकांना संरक्षण आणि जमिनी दिल्या ही बेकायदेशीर संरक्षण आणि पक्षपाती लाभाची(Clientelism and Patronage ) काही उदाहरणे आहेत.

                           कमी खटाटोपी करून, जनतेला टोपी घालणारी आणि जनतेची मती गुंग करणारी राजसत्तेची अन् धर्मसत्तेची युती ही सत्ता राखण्याची सगळ्यात जालीम युक्ती आहे. या दोहोंचा परस्पर संबंध हा मानवी इतिहासातील एक गुंतागुंतीचा, दीर्घकालीन चाललेला मुद्दा आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातील नाते हे एकमेकांना मजबूत करण्यासाठी असते. धर्मसत्ता राजसत्तेला नैतिकता, वैधता प्राप्त करून देते तर राजसत्ता धर्मसत्तेला राजाश्रय मिळवून देते. पाखंडी धर्ममार्तंडांना राजाश्रय मिळाला की जनतेच्या भावना बोथट करण्याचे काम करत असतात. धर्ममार्तंड धर्माचा वापर जनतेला भ्रमात ठेवण्यासाठी करतात. धर्मसत्ता पाप-पुण्य, स्वर्ग-नरक यांच्या भीतीने जनतेवर मानसिक वर्चस्व गाजवतात, ज्यामुळे लोक स्वतंत्र विचार करू शकत नाहीत आणि सत्ताधाऱ्यांच्या शोषणाला बळी पडतात. जनतेला भ्रमात ठेवून त्यांचे अधिकार हिरावले जातात, विकास रोखला जातो आणि सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांचा वापर केला जातो. जनतेची धार्मिक श्रद्धा सत्तेच्या समर्थनासाठी वापरली जाते. धर्ममार्तंड आणि राज्यकर्ते धर्माच्या, धर्म वाचवण्याच्या, वाढवण्याच्या गोष्टी करतात पण त्या धर्मातील लोकं वाचवण्याच्या, त्यांचा उत्कर्ष करण्याच्या गोष्टी करत नाहीत. मध्ययुगात युरोपात कॅथलिक चर्च आणि राजसत्तेची युती होती. इटलीमध्ये पोप पायस ११ आणि मुसोलिनी यांची युती होती, ज्यात चर्चने मुसोलिनीच्या हुकूमशाही राजवटीला पाठिंबा दिला आणि ज्यूंविरोधी कायद्यांना अप्रत्यक्ष संमती दिली. जागतिक स्तरावर, धर्माचा दुरुपयोग अतिरेकवाद वाढवण्यासाठी होतो, ज्यात राजकीय नेते धार्मिक भाषेचा वापर करून आपले अजेंडे पुढे रेटतात.

               कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थाचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी, जनतेत भीती निर्माण करण्यासाठी करतात. शासनाला अडचणीत आणणाऱ्या घटकांना नेस्तनाबूत करण्यासाठी या संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या संपत्तीवर टाच आणली जाते, त्यांच्या स्थावर मालमत्ता जमिनीदोस्त केल्या जातात, त्यांची सगळी कृत्ये बेकायदेशीर ठरवून त्यांना तुरुंगात डांबले जाते. प्राचीन अ‍ॅसिरियन साम्राज्याने निष्ठुरपणे दडपशाहीद्वारे लोकांना आपल्या अधिपत्याखाली ठेवले होते. राज्यकर्ते शिक्षणातून आपल्या विचारसणीचा प्रसार करून जनतेच्या विचारावर नियंत्रण ठेवतात आणि त्यांना आपल्या बाजूला वळवतात.  प्राचीन स्पार्टामध्ये तरुणांना सैनिकी प्रशिक्षण आणि विचारसरणी शिकवली जायची. आधुनिक काळात काही देश पाठ्यपुस्तकांद्वारे इतिहासाची हेराफेरी करून आपल्या सोईस्कर इतिहास शिकवतात. याशिवाय कोणी बंडखोरी करू नये म्हणून अशा लोकांवर पाळत ठेवली जाते. जगभरातील सर्वच सरकारांच्या गुप्तचर यंत्रणा मजबूत असतात त्या परकियांवर पाळत ठेवतातच अंतर्गत विरोधक आणि विवेकवादी लोकांवर देखील पाळत ठेवतात. खरंतर जगभरातले सर्वच हुकुमशहा क्रूर असले तरी प्रत्यक्षात ते खूप घाबरट असतात. विरोधकच काय पण आपल्या समर्थकाबद्दल पण त्याच्या मनात शंका असते.

               या अशा अनेक युक्त्या वापरून सत्ता टिकवता येत पण यशस्वी होता येईलच असे नाही. त्यामुळे चोहोबाजूंनी अपयशी ठरल्यानंतर आपल्या अपयशाचे खापर कोणावर तरी फोडावे लागते, कोणाला तरी जबाबदार धरावे लागते त्यासाठी बाह्यशत्रू आणि अंतर्गत विरोधकांना बळीचा बकरा बनवले जाते (Scapegoating and External Enemies). राज्यकर्ता आपल्या नाकर्तेपणासाठी, अपयशासाठी स्वतःला जबाबदार न धरता त्या अपयशासाठी कारणीभूत नसलेल्या एखाद्या व्यक्तीला, समुदायाला, पक्षाला जबाबदार धरतो आणि त्यांच्यावर सतत टीका करत राहतो. असल्या टीकेमुळे त्याला त्याच्या अपराधीपणाच्या भावनेपासून सुटका मिळते आणि समाधानाची भावना मिळते ही एक प्रकारची मानसिक संरक्षण यंत्रणा आहे (psychological defense mechanism). सर्व गोष्टींत अपयशी ठरल्यामुळे हतबल झालेला वांझोटा सत्ताधारी आपली प्रतिमा संवर्धन करण्यासाठी पॉवर डायनॅमिक्सचा खेळ खेळतो. ज्याने खरोखर चांगले कार्य केले आहे त्यांच्यापेक्षा आपण कसे वरचढ आहोत हे भासवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. तो त्या पूर्वसुरी व्यक्तीची बदनामी करतो, त्याची प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतः नकारात्मक, विध्वसंक वृत्तीचा असल्यामुळे त्याला सकारात्मक, रचनात्मक काम करता येत नाही. त्यामुळे त्या थोर पूर्वसुरीच्या प्रत्येक गोष्टीला, कार्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःला एवढा असुरक्षित समजतो की आपण सर्वोच्चपदी विराजमान असताना आपल्याच मंत्रिमंडळातील कनिष्ठमंत्र्याच्या कार्याचे श्रेय स्वतः कडे घेतो, कामाची उद्घाटने स्वतः करतो. बाकी सर्वांना नामधारी बनवतो जेणेकरून त्याच्यापेक्षा कोणी मोठा दिसू नये आणि तसे झाल्यास अशा आपल्याच  नेत्याचे, मंत्र्याचे पद्धतशीर खच्चीकरण करतो. स्वतःची लायकी नसताना प्रत्येक गोष्टीत आपले नसलेले ज्ञान पाजळून आपल्या पदाचा प्रतिष्ठा पणाला लावतो. सर्व व्यवस्था उद्ध्वस्त झाल्यानंतर, वाताहत झाल्यानंतर जनतेला आपल्यासोबत एकत्र ठेवण्यासाठी विशेषतः निवडणुकीच्या काळात देशात अतिरेकी हल्ले, देशावर परकीय आक्रमण, युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करून लोकांच्या मध्ये राष्ट्रवादाची भावना प्रबळ करून आणि त्याचा फायदा सार्वत्रिक निवडणुकीत घेतो.

                           अशा अनेक युक्त्या हजारो वर्षांपासून सत्ता टिकवण्यासाठी, वर्चस्व राखण्यासाठी वापरल्या जात आहेत पण या युक्त्या अद्यापपर्यंत कालबाह्य झालेल्या नाहीत. नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन संशोधन याचा वापर करून या युक्त्या अजून प्रभावी बनवल्या जात आहेत आणि नवनवीन युक्त्यांची त्यात भर पडली जात आहे. या बलाढ्य सैतानी शक्तीपुढे सर्वसामान्य लोकांनी हतबल होऊन त्यांचे गुलाम होऊन राहायचे हा एकमेव पर्याय आहे का?. या सर्व युक्त्या निष्फळ करण्यासाठी एकमेव प्रभावी मार्ग म्हणजे बहुसंख्य जनतेने आपली सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवणे. अर्थातच याची जाण वर्चस्ववाद्यांना आहे म्हणून ते कधीच जनतेला त्यांच्या सद्सदविवेकबुद्धीचा वापर करण्याची संधी मिळू देत नाही. योग्य शिक्षणाने लोकांना चांगल्या - वाईटाची पारख करता येते, आपला उत्कर्ष करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याची जाणीव होते म्हणून सर्वप्रथम ते शिक्षणाचा बट्ट्याबोळ करतात. जनतेला कायम कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त, वांझोट्या गोष्टीत अडकून ठेवतात, एक चांगले, सुरक्षित जीवन जगण्यासाठी जनतेला सतत संघर्ष करायला लावतात. सर्व लोककल्याणकारी योजनांचा, पायाभूत सुविधांचा बोजवारा उडवून जीवनावश्यक गोष्टींसाठी जनतेला सरकारचे मिंधे होण्यासाठी भाग पाडतात. यावर एकमेव उपाय म्हणजे समाजातील विवेकवादी लोकांनी सातत्याने जनतेला सत्य, वास्तविक तथ्ये, सरकारच्या प्रत्येक कृती मागचा कार्यकारण भाव समजावून जनजागृती करत राहणे आवश्यक आहे. कोणी सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलेला नाही. बदल ही एकमेव चिरंतन गोष्ट आहे फक्त तो बदल आधीच्याच मार्गाने जाणार नाही याची काळजी सर्वांनीच घेणे गरजेची आहे. 

                                                                                                                                संतोबा.

Wednesday, November 26, 2025

प्रवाहपतित सेलिब्रिटी.

               क्रिकेट, राजकारण आणि सिनेसृष्टीचे भारतीय समाजाला प्रचंड आकर्षण आहे. या क्षेत्रात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींचे भरपूर कट्टर अनुयायी तयार होत असतात विशेषतः सिनेसृष्टी आणि क्रिकेट. या सेलिब्रिटी सिनेकलावंत आणि क्रिकेटपटूंचे चाहते सेलिब्रिटींच्या अनेक बऱ्यावाईट गोष्टींचे समर्थन आणि अनुकरण करत असतात. आवडत्या सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी ते अनेक दिव्य पार करत असतात, त्यांच्यासाठी वेळ आणि पैसे खर्च करत असतात तर काहीजण त्यांच्यासाठी जीव द्यायला मागे पुढे पाहत नाही. त्यांना अगदी देवत्व बहाल करतात. अशा पाठीराख्यांमुळे सिनेमा किंवा क्रिकेटमध्ये यशस्वी होणाऱ्याला त्याच्या प्रतिभेच्या कित्येक पटीने मोबदला आणि नावलौकिक मिळत असतो. या सेलिब्रिटींच्या जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या चाहत्यांवर पडत असतो, ते त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते त्यांचे दिसणे असो, ते वापरत असलेली उत्पादने असो. प्रसिद्ध व्यक्तींनी अंगिकारलेल्या चांगल्या वाईट सवयींना, कृतींना सामाजिक प्रतिष्ठा मिळत असते. त्यांच्या कृतींचे सर्वसामान्य व्यक्तींकडून अनुकरण केले जाते. त्यामुळे सेलिब्रिटींच्या प्रसिद्धीचा वापर करून उद्योजकाने आपली उत्पादनांची जाहिरात न केली तरच नवल. त्यामुळे पाण्यासारखा पैसा ओतून व्यावसायिक लोकं सेलिब्रिटी कडून आपल्या मालाची जाहिरात करत असतात. गडगंज श्रीमंत असलेला सेलिब्रिटी त्याच्यादृष्टीने क्षुल्लक असलेल्या रकमेपायी लोकांच्या आरोग्यास हानिकारक असलेल्या एखाद्या गोष्टीची जाहिरात करताना त्याच्या चाहत्यांचा, सामाजिक बांधिलकीचा विचार करत नाही. मग ती जाहिरात पान मसाल्याच्या नावाखाली गुटख्याची असो, सोड्याचा नावाखाली दारूची असो, खेळाच्या नावाखाली जुगाराची असो, श्रमपरिहार, उत्साहवर्धकपेयांच्या नावाखाली हानिकारक शीतपेयांची असो. आपल्या मुळे किती कुटुंबे उद्ध्वस्त होईल याचा सारासार विचार सेलिब्रिटी करत नाही. सर्वसामान्य लोकं आपला चरितार्थ चालवण्यासाठी नोकरीधंदा करतात, तो करताना काही तडजोडी करतात, प्रसंगी मानापमान सहन करतात पण एका मर्यादेपलीकडे आत्मसन्मान विकून पैसे कमवत नाही. पण या गडगंज सेलिब्रिटींची नेमकी काय अगतिकता असते की ती असली अनैतिक कामे करायला सहज तयार होतात.                    

                खरंतर कोणताही सिनेअभिनेता सिनेरसिकांशिवाय मोठा होऊ शकत नाही, कोणताही खेळाडू , क्रिकेटपटू क्रिडा चाहत्यांशिवाय, प्रेक्षकांशिवाय मोठा होऊ शकत नाही. कोणताही राजकीय नेता कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्याशिवाय मोठा होऊ शकत नाही. आपण ह्या लोकांना देवत्व प्राप्त करून देतो.त्यांची लार्जर दॅन लाइफ अशी आभासी प्रतिमा निर्माण करतो. कधी ही व्यक्ती राजकीय नेता, प्रसिद्ध अभिनेता, खेळाडू, प्रशासकीय अधिकारी किंवा तथाकथित सामाजिक कार्यकर्ता असू शकतो. कलेचा, कलाकाराचा सन्मान करता करता त्या कलाकारांमधील माणसाचा सन्मान करू लागतो पण आपण हा विचार करत नाही की तो माणूस सन्मान करण्याच्या योग्यतेचा आहे की नाही. पडद्यावर नायकाची भूमिका साकारणारा, भ्रष्ट, अन्याय व्यवस्थेला नडणारा, आपल्या चतुरस्त्र अभिनयाने भूमिका जिवंत करणारा चांगला कलाकार, चांगला माणूस असेलच असे नाही. आपल्या कौशल्याने आपल्या संघाला जिंकून देणारा चांगला खेळाडू माणूस म्हणून चांगला असेलच असे नाही. सातत्याने निवडून येणारा, लोकांना आपण त्यांचा तारणहार आहोत असा भासवणारा लोकप्रिय नेता चांगला माणूस असेल असे नाही. खरंतर नेत्यांनी धर्माचा, अभिनेत्यांनी नशेचा अन् खेळाडूंनी जुगाराचा बाजार मांडला आहे.अभिनय, खेळ, राजकारण हा त्या लोकांचा व्यवसाय, पेशा आहे. कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्या व्यवसायाला गरजेची असणाऱ्या कौशल्यात निपुण, निष्णात असणे ही त्या व्यवसायात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे आणि ती साध्य करण्यासाठी काही लोकं जीवतोड मेहनत करतात तर काही लोकांना ती कला अंगभूत जन्मजात स्वरूपात लाभते. ज्यावेळी कलेची देणगी अंगभूत, जन्मजात स्वरूपात लाभते त्यावेळी तिचा दर्जा(क्लास) हा वेगळाच असतो आणि अशा जन्मजात कलाकौशल्याची देणगी लाभलेल्या कलाकाराला, खेळाडूला सर्वसामान्य लोकं देवत्व बहाल करतात.

                 सिनेमाच्या माध्यमातून भ्रष्ट, अन्याय्य व्यवस्थेशी, सरकारशी दोन हात करणारा, सत्यासाठी, न्यायासाठी लढणारा, गुंडांशी दोन हात करणारा, निरपेक्षपणे दीन दुबळ्यांची बाजू घेणारा, त्यांना मदत करणारा, नैतिकची चाड असणारा आणि त्यासाठी प्रसंगी आपल्या प्रियजनांशी उभा दावा मांडणारा (पंगा घेणारा) एखादा अभिनयसम्राट, अँग्री यंग मॅन प्रत्यक्ष जीवनात व्यवस्थेला शरण गेलेला, कुठल्यातरी प्रकरणात अडकलेला आणि त्यातून सुटका व्हावी म्हणून सत्ताधाऱ्यांची तळी उचलणारा एक कणाहीन, लाचार व्यक्ती असतो. दैवी प्रतिभा लाभलेला खेळाडू, गायक, गायिका, साहित्यिक कधीही आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी करत नाही मात्र स्वतःच्या फायद्यासाठी नैतिकता गुंडाळून अधिकचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतो. कधी टॅक्स भरण्यातून सूट मिळवण्यासाठी, कधी सरकारी भूखंड मिळवण्यासाठी, स्वतःच्या संस्थेसाठी निधी मिळवण्यासाठी, पुरस्कार मिळवण्यासाठी, तर कधी आपले अपराध लपविण्यासाठी करत असतो. सत्तेविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध बोलून अडचणीत येऊ नये, आपली रोजीरोटी संकटात येऊन नये म्हणून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर, अडचणीवर मूग गिळून गप्प बसणारे सेलिब्रिटी सरकार अडचणीत आल्यावर मात्र सरकारची वकिली आणि जनतेला उपदेशाचे डोस द्यायला तत्पर असतात. सेलिब्रिटींना जर देशातल्या अराजकतेवर एक चकार शब्द उच्चारणारता येत नसेल तर त्यांनी लोकांना उपदेशाचे डोस देऊ नये आणि शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीतही पडू नये. जनता त्यांचा लढा स्वतः लढेल.           

                    खरंतर जनमाणसावर प्रभाव पाडणाऱ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींनी (प्रभावशाली लोकांनी),समाजात वावरताना किमान नैतिकता बाळगावी अशी अपेक्षा असते. जेणेकरून त्यांना आदर्श मानणारी लोकं त्यांच्या वागण्याचा आदर्श घेतील. सरसकट सर्वच सेलिब्रिटी नाही पण किमान ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे आणि त्यांच्या आणि इतरही क्षेत्रातील लोक त्यांना आपला आदर्श मानतात, त्यांची कोणाशी स्पर्धा नाही अशा अद्वितीय प्रतिभा असलेल्या सेलिब्रिटींकडून समाजहिताची भूमिका घेणे अपेक्षित असते. एवढेच काय सरकारचा एखादा चुकीचा निर्णय बदलण्याचा, सरकारची ध्येय-धोरणे सुधारण्याची ताकद अशा सेलिब्रिटींमध्ये असते कारण त्यांना मोठ्या जनसमुदायचे पाठबळ असते पण भारतातील बहुतांश सेलिब्रिटींनी आपआपल्याला क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलेले असले तरी प्रत्यक्ष राजकीय- सामाजिक जीवनात हे सेलिब्रिटी भयंकर खुजे आहेत. सर्वसामान्य जनता स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आपापल्या परीने लढत असते पण हे सेलिब्रिटी जनतेसाठी सोडा स्वतःच्या आत्मसन्मासाठी देखील भूमिका घेत नाही एवढे हे लाचार आणि असहाय्य आहेत. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे, व्यवस्थेला गोत्यात आणू शकणारी आपली भूमिका, आपले विचार जाहिर केले तर होणाऱ्या परिणामाची जाण त्यांना आहे. व्यवस्थेच्या, सत्तेच्या विरोधात गेलो तर प्रवाहाच्या बाहेर पडण्याची भीती आहे कारण सत्तेच्या अन् व्यवस्थेच्या अव्यवस्थेची भलामण करणाऱ्यालाच सत्ता, व्यवस्था पुरस्कृत करते. जे सत्तेची, व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना सत्ता अन् व्यवस्था बहिष्कृत करते. आपण प्रवाहाच्या बाहेर पडू, एकटे पडू अडचणीत येऊ, सगळी प्रतिष्ठा, प्रसिध्दी, पैसा धुळीस मिळू नये म्हणून कायम हा ही चांगला तो ही चांगला अशी सोईस्कर भूमिका घेण्याचा अभिनय ते लीलया पार पाडतात. अमाप पैसा, प्रसिद्धी, लोकांचे पाठबळ, नैतिकतेचे पाठबळ असताना चुकीला चूक म्हणता येत नसेल, अन्यायाला विरोध करता येत नसेल अन् न्यायाची बाजू घेता येत नसेल तर या सेलिब्रिटींची अलौकिक प्रतिभा व्यर्थ आहे. 

               चित्रपटातून, खेळामधून, गाण्यांमधून आपल्याला क्षणिक आनंददायी अनुभव(फिलगुड फॅक्टर) मिळतो, पण हा क्षणिक आनंददायी अनुभव आपल्या मूलभूत अडचणी सोडवत नाही. ज्या महापुरुषांमुळे आपल्या आयुष्यात चांगला बदल घडला आहे त्यांना आपण कवडीची किंमत देत नाही पण शेळपट सेलिब्रिटींना आपण देवत्व बहाल करतो. कायम चर्चेत, बातम्यात असणारे, चित्रपटगृहाच्या आणि टीव्हीच्या पडद्यावर कायम दिसणारे लोक हळूहळू सेलेब्रिटी बनतात. सध्या त्यात इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्यांची भर पडलेली आहे. ज्या लोकांच्या प्रेमामुळे आपल्याला मानसन्मान, प्रसिद्धी पैसा मिळाला आहे, ज्यांच्यामुळे सगळ्या सुख सुविधा असलेले विशेष जीवन उपभोगतोय त्या लोकांच्या गरजेपोटी ठाम भूमिका घेण्याएवढी हिंमत सेलिब्रिटींमध्ये नसेल आणि ते केवळ प्रवाहाबरोबर वाहवत जाणारे असतील तर अशा शेंदूर लावून देवत्व बहाल केलेल्या सेलिब्रिटी दगडांचा शेंदूर आपण खरवडून त्यांचे पाय मातीचेच आहेत हे सत्य स्विकारला हवे. हे सेलिब्रिटी म्हणजे कोणी दुसरे तिसरे कोणी परग्रहावरची लोकं नसून तुमच्या आमच्या सारखेच सर्वसामान्य लोकं आहेत. त्यांच्याशी आपण आपला संबंध हा त्यांच्या कलेपुरता मर्यादित ठेवावा. त्यांना खास वागणूक देऊन व्हीआयपी संस्कृती वाढू देऊ नये. त्यांच्यासाठी कायदे नियम धाब्यावर बसवून अतिरिक्त लाभ मिळू देऊ नका. या व्हीआयपी संस्कृतीचा आणि त्यांना मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा, अतिरिक्त लाभांचा त्रास आपल्यालाच होणार आहे, नुकसान आपलेच होणार आहे. या दिखाऊ, कचाकड्याच्या बाहुल्या आपल्यासाठी सेलेब्रिटी नाहीत. आपल्यासाठी लढणारा, अन्याय्य व्यवस्थेला नडणारा, स्वातंत्र्याची, समतेची, न्यायाची चाड असणारा, विवेकवादी समाज घडवणारा व्यक्तीच आपला खरा सेलेब्रिटी आहे.

                                                          संतोबा (संतोष गांजुरे).

Thursday, October 2, 2025

आरक्षणाचे खरे मारेकरी - शिव, फुले, शाहू, आंबेडकर

                    हजारो वर्षे वर्णव्यवस्थेच्या पिंजऱ्यात बंदिस्त केलेल्या हिंदू समाजाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. शिक्षणाचा अधिकार फक्त एकाच भारतात आक्रमण करून(आगमन नव्हे) स्थलांतरीत समाजाला, त्यांना शिक्षणाचे पूर्ण आरक्षण. तुरळक अपवाद म्हणून त्या भटक्या आक्रमक समाजाव्यतिरिक्त काहीजण शिकले असतील पण म्हणून अपवादांचे सरसकटीकरण वा सामान्यीकरण करता येणार नाही. समकालीन सर्वसाधारण शैक्षणिक परिस्थिती काय होती हे महत्त्वाचे. स्वतःपुरते मर्यादित असलेल्या शिक्षणामुळे आपसूकच शारीरिक श्रम अन् कौशल्य वगळता सर्वच क्षेत्रात एकाच समाजाची मक्तेदारी. इथले भूमिपुत्र असलेले सर्व हिंदू शूद्रातिशुद्र, एवढेच काय त्या अघोषित आरक्षित समाजातील महिला देखील शूद्रच. या मूठभर असलेल्या परप्रांतीय समूहाने हजारोंवर्षे येथील हिंदू समाजावर वर्चस्व गाजवले. या भटक्या समूहाने हिंदू धर्म हायजॅक करत हजारो वर्षे आणि शेकडो पिढ्यांपासून हिंदू समाजाला गुलामगिरीत बंदिस्त केले. या समाजानंतर सुद्धा अनेक आक्रमक आले पण काही वर्षात ते परतले तर काही येथेच राहून येथील समाजाचाच एक भाग बनले. शक्यतो जेव्हा एखादा व्यक्ती, समूह दोनतीन पिढ्यानंतर जिथे स्थलांतरित झाला आहे त्या समाजाचा, संस्कृतीचा भाग बनून त्यांच्या मिळून मिसळून जातो. पण हा आक्रमक, भटका समूह हजारों वर्षांपासून भारतीय समाजाचा भाग बनू शकला नाही. जिथे आश्रयाला आले तिथेच वर्चस्व गाजवू लागले पण ज्यावेळी दुसरे त्यांच्या वरचढ आक्रमक आले तेव्हा त्यांनी त्यांच्याशी सूत जुळवून घेतले, त्यांच्यासाठी खर्डेघाशी केली, हेरगिरी केली आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लढवय्या स्थानिक भूमिपुत्रांच्या खबरी तत्कालीन शासनकर्त्यांना देऊन आपला स्वार्थ साधून घेतला. कावेबाजपणा अन् भेदाभेद हेच त्यांच्या टिकून राहण्याचे जालीम हत्यार राहिले आहे. 

                     मूठभर असलेल्या भटक्या स्थलांतरीत लोकांनी एवढ्या मोठ्या प्रदेशावर, लोकांवर वर्णव्यवस्थेचे जोखड लादून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आपला कावेबाजपणा उघड झाला तर आपले अस्तित्व धोक्यात येईल याची जाणीव त्यांना होती म्हणून त्यांनी वर्णव्यवस्थेची उतरंड अशाप्रकारे निर्माण केली की, त्या उतरंडीमध्ये स्वतःला शिरोभागी ठेवत, सर्वाधिकार आपल्याकडे ठेऊन उतरंडीनुसार कमीतकमी अधिकार देऊन स्वतःचे वर्चस्व चिरंतन राहण्यासाठी वर्णव्यवस्था ही परिसंस्था (इकोसिस्टिम) निर्माण केली. या उतरंडीच्या खालच्या पायरीवर असलेल्यांना वरच्या पायरीवर असलेल्यांच्या मेहरबानीवर जगावे लागत होते. थोडक्यात खालच्या पायरीवर असलेला वरच्या पायरीवर असलेल्याचा सेवेकरी आणि अर्थातच सर्वात शिरोभागी असलेला केवळ मेवेकरी. त्यामुळे तळात असलेल्या समाजाचे जगणं प्रचंड खडतर आणि हलाखीचे होते. या विषमतावादी वर्णव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक समूह वर्णव्यवस्थेचा कमी अधिक प्रमाणात पिडित असला तरी, वर्णव्यवस्थेच्या पिंजऱ्यात अशाप्रकारे अडकला की त्याला आपल्यापेक्षा कोणीतरी खालच्या पायरीवर आहे आणि आपण केवळ वरच्या पायरीवर असलेल्या समाजात जन्माला आलो आहोत म्हणून आपले काही कर्तृत्व नसताना खालच्या पायरीवर असलेल्यांवर वर्चस्व गाजवू शकतो या भावनेनेच सुखावतो. पण त्याच्या हे लक्षात येत नाही की सगळ्यात शिरोभागी असलेल्या भटक्या, परक्या समूहाला सर्वाधिकार आहे. ते केवळ हिंदूंचे नव्हे तर हिंदूच्या देवदेवतांचे देव बनले. त्यामुळे कायदे त्यांचेच आणि व्यवस्था त्यांचीच त्यामुळे त्यांनी केलेल्या गुन्ह्यांना इतरांसारखी शिक्षा नाही. ते कितीही नितीभ्रष्ट झाले तरी सर्वश्रेष्ठच राहतील कारण ते भूदेव आहेत. ते स्वतःला केवळ हिंदूच समाजच नव्हे तर हिंदूच्या देवदेवतांच्यापेक्षाही श्रेष्ठ समजतात पण हे शिक्षणाअभावी त्यांच्या कधीच लक्षात आले नाही आणि हिंदू नसलेल्या उपऱ्या समाजाला हिंदूंचे तारणहार समजून त्यांचे वर्चस्व आणि हिंदू धर्माच्या व्यवस्थेचा भाग नसलेल्या उपऱ्या वर्णव्यवस्थेचे जोखड हिंदूसमाज हजारों वर्षापासून आनंदाने वाहत आहे आणि म्हणूनच आजसुद्धा आपली योग्यता आपली जात ठरवते आणि त्यानुसार आपल्याशी व्यवहार केला जातो. 

                  जगभरात धर्मसत्ता राजसत्तेवर पर्यायाने सामान्य जनतेवर वर्चस्व गाजवत असताना भारतात छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मसत्तेचे वर्चस्व, अन्याय्य रूढी-परंपरा मोडीत काढत रयतेचे स्वराज्य निर्माण केले. तत्कालीन धर्ममार्तंडानी शिवाजी महाराजांना 'शूद्र' म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण वर्णव्यवस्थेनुसार, शूद्रांना राज्याभिषेक (राज्यारोहण) करण्याचा अधिकार नव्हता. शिवाजी महाराज आधीच रयतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान होते त्यांनी राज्याभिषेक नसता केला तरी त्यांच्या कर्तृत्वात उणेपणा आला नसता पण त्यांच्या समकालीन इतर शासकांच्या दृष्टीने स्वराज्याला स्वतंत्र, सार्वभौम राज्य आणि परकीय शासकांशी व्यापार आणि लष्करी करार करण्यासाठी शिवाजी महाराजांना 'छत्रपती' म्हणून मान्यता मिळवण्यासाठी राज्याभिषेक गरजेचा होता आणि तो त्यांनी स्थानिक धर्ममार्तंडांचा विरोध झुगारून आपल्या गनिमी काव्याने करवून घेतला. याशिवाय शूद्रांना शस्त्र धारण करण्यास मनाई होती, शिवरायांनी हे नियम मोडत अठरापगड जातींना आपल्या लष्करता सामावून घेतले. धर्ममार्तंडानी केवळ अधिकारासाठीच नव्हे तर गुन्ह्यातील शिक्षेत सूट मिळावी म्हणून स्वतः साठी जन्मजात विशेषाअधिकारांची तजवीज केली होती. धर्ममार्तंड स्वतःला भुदेव समजत होते व त्यांची हत्या म्हणजे मोठे पातक समजले जात होते. महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करताना स्वराज्याच्या हिताआड येणाऱ्या धर्ममार्तंडांचे लाड न करता फितूर झालेल्यांची गर्दन मारताना बिल्कुल मुलाहिजा राखला नाही. थोडक्यात शिवरायांनी जन्मजात विशेषाधिकराचे जे अघोषित आरक्षण होते त्याचा कडेलोट केला. शिवरायांच्या या धोरणांमुळे जन्मजात वर्णव्यवस्थेची बंधने तोडता येतात याचा विश्वास समाजामध्ये निर्माण झाला. साम्राज्ये अनेकांनी उभारली पण एखाद्या प्रगल्भ लोकशाहीला हेवा वाटेल असे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारले. लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरावी, लोककल्याणाचे, रयतेचे राज्य कसे असावे याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. हा वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चालवताना स्वराज्यद्रोही तथाकथित भूदेवांना हत्तीच्या पायाखाली दिले.  

              शिक्षणाअभावी गुलामीत जगणाऱ्या देशातील हिंदूंच्या दुरावस्थेचे निदान महात्मा जोतीराव फुले यांनी एकाच कडव्यात प्रभावीपणे केले आहे. 

  विद्येविना मती गेली। 
    मतिविना नीती गेली। 
    नीतिविना गती गेली। 
   गतिविना वित्त गेले। 
     वित्ताविना शूद्र खचले। 
    इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

महात्मा ज्योतिराव फुले यांनी वर्णव्यवस्था शोषणकारी आणि अन्यायी आहे हे जाणले. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी वर्णव्यवस्थेच्या विरोधात शिक्षणाला सर्वात मोठे हत्यार मानत वर्णव्यवस्थेवर कठोर प्रहार केले. सामाजिक सुधारणा आणि समता-आधारित समाजाच्या निर्मिती त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. त्यांनी ओढलेल्या आसुडाचे उमटलेले वळ दीडशे वर्षांनंतर मिटलेले नाही. केवळ त्यामुळेच अजूनही त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गरळ ओकली जाते. त्यांनी 'गुलामगिरी' (१८७३) या पुस्तकात वर्णव्यवस्थेचा मिथकांवर आधारित इतिहास उघड केला आणि टोळीवाल्या भटक्यांनी हिंदूंना गुलाम बनवण्यासाठी धार्मिक ग्रंथांचा कसा गैरवापर केला, यावर प्रकाश टाकला. हिंदू समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक शोषणावर बोट ठेवले. त्यांनी वर्णव्यवस्थेच्या नावाखाली हिंदूंना शिक्षण आणि प्रगतीपासून वंचित ठेवण्याचा कावेबाजपणा उघड केला. ' शेतकऱ्याचा आसूड' (१८८१) च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे आणि शोषणाचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय सुचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विश्वास होता की शिक्षण हेच शोषणाविरुद्ध लढण्याचे शिक्षण हेच प्रभावी साधन आहे हे जाणून त्यांनी टोळीवाल्यांच्या हजारों वर्षांच्या अघोषित शैक्षणिक आरक्षणाला सुरुंग लावण्याचे काम करत १८४८ ला मुलींसाठी शाळा स्थापन केली त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका बनवून या कार्यात सामील करून घेतले.

                       कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज (कार्यकाल १८९४ ते १९२२) हे त्यांच्या लोकशाहीवादी, समतावादी, सत्यशोधक विचारांसाठी अन् प्रगतीशील धोरणांसाठी प्रसिद्ध होते. महात्मा फुले यांच्यानंतर शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. १८९४ साली राजर्षी शाहू महाराजांनी अधिकारारोहण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या सर्वसाधारण प्रशासनाच्या ७१ पैकी ६० जागांवर ३-४ टक्के असलेला समाज होता. राजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी आरक्षणाचा आदेश काढत आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर आरक्षणाला सुरुवात झाली. शाहू महाराजांची आठरापगड जातींना आरक्षण देऊन मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिपाक म्हणून पुढच्या २० वर्षात परिस्थिती हळहळू बदलली व १९२२ मध्ये सर्वसाधारण प्रशासनाच्या एकूण ८५ जागांपैकी ५९ जागांवर बहुजन समाजातील अधिकारी नेमले गेले. आरक्षणाच्या एकूणच धोरणाचा लाभ होणारे देशातील पहिले व्यक्ती प्रसिद्ध कृषितज्ज्ञ जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक व पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य श्री. पांडुरंग चिमणाजी पाटील-थोरात हे होते असे मानले जाते. सामाजिक न्याय आणि समता आधारित समाज निर्माण करणे हे आरक्षणाच्या अंमलबजावणीचे उद्दीष्ट होते. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होवू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी १९१२ मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे ठरविले. १९१७- १८ पर्यंत विनामूल्य प्राथमिक शाळांची संख्या दुप्पट केली.

              १९३०-३२ च्या लंडन येथील राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन अस्पृश्य वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र मतदार संघाची आणि राजकीय हक्कांची मागणी केली. १९३२ मध्ये ब्रिटिश सरकारने दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले.या स्वतंत्र मतदार संघामुळे हिंदू समाजाची विभागणी होईल म्हणून त्याला महात्मा गांधींनी उपोषणाद्वारे विरोध केला. गांधींच्या उपोषणानंतर डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रीय एकतेच्या दृष्टिकोनातून तडजोड करत पुणे करार स्विकारला यामुळे दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित जागा (१४७ जागा) मिळाल्या. पुणे करार भारतातील राजकीय आरक्षणाचा पहिला टप्पा आणि आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे द्योतक आहे. स्वतंत्र भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने आरक्षण बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे साधन होते. त्यासाठी बहुजन समाजाला शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा हक्क मिळावा म्हणून संविधानाच्या माध्यमातून त्यांनी आरक्षणाला घटनात्मक संरक्षण दिलं. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराजांप्रमाणेच डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन मानले. त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५) आणि डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी स्थापन करून दलित आणि मागासवर्गीयांसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या.

                 महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिघांचा जन्म तत्कालीन हिंदू धर्मांतील वेगवेगळ्या जातीतला अन् वेगवेगळ्या पायरीवरचा पण वर्णव्यवस्थेचा फटका तिघांनाही बसला. शाहू महाराज तर राजे असून आणि अगदी वर्णव्यवस्थेनुसारही हिंदू धर्मामध्ये वरच्या पायरीवर असणारे तरीही त्यांनाही वर्णव्यवस्थेचा फटका बसला. एवढेच काय स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, थोरले महाराज छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनाही वर्ण व्यवस्थेचा फटका बसला पण ती वर्णव्यवस्था उखडून टाकण्याचे काम आपआपल्यापरीने प्रत्येकाने केले. जर सर्वच हिंदूंना वर्णव्यवस्थेचा फटका बसला असले तर अशी वर्णव्यवस्था हिंदूंची कशी असू शकते. कोणत्याच धर्मात अशी व्यवस्था नसेल जी आपल्याच धर्मातील सर्वच लोकांना दुय्यम स्थान देईल, थोडक्यात वर्णव्यवस्था ही उपरी आहे आणि ती हिंदू धर्माचा भाग नाही. या युगपुरुषांसोबतच, अनेक संतानी या वर्णव्यवस्थेवर प्रहार करत वर्णव्यस्थेला कमजोर करण्याचे आणि बहुजन हिंदू समाजाला मानवी हक्कांची जाणीव करून देण्याचे कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपआपल्या परीने पाखंडी भूदेवांच्या जन्मजात विशेषाअधिकारांना, आरक्षणाला न जुमानता बहुजन हिंदू समाजाला अनेक क्षेत्रात संधी दिल्या. हजारों वर्षाच्या अघोषित आरक्षणाचे परिमार्जन करण्यासाठी हिंदू बहुजनांना आरक्षणाची संकल्पना मांडून ती पूर्णत्वास नेली त्यामुळे महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजारोंवर्षांच्या अघोषित आरक्षणाचे खरे मारेकरी आणि हिंदूचे खरे तारणहार आहेत. धर्ममार्तांडाच्या अघोषित आरक्षणाचे कर्दनकाळ आणि समस्त हिंदू समाजाचे तारणहार छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो, महात्मा जोतिराव फुलेंचा विजय असो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.


            जय शिवराय, जय ज्योती जय क्रांती, जय भीम.


                                                      संतोबा...

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!