Featured Posts
Monday, January 26, 2026
मराठी भैय्ये अर्थात खानदानी आईबापांच्या लावारिस अवलादी
Sunday, January 25, 2026
भूमिका - १
आमचा कोणालाही विरोध नाही. आम्ही सत्य, अहिंसा, समता, स्वातंत्र्यता, न्याय या उच्च मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे आहोत. पण ही मूल्ये पायदळी तुडवणारे यांना आमचा तीव्र विरोध असेल. कारण एक मूल्ये एकतर्फी जपली जाऊ शकत नाही आणि ती एकतर्फी जपण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न मूल्ये जपणाऱ्याच्या आणि एकूणच सर्वसमाजाच्या अधःपतनाला, दुर्दशेला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून जे मतलबी, कृतघ्न, खोटारडे, विश्वासघातकी, गद्दार, ढोंगी, पाखंडी, समाजद्रोही, वर्चस्ववादी, विषमतावादी, हिंस्त्र, अन्यायी आहेत त्या सर्वांना आणि अनैतिक, बेकायदेशीर, अन्यायकारक गोष्टींना आमचा ठाम विरोध आहे.
संतोबा...
Tuesday, December 23, 2025
विचारधारा आणि द्वेषधारा.
Monday, December 22, 2025
कावेबाज पाखंडी धर्ममार्तंड
Sunday, December 7, 2025
सत्तासूत्र
प्राचीन काळापासून जगभरातील बलाढ्य साम्राज्यांचे सम्राट, हुकुमशहा, भांडवलदार, राज्यकर्ते आपली सत्ता आणि वर्चस्व टिकवण्यासाठी आणि जनतेने आपल्या मनमानी कारभाराविरोधात बंड करू नये यासाठी विविध युक्त्या, तंत्र वापरून जनतेला आपल्या अधिपत्याखाली ठेवत आले आहेत. प्राचीन आणि मोठया असलेल्या रोमन साम्राज्यात(इ.स.पू. २७) भाकरी आणि मनोरंजन ही युक्ती वापरली जायची(Bread and Circuses (Panem et Circenses)). सत्ताधारी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवत. जनतेसाठी ग्लॅडिएटर लढाया, रथांच्या शर्यती यांसारखे मोठे सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करत. अशा कार्यक्रमांमुळे जनता आपल्या मूलभूत समस्यांपासून विचलित होऊन उदरनिर्वाहासाठी सत्ताधाऱ्यांवर अवलंबून रहात. मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदत देऊन जनतेला सत्ताधाऱ्यांचे मिंधे बनवल्यावर त्यांना सत्ताधाऱ्यांची जी हुजुरी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्याच बरोबर धर्म, जात, प्रदेश आणि सामाजिक वर्गाधारित फूट पाडून आपापसात लढवत ठेवण्याचा फोडा आणि राज्य करा (Divide et impera" (डिव्हाइड एट इम्पेरा)) या युक्तीचा वापर करत रोमन साम्राज्य परकीय प्रांतांमध्ये स्थानिक गटांना एकमेकांविरुद्ध लढवून रोम साम्राज्याविरोधात बंड होऊ न देण्याची काळजी घेत. तसेच कायदेशीर हेराफेरी (Legal Manipulation) ज्यामध्ये सत्ताधारी सत्ता बळकट करण्यासाठी कायद्यात बदल करतात आणि आपल्या समर्थकांना अधिकचा लाभ मिळवून देतात. तसेच प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना लढायची संधी सुद्धा देत नाही, विरोधकांनी जिंकणे तर दूरची गोष्ट. उदाहरणार्थ रोममध्ये नागरिकत्वाचे विशेषाधिकार फक्त काहींनाच दिले गेले. जनतेला लुबाडून आपल्या गोतावळ्याचा हितसंबंध जोपासत फक्त त्यांचीच भरभराट करणारे आणि जनतेची वाताहत करणारे सत्ताधारी जनतेला भुलवण्यासाठी काहीतरी भव्यदिव्य करून त्याचे प्रदर्शन करून जनतेला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. भव्य इमारती, पुतळे, संग्रहालये, सार्वजनिक समारंभ, किंवा शासकीय प्रकल्पांद्वारे आपली शक्ती आणि वर्चस्व दाखवतात, ज्यामुळे जनता त्यांच्यावर प्रभावित होते. इजिप्तमधील पिरॅमिड्स, फ्रान्समधील व्हर्सायचा राजवाडा आणि अनेक देशात उभारलेली भव्य राष्ट्रीय स्मारके,धार्मिक स्थळे भव्यता आणि प्रदर्शनाचे (Spectacle and Grandeur) उदाहरण आहे.
सत्तेचा खुंटा मजबूत करण्याचे अजून एक प्रभावी तंत्र म्हणजे प्रचारतंत्र (Propaganda). हे तंत्र समाज आणि लोकमानस आपल्या दिशेने वळवण्याचे एक कौशल्यपूर्ण साधन आहे. यामध्ये विशिष्ट विचारधारा, अजेंडा(कार्यसूची) पुढे रेटण्यासाठी आणि लोकांच्या मतांवर आणि विचारांवर प्रभाव पडण्यासाठी हेतुपुरस्सर अर्धसत्य, वाढीव माहिती आणि अफवा पसरवल्या जातात. फक्त आपल्या विचारसरणीला पूरक माहिती देणे, आपल्याविरोधी माहिती टाळणे. विरोधकांवर सातत्याने हल्ला करणे अशा गोष्टी केल्या जातात. याचा उद्देश विशिष्ट विचारसरणी, राजकीय अजेंडा किंवा हितसंबंधांना चालना देणे हा असतो. भीती, देशभक्ती, आनंद यांसारख्या तीव्र अस्मितावादी भावना जागृत केल्या जातात. हा प्रचार वस्तुनिष्ठ नसतो आणि यामध्ये विशिष्ट धारणांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडक तथ्ये सादर केली जातात. तसेच तर्कसंगत प्रतिसाद देण्याऐवजी भावनिक भाषा वापरली जाते आणि जटिल समस्या सोप्या करून सादर केल्या जातात. उद्देश हा की लोकांनी एक विशिष्ट दृष्टिकोन स्विकारावा आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आपल्यासोबत राहावे. या तंत्राचा सर्वात प्रभावी वापर हिटलरने जर्मनीमध्ये केला (गोबेल्स नीती). प्रचारतंत्राचा पुढचा आणि सर्वात प्रभावी भाग म्हणून सम्राट, सत्ताधीश हा ईश्वरी अवतार (non-biological) आहे, त्याला खुद्द देवाने लोकोद्धारासाठी पाठवले आहे असा प्रचार करायचा. आणि तो जे काही करतोय ते दैवी कार्य आहे तो प्रजेला किंवा कोणत्याही मानवी सत्तेला जबाबदार नाही. त्यामुळे राज्याची कितीही दुरावस्था झाली तरी राजाला ईश्वराचा प्रतिनिधी मानल्यामुळे आपल्याला जे काही भोगावे लागतेय एका उदात्त हेतूसाठी, त्याच्या विरोधात जाणे म्हणजे देवाच्या इच्छेविरुद्ध जाणे अशी भावना जनतेत निर्माण होऊन मोठ्या भक्तिभावाने जनता सर्व भोग भोगत असते आणि राजा राज्य उपभोगत असतो. प्राचीन इजिप्तमध्ये फारोला देव मानले जायचे. मध्ययुगात युरोपात याप्रकारे राजांचा "दैवी हक्क" (Divine Right of Kings) प्रचारला गेला आणि राज्यांनी आपल्या अनियंत्रित राज्यकारभाराचा नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त करून दिले.
सत्ताधारी आपल्या अधिकारांचा वापर करून आपल्या निष्ठावान समर्थकांना आणि प्रभावी घटकांना जसे की उद्योजक, प्रसार माध्यमे, कलाकार यांना कवडीमोल दराने जमिनी, मोठमोठी कंत्राटे, पुरस्कार, आर्थिक लाभ देऊन त्यांची निष्ठा खरेदी करतात. त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालून त्यांना संरक्षण देतात(Clientelism and Patronage) त्याबदल्यात हे लोक सत्ताधाऱ्यांची तळी उचलून परस्पर हितसंबंध जोपासतात . वैयक्तिक स्तरावर क्लायंटलिझम जबरदस्तीद्वारे देखील केला जाऊ शकतो जिथे नागरिकांना विशिष्ट राजकारणी किंवा पक्षाला मतदान न केल्यास वस्तू किंवा सेवा खंडित करण्याची धमकी दिली जाते. हे सत्तेचे दलाल आपल्या मिळकतीमधील छोटासा हिस्सा सत्कार्यासाठी खर्च करून आपली प्रतिमा उजळवत असतात. शोषित लोकं या सर्वांचा जयघोष करत राहतात त्यांना हे कळत नाही की फक्त त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेचा एक भाग त्यांना परत मिळत आहे आणि शासक आणि सत्तेचे दलाल ते जनतेच्या हिश्यातून घेतल्याशिवाय परत जनतेला देऊ शकत नाही. थोडक्यात ही मूठभर लोकं मणभर मेवा खातात आणि कणभर मेव्याच्या उष्ट्या पत्रावळ्या ढीगभर जनतेच्या वाट्याला येतात.प्राचीन रोममध्ये, सम्राटांनी आपल्या निष्ठावानांना जमिनी आणि विशेषाधिकार दिले. मध्ययुगात सामंतांनी आपल्या समर्थकांना संरक्षण आणि जमिनी दिल्या ही बेकायदेशीर संरक्षण आणि पक्षपाती लाभाची(Clientelism and Patronage ) काही उदाहरणे आहेत.
कमी खटाटोपी करून, जनतेला टोपी घालणारी आणि जनतेची मती गुंग करणारी राजसत्तेची अन् धर्मसत्तेची युती ही सत्ता राखण्याची सगळ्यात जालीम युक्ती आहे. या दोहोंचा परस्पर संबंध हा मानवी इतिहासातील एक गुंतागुंतीचा, दीर्घकालीन चाललेला मुद्दा आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातील नाते हे एकमेकांना मजबूत करण्यासाठी असते. धर्मसत्ता राजसत्तेला नैतिकता, वैधता प्राप्त करून देते तर राजसत्ता धर्मसत्तेला राजाश्रय मिळवून देते. पाखंडी धर्ममार्तंडांना राजाश्रय मिळाला की जनतेच्या भावना बोथट करण्याचे काम करत असतात. धर्ममार्तंड धर्माचा वापर जनतेला भ्रमात ठेवण्यासाठी करतात. धर्मसत्ता पाप-पुण्य, स्वर्ग-नरक यांच्या भीतीने जनतेवर मानसिक वर्चस्व गाजवतात, ज्यामुळे लोक स्वतंत्र विचार करू शकत नाहीत आणि सत्ताधाऱ्यांच्या शोषणाला बळी पडतात. जनतेला भ्रमात ठेवून त्यांचे अधिकार हिरावले जातात, विकास रोखला जातो आणि सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांचा वापर केला जातो. जनतेची धार्मिक श्रद्धा सत्तेच्या समर्थनासाठी वापरली जाते. धर्ममार्तंड आणि राज्यकर्ते धर्माच्या, धर्म वाचवण्याच्या, वाढवण्याच्या गोष्टी करतात पण त्या धर्मातील लोकं वाचवण्याच्या, त्यांचा उत्कर्ष करण्याच्या गोष्टी करत नाहीत. मध्ययुगात युरोपात कॅथलिक चर्च आणि राजसत्तेची युती होती. इटलीमध्ये पोप पायस ११ आणि मुसोलिनी यांची युती होती, ज्यात चर्चने मुसोलिनीच्या हुकूमशाही राजवटीला पाठिंबा दिला आणि ज्यूंविरोधी कायद्यांना अप्रत्यक्ष संमती दिली. जागतिक स्तरावर, धर्माचा दुरुपयोग अतिरेकवाद वाढवण्यासाठी होतो, ज्यात राजकीय नेते धार्मिक भाषेचा वापर करून आपले अजेंडे पुढे रेटतात.
कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थाचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी, जनतेत भीती निर्माण करण्यासाठी करतात. शासनाला अडचणीत आणणाऱ्या घटकांना नेस्तनाबूत करण्यासाठी या संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या संपत्तीवर टाच आणली जाते, त्यांच्या स्थावर मालमत्ता जमिनीदोस्त केल्या जातात, त्यांची सगळी कृत्ये बेकायदेशीर ठरवून त्यांना तुरुंगात डांबले जाते. प्राचीन अॅसिरियन साम्राज्याने निष्ठुरपणे दडपशाहीद्वारे लोकांना आपल्या अधिपत्याखाली ठेवले होते. राज्यकर्ते शिक्षणातून आपल्या विचारसणीचा प्रसार करून जनतेच्या विचारावर नियंत्रण ठेवतात आणि त्यांना आपल्या बाजूला वळवतात. प्राचीन स्पार्टामध्ये तरुणांना सैनिकी प्रशिक्षण आणि विचारसरणी शिकवली जायची. आधुनिक काळात काही देश पाठ्यपुस्तकांद्वारे इतिहासाची हेराफेरी करून आपल्या सोईस्कर इतिहास शिकवतात. याशिवाय कोणी बंडखोरी करू नये म्हणून अशा लोकांवर पाळत ठेवली जाते. जगभरातील सर्वच सरकारांच्या गुप्तचर यंत्रणा मजबूत असतात त्या परकियांवर पाळत ठेवतातच अंतर्गत विरोधक आणि विवेकवादी लोकांवर देखील पाळत ठेवतात. खरंतर जगभरातले सर्वच हुकुमशहा क्रूर असले तरी प्रत्यक्षात ते खूप घाबरट असतात. विरोधकच काय पण आपल्या समर्थकाबद्दल पण त्याच्या मनात शंका असते.
या अशा अनेक युक्त्या वापरून सत्ता टिकवता येत पण यशस्वी होता येईलच असे नाही. त्यामुळे चोहोबाजूंनी अपयशी ठरल्यानंतर आपल्या अपयशाचे खापर कोणावर तरी फोडावे लागते, कोणाला तरी जबाबदार धरावे लागते त्यासाठी बाह्यशत्रू आणि अंतर्गत विरोधकांना बळीचा बकरा बनवले जाते (Scapegoating and External Enemies). राज्यकर्ता आपल्या नाकर्तेपणासाठी, अपयशासाठी स्वतःला जबाबदार न धरता त्या अपयशासाठी कारणीभूत नसलेल्या एखाद्या व्यक्तीला, समुदायाला, पक्षाला जबाबदार धरतो आणि त्यांच्यावर सतत टीका करत राहतो. असल्या टीकेमुळे त्याला त्याच्या अपराधीपणाच्या भावनेपासून सुटका मिळते आणि समाधानाची भावना मिळते ही एक प्रकारची मानसिक संरक्षण यंत्रणा आहे (psychological defense mechanism). सर्व गोष्टींत अपयशी ठरल्यामुळे हतबल झालेला वांझोटा सत्ताधारी आपली प्रतिमा संवर्धन करण्यासाठी पॉवर डायनॅमिक्सचा खेळ खेळतो. ज्याने खरोखर चांगले कार्य केले आहे त्यांच्यापेक्षा आपण कसे वरचढ आहोत हे भासवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. तो त्या पूर्वसुरी व्यक्तीची बदनामी करतो, त्याची प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतः नकारात्मक, विध्वसंक वृत्तीचा असल्यामुळे त्याला सकारात्मक, रचनात्मक काम करता येत नाही. त्यामुळे त्या थोर पूर्वसुरीच्या प्रत्येक गोष्टीला, कार्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःला एवढा असुरक्षित समजतो की आपण सर्वोच्चपदी विराजमान असताना आपल्याच मंत्रिमंडळातील कनिष्ठमंत्र्याच्या कार्याचे श्रेय स्वतः कडे घेतो, कामाची उद्घाटने स्वतः करतो. बाकी सर्वांना नामधारी बनवतो जेणेकरून त्याच्यापेक्षा कोणी मोठा दिसू नये आणि तसे झाल्यास अशा आपल्याच नेत्याचे, मंत्र्याचे पद्धतशीर खच्चीकरण करतो. स्वतःची लायकी नसताना प्रत्येक गोष्टीत आपले नसलेले ज्ञान पाजळून आपल्या पदाचा प्रतिष्ठा पणाला लावतो. सर्व व्यवस्था उद्ध्वस्त झाल्यानंतर, वाताहत झाल्यानंतर जनतेला आपल्यासोबत एकत्र ठेवण्यासाठी विशेषतः निवडणुकीच्या काळात देशात अतिरेकी हल्ले, देशावर परकीय आक्रमण, युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करून लोकांच्या मध्ये राष्ट्रवादाची भावना प्रबळ करून आणि त्याचा फायदा सार्वत्रिक निवडणुकीत घेतो.
अशा अनेक युक्त्या हजारो वर्षांपासून सत्ता टिकवण्यासाठी, वर्चस्व राखण्यासाठी वापरल्या जात आहेत पण या युक्त्या अद्यापपर्यंत कालबाह्य झालेल्या नाहीत. नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन संशोधन याचा वापर करून या युक्त्या अजून प्रभावी बनवल्या जात आहेत आणि नवनवीन युक्त्यांची त्यात भर पडली जात आहे. या बलाढ्य सैतानी शक्तीपुढे सर्वसामान्य लोकांनी हतबल होऊन त्यांचे गुलाम होऊन राहायचे हा एकमेव पर्याय आहे का?. या सर्व युक्त्या निष्फळ करण्यासाठी एकमेव प्रभावी मार्ग म्हणजे बहुसंख्य जनतेने आपली सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवणे. अर्थातच याची जाण वर्चस्ववाद्यांना आहे म्हणून ते कधीच जनतेला त्यांच्या सद्सदविवेकबुद्धीचा वापर करण्याची संधी मिळू देत नाही. योग्य शिक्षणाने लोकांना चांगल्या - वाईटाची पारख करता येते, आपला उत्कर्ष करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याची जाणीव होते म्हणून सर्वप्रथम ते शिक्षणाचा बट्ट्याबोळ करतात. जनतेला कायम कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त, वांझोट्या गोष्टीत अडकून ठेवतात, एक चांगले, सुरक्षित जीवन जगण्यासाठी जनतेला सतत संघर्ष करायला लावतात. सर्व लोककल्याणकारी योजनांचा, पायाभूत सुविधांचा बोजवारा उडवून जीवनावश्यक गोष्टींसाठी जनतेला सरकारचे मिंधे होण्यासाठी भाग पाडतात. यावर एकमेव उपाय म्हणजे समाजातील विवेकवादी लोकांनी सातत्याने जनतेला सत्य, वास्तविक तथ्ये, सरकारच्या प्रत्येक कृती मागचा कार्यकारण भाव समजावून जनजागृती करत राहणे आवश्यक आहे. कोणी सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलेला नाही. बदल ही एकमेव चिरंतन गोष्ट आहे फक्त तो बदल आधीच्याच मार्गाने जाणार नाही याची काळजी सर्वांनीच घेणे गरजेची आहे.
संतोबा.
Wednesday, November 26, 2025
प्रवाहपतित सेलिब्रिटी.
क्रिकेट, राजकारण आणि सिनेसृष्टीचे भारतीय समाजाला प्रचंड आकर्षण आहे. या क्षेत्रात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींचे भरपूर कट्टर अनुयायी तयार होत असतात विशेषतः सिनेसृष्टी आणि क्रिकेट. या सेलिब्रिटी सिनेकलावंत आणि क्रिकेटपटूंचे चाहते सेलिब्रिटींच्या अनेक बऱ्यावाईट गोष्टींचे समर्थन आणि अनुकरण करत असतात. आवडत्या सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी ते अनेक दिव्य पार करत असतात, त्यांच्यासाठी वेळ आणि पैसे खर्च करत असतात तर काहीजण त्यांच्यासाठी जीव द्यायला मागे पुढे पाहत नाही. त्यांना अगदी देवत्व बहाल करतात. अशा पाठीराख्यांमुळे सिनेमा किंवा क्रिकेटमध्ये यशस्वी होणाऱ्याला त्याच्या प्रतिभेच्या कित्येक पटीने मोबदला आणि नावलौकिक मिळत असतो. या सेलिब्रिटींच्या जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या चाहत्यांवर पडत असतो, ते त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते त्यांचे दिसणे असो, ते वापरत असलेली उत्पादने असो. प्रसिद्ध व्यक्तींनी अंगिकारलेल्या चांगल्या वाईट सवयींना, कृतींना सामाजिक प्रतिष्ठा मिळत असते. त्यांच्या कृतींचे सर्वसामान्य व्यक्तींकडून अनुकरण केले जाते. त्यामुळे सेलिब्रिटींच्या प्रसिद्धीचा वापर करून उद्योजकाने आपली उत्पादनांची जाहिरात न केली तरच नवल. त्यामुळे पाण्यासारखा पैसा ओतून व्यावसायिक लोकं सेलिब्रिटी कडून आपल्या मालाची जाहिरात करत असतात. गडगंज श्रीमंत असलेला सेलिब्रिटी त्याच्यादृष्टीने क्षुल्लक असलेल्या रकमेपायी लोकांच्या आरोग्यास हानिकारक असलेल्या एखाद्या गोष्टीची जाहिरात करताना त्याच्या चाहत्यांचा, सामाजिक बांधिलकीचा विचार करत नाही. मग ती जाहिरात पान मसाल्याच्या नावाखाली गुटख्याची असो, सोड्याचा नावाखाली दारूची असो, खेळाच्या नावाखाली जुगाराची असो, श्रमपरिहार, उत्साहवर्धकपेयांच्या नावाखाली हानिकारक शीतपेयांची असो. आपल्या मुळे किती कुटुंबे उद्ध्वस्त होईल याचा सारासार विचार सेलिब्रिटी करत नाही. सर्वसामान्य लोकं आपला चरितार्थ चालवण्यासाठी नोकरीधंदा करतात, तो करताना काही तडजोडी करतात, प्रसंगी मानापमान सहन करतात पण एका मर्यादेपलीकडे आत्मसन्मान विकून पैसे कमवत नाही. पण या गडगंज सेलिब्रिटींची नेमकी काय अगतिकता असते की ती असली अनैतिक कामे करायला सहज तयार होतात.
खरंतर कोणताही सिनेअभिनेता सिनेरसिकांशिवाय मोठा होऊ शकत नाही, कोणताही खेळाडू , क्रिकेटपटू क्रिडा चाहत्यांशिवाय, प्रेक्षकांशिवाय मोठा होऊ शकत नाही. कोणताही राजकीय नेता कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्याशिवाय मोठा होऊ शकत नाही. आपण ह्या लोकांना देवत्व प्राप्त करून देतो.त्यांची लार्जर दॅन लाइफ अशी आभासी प्रतिमा निर्माण करतो. कधी ही व्यक्ती राजकीय नेता, प्रसिद्ध अभिनेता, खेळाडू, प्रशासकीय अधिकारी किंवा तथाकथित सामाजिक कार्यकर्ता असू शकतो. कलेचा, कलाकाराचा सन्मान करता करता त्या कलाकारांमधील माणसाचा सन्मान करू लागतो पण आपण हा विचार करत नाही की तो माणूस सन्मान करण्याच्या योग्यतेचा आहे की नाही. पडद्यावर नायकाची भूमिका साकारणारा, भ्रष्ट, अन्याय व्यवस्थेला नडणारा, आपल्या चतुरस्त्र अभिनयाने भूमिका जिवंत करणारा चांगला कलाकार, चांगला माणूस असेलच असे नाही. आपल्या कौशल्याने आपल्या संघाला जिंकून देणारा चांगला खेळाडू माणूस म्हणून चांगला असेलच असे नाही. सातत्याने निवडून येणारा, लोकांना आपण त्यांचा तारणहार आहोत असा भासवणारा लोकप्रिय नेता चांगला माणूस असेल असे नाही. खरंतर नेत्यांनी धर्माचा, अभिनेत्यांनी नशेचा अन् खेळाडूंनी जुगाराचा बाजार मांडला आहे.अभिनय, खेळ, राजकारण हा त्या लोकांचा व्यवसाय, पेशा आहे. कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्या व्यवसायाला गरजेची असणाऱ्या कौशल्यात निपुण, निष्णात असणे ही त्या व्यवसायात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे आणि ती साध्य करण्यासाठी काही लोकं जीवतोड मेहनत करतात तर काही लोकांना ती कला अंगभूत जन्मजात स्वरूपात लाभते. ज्यावेळी कलेची देणगी अंगभूत, जन्मजात स्वरूपात लाभते त्यावेळी तिचा दर्जा(क्लास) हा वेगळाच असतो आणि अशा जन्मजात कलाकौशल्याची देणगी लाभलेल्या कलाकाराला, खेळाडूला सर्वसामान्य लोकं देवत्व बहाल करतात.
सिनेमाच्या माध्यमातून भ्रष्ट, अन्याय्य व्यवस्थेशी, सरकारशी दोन हात करणारा, सत्यासाठी, न्यायासाठी लढणारा, गुंडांशी दोन हात करणारा, निरपेक्षपणे दीन दुबळ्यांची बाजू घेणारा, त्यांना मदत करणारा, नैतिकची चाड असणारा आणि त्यासाठी प्रसंगी आपल्या प्रियजनांशी उभा दावा मांडणारा (पंगा घेणारा) एखादा अभिनयसम्राट, अँग्री यंग मॅन प्रत्यक्ष जीवनात व्यवस्थेला शरण गेलेला, कुठल्यातरी प्रकरणात अडकलेला आणि त्यातून सुटका व्हावी म्हणून सत्ताधाऱ्यांची तळी उचलणारा एक कणाहीन, लाचार व्यक्ती असतो. दैवी प्रतिभा लाभलेला खेळाडू, गायक, गायिका, साहित्यिक कधीही आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी करत नाही मात्र स्वतःच्या फायद्यासाठी नैतिकता गुंडाळून अधिकचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतो. कधी टॅक्स भरण्यातून सूट मिळवण्यासाठी, कधी सरकारी भूखंड मिळवण्यासाठी, स्वतःच्या संस्थेसाठी निधी मिळवण्यासाठी, पुरस्कार मिळवण्यासाठी, तर कधी आपले अपराध लपविण्यासाठी करत असतो. सत्तेविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध बोलून अडचणीत येऊ नये, आपली रोजीरोटी संकटात येऊन नये म्हणून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर, अडचणीवर मूग गिळून गप्प बसणारे सेलिब्रिटी सरकार अडचणीत आल्यावर मात्र सरकारची वकिली आणि जनतेला उपदेशाचे डोस द्यायला तत्पर असतात. सेलिब्रिटींना जर देशातल्या अराजकतेवर एक चकार शब्द उच्चारणारता येत नसेल तर त्यांनी लोकांना उपदेशाचे डोस देऊ नये आणि शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीतही पडू नये. जनता त्यांचा लढा स्वतः लढेल.
खरंतर जनमाणसावर प्रभाव पाडणाऱ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींनी (प्रभावशाली लोकांनी),समाजात वावरताना किमान नैतिकता बाळगावी अशी अपेक्षा असते. जेणेकरून त्यांना आदर्श मानणारी लोकं त्यांच्या वागण्याचा आदर्श घेतील. सरसकट सर्वच सेलिब्रिटी नाही पण किमान ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे आणि त्यांच्या आणि इतरही क्षेत्रातील लोक त्यांना आपला आदर्श मानतात, त्यांची कोणाशी स्पर्धा नाही अशा अद्वितीय प्रतिभा असलेल्या सेलिब्रिटींकडून समाजहिताची भूमिका घेणे अपेक्षित असते. एवढेच काय सरकारचा एखादा चुकीचा निर्णय बदलण्याचा, सरकारची ध्येय-धोरणे सुधारण्याची ताकद अशा सेलिब्रिटींमध्ये असते कारण त्यांना मोठ्या जनसमुदायचे पाठबळ असते पण भारतातील बहुतांश सेलिब्रिटींनी आपआपल्याला क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलेले असले तरी प्रत्यक्ष राजकीय- सामाजिक जीवनात हे सेलिब्रिटी भयंकर खुजे आहेत. सर्वसामान्य जनता स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आपापल्या परीने लढत असते पण हे सेलिब्रिटी जनतेसाठी सोडा स्वतःच्या आत्मसन्मासाठी देखील भूमिका घेत नाही एवढे हे लाचार आणि असहाय्य आहेत. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे, व्यवस्थेला गोत्यात आणू शकणारी आपली भूमिका, आपले विचार जाहिर केले तर होणाऱ्या परिणामाची जाण त्यांना आहे. व्यवस्थेच्या, सत्तेच्या विरोधात गेलो तर प्रवाहाच्या बाहेर पडण्याची भीती आहे कारण सत्तेच्या अन् व्यवस्थेच्या अव्यवस्थेची भलामण करणाऱ्यालाच सत्ता, व्यवस्था पुरस्कृत करते. जे सत्तेची, व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना सत्ता अन् व्यवस्था बहिष्कृत करते. आपण प्रवाहाच्या बाहेर पडू, एकटे पडू अडचणीत येऊ, सगळी प्रतिष्ठा, प्रसिध्दी, पैसा धुळीस मिळू नये म्हणून कायम हा ही चांगला तो ही चांगला अशी सोईस्कर भूमिका घेण्याचा अभिनय ते लीलया पार पाडतात. अमाप पैसा, प्रसिद्धी, लोकांचे पाठबळ, नैतिकतेचे पाठबळ असताना चुकीला चूक म्हणता येत नसेल, अन्यायाला विरोध करता येत नसेल अन् न्यायाची बाजू घेता येत नसेल तर या सेलिब्रिटींची अलौकिक प्रतिभा व्यर्थ आहे.
चित्रपटातून, खेळामधून, गाण्यांमधून आपल्याला क्षणिक आनंददायी अनुभव(फिलगुड फॅक्टर) मिळतो, पण हा क्षणिक आनंददायी अनुभव आपल्या मूलभूत अडचणी सोडवत नाही. ज्या महापुरुषांमुळे आपल्या आयुष्यात चांगला बदल घडला आहे त्यांना आपण कवडीची किंमत देत नाही पण शेळपट सेलिब्रिटींना आपण देवत्व बहाल करतो. कायम चर्चेत, बातम्यात असणारे, चित्रपटगृहाच्या आणि टीव्हीच्या पडद्यावर कायम दिसणारे लोक हळूहळू सेलेब्रिटी बनतात. सध्या त्यात इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्यांची भर पडलेली आहे. ज्या लोकांच्या प्रेमामुळे आपल्याला मानसन्मान, प्रसिद्धी पैसा मिळाला आहे, ज्यांच्यामुळे सगळ्या सुख सुविधा असलेले विशेष जीवन उपभोगतोय त्या लोकांच्या गरजेपोटी ठाम भूमिका घेण्याएवढी हिंमत सेलिब्रिटींमध्ये नसेल आणि ते केवळ प्रवाहाबरोबर वाहवत जाणारे असतील तर अशा शेंदूर लावून देवत्व बहाल केलेल्या सेलिब्रिटी दगडांचा शेंदूर आपण खरवडून त्यांचे पाय मातीचेच आहेत हे सत्य स्विकारला हवे. हे सेलिब्रिटी म्हणजे कोणी दुसरे तिसरे कोणी परग्रहावरची लोकं नसून तुमच्या आमच्या सारखेच सर्वसामान्य लोकं आहेत. त्यांच्याशी आपण आपला संबंध हा त्यांच्या कलेपुरता मर्यादित ठेवावा. त्यांना खास वागणूक देऊन व्हीआयपी संस्कृती वाढू देऊ नये. त्यांच्यासाठी कायदे नियम धाब्यावर बसवून अतिरिक्त लाभ मिळू देऊ नका. या व्हीआयपी संस्कृतीचा आणि त्यांना मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा, अतिरिक्त लाभांचा त्रास आपल्यालाच होणार आहे, नुकसान आपलेच होणार आहे. या दिखाऊ, कचाकड्याच्या बाहुल्या आपल्यासाठी सेलेब्रिटी नाहीत. आपल्यासाठी लढणारा, अन्याय्य व्यवस्थेला नडणारा, स्वातंत्र्याची, समतेची, न्यायाची चाड असणारा, विवेकवादी समाज घडवणारा व्यक्तीच आपला खरा सेलेब्रिटी आहे.
संतोबा (संतोष गांजुरे).
Thursday, October 2, 2025
आरक्षणाचे खरे मारेकरी - शिव, फुले, शाहू, आंबेडकर
हजारो वर्षे वर्णव्यवस्थेच्या पिंजऱ्यात बंदिस्त केलेल्या हिंदू समाजाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. शिक्षणाचा अधिकार फक्त एकाच भारतात आक्रमण करून(आगमन नव्हे) स्थलांतरीत समाजाला, त्यांना शिक्षणाचे पूर्ण आरक्षण. तुरळक अपवाद म्हणून त्या भटक्या आक्रमक समाजाव्यतिरिक्त काहीजण शिकले असतील पण म्हणून अपवादांचे सरसकटीकरण वा सामान्यीकरण करता येणार नाही. समकालीन सर्वसाधारण शैक्षणिक परिस्थिती काय होती हे महत्त्वाचे. स्वतःपुरते मर्यादित असलेल्या शिक्षणामुळे आपसूकच शारीरिक श्रम अन् कौशल्य वगळता सर्वच क्षेत्रात एकाच समाजाची मक्तेदारी. इथले भूमिपुत्र असलेले सर्व हिंदू शूद्रातिशुद्र, एवढेच काय त्या अघोषित आरक्षित समाजातील महिला देखील शूद्रच. या मूठभर असलेल्या परप्रांतीय समूहाने हजारोंवर्षे येथील हिंदू समाजावर वर्चस्व गाजवले. या भटक्या समूहाने हिंदू धर्म हायजॅक करत हजारो वर्षे आणि शेकडो पिढ्यांपासून हिंदू समाजाला गुलामगिरीत बंदिस्त केले. या समाजानंतर सुद्धा अनेक आक्रमक आले पण काही वर्षात ते परतले तर काही येथेच राहून येथील समाजाचाच एक भाग बनले. शक्यतो जेव्हा एखादा व्यक्ती, समूह दोनतीन पिढ्यानंतर जिथे स्थलांतरित झाला आहे त्या समाजाचा, संस्कृतीचा भाग बनून त्यांच्या मिळून मिसळून जातो. पण हा आक्रमक, भटका समूह हजारों वर्षांपासून भारतीय समाजाचा भाग बनू शकला नाही. जिथे आश्रयाला आले तिथेच वर्चस्व गाजवू लागले पण ज्यावेळी दुसरे त्यांच्या वरचढ आक्रमक आले तेव्हा त्यांनी त्यांच्याशी सूत जुळवून घेतले, त्यांच्यासाठी खर्डेघाशी केली, हेरगिरी केली आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लढवय्या स्थानिक भूमिपुत्रांच्या खबरी तत्कालीन शासनकर्त्यांना देऊन आपला स्वार्थ साधून घेतला. कावेबाजपणा अन् भेदाभेद हेच त्यांच्या टिकून राहण्याचे जालीम हत्यार राहिले आहे.
मूठभर असलेल्या भटक्या स्थलांतरीत लोकांनी एवढ्या मोठ्या प्रदेशावर, लोकांवर वर्णव्यवस्थेचे जोखड लादून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आपला कावेबाजपणा उघड झाला तर आपले अस्तित्व धोक्यात येईल याची जाणीव त्यांना होती म्हणून त्यांनी वर्णव्यवस्थेची उतरंड अशाप्रकारे निर्माण केली की, त्या उतरंडीमध्ये स्वतःला शिरोभागी ठेवत, सर्वाधिकार आपल्याकडे ठेऊन उतरंडीनुसार कमीतकमी अधिकार देऊन स्वतःचे वर्चस्व चिरंतन राहण्यासाठी वर्णव्यवस्था ही परिसंस्था (इकोसिस्टिम) निर्माण केली. या उतरंडीच्या खालच्या पायरीवर असलेल्यांना वरच्या पायरीवर असलेल्यांच्या मेहरबानीवर जगावे लागत होते. थोडक्यात खालच्या पायरीवर असलेला वरच्या पायरीवर असलेल्याचा सेवेकरी आणि अर्थातच सर्वात शिरोभागी असलेला केवळ मेवेकरी. त्यामुळे तळात असलेल्या समाजाचे जगणं प्रचंड खडतर आणि हलाखीचे होते. या विषमतावादी वर्णव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक समूह वर्णव्यवस्थेचा कमी अधिक प्रमाणात पिडित असला तरी, वर्णव्यवस्थेच्या पिंजऱ्यात अशाप्रकारे अडकला की त्याला आपल्यापेक्षा कोणीतरी खालच्या पायरीवर आहे आणि आपण केवळ वरच्या पायरीवर असलेल्या समाजात जन्माला आलो आहोत म्हणून आपले काही कर्तृत्व नसताना खालच्या पायरीवर असलेल्यांवर वर्चस्व गाजवू शकतो या भावनेनेच सुखावतो. पण त्याच्या हे लक्षात येत नाही की सगळ्यात शिरोभागी असलेल्या भटक्या, परक्या समूहाला सर्वाधिकार आहे. ते केवळ हिंदूंचे नव्हे तर हिंदूच्या देवदेवतांचे देव बनले. त्यामुळे कायदे त्यांचेच आणि व्यवस्था त्यांचीच त्यामुळे त्यांनी केलेल्या गुन्ह्यांना इतरांसारखी शिक्षा नाही. ते कितीही नितीभ्रष्ट झाले तरी सर्वश्रेष्ठच राहतील कारण ते भूदेव आहेत. ते स्वतःला केवळ हिंदूच समाजच नव्हे तर हिंदूच्या देवदेवतांच्यापेक्षाही श्रेष्ठ समजतात पण हे शिक्षणाअभावी त्यांच्या कधीच लक्षात आले नाही आणि हिंदू नसलेल्या उपऱ्या समाजाला हिंदूंचे तारणहार समजून त्यांचे वर्चस्व आणि हिंदू धर्माच्या व्यवस्थेचा भाग नसलेल्या उपऱ्या वर्णव्यवस्थेचे जोखड हिंदूसमाज हजारों वर्षापासून आनंदाने वाहत आहे आणि म्हणूनच आजसुद्धा आपली योग्यता आपली जात ठरवते आणि त्यानुसार आपल्याशी व्यवहार केला जातो.
जगभरात धर्मसत्ता राजसत्तेवर पर्यायाने सामान्य जनतेवर वर्चस्व गाजवत असताना भारतात छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मसत्तेचे वर्चस्व, अन्याय्य रूढी-परंपरा मोडीत काढत रयतेचे स्वराज्य निर्माण केले. तत्कालीन धर्ममार्तंडानी शिवाजी महाराजांना 'शूद्र' म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण वर्णव्यवस्थेनुसार, शूद्रांना राज्याभिषेक (राज्यारोहण) करण्याचा अधिकार नव्हता. शिवाजी महाराज आधीच रयतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान होते त्यांनी राज्याभिषेक नसता केला तरी त्यांच्या कर्तृत्वात उणेपणा आला नसता पण त्यांच्या समकालीन इतर शासकांच्या दृष्टीने स्वराज्याला स्वतंत्र, सार्वभौम राज्य आणि परकीय शासकांशी व्यापार आणि लष्करी करार करण्यासाठी शिवाजी महाराजांना 'छत्रपती' म्हणून मान्यता मिळवण्यासाठी राज्याभिषेक गरजेचा होता आणि तो त्यांनी स्थानिक धर्ममार्तंडांचा विरोध झुगारून आपल्या गनिमी काव्याने करवून घेतला. याशिवाय शूद्रांना शस्त्र धारण करण्यास मनाई होती, शिवरायांनी हे नियम मोडत अठरापगड जातींना आपल्या लष्करता सामावून घेतले. धर्ममार्तंडानी केवळ अधिकारासाठीच नव्हे तर गुन्ह्यातील शिक्षेत सूट मिळावी म्हणून स्वतः साठी जन्मजात विशेषाअधिकारांची तजवीज केली होती. धर्ममार्तंड स्वतःला भुदेव समजत होते व त्यांची हत्या म्हणजे मोठे पातक समजले जात होते. महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करताना स्वराज्याच्या हिताआड येणाऱ्या धर्ममार्तंडांचे लाड न करता फितूर झालेल्यांची गर्दन मारताना बिल्कुल मुलाहिजा राखला नाही. थोडक्यात शिवरायांनी जन्मजात विशेषाधिकराचे जे अघोषित आरक्षण होते त्याचा कडेलोट केला. शिवरायांच्या या धोरणांमुळे जन्मजात वर्णव्यवस्थेची बंधने तोडता येतात याचा विश्वास समाजामध्ये निर्माण झाला. साम्राज्ये अनेकांनी उभारली पण एखाद्या प्रगल्भ लोकशाहीला हेवा वाटेल असे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारले. लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरावी, लोककल्याणाचे, रयतेचे राज्य कसे असावे याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. हा वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चालवताना स्वराज्यद्रोही तथाकथित भूदेवांना हत्तीच्या पायाखाली दिले.
शिक्षणाअभावी गुलामीत जगणाऱ्या देशातील हिंदूंच्या दुरावस्थेचे निदान महात्मा जोतीराव फुले यांनी एकाच कडव्यात प्रभावीपणे केले आहे.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी वर्णव्यवस्था शोषणकारी आणि अन्यायी आहे हे जाणले. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी वर्णव्यवस्थेच्या विरोधात शिक्षणाला सर्वात मोठे हत्यार मानत वर्णव्यवस्थेवर कठोर प्रहार केले. सामाजिक सुधारणा आणि समता-आधारित समाजाच्या निर्मिती त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. त्यांनी ओढलेल्या आसुडाचे उमटलेले वळ दीडशे वर्षांनंतर मिटलेले नाही. केवळ त्यामुळेच अजूनही त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गरळ ओकली जाते. त्यांनी 'गुलामगिरी' (१८७३) या पुस्तकात वर्णव्यवस्थेचा मिथकांवर आधारित इतिहास उघड केला आणि टोळीवाल्या भटक्यांनी हिंदूंना गुलाम बनवण्यासाठी धार्मिक ग्रंथांचा कसा गैरवापर केला, यावर प्रकाश टाकला. हिंदू समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक शोषणावर बोट ठेवले. त्यांनी वर्णव्यवस्थेच्या नावाखाली हिंदूंना शिक्षण आणि प्रगतीपासून वंचित ठेवण्याचा कावेबाजपणा उघड केला. ' शेतकऱ्याचा आसूड' (१८८१) च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे आणि शोषणाचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय सुचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विश्वास होता की शिक्षण हेच शोषणाविरुद्ध लढण्याचे शिक्षण हेच प्रभावी साधन आहे हे जाणून त्यांनी टोळीवाल्यांच्या हजारों वर्षांच्या अघोषित शैक्षणिक आरक्षणाला सुरुंग लावण्याचे काम करत १८४८ ला मुलींसाठी शाळा स्थापन केली त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका बनवून या कार्यात सामील करून घेतले.
कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज (कार्यकाल १८९४ ते १९२२) हे त्यांच्या लोकशाहीवादी, समतावादी, सत्यशोधक विचारांसाठी अन् प्रगतीशील धोरणांसाठी प्रसिद्ध होते. महात्मा फुले यांच्यानंतर शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. १८९४ साली राजर्षी शाहू महाराजांनी अधिकारारोहण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या सर्वसाधारण प्रशासनाच्या ७१ पैकी ६० जागांवर ३-४ टक्के असलेला समाज होता. राजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी आरक्षणाचा आदेश काढत आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर आरक्षणाला सुरुवात झाली. शाहू महाराजांची आठरापगड जातींना आरक्षण देऊन मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिपाक म्हणून पुढच्या २० वर्षात परिस्थिती हळहळू बदलली व १९२२ मध्ये सर्वसाधारण प्रशासनाच्या एकूण ८५ जागांपैकी ५९ जागांवर बहुजन समाजातील अधिकारी नेमले गेले. आरक्षणाच्या एकूणच धोरणाचा लाभ होणारे देशातील पहिले व्यक्ती प्रसिद्ध कृषितज्ज्ञ जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक व पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य श्री. पांडुरंग चिमणाजी पाटील-थोरात हे होते असे मानले जाते. सामाजिक न्याय आणि समता आधारित समाज निर्माण करणे हे आरक्षणाच्या अंमलबजावणीचे उद्दीष्ट होते. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होवू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी १९१२ मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे ठरविले. १९१७- १८ पर्यंत विनामूल्य प्राथमिक शाळांची संख्या दुप्पट केली.
१९३०-३२ च्या लंडन येथील राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन अस्पृश्य वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र मतदार संघाची आणि राजकीय हक्कांची मागणी केली. १९३२ मध्ये ब्रिटिश सरकारने दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले.या स्वतंत्र मतदार संघामुळे हिंदू समाजाची विभागणी होईल म्हणून त्याला महात्मा गांधींनी उपोषणाद्वारे विरोध केला. गांधींच्या उपोषणानंतर डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रीय एकतेच्या दृष्टिकोनातून तडजोड करत पुणे करार स्विकारला यामुळे दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित जागा (१४७ जागा) मिळाल्या. पुणे करार भारतातील राजकीय आरक्षणाचा पहिला टप्पा आणि आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे द्योतक आहे. स्वतंत्र भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने आरक्षण बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे साधन होते. त्यासाठी बहुजन समाजाला शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा हक्क मिळावा म्हणून संविधानाच्या माध्यमातून त्यांनी आरक्षणाला घटनात्मक संरक्षण दिलं. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराजांप्रमाणेच डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन मानले. त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५) आणि डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी स्थापन करून दलित आणि मागासवर्गीयांसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिघांचा जन्म तत्कालीन हिंदू धर्मांतील वेगवेगळ्या जातीतला अन् वेगवेगळ्या पायरीवरचा पण वर्णव्यवस्थेचा फटका तिघांनाही बसला. शाहू महाराज तर राजे असून आणि अगदी वर्णव्यवस्थेनुसारही हिंदू धर्मामध्ये वरच्या पायरीवर असणारे तरीही त्यांनाही वर्णव्यवस्थेचा फटका बसला. एवढेच काय स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, थोरले महाराज छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनाही वर्ण व्यवस्थेचा फटका बसला पण ती वर्णव्यवस्था उखडून टाकण्याचे काम आपआपल्यापरीने प्रत्येकाने केले. जर सर्वच हिंदूंना वर्णव्यवस्थेचा फटका बसला असले तर अशी वर्णव्यवस्था हिंदूंची कशी असू शकते. कोणत्याच धर्मात अशी व्यवस्था नसेल जी आपल्याच धर्मातील सर्वच लोकांना दुय्यम स्थान देईल, थोडक्यात वर्णव्यवस्था ही उपरी आहे आणि ती हिंदू धर्माचा भाग नाही. या युगपुरुषांसोबतच, अनेक संतानी या वर्णव्यवस्थेवर प्रहार करत वर्णव्यस्थेला कमजोर करण्याचे आणि बहुजन हिंदू समाजाला मानवी हक्कांची जाणीव करून देण्याचे कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपआपल्या परीने पाखंडी भूदेवांच्या जन्मजात विशेषाअधिकारांना, आरक्षणाला न जुमानता बहुजन हिंदू समाजाला अनेक क्षेत्रात संधी दिल्या. हजारों वर्षाच्या अघोषित आरक्षणाचे परिमार्जन करण्यासाठी हिंदू बहुजनांना आरक्षणाची संकल्पना मांडून ती पूर्णत्वास नेली त्यामुळे महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजारोंवर्षांच्या अघोषित आरक्षणाचे खरे मारेकरी आणि हिंदूचे खरे तारणहार आहेत. धर्ममार्तांडाच्या अघोषित आरक्षणाचे कर्दनकाळ आणि समस्त हिंदू समाजाचे तारणहार छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो, महात्मा जोतिराव फुलेंचा विजय असो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.
जय शिवराय, जय ज्योती जय क्रांती, जय भीम.
संतोबा...