माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्यानंतर समाजात त्या गुन्हेगाराबद्दल तीव्र रोष निर्माण होऊन आरोपीचा एन्काऊंटर करण्याची, भर चौकात फाशी देण्याची, त्याचे हातपाय तोडण्याची, त्याला दगडाने ठेचून मारण्याची मागणी केली जाते. गुन्हे रोजच घडत असतात पण विशेषतः निर्घृण खून, पाशवी बलात्कारासारख्या घटना जिथे पीडित अगदीच निष्पाप आणि गुन्हेगार क्रूरकर्मा असतो, ज्या गुन्ह्याला पूर्वीच्या वादाची बिलकूल पार्श्वभूमी नसते आणि गुन्हेगाराची कृती अन् विकृती स्पष्ट सिद्ध होते अशा वेळी गुन्हेगाराचा एन्काऊंटर करून तात्काळ न्यायाची अपेक्षा केली जाते. प्राप्त परिस्थितीत लोकांचा आरोपीवरचा राग हा नैसर्गिक असतो, पण त्यावर आधारित तात्काळ न्याय हा अतिधोकादायक ठरू शकतो. इतिहासात दगडफेक, सार्वजनिक फाशी, हातपाय तोडणे यासारख्या क्रूर शिक्षांचा वापर झाला आहे आणि त्यात काही वेळा निर्दोष लोक मारले गेले आहेत, तर अनेकदा राजकीय विरोधकांना संपवले गेले आहे. त्यामुळे एन्काऊंटर एकदा सामान्य झाला की, त्याचा वापर प्रतिस्पर्ध्यांना संपवण्यासाठी, सुपारीबाज गुन्हेगारांना मारून त्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांना वाचवण्यासाठी किंवा मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात अपयश आल्यानंतर कोणाला तरी बळीचा बकरा बनवून आपले अपयश लपवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे तात्काळ न्याय करायची ही पद्धत नियोजित अन्याय करायला वापरली जाणार नाही, याची खात्री कोणीच देऊ शकणार नाही.
एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर समाजात तात्काळ 'एन्काऊंटर'ची मागणी केली जाते, तेव्हा त्यामागे केवळ गुन्हेगाराबद्दलचा तीव्र संताप हेच एकमेव कारण नसते. त्यापेक्षाही, आपली प्रचलित कायदेशीर प्रक्रिया गुन्हेगाराला वेळीच आणि कठोर शिक्षा देऊ शकणार नाही, ही भीती त्यामागे अधिक असते. गुन्हेगार कायद्यातील पळवाटा शोधून स्वतःची सुटका करून घेईल आणि हा खटला वर्षानुवर्षे रेंगाळत राहील, अशी रास्त शंका सर्वसामान्यांच्या मनात असते.नॅशनल ज्युडिशिअल डेटा ग्रिड (NJDG) नुसार, डिसेंबर २०२५ पर्यंत देशातील जिल्हा आणि निम्न न्यायालयांत सुमारे ४.७६ कोटी प्रकरणे प्रलंबित आहेत. उच्च न्यायालयांत सुमारे ६३.६६ लाख आणि सर्वोच्च न्यायालयात ९२,१००+ प्रकरणे प्रलंबित आहेत. एकूण पाच कोटींवर प्रकरणे प्रलंबित असल्याने "Justice delayed is justice denied" अर्थात 'विलंबित न्याय हा अन्यायासारखाच असतो. हे मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचे हे वाक्य या परिस्थितीत तंतोतंत लागू पडते. बऱ्याचदा न्यायालयाकडून केवळ 'तारीख पे तारीख' मिळत राहिल्याने पीडित व्यक्तीला आयुष्यभर न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, शिवाय उंबरठे झिजवूनही करून न्याय मिळेलच याची खात्री नसते. आणि समजा न्याय मिळाला तरी या प्रदीर्घ कायदेशीर लढाईत पीडित कुटुंबांचे व्यवस्थेकडून एवढे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण झालेले असते कि हा विलंबाने मिळालेला न्याय त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरतो. अशावेळी शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात त्याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. दुसरीकडे, तारीख पे तारीखमुळे खटला रेंगाळल्याचा थेट फायदा गुन्हेगारांना मिळतो. ते जामिनावर मोकळे फिरतात, साक्षीदारांना धमकावतात किंवा पुरावे नष्ट करतात. काळाच्या ओघात महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होणे किंवा साक्षीदार फितूर होणे यामुळे सरकारी पक्षाची बाजू कमकुवत होते. या संपूर्ण विदारक वास्तवाची जाणीव जनतेला असल्यामुळेच, न्यायव्यवस्थेतील वेळेवर न्याय मिळण्याचा अविश्वास आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयीची शंका यातूनच 'तातडीचा न्याय' म्हणून 'एन्काऊंटर'सारख्या शॉर्टकटची मागणी समाज करताना दिसतो.
जेव्हा एखाद्या गंभीर गुन्ह्यानंतर समाजात संतापाची लाट उसळते आणि 'एन्काऊंटर'ची मागणी जोर धरू लागते, तेव्हा लोकभावनेच्या भरात पकडलेला आरोपी हाच खरा गुन्हेगार आहे असे गृहीत धरले जाते. हे असे गृहीत धरणे फार धोकादायक असू शकते कारण प्रत्यक्षात त्या आरोपीला केवळ अडकवले असण्याची, गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार वेगळाच असण्याची किंवा इतर सहआरोपी मोकळे फिरत असण्याची शक्यता असू शकते याचा सारासार विचार केला जात नाही. अशा वेळी लोकांना त्यांच्या हतबलतेतून निर्माण झालेल्या असुरक्षिततेवर 'एन्काऊंटर' हा एक भावनिक रामबाण उपाय वाटू लागतो. एन्काउंटरमुळे पोलीस, समाज आणि राजकारणी या सर्वांनाच आपापल्या परीने तात्कालिक फायदे मिळतात. पोलिसांच्या दृष्टीने विचार केल्यास, जागेवरच न्याय दिल्यामुळे समाजात त्यांची हिरोची प्रतिमा तयार होते, त्याशिवाय त्यांना साक्षीदार, पुरावे शोधणे यांसारख्या क्लिष्ट कामांमधून सहज मुक्ती मिळते. दुसरीकडे, न्यायालयातील दीर्घ कायदेशीर प्रक्रियेला कंटाळलेल्या समाजात गुन्हेगाराला लगेच शिक्षा मिळाल्याने पीडितांना न्याय मिळाल्याची एक तात्कालिक समाधानाची भावना निर्माण होते. या संपूर्ण प्रक्रियेचा सर्वाधिक फायदा सत्ताधाऱ्यांना होतो. गुन्हेगारांचा तात्काळ खात्मा करून ते स्वतःची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करतात, अशी प्रतिमा त्यांना निवडणुकीत मते मिळवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कायदा -सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले सरकार अशा एन्काउंटरचा वापर करून महागाई, बेरोजगारी यांसारख्या मूळ मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष सहज भरकटवू शकते. लोकभावनेचा आणि न्यायालयीन विलंबाच्या त्रुटीचा फायदा घेत "आम्ही जागेवरच न्याय केला" असा प्रचार करून सरकार आपल्या कार्यक्षमतेचा देखावा करते. एकदा का एन्काऊंटरला समाज मान्यता मिळाली कि एन्काऊंटर सत्ताधाऱ्यांसाठी आपले अपयश लपवणारे ब्रम्हास्र ठरू शकते. ज्याद्वारे सरकारविरोधी बोलणारे आंदोलक, विरोधक किंवा सामाजिक कार्यकर्ते यांना 'गुन्हेगार' ठरवून पोलिसांच्या माध्यमातून त्यांचा आवाज दाबू शकतात. इतकेच नव्हे तर, राजकारण्यांशी साटेलोटे असलेला एखादा गुन्हेगार जेव्हा स्वतः सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतो तेव्हा एन्काउंटरच्या नावाखाली त्याला कायमचे शांत करून स्वतःचे गुन्हे आणि पुरावे नष्ट करण्याची मोठी संधी सत्ताधाऱ्यांना मिळते.
लोकशाही व्यवस्थेत पोलिसांचे मुख्य कर्तव्य गुन्ह्याचा तपास करणे, पुरावे गोळा करणे आणि आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करणे हे आहे. शिक्षा सुनावण्याचा अंतिम अधिकार केवळ न्यायव्यवस्थेला आहे. शासन, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेने केवळ लोकभावनेला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत राहून सखोल चौकशी करणे अपेक्षित असते. याउलट, दबावाखाली येऊन जेव्हा यंत्रणा प्रचंड घाईगडबडीत निर्णय घेते, तेव्हा "Justice hurried is justice buried" म्हणजेच 'घाईतील न्याय हा न्यायाचे दफन करणारा ठरतो', या दुसऱ्या म्हणीचा प्रत्यय येतो. कारण अशा घाईत महत्त्वाचे दुवे सुटून निरपराध व्यक्तीला शिक्षा होण्याचा आणि मूळ दोषी सुटण्याचा मोठा धोका निर्माण होतो. आरोपीला आपली बाजू मांडण्याची किंवा न्यायव्यवस्थेला खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्याची पुरेशी संधीच मिळत नाही. परिणामी, केवळ वरवरच्या पुराव्यांवरून आणि जनक्षोभ शांत करण्यासाठी घाईघाईने दिलेला निर्णय एकप्रकारे न्यायव्यवस्थेचाच खून करणारा ठरतो. अनेकदा खोट्या प्रकरणांमध्ये निरपराधांना अडकवण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळेच, न्यायालयाने सर्व पुराव्यांची काटेकोर छाननी करणे कायद्यानुसार बंधनकारक असते. पोलिसांनी कायदा हातात घेऊन आरोपीला तात्काळ शिक्षा देण्याच्या या संशयास्पद एन्काऊंटर पद्धतीला भावनिक झालेला सर्वसामान्य समाज जरी न्याय समजू लागला, तरी यामुळे गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि पडद्यामागचे चेहरे कायमचे सुरक्षित राहतात. येथे आरोपीचे समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. न्यायालयाने संपूर्ण तपास करून, गुन्ह्याची मूळ प्रेरणा शोधून, मुख्य सूत्रधारांसह सर्व गुन्हेगारांना जास्त विलंब न लावता कठोरात कठोर शिक्षा द्यावी हाच मुख्य उद्देश आहे. सर्व साक्षी पुरावे तपासून दिलेला न्याय हाच खरा आणि शाश्वत न्याय आहे. याउलट, आपण कायदेशीर प्रक्रियेला डावलून परस्पर गोळ्या घालत सुटलो, तर समाजात कायद्याचे भय उरणार नाही आणि संपूर्ण देशात अराजकता माजेल, जिथे शक्तिशाली लोक स्वतःच कायदा हातात घेतील. महत्त्वाचे म्हणजे, ज्याच्यावर केवळ आरोप होता अशा आरोपीचा चकमकीत अंत झाल्यामुळे या गुन्ह्यामागील मूळ सूत्रधार शोधण्याचे सर्व मार्ग आता कायमचे बंद होतील. बऱ्याचदा पडद्यामागच्या मोठ्या प्रस्थापितांना वाचवण्यासाठी अशा लहान प्याद्यांचा बळी दिला जातो, ज्यामुळे मूळ कटाचा तपास तिथेच थांबतो आणि खरे गुन्हेगार मोकाट राहतात. येथे समाज म्हणून आपण एक गोष्ट विसरता कामा नये की, आज जो गुन्हेगार आहे असं सरकार किंवा यंत्रणा म्हणतेय, उद्या तेच नियम आणि तीच पद्धत कोणावरही अगदी तुमच्या-आमच्यावरही लागू होऊ शकते. पुरावा न बघता आणि कोर्टाला न जुमानता थेट जागेवरच संपवण्याची धोकादायक सवय जर पोलिसांना लागली, तर या अमर्याद अधिकारांचा वापर भविष्यात कोणाविरुद्धही केला जाऊ शकतो, अगदी तुमच्यावरसुद्धा!.
पोलिस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांचे मुख्य उद्दिष्ट समाजात कायदा व सुव्यवस्था राखणे, सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे आहे. कायद्याचा हेतू कोणावर सूड उगवणे नसून समाजात स्थैर्य राखणे हाच आहे. एखादा गुन्हा घडल्यास कठोर शिक्षा करून समाजात धाक निर्माण केला जातो, जेणेकरून भविष्यात कोणीही पुन्हा तसे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही. परंतु जर एखादा सौम्य गुन्हा अजाणतेपणी घडला असेल किंवा गुन्हेगाराला पश्चात्ताप होत असेल, तर त्याचे समुपदेशन करून व त्याला सुधारून एक चांगला नागरिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो , जेणेकरून शिक्षा भोगल्यानंतर त्याला समाजात सन्मानाने वागण्याची संधी मिळू शकेल. गुन्हेगार नष्ट करण्यापेक्षा गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करणे महत्वाचे आहे. गुन्हे घडल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा देण्याबरोबरच , 'गुन्हा घडणारच नाही' अशी व्यवस्था निर्माण करण्याकडे समाज आणि शासनाने अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच पायबंद घालण्यासाठी सक्षम कायदा व्यवस्था, शिक्षण, नैतिक मूल्यांची जपणूक आणि सामाजिक सुरक्षा यांवर भर देणे गरजेचे आहे. आपली संपूर्ण पोलीस आणि कायदेशीर यंत्रणा आतून सक्षम, कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक बनवणे हाच यावरचा एकमेव शाश्वत मार्ग आहे. सोबत बलात्कार , बालालैंगिक गुन्ह्यासाठी जलदगती न्यायालयांची संख्या वाढवणे. गरज आहे ती पोलीस प्रशासनाला आधुनिक तंत्रज्ञान, फॉरेन्सिक विज्ञानाची प्रगत संसाधने आणि पुरेशा मनुष्यबळाने सज्ज करण्याची, जेणेकरून गुन्हे रोखता येतील आणि घडलेल्या गुन्ह्याचा तपास तातडीने पूर्ण होऊन कोणतीही केस न्यायालयात वर्षानुवर्षे रेंगाळत न पडता एका निश्चित कालमर्यादेत निकाली निघेल. याशिवाय आपली पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था स्वायत्त आणि निष्पक्ष असावी, त्यामध्ये कोणाला हस्तक्षेप, ढवळाढवळ करून केसवर विपरित परिणाम करता येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. चौकशी आणि न्यायदानाचे काम निष्पक्षपणे करायला हवे मग आरोपी सामान्य नागरिक असो वा एखादा बलाढ्य राजकारणी, बडा उद्योगपती असो वा वजनदार व्यक्ती, कायद्याची अंमलबजावणी प्रत्येकावर सारख्याच निःपक्षपातीपणे केली पाहिजे. गुन्हेगाराचा चेहरा, त्याचा धर्म, जात, पैसा किंवा राजकीय वशिला न पाहता त्याला कायद्यानुसार तत्काळ आणि निश्चित शिक्षा दिली जावी. यामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलीस यंत्रणा आणि न्यायालयाबद्दलचा ढासळलेला विश्वास पुन्हा भक्कमपणे प्रस्थापित होईल आणि एन्काऊंटरसारख्या धोकादायक शॉर्टकटच्या मागणीची गरजच उरणार नाही
संतोबा...