Featured Posts
Saturday, July 25, 2026
ऐ मेरे दोस्त
Saturday, July 18, 2026
माझी भूमिका -३.
स्पष्ट दिसणारा तरीही बहुतेकांना स्वीकारायला जड जाणारा आजचा वर्तमान बाजूला राहू द्या. अगदी दोन-चारशे वर्षे किंवा अडीच-तीन हजार वर्षांपूर्वीच्या मानवी इतिहासावर नजर टाकली, तरी एक अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद विरोधाभास सतत समोर येतो. तो विरोधाभास म्हणजे, आपल्या समाजाने नेहमीच लोककल्याणाचा आणि समाजसुधारणेचा मार्ग स्वीकारलेल्या संतमहापुरुषांना व विचारवंतांना नाकारले आणि कर्मठ, पाखंडी व ढोंगी लोकांना डोक्यावर घेतले. ज्या ढोंगी प्रवृत्तींनी समाजाला गोड बोलून फसवले, चमत्कारांचे खोटे आभास दाखवून भुलवले आणि लुटले, त्यांना या समाजाने आदराचे स्थान देऊन त्यांचा उदोउदो केला. याउलट, ज्या संतमहापुरुषांनी समाजाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले, त्यांच्या वाट्याला मात्र फक्त उपेक्षा, द्वेष आणि अतोनात त्रास आला. सत्य आणि वास्तवाचे वावडे केवळ पाखंडी लोकांनाच नव्हे, तर संपूर्ण समाजालाच असावे असे वाटते. म्हणूनच, जेव्हा जेव्हा या महापुरुषांनी पाखंडी लोकांच्या खोट्या दिखाव्याला आव्हान दिले, तेव्हा समाजाने या विचारवंतांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण या महापुरुषांचे मोठेपण यातच होते की, समाजाने कितीही विरोध केला, तरी त्यांनी समाजप्रबोधनाचा मार्ग कधीही सोडला नाही. लोक निंदा करत राहिले, तरी हे महापुरुष सत्याची, न्यायाची आणि प्रेमाची वाट चालत राहिले. त्यांचे ध्येय वैयक्तिक स्वार्थ नव्हे, तर मानवाचे कल्याण हेच होते.
दुसऱ्या बाजूला जे पाखंडी लोक होते, ते मुळात अत्यंत सुमार बुद्धीचे होते. त्यांच्याकडे कोणतेही आत्मिक ज्ञान नव्हते, ना समाजाला पुढे नेण्याची दूरदृष्टी होती. त्यांचे संपूर्ण कर्तृत्व केवळ भपका दाखवण्यात आणि लोकांच्या भीतीचा व अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची दिशाभूल करण्यात होते. लोकांना लुटून ते स्वतःचे आयुष्य अत्यंत विलासी पद्धतीने जगत होते. अशा वेळी एक विचार मनात नक्की येतो या संत-महापुरुषांकडे तर अफाट बुद्धिमत्ता, शब्दांचे सामर्थ्य आणि लोकसंग्रह करण्याची ताकद होती. त्यांनी मनावर घेतले असते, तर त्यांनाही या पाखंडी लोकांसारखाच फसवणुकीचा किंवा चमत्कारांचा मार्ग पत्करून ऐश्वर्यात जगता आले असते. पण, त्यांनी हा सोपा आणि स्वार्थी मार्ग नाकारला. त्यांनी समाजाचा रोष पत्करला, पण सत्याची पाठ सोडली नाही. आज ते पाखंडी लोक काळऔघात इतिहास जमा झाले आहेत, तर त्रास सहन करणारे संत महापुरुष शतकानुशतके मानवाच्या मनामनात आदराने जिवंत आहेत. स्वार्थाचा पाया तात्पुरता असतो, पण कल्याणाचा पाया चिरंतन असतो. आजच्या आधुनिक काळातही आपण जर स्वतःच्या कुटुंबाचे, मित्रांचे किंवा नातेवाईकांचे निरीक्षण केले, तर एक धक्कादायक वास्तव समोर येते. आजही कुटुंबातील एखादी तरी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ढोंगी, भोंदूबाबाच्या नादी लागलेली दिसते. 'तो कुणीतरी दैवी अवतार आहे, तो आपल्याला अडचणीतून बाहेर काढू शकतो किंवा मोक्ष देऊ शकतो' असा ठाम अंधविश्वास त्यांच्या मनात असतो. भोंदूबाबांनी सांगितलेले उपाय,तोडगे करून आपण आपल्या चुकांचे परिमार्जन करू शकतो, या भ्रमात ते जगतात. पुढे पाच-दहा वर्षांत जेव्हा तो बाबा कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकतो, तेव्हा त्यांचा भ्रमनिरास तर होतो पण दुर्दैवाने त्यांचा अंधविश्वास संपत नाही. एका बाबाचा पर्दाफाश झाला, की त्याची जागा घेणारा दुसरा भोंदू बाबा बाजारात आधीच तयार असतो आणि ही अंधश्रद्धेची साखळी अशीच सुरू राहते.
हा सगळा खेळ मुळात मानवाच्या मानसिक दुर्बलतेवर आणि 'झटपट सुखाच्या' अपेक्षेवर चालतो. माणसाला कष्ट न करता, स्वतःच्या चुकांची जबाबदारी न घेता चमत्काराने संकटांतून मुक्त व्हायचे असते. ढोंगी बाबा याच मानसिकतेचा गैरफायदा घेतात. ते लोकांना आत्मपरीक्षण करायला शिकवत नाहीत, तर त्यांना परावलंबी बनवतात. याउलट, खऱ्या संतांनी माणसाला स्वतःच्या आत डोकावायला शिकवले, कर्म करायला प्रवृत्त केले आणि अंधश्रद्धेऐवजी विवेकाची कास धरायला सांगितली. संतशिरोमणी सावता महाराजांनी "स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात" या वचनानुसार स्वतः कर्म करून आपल्याला मार्ग दाखवला आहे. हा स्वकर्माचा आणि विवेकाचा मार्ग कठीण व स्वतःला बदलणारा असल्यामुळे सामान्य माणूस त्याकडे पाठ फिरवतो आणि खोट्या आशेचा बाजार मांडणाऱ्या ढोंगी लोकांच्या जाळ्यात सहज अडकतो. जोपर्यंत आपण चमत्कार आणि अंधश्रद्धेच्या या दुष्टचक्रातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत समाजाची खरी प्रगती होणे अशक्य आहे. ढोंगी, भोंदू आणि भामट्यांच्या नादी लागण्याचा हा प्रकार केवळ अशिक्षित वा अल्पशिक्षित लोकांमध्येच आहे अशातला भाग नाही. उलट उच्चशिक्षित वर्गामध्ये अशा फसवणुकीचे प्रमाण आणि कट्टरता जास्त पाहायला मिळते. विज्ञान आणि शिक्षणाचा प्रसार होऊनही जर आपली मानसिकता बदलणार नसेल, तर आपण केवळ तंत्रज्ञानाने प्रगत होऊ, विचाराने नाही. खऱ्या संतमहापुरुषांच्या विचारांचा सन्मान करणे म्हणजे केवळ त्यांची जयंती साजरी करणे किंवा त्यांच्या मूर्तीची पूजा करणे नव्हे, तर त्यांनी दाखवलेल्या विवेक, सत्य आणि माणुसकीच्या मार्गावर चालणे होय. ज्या दिवशी आपण भोंदूगिरीला नाकारून बुद्धीप्रामाण्यवाद स्वीकारू, त्याच दिवशी या महापुरुषांच्या बलिदानाचे आणि त्यागाचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.
मी स्वतः माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे या आधुनिक क्षेत्रातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांची मानसिकता मी अतिशय जवळून अनुभवली आहे. आज समाजात या क्षेत्राला अफाट प्रतिष्ठा आहे. उच्च शिक्षण आणि तांत्रिक कौशल्यांच्या जोरावर हा तरुण वर्ग गलेलठ्ठ पगार कमवतोय, आर्थिक स्थैर्य उपभोगतोय. पण या झगमगाटामागे त्यांची एक अत्यंत उद्वेगजनक बाजू लपलेली आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणारा हा वर्ग सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कमालीचा अपरिपक्व आहे. आर्थिक स्थैर्यामुळे त्यांना सुख-सुविधांचे एक ‘प्रिव्हिलेज’ मिळाले आहे. त्यामुळेच, समाजातील दाहक वास्तव, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि तळागाळातील संघर्ष याच्याशी त्यांचे काही देणेघेणे उरलेले नाही. स्वतःच्या वातानुकूलित, सुखवस्तू चौकटीत सुरक्षित राहून संकुचित जगण्यातच ते धन्यता मानतात. याच आर्थिक संपन्नतेतून आणि सामाजिक अलिप्ततेतून त्यांच्यामध्ये 'सिव्हिक सेन्स' आणि सामाजिक जबाबदारीचा प्रचंड अभाव निर्माण झाला आहे. तंत्रज्ञानाचा विचार करताना तर्कशुद्ध बुद्धी वापरणारे हेच उच्चशिक्षित लोक जेव्हा सामाजिक किंवा धार्मिक बाबींचा प्रश्न येतो, तेव्हा फसव्या प्रचारतंत्राला सहज बळी पडतात आणि कसलीही शहानिशा न करता अंधभक्तीच्या आहारी जातात. जेव्हा कधी मी अशा विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मी आपसूकच एकटा पडतो. मी जे बोलतोय ते सत्य आणि वास्तव आहे, याची जाणीव आतून त्यांनाही असते पण त्यांच्या डोळ्यांवर जाणीवपूर्वक पसरवलेल्या भ्रमाचा पडदा इतका गडद असतो की, ते सत्य स्वीकारण्याचे धाडस त्यांच्यात नसते. परिणामी, ते वैयक्तिक पातळीवर निरुत्तर झाले की, झुंडशाही करून माझी खिल्ली उडवू लागतात. अर्थात, त्यांच्या या खिल्ली उडवण्याने मी कधीही मागे हटत नाही. मी आता शक्यतो अशा लोकांसोबतचे वादविवाद आणि वादाचे विषय टाळतो. कारण हे लोक आता केवळ 'अंधभक्त' राहिले नसून त्यांचे रूपांतर वैचारिक 'झोंबी'मध्ये झाले आहे, जे स्वतःच्या बुद्धीने विचार करत नाहीत आणि आता काही झाले तरी ते बदलणार नाहीत. मला माझी ऊर्जा अशा निरर्थक वादात वाया घालवायची नाही. मला केवळ एखाद्या व्यक्तीपुरता 'सिलेक्टिव्ह' नव्हे, तर संपूर्ण समाजाची विचारसरणी बदलणारा एक मोठा 'कलेक्टिव्ह' बदल घडवण्यासाठी काम करायचे आहे.
शेवटी एक गोष्ट मी नम्रपणे कबूल करतो की, या एवढ्या मोठ्या जगात माझी स्वतःची स्वतंत्र अशी काहीच मोठी ओळख नाही, मी खरंतर कोणीच नाही. पण ज्यांच्यामुळे आज मी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहिलो आहे, ज्यांच्यामुळे मला जी काही थोडीफार सामाजिक दृष्टी लाभली आहे आणि विवेकवादी विचार करण्याची बुद्धी मिळाली आहे, त्यामध्ये मला घडवणाऱ्या अनेक थोर समाजसुधारकांच्या विचारांचा आणि त्यांच्या त्यागमय कार्याचा निश्चितपणे खूप मोठा वाटा आहे. मी त्यांच्या या वैचारिक ऋणात कायम राहू इच्छितो. संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात अत्यंत हक्काने आणि अधिकारवाणीने पांडुरंगाला म्हणतात-
तुकोबा ज्याप्रमाणे देवाच्या भक्तीच्या आणि कृपेच्या पंगतीत हट्टाने ठाण मांडून बसले आणि त्यांनी आपला अधिकार मिळवला, अगदी त्याच न्यायाने, मी स्वतः कोणीच नसलो तरी, या थोर विचारवंतांच्या आणि समाजसुधारकांच्या 'लोकहिताच्या कार्याच्या पंगतीला' हट्टाने बसण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. भोवताली वैचारिक अंधार कितीही गडद असला, लोक खिल्ली उडवत असले किंवा मला एकटे पाडत असले, तरी या महापुरुषांनी दिलेल्या विवेकाचा दिवा हातात धरून मी सत्याची आणि न्यायाची वाट चालत राहीन. ही पंगत समाज परिवर्तनाची आहे, माणुसकीची आहे आणि एकदा या पंगतीत स्थान मिळवल्यावर आता मागे हटण्याचा प्रश्नच उरत नाही. हाच सत्याचा, न्यायाचा वारसा पुढे नेणे आणि समाजात कलेक्टिव्ह बदल घडवणे, हेच आता माझ्या जगण्याचे ध्येय असेल.
संतोबा...
Monday, July 6, 2026
द फायनल एन्काऊंटर
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्यानंतर समाजात त्या गुन्हेगाराबद्दल तीव्र रोष निर्माण होऊन आरोपीचा एन्काऊंटर करण्याची, भर चौकात फाशी देण्याची, त्याचे हातपाय तोडण्याची, त्याला दगडाने ठेचून मारण्याची मागणी केली जाते. गुन्हे रोजच घडत असतात पण विशेषतः निर्घृण खून, पाशवी बलात्कारासारख्या घटना जिथे पीडित अगदीच निष्पाप आणि गुन्हेगार क्रूरकर्मा असतो, ज्या गुन्ह्याला पूर्वीच्या वादाची बिलकूल पार्श्वभूमी नसते आणि गुन्हेगाराची कृती अन् विकृती स्पष्ट सिद्ध होते अशा वेळी गुन्हेगाराचा एन्काऊंटर करून तात्काळ न्यायाची अपेक्षा केली जाते. प्राप्त परिस्थितीत लोकांचा आरोपीवरचा राग हा नैसर्गिक असतो, पण त्यावर आधारित तात्काळ न्याय हा अतिधोकादायक ठरू शकतो. इतिहासात दगडफेक, सार्वजनिक फाशी, हातपाय तोडणे यासारख्या क्रूर शिक्षांचा वापर झाला आहे आणि त्यात काही वेळा निर्दोष लोक मारले गेले आहेत, तर अनेकदा राजकीय विरोधकांना संपवले गेले आहे. त्यामुळे एन्काऊंटर एकदा सामान्य झाला की, त्याचा वापर प्रतिस्पर्ध्यांना संपवण्यासाठी, सुपारीबाज गुन्हेगारांना मारून त्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांना वाचवण्यासाठी किंवा मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात अपयश आल्यानंतर कोणाला तरी बळीचा बकरा बनवून आपले अपयश लपवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे तात्काळ न्याय करायची ही पद्धत नियोजित अन्याय करायला वापरली जाणार नाही, याची खात्री कोणीच देऊ शकणार नाही.
एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर समाजात तात्काळ 'एन्काऊंटर'ची मागणी केली जाते, तेव्हा त्यामागे केवळ गुन्हेगाराबद्दलचा तीव्र संताप हेच एकमेव कारण नसते. त्यापेक्षाही, आपली प्रचलित कायदेशीर प्रक्रिया गुन्हेगाराला वेळीच आणि कठोर शिक्षा देऊ शकणार नाही, ही भीती त्यामागे अधिक असते. गुन्हेगार कायद्यातील पळवाटा शोधून स्वतःची सुटका करून घेईल आणि हा खटला वर्षानुवर्षे रेंगाळत राहील, अशी रास्त शंका सर्वसामान्यांच्या मनात असते.नॅशनल ज्युडिशिअल डेटा ग्रिड (NJDG) नुसार, डिसेंबर २०२५ पर्यंत देशातील जिल्हा आणि निम्न न्यायालयांत सुमारे ४.७६ कोटी प्रकरणे प्रलंबित आहेत. उच्च न्यायालयांत सुमारे ६३.६६ लाख आणि सर्वोच्च न्यायालयात ९२,१००+ प्रकरणे प्रलंबित आहेत. एकूण पाच कोटींवर प्रकरणे प्रलंबित असल्याने "Justice delayed is justice denied" अर्थात 'विलंबित न्याय हा अन्यायासारखाच असतो. हे मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचे हे वाक्य या परिस्थितीत तंतोतंत लागू पडते. बऱ्याचदा न्यायालयाकडून केवळ 'तारीख पे तारीख' मिळत राहिल्याने पीडित व्यक्तीला आयुष्यभर न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, शिवाय उंबरठे झिजवूनही करून न्याय मिळेलच याची खात्री नसते. आणि समजा न्याय मिळाला तरी या प्रदीर्घ कायदेशीर लढाईत पीडित कुटुंबांचे व्यवस्थेकडून एवढे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण झालेले असते कि हा विलंबाने मिळालेला न्याय त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरतो. अशावेळी शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात त्याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. दुसरीकडे, तारीख पे तारीखमुळे खटला रेंगाळल्याचा थेट फायदा गुन्हेगारांना मिळतो. ते जामिनावर मोकळे फिरतात, साक्षीदारांना धमकावतात किंवा पुरावे नष्ट करतात. काळाच्या ओघात महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होणे किंवा साक्षीदार फितूर होणे यामुळे सरकारी पक्षाची बाजू कमकुवत होते. या संपूर्ण विदारक वास्तवाची जाणीव जनतेला असल्यामुळेच, न्यायव्यवस्थेतील वेळेवर न्याय मिळण्याचा अविश्वास आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयीची शंका यातूनच 'तातडीचा न्याय' म्हणून 'एन्काऊंटर'सारख्या शॉर्टकटची मागणी समाज करताना दिसतो.
जेव्हा एखाद्या गंभीर गुन्ह्यानंतर समाजात संतापाची लाट उसळते आणि 'एन्काऊंटर'ची मागणी जोर धरू लागते, तेव्हा लोकभावनेच्या भरात पकडलेला आरोपी हाच खरा गुन्हेगार आहे असे गृहीत धरले जाते. हे असे गृहीत धरणे फार धोकादायक असू शकते कारण प्रत्यक्षात त्या आरोपीला केवळ अडकवले असण्याची, गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार वेगळाच असण्याची किंवा इतर सहआरोपी मोकळे फिरत असण्याची शक्यता असू शकते याचा सारासार विचार केला जात नाही. अशा वेळी लोकांना त्यांच्या हतबलतेतून निर्माण झालेल्या असुरक्षिततेवर 'एन्काऊंटर' हा एक भावनिक रामबाण उपाय वाटू लागतो. एन्काउंटरमुळे पोलीस, समाज आणि राजकारणी या सर्वांनाच आपापल्या परीने तात्कालिक फायदे मिळतात. पोलिसांच्या दृष्टीने विचार केल्यास, जागेवरच न्याय दिल्यामुळे समाजात त्यांची हिरोची प्रतिमा तयार होते, त्याशिवाय त्यांना साक्षीदार, पुरावे शोधणे यांसारख्या क्लिष्ट कामांमधून सहज मुक्ती मिळते. दुसरीकडे, न्यायालयातील दीर्घ कायदेशीर प्रक्रियेला कंटाळलेल्या समाजात गुन्हेगाराला लगेच शिक्षा मिळाल्याने पीडितांना न्याय मिळाल्याची एक तात्कालिक समाधानाची भावना निर्माण होते. या संपूर्ण प्रक्रियेचा सर्वाधिक फायदा सत्ताधाऱ्यांना होतो. गुन्हेगारांचा तात्काळ खात्मा करून ते स्वतःची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करतात, अशी प्रतिमा त्यांना निवडणुकीत मते मिळवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कायदा -सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले सरकार अशा एन्काउंटरचा वापर करून महागाई, बेरोजगारी यांसारख्या मूळ मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष सहज भरकटवू शकते. लोकभावनेचा आणि न्यायालयीन विलंबाच्या त्रुटीचा फायदा घेत "आम्ही जागेवरच न्याय केला" असा प्रचार करून सरकार आपल्या कार्यक्षमतेचा देखावा करते. एकदा का एन्काऊंटरला समाज मान्यता मिळाली कि एन्काऊंटर सत्ताधाऱ्यांसाठी आपले अपयश लपवणारे ब्रम्हास्र ठरू शकते. ज्याद्वारे सरकारविरोधी बोलणारे आंदोलक, विरोधक किंवा सामाजिक कार्यकर्ते यांना 'गुन्हेगार' ठरवून पोलिसांच्या माध्यमातून त्यांचा आवाज दाबू शकतात. इतकेच नव्हे तर, राजकारण्यांशी साटेलोटे असलेला एखादा गुन्हेगार जेव्हा स्वतः सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतो तेव्हा एन्काउंटरच्या नावाखाली त्याला कायमचे शांत करून स्वतःचे गुन्हे आणि पुरावे नष्ट करण्याची मोठी संधी सत्ताधाऱ्यांना मिळते.
लोकशाही व्यवस्थेत पोलिसांचे मुख्य कर्तव्य गुन्ह्याचा तपास करणे, पुरावे गोळा करणे आणि आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करणे हे आहे. शिक्षा सुनावण्याचा अंतिम अधिकार केवळ न्यायव्यवस्थेला आहे. शासन, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेने केवळ लोकभावनेला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत राहून सखोल चौकशी करणे अपेक्षित असते. याउलट, दबावाखाली येऊन जेव्हा यंत्रणा प्रचंड घाईगडबडीत निर्णय घेते, तेव्हा "Justice hurried is justice buried" म्हणजेच 'घाईतील न्याय हा न्यायाचे दफन करणारा ठरतो', या दुसऱ्या म्हणीचा प्रत्यय येतो. कारण अशा घाईत महत्त्वाचे दुवे सुटून निरपराध व्यक्तीला शिक्षा होण्याचा आणि मूळ दोषी सुटण्याचा मोठा धोका निर्माण होतो. आरोपीला आपली बाजू मांडण्याची किंवा न्यायव्यवस्थेला खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्याची पुरेशी संधीच मिळत नाही. परिणामी, केवळ वरवरच्या पुराव्यांवरून आणि जनक्षोभ शांत करण्यासाठी घाईघाईने दिलेला निर्णय एकप्रकारे न्यायव्यवस्थेचाच खून करणारा ठरतो. अनेकदा खोट्या प्रकरणांमध्ये निरपराधांना अडकवण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळेच, न्यायालयाने सर्व पुराव्यांची काटेकोर छाननी करणे कायद्यानुसार बंधनकारक असते. पोलिसांनी कायदा हातात घेऊन आरोपीला तात्काळ शिक्षा देण्याच्या या संशयास्पद एन्काऊंटर पद्धतीला भावनिक झालेला सर्वसामान्य समाज जरी न्याय समजू लागला, तरी यामुळे गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि पडद्यामागचे चेहरे कायमचे सुरक्षित राहतात. येथे आरोपीचे समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. न्यायालयाने संपूर्ण तपास करून, गुन्ह्याची मूळ प्रेरणा शोधून, मुख्य सूत्रधारांसह सर्व गुन्हेगारांना जास्त विलंब न लावता कठोरात कठोर शिक्षा द्यावी हाच मुख्य उद्देश आहे. सर्व साक्षी पुरावे तपासून दिलेला न्याय हाच खरा आणि शाश्वत न्याय आहे. याउलट, आपण कायदेशीर प्रक्रियेला डावलून परस्पर गोळ्या घालत सुटलो, तर समाजात कायद्याचे भय उरणार नाही आणि संपूर्ण देशात अराजकता माजेल, जिथे शक्तिशाली लोक स्वतःच कायदा हातात घेतील. महत्त्वाचे म्हणजे, ज्याच्यावर केवळ आरोप होता अशा आरोपीचा चकमकीत अंत झाल्यामुळे या गुन्ह्यामागील मूळ सूत्रधार शोधण्याचे सर्व मार्ग आता कायमचे बंद होतील. बऱ्याचदा पडद्यामागच्या मोठ्या प्रस्थापितांना वाचवण्यासाठी अशा लहान प्याद्यांचा बळी दिला जातो, ज्यामुळे मूळ कटाचा तपास तिथेच थांबतो आणि खरे गुन्हेगार मोकाट राहतात. येथे समाज म्हणून आपण एक गोष्ट विसरता कामा नये की, आज जो गुन्हेगार आहे असं सरकार किंवा यंत्रणा म्हणतेय, उद्या तेच नियम आणि तीच पद्धत कोणावरही अगदी तुमच्या-आमच्यावरही लागू होऊ शकते. पुरावा न बघता आणि कोर्टाला न जुमानता थेट जागेवरच संपवण्याची धोकादायक सवय जर पोलिसांना लागली, तर या अमर्याद अधिकारांचा वापर भविष्यात कोणाविरुद्धही केला जाऊ शकतो, अगदी तुमच्यावरसुद्धा!.
पोलिस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांचे मुख्य उद्दिष्ट समाजात कायदा व सुव्यवस्था राखणे, सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे आहे. कायद्याचा हेतू कोणावर सूड उगवणे नसून समाजात स्थैर्य राखणे हाच आहे. एखादा गुन्हा घडल्यास कठोर शिक्षा करून समाजात धाक निर्माण केला जातो, जेणेकरून भविष्यात कोणीही पुन्हा तसे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही. परंतु जर एखादा सौम्य गुन्हा अजाणतेपणी घडला असेल किंवा गुन्हेगाराला पश्चात्ताप होत असेल, तर त्याचे समुपदेशन करून व त्याला सुधारून एक चांगला नागरिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो , जेणेकरून शिक्षा भोगल्यानंतर त्याला समाजात सन्मानाने वागण्याची संधी मिळू शकेल. गुन्हेगार नष्ट करण्यापेक्षा गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करणे महत्वाचे आहे. गुन्हे घडल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा देण्याबरोबरच , 'गुन्हा घडणारच नाही' अशी व्यवस्था निर्माण करण्याकडे समाज आणि शासनाने अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच पायबंद घालण्यासाठी सक्षम कायदा व्यवस्था, शिक्षण, नैतिक मूल्यांची जपणूक आणि सामाजिक सुरक्षा यांवर भर देणे गरजेचे आहे. आपली संपूर्ण पोलीस आणि कायदेशीर यंत्रणा आतून सक्षम, कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक बनवणे हाच यावरचा एकमेव शाश्वत मार्ग आहे. सोबत बलात्कार , बालालैंगिक गुन्ह्यासाठी जलदगती न्यायालयांची संख्या वाढवणे. गरज आहे ती पोलीस प्रशासनाला आधुनिक तंत्रज्ञान, फॉरेन्सिक विज्ञानाची प्रगत संसाधने आणि पुरेशा मनुष्यबळाने सज्ज करण्याची, जेणेकरून गुन्हे रोखता येतील आणि घडलेल्या गुन्ह्याचा तपास तातडीने पूर्ण होऊन कोणतीही केस न्यायालयात वर्षानुवर्षे रेंगाळत न पडता एका निश्चित कालमर्यादेत निकाली निघेल. याशिवाय आपली पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था स्वायत्त आणि निष्पक्ष असावी, त्यामध्ये कोणाला हस्तक्षेप, ढवळाढवळ करून केसवर विपरित परिणाम करता येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. चौकशी आणि न्यायदानाचे काम निष्पक्षपणे करायला हवे मग आरोपी सामान्य नागरिक असो वा एखादा बलाढ्य राजकारणी, बडा उद्योगपती असो वा वजनदार व्यक्ती, कायद्याची अंमलबजावणी प्रत्येकावर सारख्याच निःपक्षपातीपणे केली पाहिजे. गुन्हेगाराचा चेहरा, त्याचा धर्म, जात, पैसा किंवा राजकीय वशिला न पाहता त्याला कायद्यानुसार तत्काळ आणि निश्चित शिक्षा दिली जावी. यामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलीस यंत्रणा आणि न्यायालयाबद्दलचा ढासळलेला विश्वास पुन्हा भक्कमपणे प्रस्थापित होईल आणि एन्काऊंटरसारख्या धोकादायक शॉर्टकटच्या मागणीची गरजच उरणार नाही
संतोबा...
Saturday, June 20, 2026
विमानतळ
विमानतळ
काळ बनलंय विमानतळ,
पण टळून जाईल ही वेळ.
तुटू न देऊ या मातीशी नाळ,
धीर धरू, सोसू थोडीशी कळ.
एकी राखू, येईल पंखात बळ,
जगप्रसिद्ध अंजीर अन् सीताफळ.
जागतिक वारसा हा, नको त्यास झळ,
हा ठेवा वाचवण्यासाठी ही सारी तळमळ.
त्यासोबत असे ताज्या माळव्यांची हिरवळ,
कष्टाचे मिळे समाधान आणि उत्पन्न बक्कळ.
आश्वासनांचा अन् मोबदल्याचा नका घालू मेळ,
अडल्यानडल्यास फितवण्याचा नका हो करू खेळ.
विरोध असे आमचा ठाम, नको संमतीची खळखळ,
आम्ही ओळखून आहोत सारी दलाल दुतोंडी गांडुळं.
कटकारस्थाने करू उघड अन् थांबवू त्यांची वळवळ.
हर हर महादेवाचा जयघोष ओठी आहे सदासर्वकाळ.
अन् खंडोबाच्या भंडाऱ्याने रंगले आहे आमुचे कपाळ.
लढजिंकण्याच्या निर्धाराने उत्साह आमुचा सळसळं.
शिवछत्रपतींच्या केवळ नावानेच रक्त आमुचे उसळं.
हा आमुचा लढाच आणेन बळीराजाचा सुवर्णकाळ.
दुधदुभत्या, खात्या घरात आनंदाने नांदेल गोकुळ.
दलालांनो तुम्ही आता नका येऊ आमच्या जवळ.
जगा अन् जगू द्या, एवढीच मागणी साधीसरळ.
तुम्ही आम्ही एकच, नको कसलीही जळजळ.
तुम्हाला सुधारण्याचे मार्ग आहेत पुष्कळ.
ऐका एवढा सल्ला, नका करू खळबळ.
नाहीतर कराल आयुष्यभर पळापळ.
संतोबा (संतोष गांजुरे)
Sunday, June 14, 2026
सुखी माणसाचा सदरा
"महाराज, या जगात जो कोणी पूर्णपणे सुखी माणूस असेल, त्याचा सदरा (शर्ट) तुम्ही एका रात्रीसाठी अंगावर परिधान करा. तुमचे दुःख आणि अस्वस्थता कायमची नाहीशी होईल."
राजाचे सैनिक संपूर्ण राज्यात सुखी माणसाचा शोध घेऊ लागतात. ते श्रीमंत व्यापारी, मंत्री, जमीनदार यांच्याकडे जातात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख, चिंता असतेच. पैसा असूनही कोणी सुखी नसतं.
शोध घेता घेता सैनिकांना राज्याच्या सीमेवर एका झोपडीबाहेर रात्रीच्या वेळी एक शेतकरी गाढ झोपलेला आणि आनंदाने गाणे गुणगुणताना दिसतो. सैनिक त्याला विचारतात, "तू तुझ्या आयुष्यात पूर्ण सुखी आहेस का?" तो हसून उत्तर देतो, "हो, मी या जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे. मला कोणतीही चिंता नाही."
सैनिक आनंदित होतात आणि राजाच्या आज्ञेनुसार त्याचा सदरा मागतात. पण जेव्हा ते त्याच्याकडे नीट पाहतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येते की त्या सुखी माणसाच्या अंगावर साधा सदरासुद्धा नसतो! तो उघड्या अंगानेच आनंदाने जगत असतो.
जेव्हा ही गोष्ट राजाला समजते, तेव्हा त्याचे डोळे उघडतात. त्याला समजते की, सुखाचा संबंध बाह्य वस्तूंशी किंवा कपड्यांशी नसून तो माणसाच्या मनाशी असतो.
Sunday, June 7, 2026
भांडवलशाही शोषणव्यवस्थेच्या शिखरावर मूठभर शोषक असतात, तर तळाशी अथांग कष्टकरी वर्ग असतो. थोडक्यात, या व्यवस्थेची रचना एखाद्या पिरॅमिडसारखी असते. या संरचनेत आपण जसे वरून खाली येतो, तशी लोकसंख्या आणि त्यांच्यावरील शोषणाचा भार उत्तरोत्तर वाढत जातो.
▲▲▲ [०९%] उच्चपदस्थ अधिकारी / कंत्राटदार
▲▲▲▲▲ [९०%] सामान्य कामगार / मजूर वर्ग
या पिरॅमिडच्या अगदी तळाशी देशातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक श्रमिक वर्ग कार्यरत असतो. व्यवस्थेतील उच्चपदस्थ अधिकारी हे भांडवलशाहीचे 'ठेकेदार' किंवा प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. मालकांचे नफा मिळवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची मुख्य जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असते. स्वतःचे गलेलठ्ठ पगार, बोनस आणि पदे सुरक्षित ठेवण्यासाठी हे अधिकारी कनिष्ठ स्तरावर प्रचंड मानसिक व व्यावसायिक दबाव निर्माण करतात. या व्यवस्थेत शोषण आणि दबावाचा प्रवाह नेहमी उच्च स्तराकडून कनिष्ठ स्तराकडे वाहत असतो. मालक हे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर दबाब आणतात. अधिकारी हा दबाव व्यवस्थापकांवर संक्रमित करतात. व्यवस्थापक शेवटी या सर्व ताणाचा बोजा तळातील प्रत्यक्ष काम करणाऱ्या कामगारांवर लादतात. या संपूर्ण प्रक्रियेत सामान्य कर्मचाऱ्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसते. केवळ वरून आलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करणे एवढेच त्यांचे कर्तव्य ठरवले जाते. जोपर्यंत ही केवळ नफाकेंद्री भांडवलशाही अस्तित्वात आहे, तोपर्यंत शोषणाचे हे दुष्टचक्र अव्याहतपणे सुरूच राहणार. भांडवलशाही व्यवस्थेचा हा पिरॅमिड संपत्ती आणि नफ्याच्या वाटपाच्या बाबतीत नेमका उलटा असतो. यात सर्वात जास्त घाम गाळणाऱ्या शोषिताला सर्वात कमी मोबदला मिळतो आणि काहीही शारीरिक कष्ट न करणाऱ्या शोषकाला सर्वाधिक नफा होतो.
▼▼▼ गलेलठ्ठ पगार – व्यवस्थापन सांभाळणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना
▼ तुटपुंजी मजुरी – प्रत्यक्ष अहोरात्र राबणाऱ्या लाखो कामगारांना.
भय हे अनेकांच्या यशस्वी व्यवसायाचे मूळ भांडवल आणि बहुसंख्याकांच्या शोषणाचे मुख्य कारण आहे
.
Sunday, May 31, 2026
अंधभक्त प्रस्तावना
या लिखाणात वापरलेल्या उपमांबद्दल मी सर्व प्राणीमात्रांची माफी मागतो. कोणत्याही प्राण्याची बदनामी करण्याचा माझा अजिबात हेतू नाही, कारण त्यांचे गुण-दोष हे नैसर्गिक असतात. उदाहरणार्थ, सरडा रंग बदलतो ही त्याची संकटापासून स्वतःचा बचाव करण्याची नैसर्गिक कला आहे. परंतु, जेव्हा आपण एखाद्या माणसाला 'रंग बदलणारा सरडा म्हणतो, तेव्हा तो सरड्याचा अपमान नसून, माणसाच्या बदलत्या स्वभावावर केलेले भाष्य असते. मानव हा देखील एक प्राणीच आहे. त्याला लाभलेल्या बुद्धिमत्तेच्या वरदानामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ मानला जातो; पण हे पूर्ण सत्य नाही. जगभरातील अंधभक्त याला सर्वात मोठा अपवाद आहेत. खरं तर, अंधभक्तांचा बुद्ध्यांक (IQ) हा कोणत्याही सजीव प्राण्यापेक्षाही कमी असतो. निसर्गात प्रत्येक प्राण्याला संकटाची उपजत चाहूल लागते, त्याला आपल्या धोक्याची जाणीव असते. कोणताही धर्म, धर्मग्रंथ किंवा मसिहा पाठीशी नसतानाही आजवर ते टिकून आहेत. प्राण्यांना आपण माणसांइतके बुद्धिमान समजत नसलो तरी कोणताही प्राणी आपल्या नैसर्गिक गुणधर्माच्या पलीकडे जाऊन स्वतःची व्यवस्था उद्ध्वस्त करत नाही. दुर्दैवाने, बुद्धीचे वरदान लाभलेला माणूस मात्र अंधभक्तीत अडकून स्वतःचा आणि सर्व सामाजिक व्यवस्थेचा विनाश करत असतो.
अंधभक्ती केवळ त्या अंधभक्त व्यक्तीसाठीच नाही तर तिच्या कुटुंबासाठी, एकूणच समाजासाठी घातक असते. अंधभक्ती ही एक अत्यंत घातक मानसिक गुलामगिरी आहे, जी माणसाचा विवेक आणि स्वतंत्र विचार पूर्णपणे नष्ट करते. त्यामुळेच कट्टर अंधभक्तांमध्ये सुधारणा होण्याची तिळमात्र शक्यता नसते. निरोध तरी एकदा वापरून फेकून दिला जातो, अंधभक्तांना वारंवार वापरून फेकून दिले जाते तरी ते सुधारत नाही. त्यांचे तथाकथित तारणहार, पाखंडी धर्ममार्तंड, नेते आपले ईप्सित साध्य करण्यासाठी या अंधभक्तांचा वारंवार वापर करून त्यांना फेकून देतात. आश्चर्य म्हणजे, इतक्या वेळा शोषित आणि उपेक्षित होऊनही अंधभक्त कधी आत्मपरीक्षण करत नाही. उलट, नेत्याने, पाखंडी धर्ममार्तंडाने आपला वापर करून घेण्यालाच ते आपल्या जीवनाचे सार्थक समजतात. आपला गैरफायदा घेतला जात आहे हे मान्य करणे त्यांच्या अहंकाराला पटत नसल्यामुळे ते स्वतःला सतत खोट्या समाधानात ठेवतात. सामान्य माणूस चुकीची जाणीव झाल्यावर स्वतःमध्ये बदल करतो, परंतु कट्टर अंधभक्त हा शोषणाच्या अशा चक्रव्यूहात अडकलेला असतो की तो वैचारिकदृष्ट्या कायमचा परावलंबी आणि निष्प्राण बनतो, ज्यामुळे अशा मानसिकतेत सुधारणेला अजिबात वाव उरत नाही.
हे लिखाण विचार करण्याची क्षमता गमावलेल्या अंधभक्तांसाठी मुळीच नाही, कारण खुद्द त्यांचा तथाकथित 'तारणहार'ही त्यांच्या भल्यासाठी काही करत नाही. हे लिखाण अशा सर्वसामान्य लोकांसाठी आहे, जे अंधभक्तांच्या वाढत्या अंधभक्तीमुळे आणि अतार्किक वादविवादांमुळे पुरते हैराण झाले आहेत. अंधभक्तांना कसे हाताळावे आणि जे लोक या चुकीच्या मार्गावर आहेत, त्यांना पुन्हा विवेकवादाकडे कसे आणावे, याचे मार्गदर्शन करणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. अंधभक्तांशी वाद घालणे म्हणजे केवळ वेळ आणि ऊर्जा वाया घालवणे होय. त्यामुळे त्यांच्याशी कामाव्यतिरिक कसलीही चर्चा न करता, केवळ कामापुरते आणि सुरक्षित अंतर ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. अंधभक्तांना कधीही कमी लेखून चालणार नाही, कारण त्यांच्याकडे जरी तर्क आणि विवेक नसला, तरी आक्रमकता आणि दुष्प्रचार (प्रपोगंडा) पसरवण्याची मोठी आसुरी शक्ती असते. त्यांना कमी समजण्याची चूक आपल्याला महागात पडू शकते, कारण अंधभक्त स्वतः सुधारण्याची शक्यता शून्य असली, तरी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या सर्वसामान्य, माणसाला बिघडवण्याची पुरेपूर क्षमता त्यांच्यात असते. स्वतः न सुधारता इतरांनाही आपल्यासारखेच आंधळे व विखारी बनवणे, हाच अंधभक्तांचा मुख्य स्वभावगुण आहे. आपले प्रियजन कोणाच्याही अंधभक्तीच्या विळख्यात अडकणार नाहीत, यासाठी आपण वेळीच आणि कायम जागृत राहिले पाहिजे. अंधभक्तांच्या आणि त्यांच्या पाखंडी तारणहारांच्या खोटेपणाची वारंवार पोलखोल करून, त्यांना समाजात डोईजड होऊ न देणे गरजेचे आहे. अशा समाजघातक अंधभक्तांपासून आणि त्यांच्या विषारी मानसिकतेपासून आपण कायम सावध राहणे, हेच आजच्या काळात आपले सर्वोच्च सामाजिक कर्तव्य आहे.