माणसांमाणसांत भेदाभेद न करता अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी, चांगला बदल स्विकारणारा सर्वसमावेशक प्रवाही आणि प्रभावी विचार म्हणजे विचारधारा. वंशश्रेष्ठत्वाचा अहंकारातून माणसांमाणसांत भेदाभेद करणारा, विकृत नरसंहार करण्याची इच्छा बाळगणारा रक्तपिसासू विचार म्हणजे द्वेषधारा. नैसर्गिक हक्क आणि न्यायाचा स्विकार म्हणजे विचारधारा तर त्यास नकार म्हणजे द्वेषधारा. विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध, तर्कनिष्ठ मांडणीच्या आधारे प्रगतीचा मार्ग दाखवणारी पद्धत म्हणजे विचारधारा. भ्रामक, काल्पनिक अंधश्रध्देच्या जोखडाखाली बहुसंख्य जनतेला अडकवून स्वतः वंशपरंपरागत विशेषाधिकार पदरात पाडून घेणारी व्यवस्था म्हणजे द्वेषधारा. द्वेषधारा मूठभर लोकांच्या विशेषाधिकाराच्या संवर्धनासाठी बहुसंख्य लोकांना मानसिक गुलामगिरी बंदिस्त करण्याचा कावेबाजपणा करते. विचारधारा पिढ्यान् पिढ्यांच्या अन्याय रूढी- परंपरांना झुगारून सर्वसामान्य जनतेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी झटत असते. द्वेषधारा विरोधकांचा तिरस्कार करते, त्यांना संपवण्याचा प्रयत्न करते. विचारधारा विरोधकांनाही मार्गदर्शन करते, त्यांच्याही हिताचा विचार करते. द्वेषधारावाले कधीही सकारात्मक कार्य करू शकत नाही, अगदी आपण बरोबर आहोत हे पटवून देण्यासाठी सुद्धा ते दुसरे कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. जबाबदारी झटकण्यात द्वेषधारावाल्यांचा हातखंडा असतो. अस्मिताचे भांडवल करून आपले दुकान कसे चालवायचे याचे कसब त्यांनी आत्मसात केलेले असते. थोडक्यात असे म्हणता येईल विचारधारा ही प्रागतिक पुरोगामी तर द्वेषधारा ही अधोगतीक प्रतिगामी असते.
विचारधारा बहुतेकदा समाजकल्याणाच्या चिंतनातून उगम पावते. त्यासाठी सखोल अभ्यास, सर्वांगीण बाजूचा विचार करावा लागतो. पारंपारिक, कालबाह्य, अन्याय्य गोष्टींना छेद देत नवीन समाजकल्याणाचा विचार रुजवावा लागतो. विचारधारा समानता, सामाजिक न्याय आणि सामूहिक हिताचा विचार करते.विचारधारा समाजाला दिशा देते, समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करते आणि लोकांना जोडण्याचे काम करते. विचारधारा ही सकारात्मक शक्ती आहे जी समाजाच्या उन्नतीसाठी आणि न्यायासाठी काम करते. विचारधारा ही संपूर्ण समाजाच्या हिताची असते अगदी विचारधारेला विरोध करणाऱ्याच्याही हिताची असते. द्वेषधारा बहुतेकदा भेदभाव, ईर्षा, पूर्वग्रह किंवा वर्चस्ववादातील संघर्षांमधून उगम पावते (वर्णभेद, जातीयवाद, धार्मिक कट्टरता). द्वेषधारा समाजात दुही निर्माण करते, नकारात्मक वातावरण निर्माण करते. द्वेषधारा नकारात्मक आहे, ती विनाश घडवते, सामूहिक दंगली किंवा युद्धांना जन्म देते. द्वेषधारा कोणाचा ना कोणाचा तिरस्कार करून हिंसा करण्यास प्रोत्साहन देत असते. द्वेषभावनेने भारलेली व्यक्ती कायम समोरच्याच्या चुका शोधते, दुसऱ्यांच्याबाबत कायम संशयी असते. सततच्या तिरस्कारामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास गमावते. अशी व्यक्ती समोरच्याशी एकटी लढू शकत नाही, त्यासाठी तिला समद्वेषीविचारी समूहाचा आधार लागतो. त्याचप्रमाणे द्वेषधारेला निर्बुद्ध झुंडींची गरज असते, झुंडीशिवाय द्वेषधारेचे अस्तित्व शून्य असते. दुसरीकडे ठाम विचारधारेचा व्यक्ती कितीही मोठ्या झुंडीला एकट्याने सामोरे जाण्याचे सामर्थ्य बाळगून असतो.
द्वेषधारा कधीही कोणाचे कायमस्वरुपी कल्याण करू शकत नाही. द्वेषधारा प्रत्येकासाठी घातकच असते, आज जे लोक अशा विचारधारेचे समर्थन करतात आणि या विचारधारेच्या बरहुकूम काम करणाऱ्या लोकांच्या कोणत्याही द्वेषपूर्ण कृतीचे, विकृतीचे समर्थन करतात त्यांना आज ना उद्या त्यांना तशाच विकृतीला बळी पडावे लागणार असते. प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचा शेर याचे चपखल उदाहरण देतो "लगेगी आग तो आएंगे कई घर जद मे, यहा पे सिर्फ हमारा मकान थोडी है..!". द्वेषधारा म्हणजे उन्माद अन् विचारधारा म्हणजे संवाद. द्वेषधारा आपसूकच आत्मसात केली जाते कारण त्यासाठी काही तर्क, विचार करण्याची गरज नसते. त्यामुळे द्वेषधारेच्या उन्मादी, विखारी प्रचाराला बहुसंख्य लोक सहज बळी पडतात आणि त्यांच्या निर्बुद्ध झुंडी निर्माण होतात. जिथे झुंडी होतात तिथे विवेक हरवतो. या उन्मादी झुंडी सारासार विचार न करता एखाद्या झोंबीप्रमाणे सारं काही उद्ध्वस्त करतात. त्यांची विकृत कृत्ये सोडा अगदी त्यांच्या वागण्याबोलण्यातही सुसंगतता नसते, ते ज्यांचा विरोध करतात त्यांचाच त्यांना नाईलाजाने का होईना उदोउदो करावा लागतो. उदाहरणार्थ भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या समतावादी विचारांमुळे आणि कार्यांमुळे काही राजकीय, सामाजिक संघटनांकडून प्रचंड द्वेष केला जातो. या द्वेषी लोकांचे आदर्श एवढे खुजे आहेत की त्यांचे कितीही उदात्तीकरण केले तरी आणि ते त्यांच्यासाठी कितीही पूजनीय असले तरी त्यांच्या अंधभक्तांच्या कोंडाळ्या बाहेर जगजाहीर त्यांचा उदोउदो ते करू शकत नाही. जेव्हा हे द्वेष करणारे लोक परदेशात जातात तेव्हा देशात ते ज्यांचा द्वेष करतात त्यांचाच परदेशात उदोउदो करतात कारण या महापुरुषांचे कार्य एवढे उत्तुंग आहे की जगभरात त्यांना मान्यता आहे. विविध देशाचे प्रतिनिधी आपल्या देशात येतात तेव्हा त्यांना गांधीजींच्या समाधी स्थळावर राजघाटावर घेऊन जातात, बुद्धाची प्रतिमा, फुले - आंबेडकरांची पुस्तके भेट देतात पण चुकूनही द्वेषधारासमर्थक अनुयायांच्या आदर्शांचा उल्लेख करत नाहीत एवढे त्याचे आदर्श खुजे असतात.
द्वेषधारा प्रवर्तक आणि समर्थक दुतोंडी गांडूळांसारखी असतात. दुसऱ्यावर अन्याय करताना कसलाही विधिनिषेध न बाळगणारे, नितीनियम पायदळी तुडवणारे, दुसऱ्यांवर अन्याय होत असताना, दुसऱ्यांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असताना त्या शोषितांची खिल्ली उडवणारे, एखादी घटना त्यांच्या अंगलट आल्यावर त्यांना लगेच मानवाधिकार, लोकशाही आणि संविधान आठवते. व्हिक्टिम कार्ड खेळण्यात त्यांचा हातखंडा असतो. त्यांना दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. खरंतर विचारधारा आणि द्वेषधारा यांचे मूठभर प्रवर्तक असतात, सर्वसामान्य लोक आपापल्या वैचारिक कुवतीनुसार विचारधारा आणि द्वेषधारेचे समर्थक बनतात. द्वेषधारेच्या प्रवर्तकांनाही विचारधारेचे महत्व आणि द्वेषधारेचा फोलपणा माहीत असतो. ते स्वतः विचारधारेच्या मार्गाचे पालन करून आपला फायदा करून घेतात पण आपल्या समर्थकांना द्वेषधारेचे पालन करण्यास भाग पाडतात. त्यांना वांझोट्या, निरुत्पादक गोष्टीत गुंतवून सार्वजनिक संसाधनांचा वापर करण्यातील स्पर्धा संपवून आपला स्वार्थ साधून घेतात. द्वेषधारेचे प्रवर्तक मूलभूत गरजा,आरोग्य, शिक्षण, रोजगार, याबद्दल बोलणार नाहीत, ते तुम्हाला शिक्षण घ्या, व्यवसाय करा, त्यासाठीचे कला कौशल्य आत्मसात करा असे सांगणार नाही. ते तुम्हाला कोणाला तरी तुमच्या दुरावस्थेला जबाबदार ठरवून त्यांचा द्वेष करायला भाग पाडतील. ते लोकांना पाखंडी त्यांचे तारणहार म्हणून भासवतील, त्यांची सेवा करायला भाग पाडतील , दानधर्म करायला सांगतील, पाखंडी, अनिष्ट रूढी यांचे पालन करायला भाग पाडतील.
नरसंहार, विध्वंस करणाऱ्या रक्तपिसासूपेक्षा रचनात्मक कार्य करणाऱ्या, नवनिर्मिती करणाऱ्याला कायम लक्षात ठेवलं जाते. पिढ्यान् पिढ्यासाठी त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असते. त्यांच्या कर्तुत्वाचा प्रकाशात कित्येक पिढ्यांचे जीवन उजळून निघते. असे असले तरी द्वेषधारेच्या समर्थकांच्या तुलनेत विचारधारेचे समर्थक फार कमी असतात. सांख्यिकदृष्ट्या एकजूट असल्याने लोक सामाजिक स्वीकृतीसाठी द्वेषधारेच्या गटाच्या विचारांशी लोकं जुळवून घेतात. विचारधारा विनाकारण लोकानुनयन करत नाही. त्यामुळे विचारधारा स्विकारण्यासाठी आपला विवेक जागृत करावा लागतो, स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा लागतो. त्यासाठी पुरावे, तर्क आणि वस्तुनिष्ठतेनुसार विचार करणे, निर्णय घेणे आवश्यक असते आणि पूर्ण तार्किक विचार करायला वेळ आणि मेहनत लागते. मेंदू उत्क्रांतीने जलद आणि भावनिक विचारासाठी तयार झाला आहे, ना की पूर्ण तार्किकतेसाठी. मानवी मेंदूचे दोन भाग असतात : सिस्टम १(जलद, भावनिक, स्वयंचलित) आणि सिस्टम २ (हळू, तार्किक, प्रयत्नपूर्ण). बहुतेक वेळा सिस्टम १ चालते, कारण सिस्टम २ वापरणे ऊर्जा खूप खर्च करते (मेंदूला ग्लुकोज लागते). भावना (राग, भीती, प्रेम) तर्काला मागे टाकतात. उदाहरणार्थ आपल्या आवडत्या व्यक्तीच्या चुकीला समर्थन देणे. विचारधारा परिवर्तनीय, प्रवाही असते ती कायम नवनवीन चांगला बदल स्विकारत असतात. द्वेषधारा मात्र द्वेष, भेदाभेद, वर्चस्ववाद, वंशश्रेष्ठत्ववादाच्या डबक्यातून बाहेर पडू शकली नाही. समाजातील विवेकवादी लोकांचे कर्तव्य आहे की तरुण पिढीला त्यांच्या प्रगतीसाठी, व्यक्तीस्वातंत्र्यासाठी, मूलभूत हक्कांसाठी कोण झटले आहेत आणि कोणी विरोध केला आहे याची सतत जाणीव करून द्यायला हवी. त्यांना विचारधारेच्या मार्गावर आणून विवेकवादी बनवणे गरजेचे आहे. अर्थात या गोष्टीला वेळ लागले किंबहुना ही निरंतर चालणारी प्रकिया आहे आणि या प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांना सामावून घेणे वैयक्तिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी गरजेचे आहे.
संतोबा...
0 प्रतिक्रिया:
Post a Comment