Ads 468x60px

Sunday, June 30, 2024

🎉 आपल्या रावल्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने🎉

                     गेल्या आठवड्यात १९ जूनला राहुल गांधींचा वाढदिवस होता आणि मी त्यांना मित्र म्हणून शुभेच्छा देणारे स्टेटस व्हॉट्सॲप आणि फेसबुकला ठेवले होते. त्यानंतर काहीजणांच्या विस्मयजनक तर काहीजणांच्या हेटाळणीयुक्त प्रतिक्रिया आल्या, मला त्या अपेक्षित होत्या कारण अशा प्रतिक्रियांचा अनुभव मला राहुल गांधीच काय राजीव गांधी, पंडित नेहरूंच्या बाबतीतही असाच आहे. समाजाची सामाजिक समज किती तकलादू आहे आणि राहुल गांधींबद्दलच्या चारित्र्यहननाच्या, बदनामीच्या अपप्रचाराला बळी पडून लोकांची बौद्धिक कार्यक्षमता किती कार्यक्षम राहिली आहे याची मला जाणीव होतीच. राहुल गांधींच्याबद्दल लोकांच्या मनात एवढा द्वेष का आहे? लोकं त्यांची एवढी खिल्ली का उडवतात. राहुल गांधी गुन्हेगार आहे का? भ्रष्टाचारी आहे का? घोटाळेबाज आहे का? देशद्रोही आहे का?. बहुतेकांना होय असे वाटते पण त्यांना हा प्रश्न पडत नाही की अनेक देशी, परदेशी गुप्तहेर यंत्रणा, पेगासस राहुल गांधीवर नजर ठेऊन असूनही त्यांची कोणत्याच बाबतीत त्यांना कोंडी करता आली नाही. निव्वळ राजकीय हेतूने केलेल्या आरोपांनुसार आज केवळ राहुल गांधीच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटुंब तुरुंगात असायला हवे होते. राहुलच्या संपूर्ण कुटुंबीयांची मग ते जिवंत असोत वा मृत कसलाही विधिनिषेध न बाळगता, त्यांच्या कार्याची जाण न ठेवता खूप खालच्या पातळीवर जाऊन बदनामी, हिणकस,हिडीस टीका, बेलगाम आरोप केले, त्यांचे विकृत फोटोशॉप करून विरोधकांनी आपआपल्या थोर खानदानी परंपरेचे दर्शन घडवले. काहीही करून त्यांना गुन्हेगार, देशद्रोही ठरवण्याचा घाट घातलेला दिसत असताना गांधी कुटुंबीयांपैकी कोणाचीही एखादी क्षुल्लक चूक जरी सापडली असती तर अमर्याद सत्ता हाती असल्याने राईचा पर्वत करून राहुल आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात डांबले असते, त्यांना राजकारणातून, सार्वजनिक जीवनातून हद्दपार केले असते पण जंगजंग पछाडून असे काही करता आले नाही.        

                       कोवळ्या वयापासून राहुलवर अनेक आघात झालेत, मात्र त्यातून त्याच्यात कसलाही कडवटपणा आलेला दिसत नाही. कोणाच्याबद्दल त्याच्या मनात द्वेष, आकस दिसत नाही. बेछूट गोळीबाराने पंतप्रधानपदी असलेल्या आजीच्या शरीराची चाळणी झालेला मृतदेह, बॉम्बस्फोटात पंतप्रधानपदी असलेल्या वडिलांच्या शरीराच्या चिंधड्या झालेला मृतदेह पाहण्याचे दुर्दैव त्याच्या वाट्याला आलेले, परदेशीत्वाच्या मुद्द्यावरून आईवर झालेली बोचरी टीका. त्यातून त्याला राजकारणाबद्दल निश्चित विरक्ती आलेली असेल किंबहुना त्यालाही राजकारणाची ओढ नसावी असे वाटत होते. पण म्हणतात ना जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. नाईलाजाने का होईना त्याला राजकारणात यावे लागले. त्याच्याकडे राजकारणात विरोधकांची जीवघेणी टीका, बेलगाम आरोप सहन करण्यासाठी लागणारी गेंड्याची कातडी नाही. अगदी वयाच्या पन्नाशीतही त्याच्यात निर्मळ, निखळ निरागसपणा दिसतो. शिवाय राहुल फार काही मुत्सद्दी राजकारणी आहे अशातला भाग नाही. त्यामुळे त्याची पप्पू अशी प्रतिमा निर्माण करण्यात भाड्याच्या ट्रोलर्स ना प्रचंड यश आले एवढे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनादेखील राहुल पप्पूच आहे असे वाटावे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना भाडेकरू ट्रोलर्सचा प्रतिवाद करणे कठीण झाले होते. काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट होत होती, संघटनेची पडझड होतच होती. भारत काँग्रेसमुक्त करण्याची सुडाची मोहीम यशस्वी होण्याच्या मार्गावर होती, काँग्रेस कधीच उभारी घेऊ शकणार नाही आणि राहुलच काँग्रेस संपवणार असा समज निर्माण करण्यात यश आलेलं होते आणि त्यावर विश्वास वाटण्यासारखी परिस्थिती होती. 

                     सर्व बाजूंनी निराशाजनक परिस्थिती होती, सारं काही संपल्यात जमा होते. ज्यांच्यासाठी लढायचे तेच खिल्ली उडवत होते. पिढ्यान् पिढ्या सत्ता असताना सोबत राहून आपापली संस्थाने निर्माण केलेले सरंजाम भीतीने वा फायदा बघून साथ सोडून गेले होते. सोबत फारसे कोणी नव्हते पण तीन चार पिढ्यांची पुण्याई राहुलच्या पाठीमागे होती, कित्येकांच्या वडिलांनी, आजोबा-पंजोबांनी त्यांच्यासाठी केले नसेल त्यापेक्षा जास्त राहुलच्या वडिलांनी, आजोबा-पंजोबांनी देशातील जनतेसाठी केले आहे. भारताच्या जडणघडणीत त्यांचे भरीव योगदान आहे. पक्षाची, स्वतःची राखरांगोळी झालेली असताना त्या राखेतून राहुल भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेपावला. तो जिद्दीने भारतभर चालत राहीला. कडाक्याच्या थंडीत, उन्हातान्हात, काश्मीर मधल्या बर्फात स्वतःचा मार्ग निर्माण करत राहिला. भारत, भारतातील जनता समजून घेत राहिला शेतकरी, कामगार, नोकरदार, कष्टकरी सगळ्यांशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे आपुलकीने ऐकून घेतले. हळूहळू का होईना जनतेला त्याची गोरगरिबांविषयीची तळमळ जाणवू लागली. त्याच्या विरोधकांनी त्याला रोखण्यासाठी जे करता येईल ते केले खासदारकी रद्द केली, घर काढून घेतले, बँक खाती गोठवली त्याला अडचणीत आणायची एक संधी सोडली नाही. अनेक आघात सोसूनदेखील न डगमगता लढत राहिला पण कधी आपला तोल ढळू दिला नाही आपली खानदानी आदब त्याने राखली. चेहऱ्यावरचे हसू ओसरू दिले नाही, एकप्रकारे त्याने खात्रीच दिली की तुम्ही त्याच्यावर कितीही टीका केली तरी तो सुडभावनेने वागणार नाही. या सगळ्यातून तो आता ताऊन, सुलाखून निघाला आहे त्याची प्रतिमा त्याने मेहनतीने उजळवली आहे. त्याचे फळ म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीत सगळे काही विरोधात असताना चांगले यश मिळाले आहे. विरोधात असताना तो ताठ मानेने, नजरेला नजर भिडवून बोलत असतो या उलट सत्तेत असून त्याच्या विरोधकांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत आहे, माना झुकलेल्या आहेत. लोकसभेतील विरोधकांच्या वागण्यातील सहजता आणि सत्ताधाऱ्यांच्या वागण्यातील अवघडलेपण बरेच काही सांगून जाते. चेहऱ्यावर जे नीतिमत्तेचे तेज आहे ते पैशाने, सत्तेने, बळजबरीने विकत घेता येत नाही ते चांगल्या कर्तुत्वाने आणि निर्मळ मनाने कमवावे लागते. युवराज, शहजादे म्हणून त्याची हेटाळणी करणाऱ्यांना, युवराज शहाजादा कसा असतो याचा वस्तुपाठच त्याने घालून दिला आहे.

                 राहुल गांधीच्या जागी आपण आपल्याला ठेऊन पहा, कित्येकांना आज ड्रीम इलेव्हन किंवा कुठल्यातरी एखाद्या प्लॅटफॉर्मवर दोन तीन कोटी भेटले तर तात्काळ नोकरीचा राजीनामा देऊन शांतेत जीवन जगायची इच्छा असेल. राहुलला हे सगळं करताच आले असते. सर्वच बाबतीत खानदानी श्रीमंती असताना त्याने हा काट्याचा मार्ग कशाला निवडला असता तो देखील कसली ओढ नसताना. राहुल किंवा त्याचे समर्थन करणाऱ्यांची हेटाळणी करणाऱ्यांना एवढे सांगायचे आहे की तुमच्या मनात रावल्याबद्दल एवढा द्वेष नसता तर आमच्याही मनात रावल्याबद्दल एवढे प्रेम नसते. तुम्ही ज्यांची भक्ती करता त्या नेत्यावर टीका करून बघा त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा अनुभव घेऊन बघा. राहुलशी कोणत्याही बाबतीत त्याची माझी बरोबरी नसली तरी मी त्याच्यावर टीका करू शकतो, त्याला रावल्या बोलू शकतो आणि आपण राहुलला प्रेमाने वा रागाने रावल्या म्हणले तरी तो आपल्याशी आदबीनेच बोलेल. मी त्याला रावल्या म्हणले तरी तो मला संतोषजी म्हणूनच बोलणार आणि म्हणून रावल्या आपला मित्र आहे. अर्थात राहुलचेही काही अंधभक्त असतील त्यांना हे असे रावल्या बोलणे आवडणार नाही पण त्यांच्या आवडण्या न आवडण्याचा आपल्याला काही फरक पडत नाही. अंधभक्त कोणाचेही असोत त्यांची फिकीर आपण करायची नाही. राहुल गांधी काही माझा नेता नाही किंवा मी काँग्रेस किंवा कोणत्याच पक्षाला बांधील नाही. मला ज्यावेळी जो योग्य वाटेल त्याला मी मतदान केले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार, सुप्रियाताई), काँग्रेस(संजय जगताप) आणि शिवसेना (विजय शिवतारे) या पक्षांना त्या त्यावेळी असलेल्या परिस्थिती नुसार मतदान केले आहे आणि मी ज्यांना मतदान केले आहे ते निवडून आलेच आहेत. निवडून दिलेल्यापैकी मी कोणाचाही समर्थक किंवा कार्यकर्ता नाही उलट त्यांनी जेव्हा काही समाजाच्या हितास बाधा आणणारी भूमिका त्यावेळी मी मला जमेल तसा विरोध केला आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतची माझी भूमिका जगजाहीर आहेच आणि त्याचे परिणामही बघितले असतील. जेव्हा कधी काँग्रेस सत्तेत येईल तेव्हा मी काँग्रेस आणि राहुल गांधींचा पूर्वीपेक्षा तीव्र विरोधक असणार आहे, कारण पुन्हा 'अच्छे दिन' पाहणे परवडणार नाही आणि ते 'अच्छे दिन' पुन्हा पाहण्याची हिंमत सर्वसामान्य जनतेमध्ये राहिलेली नाही. राहुलला राजकारणाचा मोठा वारसा आहे, तो लढतोय, त्याच्यावर अन्याय होतोय म्हणून त्याला साथ देऊ नका. तो जे करतोय ते तुमच्या फायद्याचे, येणाऱ्या पिढ्यांच्या फायद्याचे पर्यायाने समाजाच्या, देशाच्या फायद्याचे असेल तरच समर्थन द्या अन्यथा त्याला प्राणपणाने विरोध करा, आपण काही कोणाचे मिंधे नाही आणि कोणी आपले घर चालवत नाही आपल्यालाच आपल्या आणि कुटुंबियांच्या भल्यासाठी कष्ट करायचे आहेत.          

                  यानिमित्ताने मला एकच गोष्ट अधोरेखित करायची आहे की कोणत्याही राजकीय पक्षाच्या चुकीच्या धोरणांची, नेत्यांच्या चुकीच्या गोष्टींची बाजू घेणे जनता म्हणून आपल्या सर्वांच्या अंगलट येऊ शकते. एखादया राजकीय पक्षाची विचारधारा कितीही आवडत असली म्हणून पक्षाच्या, नेत्याच्या चुकीच्या गोष्टींसाठी आपण कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळून नैतिक, न्याय बाजू असणाऱ्या कोणालाही अंगावर, शिंगावर घ्यायचे नाही. त्यात तो आपला लाडका पक्ष खुनशी, द्वेष पसरवणारा असेल, घातकी असेल तर तुम्ही किती त्यांचे समर्थक असाल, पक्षासाठी किती झटले असाल, त्याग केला असेल तरी पक्षनेतृत्व गरज पडली तर तुमचा बळी द्यायला बिलकुल कचरत नाही. जे पहिल्या फळीतील नेते आहेत, ज्यांनी पक्ष वाढीसाठी भरीव योगदान दिलेले आहे अशांना देखील पद्धतशीर पणे बाजूला करण्यात येते, कार्यकर्ते तर त्यांच्या खिजगणीतही नसतात त्यामुळे तुम्ही ज्यांना समर्थन देता ते खरोखर तुमचे नेते आहेत की तुमचे वापरकर्ते आहेत याची स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीने शहानिशा करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडत्या नेत्याचा, पक्षाचा जरूर उदोउदो करा, भक्ती करा पण बुद्धी गहाण ठेऊन अंधभक्त बनू नका. चांगल्या चांगले आणि वाईटाला समजण्याइतकी बुद्धी शिल्लक ठेवा. तुमच्या अंधभक्तीचे वाईट परिणाम केवळ तुम्हालाच नव्हते तर तुमच्या येणाऱ्या पिढ्या , तुमचे आप्तेष्ट सर्वांच भोगावे लागणार याची जाण ठेवा. जो तुमच्या भल्याचा, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचा विचार करेल, तुम्हाला समाजात निर्भयपणे , स्वतंत्रपणे वावरता येईल असा समाज घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर कोणाच्याही कसल्याही भावनिक आवाहनांना बळी न पडता तुमच्या भल्यासाठी अशा नेत्यासोबत, पक्षासोबत ठामपणे उभे रहा. 

                                 संतोबा...

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!