Ads 468x60px

Monday, January 26, 2026

मराठी भैय्ये अर्थात खानदानी आईबापांच्या लावारिस अवलादी

स्वातंत्र्यानंतर भारतात राज्यांची पुनर्रचना भाषेच्या आधारावर करण्याच्या मागणीने जोर धरला. States Reorganisation Act 1956 अंतर्गत अनेक राज्ये भाषेवर आधारित झाली, पण महाराष्ट्र-गुजरातसाठी द्वैभाषिक मुंबई राज्य (Bilingual Bombay State) निर्माण झाले. मुंबई हे आर्थिक केंद्र असल्याने गुजराती व्यापारी वर्ग, काँग्रेसमधील काही नेते आणि केंद्र सरकारला मुंबई केंद्रशासित ठेवायची होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह गुजराती, पारशी, मारवाडी इत्यादी लोकांनी मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध केला. या सर्व विरोधांमुळे संयुक्त महाराष्ट्र समितीने (एस. एम. जोशी, एस. ए. डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे इत्यादी) तीव्र आंदोलन केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दीर्घ आणि रक्तरंजित लढ्याचा विजय झाला, १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर अखेर १ मे १९६० रोजी बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट अंतर्गत मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. भाषिक प्रांतवार रचनेनुसार मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. मराठी अस्मितेसाठी आणि मुंबईसाठी १०६ हुतात्म्यांचे बलिदान द्यावे लागले, हे बलिदान आजही मराठी माणसाच्या एकात्मतेचे आणि भाषिक अस्मितेचे, अभिमानाचे प्रतीक आहे. मोठ्या संघर्षाने अस्तित्वात आलेला महाराष्ट्र हा नेहमीच प्रगतिशील मार्गावर चालत आला आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रभागी आहे किंबहुना अनेक क्षेत्रांची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवलेली आहे. महाराष्ट्राला अनेक समाजसुधारकांचा, संतांचा, सुसंस्कृत राज्यकर्त्यांचा वारसा लाभलेला आहे. अनेक राज्यकर्ते, समाजसुधारक, संत, राजकारणी, उद्योगपतींनी महाराष्ट्र आणि पर्यायाने देश घडवलेला आहे. सर्वांचा परिपाक म्हणून इतर राज्यांच्या तुलनेने सर्व घटकांसाठी राहण्यासाठी सुरक्षित राज्य आहे म्हणून देशभरातील लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात स्थिरस्थावर होत आहेत.
अलीकडच्या साधारणपणे एकदोन दशकापासून महाराष्ट्राची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या पीछेहाट होत आहे तरी देखील अजूनही महाराष्ट्राची कोणत्याच बाबतीत देशातील इतर राज्यांबरोबर तुलना होऊ शकत नाही. अनेक राज्यातील लोक येथे स्थलांतरित होतात, ते येथे केवळ पोटापाण्यासाठी येतात अशातला भाग नाही तर एक सुरक्षित, सन्मानजनक जीवन जगण्यासाठी येतात. असे हे सर्व असताना महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अवकाशात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. सगळं काही असूनही एक त्याच्या आयुष्यात रितेपणा आलेला आहे. सर्वच बाबतीत मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा दैदिप्यमान वारसा असताना त्याला दुसऱ्याच्या कलंकित विकृतीची भुरळ पडली आहे. मराठी माणसाने काय केलं नाही? मराठी माणसाने स्वराज्य उभं केलं, अगदी अटकेपर झेंडे रोवले. लोकशाहीत स्वराज्याच्या धरतीवर लोककल्याणकारी राज्य चालवण्यासाठी राज्यघटना लिहिली. स्वतंत्र भारताच्या पहिल्या नोटेवर सही केली, मुलींना अन्याय्य रूढी परंपरेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी देशातील पहिली मुलींची शाळा काढली. त्या शाळेत शिकवणारी पहिली महिला शिक्षिका बनली. देशभरातील कामगारांना रविवारची हक्काची आठवडी सुट्टी मिळवून दिली. इथल्या संतांनी वारकरी संप्रदायाची पताका पंजाबपर्यंत नेली, त्यांनी अन्याय रूढी, परंपरावर, चमत्कारावर टीका करून समतेचा मार्ग दाखवला. मराठी माणसाने साहित्य, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात नावलौकिक कमावला आहे. असे असताना काही मराठी भैय्यांच्या मनात स्वतः बद्दल, स्वतःच्या भाषेबद्दल, संस्कृती आणि एकूणच सर्व गोष्टीविषयी न्यूनगंड निर्माण झाला आहे. त्याला स्वतःचा दैदिप्यमान वारसा अडगळीत टाकून, दुसऱ्याचा विकृत वारसा अंगीकारण्याची विपरीत बुद्धी झाली आहे.
नैसर्गिकपणे आपल्याला चांगल्या गोष्टींचे आकर्षण असते, आज आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा अधिक चांगले मिळावे असा आपला प्रयत्न असतो. चांगल्या राहणीमानासाठी अन् एकूणच आपले जीवनमान उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्यासाठी आपण त्या-त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांना आपला आदर्श मानत असतो. मराठी भैय्ये कदाचित या गोष्टीला अपवाद आहे की काय असे आता वाटू लागले आहे. ज्या गोष्टींचा अभिमान बाळगायला हवा त्या गोष्टींची लाज मराठी भैय्यांना वाटत आहे. ज्यांच्यामुळे कार्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आला, ज्यांच्यामुळे कार्यामुळे आपल्याला सामाजिक सुरक्षितता लाभली, ज्यांच्यामुळे कार्यामुळे आपली वैयक्तिक प्रगती झाली, ज्यांच्यामुळे कार्यामुळे आपल्याला पोटापाण्यासाठी आपल्या भागातून परागंदा व्हायला न लागता आपल्या राज्यात स्वाभिमानाने जगता येतेय, ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात चांगला बदल झालेला आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञ रहाण्याऐवजी त्यांचा द्वेष करण्याची चढाओढ त्यांच्यामध्ये लागलेली आहे. अनेक उच्चशिक्षित आणि सुरक्षित जीवन जगणाऱ्या अनेकांना अल्पशिक्षित, विध्वंसक, दूरदृष्टीचा अभाव असलेले, घटनाबाह्य, अनैतिक कार्य करणारे टपोरी नेते अचानक हिरो वाटू लागले आहेत. महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि संत यांचे कार्य त्यांना मातीमोल वाटू लागले आहे. मातृभाषेत बोलणे त्यांना कमीपणाचे वाटू लागले आहे. इथल्या मराठी भाषेवर, नात्यांवर, सणांवर, देवदेवतांवर उत्तरेकडील सांस्कृतिक आक्रमण त्याने स्विकारून ते अंगिकारले आहे. त्याला तिथल्या राहणीमानाची भुरळ पडली आहे. त्याने स्वतःच स्वतःच्या अस्मिता पायदळी तुडवल्या आहेत आणि आता त्याचे अस्तित्व नष्ट होण्याची वेळ आली आहे तरी तो निर्धास्त आहे.
एका सुसंस्कृत, खानदानी, प्रगतीशील, पुरोगामी राज्यात भिकेचे डोहाळे लागलेल्या या लावारिस औलादींची वाढती पैदास मन विषण्ण करणारी आहे. हे मराठी भैय्ये कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ आहेत. मानवाला हिंसा, बदला, द्वेष करण्यास प्रोत्साहन देणारी कट्टरवादी विचारसरणी आकर्षित करते. मराठी भैय्यांनाही तिचीच भुरळ पडली आहे, त्यांना आपण कोणत्या गोष्टीं डोक्यावर घेऊन नाचत आहोत याचे साधे भान सुद्धा राहिलेले नाही. मराठी भैय्यांना गायपट्ट्यातील नेत्यांचे, संस्कृतीचे, सणावारांचे, प्रथा परंपरांचे आकर्षण निर्माण झाले आहे. त्यांना आता पंढरीचा विठ्ठल नको, जेजुरीचा खंडोबा नको, कोल्हापूरची अंबाबाई नको अन् तुळजापूरची तुळजाभवानी नको त्याला ढोंगी, पाखंडी बाबांची ओढ लागलीय. त्यांना आता दसरा दिवाळी नको अन् भोंडला नको त्यांना आता गरबा पाहिजे अन् करवा चोथ पाहिजे कदाचित काही वर्षांनी छटपूजा महाराष्ट्राचा मुख्य सण असेल. या सर्व वाताहतीला येथील मराठी राजकारणी आणि त्यांचे चेलेचपाटे जबाबदार आहे, त्याचबरोबर आपला पराकोटीचा परधार्जिणेपणाही जबाबदार आहे. परप्रांतीयांची संख्या उत्तोरत्तर वाढत गेली आणि निवडणुकीत त्यांच्या मतांचा टक्का निर्णायकी ठरू लागल्यावर राजकीय पक्षांकडून अन् नेत्यांकडून परप्रांतीयांचे लांगुलचालन चालू झाले. मतांच्या बेगमीसाठी राजकारण्यांनी परके उरावर घेतलेत अन् घरचे वाऱ्यावर सोडलेत. त्याचाच परिपाक म्हणून मराठा आंदोलनावेळी हॉटेल, पाणी, शौचालये बंद ठेवून आपल्याच महाराष्ट्रातील आंदोलकांची मुंबईत कोंडी केली पण छटपूजेसाठी परप्रांतीयांसाठी पायघड्या घातल्या त्यांची व्यवस्थित सोय केली.
देशातील अनेक दिग्गज राजकारणी, उद्योजक, आणि बऱ्याच अमहाराष्ट्रीयन लोकांना महाराष्ट्राबद्दल असूया आणि द्वेष आहे त्यामुळे त्यांचे जाणीवपूर्वक मराठी माणसांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न कित्येक वर्षांपासून चालू आहेत. स्थलांतरित परप्रांतीय मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला कमी लेखतात. महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळवले जात आहेत, महाराष्ट्रातील महत्त्वाची आर्थिक केंद्रे दुसऱ्या राज्यात हलवली जात आहेत. महाराष्ट्रातील प्रकल्पाची ठेके(कंत्राटे) दुसऱ्या राज्यातील ठेकेदारांना दिले जात आहेत. मराठी लोकांना आळशी, कौशल्यहीन म्हणून नोकऱ्या नाकारल्या जातात. 'No jobs for Marathi' म्हणून जाहिराती दिल्या जातात. मराठी माणसांना घरे नाकारली जातात. मराठी लोकं मांसाहार करतात म्हणून घाणेरडी आहेत अशी हेटाळणी करत मानहानी केली जाते, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मामाच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा आहे म्हणून मराठी लोकांवर प्रचंड खालच्या दर्जाची टीका केली जाते. हे इतके डोईजड होत चालले आहे की आता युपीबिहार वाले मुंबईत स्थानिक झालेत आणि सातारा, सांगली, कोल्हापूरकर परप्रांतीय झालेत. सातारा, सांगली, कोल्हापूरच्या लोकांना मुंबईत नोकऱ्या दिल्या जाऊ नयेत असे उत्तर भारतीय सेनेचा अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला खुलेआम बोलतो. महाराष्ट्र काबीज करण्याची, महाराष्ट्रावर वर्चस्व गाजवण्याची चिथावणी देतो. बदला घेण्याची भाषा करतो, शस्त्रास्त्र असणाऱ्यांना आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण देतो. अनेक परप्रांतीय इथे गुन्हे करून जातात, अनेक अनैतिक धंदे करतात, भेसळ करतात. नैतिकता नीतिमत्ता यांच्या गावी नसते. पण यांच्यावर काही कारवाई होत नाही. यांना आवर घालणे शासन-प्रशासनाच्या आवाक्याबाहेर आहे की शासन-प्रशासनाचाच ह्यांना आशीर्वाद आहे हेच कळत नाही. मराठी भाषेची, महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि मराठी माणसाच्या कर्तृत्वाची जाणूनबुजून मानहानी होत असताना इथल्या राज्यकर्त्यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान पायदळी तुडवणारांच्या विरोधात ठाम भूमिका घ्यायची सोडून त्यांचीच बाजू घेत आहेत. अनेक लाचार, गद्दार, कणाहीन नेते महाराष्ट्रात हिंदी अधिकृत करण्याच्या कटात सामील झालेत. मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीपेक्षा, स्वाभिमानापेक्षा त्यांची पक्षनिष्ठा मोठी झाली आहे. विविध पक्षाचे नेते, प्रवक्ते हिंदीची तळी उचलताना दिसत आहेतच पण त्यांचे सतरंजी उचले कार्यकर्ते दुप्पट जोमाने समर्थन करताना दिसत आहेत.
या मराठी भैय्यांना वठणीवर आणण्यासाठी आपण दोन गोष्टी करू शकतो, एक म्हणजे जे चालले आहे ते तसेच चालू द्यावे त्याला विरोध करू नये. सारं उद्ध्वस्त होऊ द्यावे. पायाभूत सुविधांचा, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडू द्यावा. शाळा बंद होऊ द्याव्यात, शिक्षणाच्या अभावाने, गुन्हेगारी, बेरोजगारी फोफावू द्यावी. मराठी भैय्यांना ज्या प्रदेशाचे आकर्षण आहे तशी परिस्थिती इथे निर्माण होऊ द्यावी. पुढे जे होईल ते त्यांना भोगू द्यावे. आपल्याच राज्यात त्यांना दुय्यम वागणूक मिळू द्यावी. त्यांच्या नेत्यांच्या इच्छेनेनुसार महाराष्ट्राचे तुकडे पडत असताना, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे कारस्थान चालू असताना आपण त्याला विरोध करू नये. यामध्ये अडचण अशी आहे की हे सगळे भोग मराठी भैय्यांसोबत आपल्याला आणि सर्वसामान्य जनतेलाही भोगावे लागतील. प्रतिगामी कट्टरवादांमुळे मराठी भैय्यांच्या भावना बोथट झाल्यामुळे त्यांना कदाचित त्रास होणार नाही पण सर्वसामान्य मराठी जनतेला मात्र सर्वांना प्रचंड त्रास होईल. सारं काही उद्ध्वस्त व्हायला फार वेळ लागणार नाही. सारं उद्ध्वस्त झाल्यानंतर पुन्हा ही व्यवस्था उभारण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागेल. कोणतीही गोष्ट, व्यवस्था उद्ध्वस्त व्हायला फार वेळ लागत नाही आणि ती उद्ध्वस्त करायला फार हुशार असण्याची गरज नसते. पण एखादी व्यवस्था उभारण्यासाठी दूरदृष्टीची गरज आणि बराच कालावधी लागतो. कायम प्रयत्नशील राहून सतत ती व्यवस्था दिवसेंदिवस परिपक्व करावी लागते. महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, येथील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवस्था उद्ध्वस्त झाली तर ती पुन्हा उभारण्यासाठी पिढ्या खर्ची पडतील आणि ते आपल्याला कोणालाच परवडणारे नाही.
दुसरी गोष्ट आपण निश्चित करू शकतो आणि तीच आपण करायला हवी. साधारपणे चार-दोन कर्तृत्ववान पिढ्यानंतर एखादी पिढी निष्क्रीय, नालायक उपजते, जी बापजाद्यांनी रक्ताच पाणी करून कमावलेले संचित, इज्जत उधळून मोकळी होते. आताची ही पिढी नादान, बेजबाबदार आहे असे समजून आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल. महाराष्ट्र अन् महाराष्ट्राचा वैभवशाली, दैदिप्यमान वारसा वाचवणे, आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्य अन् स्वायत्ततेचे रक्षण करणे, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व्यवस्था सुधारणे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे. यासाठी आपल्याला या मराठी भैय्यांना आणि सर्वसामान्य लोकांना सतत सत्याची, वास्तवाची जाणीव करून देत राहिले पाहिजे. ते ज्यांच्या नादी लागलेत त्या विचारसणीच्या व्यवस्थेतील फोलपणा अन् त्या व्यवस्थेत त्यांचे, सर्वसामान्य लोकांचे काय स्थान असेल याची जाणीव त्यांना करून देणे गरजेचे आहे. घर, कार्यालय, कार्यक्रमात जिथे भेटतील तिथे आप्तेष्ट, मित्रमंडळी, सहकारी यांच्याशी याविषयी बोलून त्यांच्यात जागृतता निर्माण करणे गरजेचे आहे. हा छत्रपतींचा लढवय्या महाराष्ट्र आहे, ईमानी, लढवय्ये मावळे महाराजांच्या सोबतीने स्वराज्याच्या शत्रूसोबत लढले. धाकल्या महाराजांनंतर अनेक सरदार, सरंजाम आपल्याला गढ्या, वतनदाऱ्या वाचवण्यासाठी गुजरातेत जन्मलेल्या औरंगजेबाच्या दरबारात कुर्निसात करत होते त्यावेळी हे कडवे मावळे स्वराज्याच्या रक्षणासाठी लढले, कटून धारातीर्थी पडत होते पण त्यांनी स्वराज्य औरंग्याच्या घशात जाऊ दिले नाही. शेवटी स्वराज्यद्रोही औरंग्या इथेच मेला अन् इथेच गाडला गेला. आताही बडे बडे महाराष्ट्राचे नेते म्हणवणारे सरंजाम सत्तेच्या वळचणीला जाऊन आपापली वतनदारी वाचवण्यासाठी दिल्लीश्वरांचे तळवे चाटत आहेत, त्या गद्दार महाराष्ट्रद्रोह्यांना बाजूला ठेऊन आपण महाराष्ट्र, मराठी अन् महाराष्ट्र वाचवायचा निर्धार करूया त्यासाठी आपण तीव्र संघर्ष करू. आपला कोणाला विरोध नाही, ना आपण कोणाचा द्वेष करतोय. आपला संघर्ष आपल्या अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी आहे. या संघर्षात आपण सर्व एकत्र येऊन एकजुटीने लढूया, या लढ्यात आपण निश्चित यशस्वी होऊ याची खात्री आहे.
जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र!!!
संतोबा...

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!