Ads 468x60px

Tuesday, December 23, 2025

विचारधारा आणि द्वेषधारा.

                 माणसांमाणसांत भेदाभेद न करता अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी, चांगला बदल स्विकारणारा सर्वसमावेशक प्रवाही आणि प्रभावी विचार म्हणजे विचारधारा. वंशश्रेष्ठत्वाचा अहंकारातून माणसांमाणसांत भेदाभेद करणारा, विकृत नरसंहार करण्याची इच्छा बाळगणारा रक्तपिसासू विचार म्हणजे द्वेषधारा. नैसर्गिक हक्क आणि न्यायाचा स्विकार म्हणजे विचारधारा तर त्यास नकार म्हणजे द्वेषधारा. विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध, तर्कनिष्ठ मांडणीच्या आधारे प्रगतीचा मार्ग दाखवणारी पद्धत म्हणजे विचारधारा. भ्रामक, काल्पनिक अंधश्रध्देच्या जोखडाखाली बहुसंख्य जनतेला अडकवून स्वतः वंशपरंपरागत विशेषाधिकार पदरात पाडून घेणारी व्यवस्था म्हणजे द्वेषधारा. द्वेषधारा मूठभर लोकांच्या विशेषाधिकाराच्या संवर्धनासाठी बहुसंख्य लोकांना मानसिक गुलामगिरी बंदिस्त करण्याचा कावेबाजपणा करते. विचारधारा पिढ्यान् पिढ्यांच्या अन्याय रूढी- परंपरांना झुगारून सर्वसामान्य जनतेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी झटत असते. द्वेषधारा विरोधकांचा तिरस्कार करते, त्यांना संपवण्याचा प्रयत्न करते. विचारधारा विरोधकांनाही मार्गदर्शन करते, त्यांच्याही हिताचा विचार करते. द्वेषधारावाले कधीही सकारात्मक कार्य करू शकत नाही, अगदी आपण बरोबर आहोत हे पटवून देण्यासाठी सुद्धा ते दुसरे कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. जबाबदारी झटकण्यात द्वेषधारावाल्यांचा हातखंडा असतो. अस्मिताचे भांडवल करून आपले दुकान कसे चालवायचे याचे कसब त्यांनी आत्मसात केलेले असते. थोडक्यात असे म्हणता येईल विचारधारा ही प्रागतिक पुरोगामी तर द्वेषधारा ही अधोगतीक प्रतिगामी असते. 
                        विचारधारा बहुतेकदा समाजकल्याणाच्या चिंतनातून उगम पावते. त्यासाठी सखोल अभ्यास, सर्वांगीण बाजूचा विचार करावा लागतो. पारंपारिक, कालबाह्य, अन्याय्य गोष्टींना छेद देत नवीन समाजकल्याणाचा विचार रुजवावा लागतो. विचारधारा समानता, सामाजिक न्याय आणि सामूहिक हिताचा विचार करते.विचारधारा समाजाला दिशा देते, समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करते आणि लोकांना जोडण्याचे काम करते. विचारधारा ही सकारात्मक शक्ती आहे जी समाजाच्या उन्नतीसाठी आणि न्यायासाठी काम करते. विचारधारा ही संपूर्ण समाजाच्या हिताची असते अगदी विचारधारेला विरोध करणाऱ्याच्याही हिताची असते. द्वेषधारा बहुतेकदा भेदभाव, ईर्षा, पूर्वग्रह किंवा वर्चस्ववादातील संघर्षांमधून उगम पावते (वर्णभेद, जातीयवाद, धार्मिक कट्टरता). द्वेषधारा समाजात दुही निर्माण करते, नकारात्मक वातावरण निर्माण करते. द्वेषधारा नकारात्मक आहे, ती विनाश घडवते, सामूहिक दंगली किंवा युद्धांना जन्म देते. द्वेषधारा कोणाचा ना कोणाचा तिरस्कार करून हिंसा करण्यास प्रोत्साहन देत असते. द्वेषभावनेने भारलेली व्यक्ती कायम समोरच्याच्या चुका शोधते, दुसऱ्यांच्याबाबत कायम संशयी असते. सततच्या तिरस्कारामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास गमावते. अशी व्यक्ती समोरच्याशी एकटी लढू शकत नाही, त्यासाठी तिला समद्वेषीविचारी समूहाचा आधार लागतो. त्याचप्रमाणे द्वेषधारेला निर्बुद्ध झुंडींची गरज असते, झुंडीशिवाय द्वेषधारेचे अस्तित्व शून्य असते. दुसरीकडे ठाम विचारधारेचा व्यक्ती कितीही मोठ्या झुंडीला एकट्याने सामोरे जाण्याचे सामर्थ्य बाळगून असतो.
                       द्वेषधारा कधीही कोणाचे कायमस्वरुपी कल्याण करू शकत नाही. द्वेषधारा प्रत्येकासाठी घातकच असते, आज जे लोक अशा विचारधारेचे समर्थन करतात आणि या विचारधारेच्या बरहुकूम काम करणाऱ्या लोकांच्या कोणत्याही द्वेषपूर्ण कृतीचे, विकृतीचे समर्थन करतात त्यांना आज ना उद्या त्यांना तशाच विकृतीला बळी पडावे लागणार असते. प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचा शेर याचे चपखल उदाहरण देतो "लगेगी आग तो आएंगे कई घर जद मे, यहा पे सिर्फ हमारा मकान थोडी है..!". द्वेषधारा म्हणजे उन्माद अन् विचारधारा म्हणजे संवाद. द्वेषधारा आपसूकच आत्मसात केली जाते कारण त्यासाठी काही तर्क, विचार करण्याची गरज नसते. त्यामुळे द्वेषधारेच्या उन्मादी, विखारी प्रचाराला बहुसंख्य लोक सहज बळी पडतात आणि त्यांच्या निर्बुद्ध झुंडी निर्माण होतात. जिथे झुंडी होतात तिथे विवेक हरवतो. या उन्मादी झुंडी सारासार विचार न करता एखाद्या झोंबीप्रमाणे सारं काही उद्ध्वस्त करतात. त्यांची विकृत कृत्ये सोडा अगदी त्यांच्या वागण्याबोलण्यातही सुसंगतता नसते, ते ज्यांचा विरोध करतात त्यांचाच त्यांना नाईलाजाने का होईना उदोउदो करावा लागतो. उदाहरणार्थ भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या समतावादी विचारांमुळे आणि कार्यांमुळे काही राजकीय, सामाजिक संघटनांकडून प्रचंड द्वेष केला जातो. या द्वेषी लोकांचे आदर्श एवढे खुजे आहेत की त्यांचे कितीही उदात्तीकरण केले तरी आणि ते त्यांच्यासाठी कितीही पूजनीय असले तरी त्यांच्या अंधभक्तांच्या कोंडाळ्या बाहेर जगजाहीर त्यांचा उदोउदो ते करू शकत नाही. जेव्हा हे द्वेष करणारे लोक परदेशात जातात तेव्हा देशात ते ज्यांचा द्वेष करतात त्यांचाच परदेशात उदोउदो करतात कारण या महापुरुषांचे कार्य एवढे उत्तुंग आहे की जगभरात त्यांना मान्यता आहे. विविध देशाचे प्रतिनिधी आपल्या देशात येतात तेव्हा त्यांना गांधीजींच्या समाधी स्थळावर राजघाटावर घेऊन जातात, बुद्धाची प्रतिमा, फुले - आंबेडकरांची पुस्तके भेट देतात पण चुकूनही द्वेषधारासमर्थक अनुयायांच्या आदर्शांचा उल्लेख करत नाहीत एवढे त्याचे आदर्श खुजे असतात. 
                       द्वेषधारा प्रवर्तक आणि समर्थक दुतोंडी गांडूळांसारखी असतात. दुसऱ्यावर अन्याय करताना कसलाही विधिनिषेध न बाळगणारे, नितीनियम पायदळी तुडवणारे, दुसऱ्यांवर अन्याय होत असताना, दुसऱ्यांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असताना त्या शोषितांची खिल्ली उडवणारे, एखादी घटना त्यांच्या अंगलट आल्यावर त्यांना लगेच मानवाधिकार, लोकशाही आणि संविधान आठवते. व्हिक्टिम कार्ड खेळण्यात त्यांचा हातखंडा असतो. त्यांना दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. खरंतर विचारधारा आणि द्वेषधारा यांचे मूठभर प्रवर्तक असतात, सर्वसामान्य लोक आपापल्या वैचारिक कुवतीनुसार विचारधारा आणि द्वेषधारेचे समर्थक बनतात. द्वेषधारेच्या प्रवर्तकांनाही विचारधारेचे महत्व आणि द्वेषधारेचा फोलपणा माहीत असतो. ते स्वतः विचारधारेच्या मार्गाचे पालन करून आपला फायदा करून घेतात पण आपल्या समर्थकांना द्वेषधारेचे पालन करण्यास भाग पाडतात. त्यांना वांझोट्या, निरुत्पादक गोष्टीत गुंतवून सार्वजनिक संसाधनांचा वापर करण्यातील स्पर्धा संपवून आपला स्वार्थ साधून घेतात. द्वेषधारेचे प्रवर्तक मूलभूत गरजा,आरोग्य, शिक्षण, रोजगार, याबद्दल बोलणार नाहीत, ते तुम्हाला शिक्षण घ्या, व्यवसाय करा, त्यासाठीचे कला कौशल्य आत्मसात करा असे सांगणार नाही. ते तुम्हाला कोणाला तरी तुमच्या दुरावस्थेला जबाबदार ठरवून त्यांचा द्वेष करायला भाग पाडतील. ते लोकांना पाखंडी त्यांचे तारणहार म्हणून भासवतील, त्यांची सेवा करायला भाग पाडतील , दानधर्म करायला सांगतील, पाखंडी, अनिष्ट रूढी यांचे पालन करायला भाग पाडतील.
                      नरसंहार, विध्वंस करणाऱ्या रक्तपिसासूपेक्षा रचनात्मक कार्य करणाऱ्या, नवनिर्मिती करणाऱ्याला कायम लक्षात ठेवलं जाते. पिढ्यान् पिढ्यासाठी त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असते. त्यांच्या कर्तुत्वाचा प्रकाशात कित्येक पिढ्यांचे जीवन उजळून निघते. असे असले तरी द्वेषधारेच्या समर्थकांच्या तुलनेत विचारधारेचे समर्थक फार कमी असतात. सांख्यिकदृष्ट्या एकजूट असल्याने लोक सामाजिक स्वीकृतीसाठी द्वेषधारेच्या गटाच्या विचारांशी लोकं जुळवून घेतात. विचारधारा विनाकारण लोकानुनयन करत नाही. त्यामुळे विचारधारा स्विकारण्यासाठी आपला विवेक जागृत करावा लागतो, स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा लागतो. त्यासाठी पुरावे, तर्क आणि वस्तुनिष्ठतेनुसार विचार करणे, निर्णय घेणे आवश्यक असते आणि पूर्ण तार्किक विचार करायला वेळ आणि मेहनत लागते. मेंदू उत्क्रांतीने जलद आणि भावनिक विचारासाठी तयार झाला आहे, ना की पूर्ण तार्किकतेसाठी. मानवी मेंदूचे दोन भाग असतात : सिस्टम १(जलद, भावनिक, स्वयंचलित) आणि सिस्टम २ (हळू, तार्किक, प्रयत्नपूर्ण). बहुतेक वेळा सिस्टम १ चालते, कारण सिस्टम २ वापरणे ऊर्जा खूप खर्च करते (मेंदूला ग्लुकोज लागते). भावना (राग, भीती, प्रेम) तर्काला मागे टाकतात. उदाहरणार्थ आपल्या आवडत्या व्यक्तीच्या चुकीला समर्थन देणे. विचारधारा परिवर्तनीय, प्रवाही असते ती कायम नवनवीन चांगला बदल स्विकारत असतात. द्वेषधारा मात्र द्वेष, भेदाभेद, वर्चस्ववाद, वंशश्रेष्ठत्ववादाच्या डबक्यातून बाहेर पडू शकली नाही. समाजातील विवेकवादी लोकांचे कर्तव्य आहे की तरुण पिढीला त्यांच्या प्रगतीसाठी, व्यक्तीस्वातंत्र्यासाठी, मूलभूत हक्कांसाठी कोण झटले आहेत आणि कोणी विरोध केला आहे याची सतत जाणीव करून द्यायला हवी. त्यांना विचारधारेच्या मार्गावर आणून विवेकवादी बनवणे गरजेचे आहे. अर्थात या गोष्टीला वेळ लागले किंबहुना ही निरंतर चालणारी प्रकिया आहे आणि या प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांना सामावून घेणे वैयक्तिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी गरजेचे आहे.
                                                 संतोबा...

Monday, December 22, 2025

कावेबाज पाखंडी धर्ममार्तंड


                       आयुष्यातील-भविष्यातील अनिश्चितता. गूढ-रहस्यमयी, अनाकलनीय गोष्टींचा न होणारा उलगडा. अनामिक संकटांची भीती, मोठ्या संकटातून  अविश्वासनीयरित्या सुखरूपपणे बाहेर पडल्यानंतर आलेली  कृतज्ञतेची भावना. सततच्या अपयशातून आलेली हतबलता. आर्थिक - सामाजिक दुर्बलतेमुळे आलेली ओळखशून्यता. कळत-नकळत घडलेल्या चुकीमुळे,अपराधामुळे आलेल्या अपराधीपणाच्या भावनेतून सुटका व्हावी म्हणून तसेच अलौकिक सुखाच्या प्राप्तीच्या ओढीतून. तसेच कौटुंबिक वारसा, प्रथा, परंपरा यांचा प्रभाव, अन् समाजाने आपापल्या स्वीकारावे, समाजाचे पाठबळ मिळावे या भावनेतून आणि हे सारं नाकारले तर समाजातून बहिष्कृत होण्याचा दबाव आणि त्यायोगे होणाऱ्या टीकेपासून वाचण्यासाठी आणि अशा अनेक अपरिहार्यतेतून  सर्वसामान्य लोकं रूढी, परंपरा पर्यायाने धार्मिकतेकडे ओढली जातात. सर्वसामान्य माणसांच्या या भावनांचा, विश्वासाचा अन् बिकट परिस्थितीचा गैरफायदा हे त्या त्या धर्मातील पाखंडी धर्ममार्तंड घेत असतात. जगातील बहुतेक सर्वच धर्माचे धर्ममार्तंड आपापल्या धर्माच्या उदात्तीकरणासाठी काहीतरी अतार्किक,अनाकलनीय, आभासी गोष्टी आपल्या ओघवत्या वाणीने प्रसवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतात. निसर्गात अनेक चमत्कारिक, रहस्यमय गोष्टी आहेत तसेच कधी चमत्कारिक, रहस्यमय घटना घडत असतात. या चमत्कारिक, रहस्यमय गोष्टी , घटनांचा संबंध आपल्या धर्माशी जोडून आपला धर्म सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा करतात. असा हा सर्वश्रेष्ठ धर्म कायमच धोक्यात असतो आणि तो वाचवण्यासाठी धर्ममार्तंड सर्वसामान्य लोकांना आवाहन करत असतात. निस्वार्थ सेवाभावाला धर्माचा पाया बनवणे हे धर्ममार्तंडांचे मुख्य ध्येय असते.
                     खरंतर या पाखंडी धर्ममार्तंडांना धर्माशी आणि त्या धर्माच्या अनुयायांच्या अडचणींशी काही देणंघेणं नसते. त्यांना धर्माचा आणि त्यांच्या अनुयायांचा वापर करून आपला स्वार्थ साधून घ्यायचा असतो. ते स्वर्ग दाखवतील पण मार्ग दाखवणार नाहीत. देवाधर्माचे अवडंबर माजवून फक्त पाखंडी धर्ममार्तंडांचा फायदा होतो. सर्वधर्मांमध्ये सर्वधर्मसमभाव असेल किंवा नसेल पण सर्वधर्मीय बहुसंख्य पाखंडी धर्ममार्तंडांमध्ये स्वतःच्याच धर्माच्या अनुयायांना लुबाडण्याची कला वादातीत असते. हे धर्ममार्तंड काल्पनिक आख्यायिका रचून, अख्ख्या समाजाला पिढ्यान् पिढ्यां आपल्या नियंत्रणाखाली ठेवतात. स्वतःच्या कुळातील मूठभर लोकांना जन्मजात श्रेष्ठ ठरवतात आणि बहुसंख्यांना कायमस्वरुपी जन्मजात दुय्यम ठरवले जाते. आश्चर्य म्हणजे हे सर्व त्या बहुसंख्य समाजच्या एवढे अंगवळणी पडते आहे की हाच बहुसंख्य समाज त्या अन्यायाला पिढ्यान् पिढ्यां दैवी कर्तव्य मानून इमानेइतबारे निभावतो. धर्म संकटात नसतो पण धर्माच्या नावाने दुकानदारी चालवणारे संकटात यायला लागले की त्या धर्माचे धर्ममार्तंड त्या त्या धर्मातील सर्वसामान्य लोकांना परधर्मियांमुळे आपला धर्म संकटात आहे आणि तुम्ही जागृत नाही असा दोषारोपण करत सर्वसामान्य लोकांना डिवचत असतात. जेणेकरून त्यांना हवी ती स्फोटक परिस्थिती निर्माण करता येईल आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना आपली पोळी भाजता येईल. धर्माच्या आचरणाने माणसाच्या अंगी नैतिकता, कृतज्ञता, नीतिमत्ता, आध्यात्मिक शांतता यायला हवी पण धर्ममार्तंड मात्र त्यास अपवाद असतात कारण धर्म हा त्यांचा धंदा असल्यामुळे त्यांच्या धंद्याच्या आड येणाऱ्या कोणालाही ते सोडत नाही भले तो धर्माचा अन कट्टर अनुयायी का असेना. एवढेच काय ज्या धर्माचा या धर्ममार्तंडांनी ठेका घेतला आहे त्याच धर्माचा संस्थापक जरी प्रकट झाला आणि त्याने या धर्ममार्तंडाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले, विरोध केला तर त्या धर्मसंस्थापकाला देखील ते संपवल्याशिवाय राहणार नाही. अनुयायांपेक्षा धर्म मोठा आहे, धर्माने त्याच्या अनुयायांना सदमार्ग दाखवून वाचवायला हवं, पण धर्ममार्तंडाच्या कृपेने धर्मच कायम धोक्यात असतो आणि त्याला वाचविण्याची जबाबदारी धर्माच्या अनुयायांवर असते. 
                    धर्म धोक्यात आहे म्हणून पाखंडी धर्ममार्तंडाचे ऐकून धर्माच्या अनुयायांनो तुम्ही धर्म वाचवायला गेलात की तुम्ही अडचणीत याल. कारण बहुसंख्य धर्ममार्तंडांमध्ये ढोंगीपणा, दुटप्पीपणा ठासून भरलेला असतो. डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवणारे अनुयायी हे त्यांचे भांडवल आहे. तुम्हाला जगण्यासाठी शाश्वत आणि आवश्यक असणाऱ्या गोष्टींबद्दल ते बोलणार नाही आणि त्यादृष्टीने काही प्रयत्नही करणार नाही. ते तुम्ही काय खाऊ -पिऊ नये, कोणते कपडे घालू नये याबद्दल बोलतील पण ते तुमच्या मूलभूत प्रश्नांबद्दल कधी बोलणार नाहीत. ते रोजगार, महागाई, शिक्षण, भ्रष्टाचार, गोरगरीबांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलणार नाहीत ते बिघडलेल्या सामाजिक व्यवस्था, शासनप्रशासनाच्या मनमानीवर बोलणार नाहीत. कसलेही प्रश्न न विचारता मनोभावे सेवा करणारे अनुयायी धर्ममार्तंडाची संपत्ती आहे, त्यात वाढ होणे त्यांच्या फायद्याचे आहे. अनुयायांच्या जीवनातील अनिश्चितता, भिती आणि चमत्कारांचे आमिष हे ह्या त्यांच्या धंद्याचे भांडवल आहे. त्यामुळे अनुयायांनी स्थिरस्थावर, सुखी, स्वावलंबी होणे त्यांना हितकारक नाही. दर्जेदार शैक्षणिक व्यवस्था ही सामाजिक समतेचा आणि शाश्वत उन्नतीचा मार्ग आहे. आर्थिक स्थैर्य हे स्वाभिमानी,स्वावलंबी जीवनाचा पाया आहे. तुमचं ज्यामुळे भलं होऊ शकणार आहे, तुमचे आयुष्य सुखासमाधानाचे होऊ शकणार आहे अशा शिक्षण, आर्थिक स्थैर्य अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याऐवजी तुमच्या मनात या भौतिक गोष्टींबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण करतात. पैशाअभावी माणूस हतबल होतो आणि हतबल माणूस नाईलाजाने कोणालाही शरण जातो. जीवनातील अनिश्चितता हे त्यांच्या जगण्याचे भांडवल आहे. भौतिकसुख हे तुमच्या मोक्ष प्राप्तीतील मोठा अडथळा आहे हे तुमच्या मनावर ठसवण्यात त्यांचा हातखंडा असतो. पैसा कमावणे, गुंतवणूक करणे हे त्यामुळे पाप समजले जाते. स्थिरस्थावर असणाऱ्या लोकांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करण्यात ते यशस्वी होतात.                
                     धर्ममार्तंड तुम्हाला साधन संपत्तीचा मोह सोडण्याचा उपदेश करत असतात मात्र जगभरातील अनेक धार्मिक संस्था, धार्मिक समुदाय यांच्याकडे मात्र प्रचंड संपत्ती असते. याबाबतीत आफ्रिकन धर्मोपदेशक(Bishop) डेस्मंड टूटू यांनी मजेशीररीत्या एक विसंगत वाटू शकणारे पण वास्तववादी सत्य कथन केले आहे, ते म्हणतात, ज्यावेळी धर्ममार्तंड आमच्याकडे आले त्यावेळी त्यांच्याकडे धर्मग्रंथ होता आणि आमच्याकडे जमिनी होत्या. त्यांनी आम्हाला प्रार्थना करण्यास सांगितली, आम्ही डोळे मिटून प्रार्थना केली. आम्ही जेव्हा डोळे उघडले त्यावेळी आमच्या हातात धर्मग्रंथ होता आणि त्यांच्याकडे जमिनी होत्या.  'When the missionaries came to Africa, they had the Bible and we had the land. They said, ‘Let us pray.’ We closed our eyes. When we opened them, we had the Bible, and they had the land.’   खरंतर अध्यात्मिकेमुळे अनासक्ती यायला हवी होती पण पाखंडी धर्ममार्तंड अनुयायांना साधन संपत्तीच्या मोहापासून दूर राहायला सांगून स्वतः करोडोंची संपत्ती बाळगतात, महागड्या गाड्या, वस्तूंचा वापर करतात, ऐशो आरामात राहतात. खरंतर  संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात पाखंडी लोकांचे अचूक वर्णन केले आहे.
                                      लोकां सांगे ब्रम्हज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥१॥
                                       तेणें ज्ञान कां सांगावें । ज्ञानासारिखें वर्तावें ॥२॥
                                       नित्य वाची ज्ञानेश्वरी । दारीं भिकार्‍यासी मारी ॥३॥
                                       तुका म्हणे ऐसे धर्ममार्तंड । आम्ही देखिले उदंड ॥४॥
ह्या पाखंडी लोकांची मजल फक्त अफाट संपत्ती कमावण्या आणि उपभोगण्यापर्यंतच आहे असे नाही तर अनेक विकृत दुष्कृत्ये हे लोक करत असतात. जगभरात अनेक धर्ममार्तंडावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
               सर्वधर्मीयांनी हे लक्षात घ्यायला हवं की धर्म आणि धर्ममार्तंड हे वेगवेगळे आहेत. हे धर्ममार्तंड धर्माचे दलाल झाले आहेत त्यांच्याकडून तुमची लूट होऊ नये म्हणून सर्वांनी सजग राहिले पाहिजे. खरंतर हे धर्ममार्तंड धर्माला बंदिस्त करतात आणि धर्माच्या अनुयायांवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध घालतात. धर्म, धर्ममार्तंड आपले असो वा दुसऱ्याचे त्यांना आपल्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे पण धर्माच्या दलालांना तुमच्या श्रद्धेचा बाजार मांडू देऊ नका. तुमची विचारशक्ती जागृत करा, तुमच्या मेंदूचा वापर दुसऱ्याला करू देऊ नका. आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या भल्याबुऱ्याचा विचार करा. चांगले शिक्षण घ्या, नोकरी व्यवसायात पारंगत व्हा, स्वावलंबी व्हा. नितीनियमाने संपत्ती कमवून आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर व्हा. दान धर्म करण्याची भावना निर्माण झाली तर गरजवंताना मदत करा, आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवून समाजातील दीनदुबळ्या घटकांना आत्मसन्मानाने जगता येईल यासाठी प्रयत्न करा. नेहमी सत्याची, न्यायाची बाजू घ्या, अन्यायाला विरोध करा. आपआपला धर्मसमृद्ध करण्यासाठी आपआपल्या धर्मातील वाईट प्रवृत्ती ठेचून काढा, कालबाह्य झालेल्या गोष्टी सोडून द्या. कालबाह्य गोष्टींना चिकटून राहून धर्माचे डबके होऊ देऊ नका. नवीन चांगल्या लोककल्याणकारी गोष्टींचा स्वीकार करून धर्म प्रवाही ठेवा.आपल्या धर्मातील लोक सुखी, समाधानी, समृद्ध झाली तर आपलाच धर्म आपोआप समृद्ध होईल. अनुयायांनी निर्भय, सुखी, समाधानी, समृद्ध, स्वावलंबी ,नीतीवान असणे यापेक्षा दैवीकृपा वेगळी काय असू शकते?.

                               संतोबा.....

Sunday, December 7, 2025

सत्तासूत्र

                        प्राचीन काळापासून जगभरातील बलाढ्य साम्राज्यांचे सम्राट, हुकुमशहा, भांडवलदार, राज्यकर्ते आपली सत्ता आणि वर्चस्व टिकवण्यासाठी आणि जनतेने आपल्या मनमानी कारभाराविरोधात बंड करू नये यासाठी विविध युक्त्या, तंत्र वापरून जनतेला आपल्या अधिपत्याखाली ठेवत आले आहेत. प्राचीन आणि मोठया असलेल्या रोमन साम्राज्यात(इ.स.पू. २७) भाकरी आणि मनोरंजन ही युक्ती वापरली जायची(Bread and Circuses (Panem et Circenses)). सत्ताधारी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवत. जनतेसाठी ग्लॅडिएटर लढाया, रथांच्या शर्यती यांसारखे मोठे सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करत. अशा कार्यक्रमांमुळे जनता आपल्या मूलभूत समस्यांपासून विचलित होऊन उदरनिर्वाहासाठी सत्ताधाऱ्यांवर अवलंबून रहात. मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदत देऊन जनतेला सत्ताधाऱ्यांचे मिंधे बनवल्यावर त्यांना सत्ताधाऱ्यांची जी हुजुरी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्याच बरोबर धर्म, जात, प्रदेश आणि सामाजिक वर्गाधारित फूट पाडून आपापसात लढवत ठेवण्याचा फोडा आणि राज्य करा (Divide et impera" (डिव्हाइड एट इम्पेरा)) या युक्तीचा वापर करत रोमन साम्राज्य परकीय प्रांतांमध्ये स्थानिक गटांना एकमेकांविरुद्ध लढवून रोम साम्राज्याविरोधात बंड होऊ न देण्याची काळजी घेत. तसेच कायदेशीर हेराफेरी (Legal Manipulation) ज्यामध्ये सत्ताधारी सत्ता बळकट करण्यासाठी कायद्यात बदल करतात आणि आपल्या समर्थकांना अधिकचा लाभ मिळवून देतात. तसेच प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना लढायची संधी सुद्धा देत नाही, विरोधकांनी जिंकणे तर दूरची गोष्ट. उदाहरणार्थ रोममध्ये नागरिकत्वाचे विशेषाधिकार फक्त काहींनाच दिले गेले. जनतेला लुबाडून आपल्या गोतावळ्याचा हितसंबंध जोपासत फक्त त्यांचीच भरभराट करणारे आणि जनतेची वाताहत करणारे सत्ताधारी जनतेला भुलवण्यासाठी काहीतरी भव्यदिव्य करून त्याचे प्रदर्शन करून जनतेला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. भव्य इमारती, पुतळे, संग्रहालये, सार्वजनिक समारंभ, किंवा शासकीय प्रकल्पांद्वारे आपली शक्ती आणि वर्चस्व दाखवतात, ज्यामुळे जनता त्यांच्यावर प्रभावित होते. इजिप्तमधील पिरॅमिड्स, फ्रान्समधील व्हर्सायचा राजवाडा आणि अनेक देशात उभारलेली भव्य राष्ट्रीय स्मारके,धार्मिक स्थळे भव्यता आणि प्रदर्शनाचे (Spectacle and Grandeur) उदाहरण आहे.            

                सत्तेचा खुंटा मजबूत करण्याचे अजून एक प्रभावी तंत्र म्हणजे प्रचारतंत्र (Propaganda). हे तंत्र समाज आणि लोकमानस आपल्या दिशेने वळवण्याचे एक कौशल्यपूर्ण साधन आहे. यामध्ये विशिष्ट विचारधारा, अजेंडा(कार्यसूची) पुढे रेटण्यासाठी आणि लोकांच्या मतांवर आणि विचारांवर प्रभाव पडण्यासाठी हेतुपुरस्सर अर्धसत्य, वाढीव माहिती आणि अफवा पसरवल्या जातात. फक्त आपल्या विचारसरणीला पूरक माहिती देणे, आपल्याविरोधी माहिती टाळणे. विरोधकांवर सातत्याने हल्ला करणे अशा गोष्टी केल्या जातात. याचा उद्देश विशिष्ट विचारसरणी, राजकीय अजेंडा किंवा हितसंबंधांना चालना देणे हा असतो. भीती, देशभक्ती, आनंद यांसारख्या तीव्र अस्मितावादी भावना जागृत केल्या जातात. हा प्रचार वस्तुनिष्ठ नसतो आणि यामध्ये विशिष्ट धारणांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडक तथ्ये सादर केली जातात. तसेच तर्कसंगत प्रतिसाद देण्याऐवजी भावनिक भाषा वापरली जाते आणि जटिल समस्या सोप्या करून सादर केल्या जातात. उद्देश हा की लोकांनी एक विशिष्ट दृष्टिकोन स्विकारावा आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आपल्यासोबत राहावे. या तंत्राचा सर्वात प्रभावी वापर हिटलरने जर्मनीमध्ये केला (गोबेल्स नीती). प्रचारतंत्राचा पुढचा आणि सर्वात प्रभावी भाग म्हणून सम्राट, सत्ताधीश हा ईश्वरी अवतार (non-biological) आहे, त्याला खुद्द देवाने लोकोद्धारासाठी पाठवले आहे असा प्रचार करायचा. आणि तो जे काही करतोय ते दैवी कार्य आहे तो प्रजेला किंवा कोणत्याही मानवी सत्तेला जबाबदार नाही.  त्यामुळे राज्याची कितीही दुरावस्था झाली तरी राजाला ईश्वराचा प्रतिनिधी मानल्यामुळे आपल्याला जे काही भोगावे लागतेय एका उदात्त हेतूसाठी, त्याच्या विरोधात जाणे म्हणजे देवाच्या इच्छेविरुद्ध जाणे अशी भावना जनतेत निर्माण होऊन मोठ्या भक्तिभावाने जनता सर्व भोग भोगत असते आणि राजा राज्य उपभोगत असतो. प्राचीन इजिप्तमध्ये फारोला देव मानले जायचे. मध्ययुगात युरोपात याप्रकारे राजांचा "दैवी हक्क" (Divine Right of Kings) प्रचारला गेला आणि राज्यांनी आपल्या अनियंत्रित राज्यकारभाराचा नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त करून दिले.

              सत्ताधारी आपल्या अधिकारांचा वापर करून आपल्या निष्ठावान समर्थकांना आणि प्रभावी घटकांना जसे की उद्योजक, प्रसार माध्यमे, कलाकार यांना कवडीमोल दराने जमिनी, मोठमोठी कंत्राटे, पुरस्कार, आर्थिक लाभ देऊन त्यांची निष्ठा खरेदी करतात. त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालून त्यांना संरक्षण देतात(Clientelism and Patronage) त्याबदल्यात हे लोक सत्ताधाऱ्यांची तळी उचलून परस्पर हितसंबंध जोपासतात . वैयक्तिक स्तरावर क्लायंटलिझम जबरदस्तीद्वारे देखील केला जाऊ शकतो जिथे नागरिकांना विशिष्ट राजकारणी किंवा पक्षाला मतदान न केल्यास वस्तू किंवा सेवा खंडित करण्याची धमकी दिली जाते. हे सत्तेचे दलाल आपल्या मिळकतीमधील छोटासा हिस्सा सत्कार्यासाठी खर्च करून आपली प्रतिमा उजळवत असतात. शोषित लोकं या सर्वांचा जयघोष करत राहतात त्यांना हे कळत नाही की फक्त त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेचा एक भाग त्यांना परत मिळत आहे आणि शासक आणि सत्तेचे दलाल ते जनतेच्या हिश्यातून घेतल्याशिवाय परत जनतेला देऊ शकत नाही. थोडक्यात ही मूठभर लोकं मणभर मेवा खातात आणि कणभर मेव्याच्या उष्ट्या पत्रावळ्या ढीगभर जनतेच्या वाट्याला येतात.प्राचीन रोममध्ये, सम्राटांनी आपल्या निष्ठावानांना जमिनी आणि विशेषाधिकार दिले. मध्ययुगात सामंतांनी आपल्या समर्थकांना संरक्षण आणि जमिनी दिल्या ही बेकायदेशीर संरक्षण आणि पक्षपाती लाभाची(Clientelism and Patronage ) काही उदाहरणे आहेत.

                           कमी खटाटोपी करून, जनतेला टोपी घालणारी आणि जनतेची मती गुंग करणारी राजसत्तेची अन् धर्मसत्तेची युती ही सत्ता राखण्याची सगळ्यात जालीम युक्ती आहे. या दोहोंचा परस्पर संबंध हा मानवी इतिहासातील एक गुंतागुंतीचा, दीर्घकालीन चाललेला मुद्दा आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातील नाते हे एकमेकांना मजबूत करण्यासाठी असते. धर्मसत्ता राजसत्तेला नैतिकता, वैधता प्राप्त करून देते तर राजसत्ता धर्मसत्तेला राजाश्रय मिळवून देते. पाखंडी धर्ममार्तंडांना राजाश्रय मिळाला की जनतेच्या भावना बोथट करण्याचे काम करत असतात. धर्ममार्तंड धर्माचा वापर जनतेला भ्रमात ठेवण्यासाठी करतात. धर्मसत्ता पाप-पुण्य, स्वर्ग-नरक यांच्या भीतीने जनतेवर मानसिक वर्चस्व गाजवतात, ज्यामुळे लोक स्वतंत्र विचार करू शकत नाहीत आणि सत्ताधाऱ्यांच्या शोषणाला बळी पडतात. जनतेला भ्रमात ठेवून त्यांचे अधिकार हिरावले जातात, विकास रोखला जातो आणि सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांचा वापर केला जातो. जनतेची धार्मिक श्रद्धा सत्तेच्या समर्थनासाठी वापरली जाते. धर्ममार्तंड आणि राज्यकर्ते धर्माच्या, धर्म वाचवण्याच्या, वाढवण्याच्या गोष्टी करतात पण त्या धर्मातील लोकं वाचवण्याच्या, त्यांचा उत्कर्ष करण्याच्या गोष्टी करत नाहीत. मध्ययुगात युरोपात कॅथलिक चर्च आणि राजसत्तेची युती होती. इटलीमध्ये पोप पायस ११ आणि मुसोलिनी यांची युती होती, ज्यात चर्चने मुसोलिनीच्या हुकूमशाही राजवटीला पाठिंबा दिला आणि ज्यूंविरोधी कायद्यांना अप्रत्यक्ष संमती दिली. जागतिक स्तरावर, धर्माचा दुरुपयोग अतिरेकवाद वाढवण्यासाठी होतो, ज्यात राजकीय नेते धार्मिक भाषेचा वापर करून आपले अजेंडे पुढे रेटतात.

               कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थाचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी, जनतेत भीती निर्माण करण्यासाठी करतात. शासनाला अडचणीत आणणाऱ्या घटकांना नेस्तनाबूत करण्यासाठी या संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या संपत्तीवर टाच आणली जाते, त्यांच्या स्थावर मालमत्ता जमिनीदोस्त केल्या जातात, त्यांची सगळी कृत्ये बेकायदेशीर ठरवून त्यांना तुरुंगात डांबले जाते. प्राचीन अ‍ॅसिरियन साम्राज्याने निष्ठुरपणे दडपशाहीद्वारे लोकांना आपल्या अधिपत्याखाली ठेवले होते. राज्यकर्ते शिक्षणातून आपल्या विचारसणीचा प्रसार करून जनतेच्या विचारावर नियंत्रण ठेवतात आणि त्यांना आपल्या बाजूला वळवतात.  प्राचीन स्पार्टामध्ये तरुणांना सैनिकी प्रशिक्षण आणि विचारसरणी शिकवली जायची. आधुनिक काळात काही देश पाठ्यपुस्तकांद्वारे इतिहासाची हेराफेरी करून आपल्या सोईस्कर इतिहास शिकवतात. याशिवाय कोणी बंडखोरी करू नये म्हणून अशा लोकांवर पाळत ठेवली जाते. जगभरातील सर्वच सरकारांच्या गुप्तचर यंत्रणा मजबूत असतात त्या परकियांवर पाळत ठेवतातच अंतर्गत विरोधक आणि विवेकवादी लोकांवर देखील पाळत ठेवतात. खरंतर जगभरातले सर्वच हुकुमशहा क्रूर असले तरी प्रत्यक्षात ते खूप घाबरट असतात. विरोधकच काय पण आपल्या समर्थकाबद्दल पण त्याच्या मनात शंका असते.

               या अशा अनेक युक्त्या वापरून सत्ता टिकवता येत पण यशस्वी होता येईलच असे नाही. त्यामुळे चोहोबाजूंनी अपयशी ठरल्यानंतर आपल्या अपयशाचे खापर कोणावर तरी फोडावे लागते, कोणाला तरी जबाबदार धरावे लागते त्यासाठी बाह्यशत्रू आणि अंतर्गत विरोधकांना बळीचा बकरा बनवले जाते (Scapegoating and External Enemies). राज्यकर्ता आपल्या नाकर्तेपणासाठी, अपयशासाठी स्वतःला जबाबदार न धरता त्या अपयशासाठी कारणीभूत नसलेल्या एखाद्या व्यक्तीला, समुदायाला, पक्षाला जबाबदार धरतो आणि त्यांच्यावर सतत टीका करत राहतो. असल्या टीकेमुळे त्याला त्याच्या अपराधीपणाच्या भावनेपासून सुटका मिळते आणि समाधानाची भावना मिळते ही एक प्रकारची मानसिक संरक्षण यंत्रणा आहे (psychological defense mechanism). सर्व गोष्टींत अपयशी ठरल्यामुळे हतबल झालेला वांझोटा सत्ताधारी आपली प्रतिमा संवर्धन करण्यासाठी पॉवर डायनॅमिक्सचा खेळ खेळतो. ज्याने खरोखर चांगले कार्य केले आहे त्यांच्यापेक्षा आपण कसे वरचढ आहोत हे भासवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. तो त्या पूर्वसुरी व्यक्तीची बदनामी करतो, त्याची प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतः नकारात्मक, विध्वसंक वृत्तीचा असल्यामुळे त्याला सकारात्मक, रचनात्मक काम करता येत नाही. त्यामुळे त्या थोर पूर्वसुरीच्या प्रत्येक गोष्टीला, कार्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःला एवढा असुरक्षित समजतो की आपण सर्वोच्चपदी विराजमान असताना आपल्याच मंत्रिमंडळातील कनिष्ठमंत्र्याच्या कार्याचे श्रेय स्वतः कडे घेतो, कामाची उद्घाटने स्वतः करतो. बाकी सर्वांना नामधारी बनवतो जेणेकरून त्याच्यापेक्षा कोणी मोठा दिसू नये आणि तसे झाल्यास अशा आपल्याच  नेत्याचे, मंत्र्याचे पद्धतशीर खच्चीकरण करतो. स्वतःची लायकी नसताना प्रत्येक गोष्टीत आपले नसलेले ज्ञान पाजळून आपल्या पदाचा प्रतिष्ठा पणाला लावतो. सर्व व्यवस्था उद्ध्वस्त झाल्यानंतर, वाताहत झाल्यानंतर जनतेला आपल्यासोबत एकत्र ठेवण्यासाठी विशेषतः निवडणुकीच्या काळात देशात अतिरेकी हल्ले, देशावर परकीय आक्रमण, युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करून लोकांच्या मध्ये राष्ट्रवादाची भावना प्रबळ करून आणि त्याचा फायदा सार्वत्रिक निवडणुकीत घेतो.

                           अशा अनेक युक्त्या हजारो वर्षांपासून सत्ता टिकवण्यासाठी, वर्चस्व राखण्यासाठी वापरल्या जात आहेत पण या युक्त्या अद्यापपर्यंत कालबाह्य झालेल्या नाहीत. नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन संशोधन याचा वापर करून या युक्त्या अजून प्रभावी बनवल्या जात आहेत आणि नवनवीन युक्त्यांची त्यात भर पडली जात आहे. या बलाढ्य सैतानी शक्तीपुढे सर्वसामान्य लोकांनी हतबल होऊन त्यांचे गुलाम होऊन राहायचे हा एकमेव पर्याय आहे का?. या सर्व युक्त्या निष्फळ करण्यासाठी एकमेव प्रभावी मार्ग म्हणजे बहुसंख्य जनतेने आपली सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवणे. अर्थातच याची जाण वर्चस्ववाद्यांना आहे म्हणून ते कधीच जनतेला त्यांच्या सद्सदविवेकबुद्धीचा वापर करण्याची संधी मिळू देत नाही. योग्य शिक्षणाने लोकांना चांगल्या - वाईटाची पारख करता येते, आपला उत्कर्ष करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याची जाणीव होते म्हणून सर्वप्रथम ते शिक्षणाचा बट्ट्याबोळ करतात. जनतेला कायम कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त, वांझोट्या गोष्टीत अडकून ठेवतात, एक चांगले, सुरक्षित जीवन जगण्यासाठी जनतेला सतत संघर्ष करायला लावतात. सर्व लोककल्याणकारी योजनांचा, पायाभूत सुविधांचा बोजवारा उडवून जीवनावश्यक गोष्टींसाठी जनतेला सरकारचे मिंधे होण्यासाठी भाग पाडतात. यावर एकमेव उपाय म्हणजे समाजातील विवेकवादी लोकांनी सातत्याने जनतेला सत्य, वास्तविक तथ्ये, सरकारच्या प्रत्येक कृती मागचा कार्यकारण भाव समजावून जनजागृती करत राहणे आवश्यक आहे. कोणी सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलेला नाही. बदल ही एकमेव चिरंतन गोष्ट आहे फक्त तो बदल आधीच्याच मार्गाने जाणार नाही याची काळजी सर्वांनीच घेणे गरजेची आहे. 

                                                                                                                                संतोबा.

Wednesday, November 26, 2025

प्रवाहपतित सेलेब्रिटी

                        क्रिकेट, राजकारण आणि सिनेसृष्टीचे भारतीय समाजाला प्रचंड आकर्षण आहे. या क्षेत्रात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींचे भरपूर कट्टर अनुयायी तयार होत असतात विशेषतः सिनेसृष्टी आणि क्रिकेट. या सेलिब्रिटी सिनेकलावंत आणि क्रिकेटपटूंचे चाहते सेलिब्रिटींच्या अनेक बऱ्यावाईट गोष्टींचे समर्थन आणि अनुकरण करत असतात. आवडत्या सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी ते अनेक दिव्य पार करत असतात, त्यांच्यासाठी वेळ आणि पैसे खर्च करत असतात तर काहीजण त्यांच्यासाठी जीव द्यायला मागे पुढे पाहत नाही. त्यांना अगदी देवत्व बहाल करतात. अशा पाठीराख्यांमुळे सिनेमा किंवा क्रिकेटमध्ये यशस्वी होणाऱ्याला त्याच्या प्रतिभेच्या कित्येक पटीने मोबदला आणि नावलौकिक मिळत असतो. या सेलिब्रिटींच्या जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या चाहत्यांवर पडत असतो, ते त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते त्यांचे दिसणे असो, ते वापरत असलेली उत्पादने असो. प्रसिद्ध व्यक्तींनी अंगिकारलेल्या चांगल्या वाईट सवयींना, कृतींना सामाजिक प्रतिष्ठा मिळत असते. त्यांच्या कृतींचे सर्वसामान्य व्यक्तींकडून अनुकरण केले जाते. त्यामुळे सेलिब्रिटींच्या प्रसिद्धीचा वापर करून उद्योजकाने आपली उत्पादनांची जाहिरात न केली तरच नवल. त्यामुळे पाण्यासारखा पैसा ओतून व्यावसायिक लोकं सेलिब्रिटी कडून आपल्या मालाची जाहिरात करत असतात. गडगंज श्रीमंत असलेला सेलिब्रिटी त्याच्यादृष्टीने क्षुल्लक असलेल्या रकमेपायी लोकांच्या आरोग्यास हानिकारक असलेल्या एखाद्या गोष्टीची जाहिरात करताना त्याच्या चाहत्यांचा, सामाजिक बांधिलकीचा विचार करत नाही. मग ती जाहिरात पान मसाल्याच्या नावाखाली गुटख्याची असो, सोड्याचा नावाखाली दारूची असो, खेळाच्या नावाखाली जुगाराची असो, श्रमपरिहार, उत्साहवर्धकपेयांच्या नावाखाली हानिकारक शीतपेयांची असो. आपल्या मुळे किती कुटुंबे उद्ध्वस्त होईल याचा सारासार विचार सेलिब्रिटी करत नाही. सर्वसामान्य लोकं आपला चरितार्थ चालवण्यासाठी नोकरीधंदा करतात, तो करताना काही तडजोडी करतात, प्रसंगी मानापमान सहन करतात पण एका मर्यादेपलीकडे आत्मसन्मान विकून पैसे कमवत नाही. पण या गडगंज सेलिब्रिटींची नेमकी काय अगतिकता असते की ती असली अनैतिक कामे करायला सहज तयार होतात.                    

                        खरंतर कोणताही सिनेअभिनेता सिनेरसिकांशिवाय मोठा होऊ शकत नाही, कोणताही खेळाडू , क्रिकेटपटू क्रिडा चाहत्यांशिवाय, प्रेक्षकांशिवाय मोठा होऊ शकत नाही. कोणताही राजकीय नेता कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्याशिवाय मोठा होऊ शकत नाही. आपण ह्या लोकांना देवत्व प्राप्त करून देतो.त्यांची लार्जर दॅन लाइफ अशी आभासी प्रतिमा निर्माण करतो. कधी ही व्यक्ती राजकीय नेता, प्रसिद्ध अभिनेता, खेळाडू, प्रशासकीय अधिकारी किंवा तथाकथित सामाजिक कार्यकर्ता असू शकतो. कलेचा, कलाकाराचा सन्मान करता करता त्या कलाकारांमधील माणसाचा सन्मान करू लागतो पण आपण हा विचार करत नाही की तो माणूस सन्मान करण्याच्या योग्यतेचा आहे की नाही. पडद्यावर नायकाची भूमिका साकारणारा, भ्रष्ट, अन्याय व्यवस्थेला नडणारा, आपल्या चतुरस्त्र अभिनयाने भूमिका जिवंत करणारा चांगला कलाकार, चांगला माणूस असेलच असे नाही. आपल्या कौशल्याने आपल्या संघाला जिंकून देणारा चांगला खेळाडू माणूस म्हणून चांगला असेलच असे नाही. सातत्याने निवडून येणारा, लोकांना आपण त्यांचा तारणहार आहोत असा भासवणारा लोकप्रिय नेता चांगला माणूस असेल असे नाही. खरंतर नेत्यांनी धर्माचा, अभिनेत्यांनी नशेचा अन् खेळाडूंनी जुगाराचा बाजार मांडला आहे.अभिनय, खेळ, राजकारण हा त्या लोकांचा व्यवसाय, पेशा आहे. कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्या व्यवसायाला गरजेची असणाऱ्या कौशल्यात निपुण, निष्णात असणे ही त्या व्यवसायात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे आणि ती साध्य करण्यासाठी काही लोकं जीवतोड मेहनत करतात तर काही लोकांना ती कला अंगभूत जन्मजात स्वरूपात लाभते. ज्यावेळी कलेची देणगी अंगभूत, जन्मजात स्वरूपात लाभते त्यावेळी तिचा दर्जा(क्लास) हा वेगळाच असतो आणि अशा जन्मजात कलाकौशल्याची देणगी लाभलेल्या कलाकाराला, खेळाडूला सर्वसामान्य लोकं देवत्व बहाल करतात.

                     सिनेमाच्या माध्यमातून भ्रष्ट, अन्याय्य व्यवस्थेशी, सरकारशी दोन हात करणारा, सत्यासाठी, न्यायासाठी लढणारा, गुंडांशी दोन हात करणारा, निरपेक्षपणे दीन दुबळ्यांची बाजू घेणारा, त्यांना मदत करणारा, नैतिकची चाड असणारा आणि त्यासाठी प्रसंगी आपल्या प्रियजनांशी उभा दावा मांडणारा (पंगा घेणारा) एखादा अभिनयसम्राट, अँग्री यंग मॅन प्रत्यक्ष जीवनात व्यवस्थेला शरण गेलेला, कुठल्यातरी प्रकरणात अडकलेला आणि त्यातून सुटका व्हावी म्हणून सत्ताधाऱ्यांची तळी उचलणारा एक कणाहीन, लाचार व्यक्ती असतो. दैवी प्रतिभा लाभलेला खेळाडू, गायक, गायिका, साहित्यिक कधीही आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी करत नाही मात्र स्वतःच्या फायद्यासाठी नैतिकता गुंडाळून अधिकचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतो. कधी टॅक्स भरण्यातून सूट मिळवण्यासाठी, कधी सरकारी भूखंड मिळवण्यासाठी, स्वतःच्या संस्थेसाठी निधी मिळवण्यासाठी, पुरस्कार मिळवण्यासाठी, तर कधी आपले अपराध लपविण्यासाठी करत असतो. सत्तेविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध बोलून अडचणीत येऊ नये, आपली रोजीरोटी संकटात येऊन नये म्हणून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर, अडचणीवर मूग गिळून गप्प बसणारे सेलिब्रिटी सरकार अडचणीत आल्यावर मात्र सरकारची वकिली आणि जनतेला उपदेशाचे डोस द्यायला तत्पर असतात. सेलिब्रिटींना जर देशातल्या अराजकतेवर एक चकार शब्द उच्चारणारता येत नसेल तर त्यांनी लोकांना उपदेशाचे डोस देऊ नये आणि शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीतही पडू नये. जनता त्यांचा लढा स्वतः लढेल.           

                          खरंतर जनमाणसावर प्रभाव पाडणाऱ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींनी (प्रभावशाली लोकांनी),समाजात वावरताना किमान नैतिकता बाळगावी अशी अपेक्षा असते. जेणेकरून त्यांना आदर्श मानणारी लोकं त्यांच्या वागण्याचा आदर्श घेतील. सरसकट सर्वच सेलिब्रिटी नाही पण किमान ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे आणि त्यांच्या आणि इतरही क्षेत्रातील लोक त्यांना आपला आदर्श मानतात, त्यांची कोणाशी स्पर्धा नाही अशा अद्वितीय प्रतिभा असलेल्या सेलिब्रिटींकडून समाजहिताची भूमिका घेणे अपेक्षित असते. एवढेच काय सरकारचा एखादा चुकीचा निर्णय बदलण्याचा, सरकारची ध्येय-धोरणे सुधारण्याची ताकद अशा सेलिब्रिटींमध्ये असते कारण त्यांना मोठ्या जनसमुदायचे पाठबळ असते पण भारतातील बहुतांश सेलिब्रिटींनी आपआपल्याला क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलेले असले तरी प्रत्यक्ष राजकीय- सामाजिक जीवनात हे सेलिब्रिटी भयंकर खुजे आहेत. सर्वसामान्य जनता स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आपापल्या परीने लढत असते पण हे सेलिब्रिटी जनतेसाठी सोडा स्वतःच्या आत्मसन्मासाठी देखील भूमिका घेत नाही एवढे हे लाचार आणि असहाय्य आहेत. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे, व्यवस्थेला गोत्यात आणू शकणारी आपली भूमिका, आपले विचार जाहिर केले तर होणाऱ्या परिणामाची जाण त्यांना आहे. व्यवस्थेच्या, सत्तेच्या विरोधात गेलो तर प्रवाहाच्या बाहेर पडण्याची भीती आहे कारण सत्तेच्या अन् व्यवस्थेच्या अव्यवस्थेची भलामण करणाऱ्यालाच सत्ता, व्यवस्था पुरस्कृत करते. जे सत्तेची, व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना सत्ता अन् व्यवस्था बहिष्कृत करते. आपण प्रवाहाच्या बाहेर पडू, एकटे पडू अडचणीत येऊ, सगळी प्रतिष्ठा, प्रसिध्दी, पैसा धुळीस मिळू नये म्हणून कायम हा ही चांगला तो ही चांगला अशी सोईस्कर भूमिका घेण्याचा अभिनय ते लीलया पार पाडतात. अमाप पैसा, प्रसिद्धी, लोकांचे पाठबळ, नैतिकतेचे पाठबळ असताना चुकीला चूक म्हणता येत नसेल, अन्यायाला विरोध करता येत नसेल अन् न्यायाची बाजू घेता येत नसेल तर या सेलिब्रिटींची अलौकिक प्रतिभा व्यर्थ आहे. 

                      चित्रपटातून, खेळामधून, गाण्यांमधून आपल्याला क्षणिक आनंददायी अनुभव(फिलगुड फॅक्टर) मिळतो, पण हा क्षणिक आनंददायी अनुभव आपल्या मूलभूत अडचणी सोडवत नाही. ज्या महापुरुषांमुळे आपल्या आयुष्यात चांगला बदल घडला आहे त्यांना आपण कवडीची किंमत देत नाही पण शेळपट सेलिब्रिटींना आपण देवत्व बहाल करतो. कायम चर्चेत, बातम्यात असणारे, चित्रपटगृहाच्या आणि टीव्हीच्या पडद्यावर कायम दिसणारे लोक हळूहळू सेलेब्रिटी बनतात. सध्या त्यात इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्यांची भर पडलेली आहे. ज्या लोकांच्या प्रेमामुळे आपल्याला मानसन्मान, प्रसिद्धी पैसा मिळाला आहे, ज्यांच्यामुळे सगळ्या सुख सुविधा असलेले विशेष जीवन उपभोगतोय त्या लोकांच्या गरजेपोटी ठाम भूमिका घेण्याएवढी हिंमत सेलिब्रिटींमध्ये नसेल आणि ते केवळ प्रवाहाबरोबर वाहवत जाणारे असतील तर अशा शेंदूर लावून देवत्व बहाल केलेल्या सेलिब्रिटी दगडांचा शेंदूर आपण खरवडून त्यांचे पाय मातीचेच आहेत हे सत्य स्विकारला हवे. हे सेलिब्रिटी म्हणजे कोणी दुसरे तिसरे कोणी परग्रहावरची लोकं नसून तुमच्या आमच्या सारखेच सर्वसामान्य लोकं आहेत. त्यांच्याशी आपण आपला संबंध हा त्यांच्या कलेपुरता मर्यादित ठेवावा. त्यांना खास वागणूक देऊन व्हीआयपी संस्कृती वाढू देऊ नये. त्यांच्यासाठी कायदे नियम धाब्यावर बसवून अतिरिक्त लाभ मिळू देऊ नका. या व्हीआयपी संस्कृतीचा आणि त्यांना मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा, अतिरिक्त लाभांचा त्रास आपल्यालाच होणार आहे, नुकसान आपलेच होणार आहे. या दिखाऊ, कचाकड्याच्या बाहुल्या आपल्यासाठी सेलेब्रिटी नाहीत. आपल्यासाठी लढणारा, अन्याय्य व्यवस्थेला नडणारा, स्वातंत्र्याची, समतेची, न्यायाची चाड असणारा, विवेकवादी समाज घडवणारा व्यक्तीच आपला खरा सेलेब्रिटी आहे.

                                                          संतोबा (संतोष गांजुरे).

Saturday, August 2, 2025

चांगभलं होता होता

चांगभलं होता होता, स्वप्ने सारी उद्ध्वस्त झाली.
अरे पुन्हा सत्तेतून हटवा, दलालांचे वाली. 

आम्ही पोकळ आश्वासनांची ही, पालखी का वहावी.
जे कधी मिळणार नव्हते, त्याची आस का बाळगावी.
कशी जेलात जाणाऱ्यांची, मंत्रीमंडळी वर्णी लागली.

तोऱ्यात केली त्यांनी, कायदा सुव्यवस्थेची माती.
आम्हांवरी कारवाईची, तलवार कायम लटकती.
आम्ही ते विवेकी, ज्यांना शोषित ही ना वाली.

उभा पक्ष झाला आता भ्रष्ट, गुंडांची बंदिशाला.
जिथे कलंकितांना, मंत्रिपदाचा प्रसाद मिळाला.
कसे हे निष्ठावंत दुर्देवी अन गद्दार भाग्यशाली.

धुमसतात अजुनी मेल्या, वर्णश्रेष्ठत्वाचे निखारे.
अजूनही द्वेष पेरत फिरती, कट्टरतावादी सारे.
आश्वासनेच जन सुरक्षतेची, आम्हाला मिळाली !

तेच जुने डाव पुन्हा टाकती, फिरुनी नवे सत्ताधारी.
तेच गळफास लावती, सिंहासनावरचे नाग विषारी.
आम्ही मात्र पोसत राहतो, त्याच त्या विषवल्ली.

अशी कशी ज्याने त्याने ठेवली, बुद्धी गहाण?
असे कसे हे जहागिरदार, सत्तेस गेले शरण?
कशी लाचार शहेनशहांनी, पत्करली ही दलाली?.
                                       संतोबा ...

Wednesday, July 16, 2025

नतद्रष्ट

सारं आहे तोट्यात दाखवून, विका सर्व.
असा हा नवभारत, अन् असे हे विकासपर्व.
घोटाळेबाज दल्ले, राजरोस लुबाडती खर्व.
अन् आम्हाला केवळ, वांझोट्या गोष्टींचा गर्व.

दीन दुबळ्यांना झोडपणे, हे असे त्यांचे शौर्य.
अन् अन्यायाविरुद्धचा लढा वाटे त्यांना कौर्य.
जनतेस लावी देशोधडीला, एवढेच त्यांचे कार्य. 
कोहळा घेऊन आवळा देणे, हे त्यांचे औदार्य.

साऱ्या घोटाळ्यांचे, गाडीभर पुरावे यांच्या संग्रही.
नोटीशी पाठवून त्यांना, सोबत घेण्या हे आग्रही.
व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या संकल्पी हे निग्रही.
जे जे त्यांच्या विरोधात, ते सारे देव,धर्म,देशद्रोही.

कुबेरा श्रीमंत करण्या, ठेवती सारं काही गहाण.
काबाडकष्ट करणाऱ्याच्या वाट्यास, येई मरण. 
राक्षसी सत्ता, गडगंज संपत्तीपुढे होती सारे शरण.
पडद्या-मैदानावरचे सारे वाघही, घालती लोटांगण.

गतकाळाची ओढ यांना, नको भविष्याची पायाभरणी.
बेजबाबदार सारे,  फलद्रूप होईना यांची एकही करणी.
निष्फळता लपविती, गात गतअग्रणीच्या नावे रडगाणी.
कायदे बदलून नितीभ्रष्ट होती पावन, करण्या मनमानी.
                                       संतोबा ....

Sunday, June 22, 2025

आधारवड

मी कर्ता, मीच करविता, मी साऱ्यांचा भाग्यविधाता. 
आसमानी,सुलतानी संकटी, मी संकटमोचक विघ्नहर्ता. 

कष्टकऱ्यांचा नेता मी, भांडवलदारांचा सारथी मी. 
सर्वांच्या यशातील वाटा मी, असा आहे मी असामी.

चेहरा माझा पुरोगामी, प्रतिगाम्यांचाही आधार मी.  
दोन्ही दगडी पाय माझा, पडद्यामागचा सुत्रधार मी.

अगम्य माझ्या चाली अन् लवचिक माझी विचारधारा.
दोन्हीकडे ऊठबस माझी. संकटी जो मी त्याच्या आधारा.  

अकल्‍पित माझ्या भूमिका, कधी कोणाला देतो टाळी.
घडो काहीही कुठेही, साऱ्यांना वाटे माझीच ही खेळी.

आपले साऱ्यांशीच सख्य, नाही कोणाशी कसले वैर.
न बोलल्या शब्दांबाहेर जो माझ्या, नाही त्याची खैर.

सत्तेच्या सारीपाटापायी, अलत्याभलत्यांशी लावतो पाट.
वेळोवेळी, भल्याभल्यांना दाखवतो मी कात्रजचा घाट.

रुजवली मी जी विषवल्ली, भिडे तिचा फास माझ्या गळा. 
उद्ध्वस्त केली तरुणाई तिने, मनी फुलवला द्वेषाचा मळा.

निकराच्या लढाईत, डाव जिंकताना तह मी केला.
बेरजेच्या राजकारणात, विश्वास मात्र वजा झाला.

कमावला नावलौकिक, तरी पाठ सोडेना खंजीर. 
वैऱ्यास सामील झाले सांगाती, तोडून नात्यांची जंजीर.     


                                                       संतोबा...

Saturday, June 14, 2025

जागृती

मत आमचे, ईव्हीएम तुमची.
देश आमचा, सत्ता तुमची.
राज्य आमचं, राजकारण तुमचं.
दरबार आमचा, कारभार तुमचा. 
निष्ठा आमची, प्रतिष्ठा तुमची.

सातबारा आमचा, शिक्का तुमचा.
पिकं आमची, दर तुमचा.
कष्ट आमचे, कर तुमचा.
फास आम्हाला, घास तुम्हाला.
उपाशी आम्ही, तुपाशी तुम्ही.

योजना आमच्या, लालफित तुमची.
हतबल आम्ही, बलवान तुम्ही.
अस्वस्थ आम्ही, आश्वस्त तुम्ही. 
हाल आमचे, व्यवस्था तुमची.
खड्डेखुड्डे आम्हाला, पायघड्या तुम्हाला.

धर्म आमचा, बंधने तुमची. 
सेवा आमची, मेवा तुमचा. 
श्रद्धा आमची, धंदा तुमचा.
तिजोरी आमची, किल्ली तुमची.
घाव आम्हाला, भाव तुम्हाला. 

जुलमी राजवट, निर्दयी व्यवस्था तुमची.
ती उद्ध्वस्त करण्याची ताकद आमची.
देव,देश,धर्माच्या बाजारीकरणाचे हस्तक तुम्ही.
तथ्य जाणून सत्यशोधन करणारे मस्तक आम्ही.
क्षणभंगुर वर्चस्ववाद तुमचा, शाश्वत समता आमची.

                                            संतोबा...

Sunday, May 4, 2025

पुरंदर विमानतळ - शासन प्रशासनाची मनमानी

             या लोकांच्या हातात तलवारी, बंदूका नाहीत, या लोकांनी कोणावरही आक्रमण केलेले नाही. मग एवढा फौजफाटा कशासाठी?. एवढा फौजफाटा त्यांना रोखण्यासाठी तैनात करावा लागण्याइतपत हे लोक डेंजर - धोकादायक आहेत का?. हे लोक आपल्या अस्तित्वासाठी हक्कासाठी एकत्र आले आहेत. आपली मालकी हक्काची घरे, शेतजमीन, संसार वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देणे गुन्हा आहे का?. दुपारच्या रखरखत्या उन्हात वृद्ध, महिला, असाह्य शेतकऱ्यांवर आपण गुन्हेगारांवर कारवाई करतोय अशा प्रकारे अमानुष लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने केला गेला?. आपल्या हक्काची जाणीव असलेला व्यक्ती सत्ताधाऱ्यांसाठी धोकादायक असतो. सत्ताधारी एकवेळ गुन्हेगारांना सोडतील पण आपल्या हक्काची जाणीव असलेल्या व्यक्तीला कदापी सोडणार नाहीत. सात-आठ वर्षापासून चाललेल्या या संकटाच्या धसक्याने बाधीत गावातील काही व्यक्ती दगावल्या आहे. थोडाबहुत शिल्लक असलेला निसर्ग ओरबाडून, भूमिपुत्रांवर जबरदस्तीने परागंदा व्हायला भाग पाडण्याच्या प्रयत्न करणारी ही मोगलाई कोणाच्या भल्यासाठी आहे. भांडवलदारांचे हितसंबंध आणि दलालांचे लागेबांधे कष्टकरी बळीराजाच्या जीवावर बेतले आहेत. हा प्रकल्प करण्याची निकड आणि तो इथेच करण्याचा हट्ट का आहे?.

                    गेल्या सात-आठ वर्षात एकदाही कोणाला निर्हेतुकपणे येथील भूमिपुत्रांशी सल्लामसलत करायची गरज वाटली नाही. जे आले ते केवळ प्रकल्पाची वकिली करण्यासाठी आले. कोणीही आम्हाला विकासाचे गाजर दाखवू नका, बळीराजाची, भूमिपुत्रांची कोणाला किती फिकीर आहे त्याचे कौतुक आम्हाला सांगू नका आणि आमच्या भल्याचा बाजारगप्पाही मारू नका, तुम्हाला आमची किती काळजी आहे ते आम्ही जाणतो. शेतीमाल परदेशी निर्यात करता येईल ही थाप मारण्यापूर्वी शेतीसाठी मुबलक वीज,पाणी याची व्यवस्था केली आहे का? बोगस बियाणे, बोगस रासायनिक खते, बोगस तणनाशक, बोगस कीटकनाशके यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत का?. आणि सर्वात महत्वाचे आम्ही भूमिहीन झाल्यावर शेती कुठे आणि कशी करणार? अंतराळात शेती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे का?. तुमच्या पोकळ आश्वासनाने आमच्या पुढील जगण्याची कठीण आव्हाने संपणार नाहीत. ज्यांचा शेती हा धर्म अन् कर्म आहे त्यांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. त्याचबरोबर अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांचाही हा प्रश्न आहे. या संकटाची जाणीव त्यांनाही होणे गरजेचे आहे आणि हा लढा त्यांचाही व्हायला हवा. 

                   या ब्रह्म राक्षसापुढे निसर्ग मूक आहे आणि भूमिपुत्र हतबल आहे. निसर्गावर बुलडोझर चालवून तुम्ही तो उद्ध्वस्त कराल पण निसर्ग सर्वशक्तिमान आहे तो तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाचा आणि भूमिपुत्रांचा तळतळाट तुमच्या सर्वनाशास कारणीभूत ठरेल एवढा अन्याय करू नका. या प्रकल्पाची झळ फक्त बाधित भूमिपुत्रांना बसणार नाहीतर आजुबाजूच्या सर्वांनाच बसणार आहे. पैशाच्या जोरावर साऱ्याच गोष्टी विकत घेता येत नाही, नैसर्गिक साधनस्रोत मर्यादित आहेत. आधीच पाण्याची विजेची टंचाई आहे. पाणी आणि विजेसाठी उद्योगधंद्यांना प्राथमिकता दिली जाते आणि शिल्लक राहिल्यावर शेतीसाठी. त्याचप्रमाणे विकासाच्या पंचपक्वानांवर भांडवलदार आणि दलाल ताव मारतील आणि सर्वसामान्यांच्या वाट्याला उष्ट्या पत्रावळी येतील. या प्रकल्पाला संपूर्ण जिल्ह्यातील लोकांनी विरोध करणे गरजेचे आहे. आज शहरात रहदारीचा प्रश्न भेडसावत आहे, जगात रहदारीच्या बाबतीत पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्याबरोबरीने वर्षागणिक येथील प्रदूषण आणि तापमान वाढत आहे. शहरात लोकांनी कोटीमध्ये किंमत असलेले फ्लॅट घेतले आहेत पण पायभूत सुविधांचा बोजवारा वाजला आहे आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, निर्भेळ अन्न कितीही पैसे देऊन विकत मिळणार नाही आणि पर्यायाने निरोगी शरीर आणि आरोग्यही मिळणार नाही. 

                हा निसर्ग भकास करून होणारा विकास भांडवलदार आणि दलाल वगळता कोणाच्याही फायद्याचा नाही. त्यामुळे सर्वांनी आपआपल्यापरीने विरोध आणि घटनेचा निषेध करायला हवा. सध्या चाललेला भूमिपुत्रांचा तीव्र विरोध जर दुर्दैवाने शासनप्रशासनाने बळजबरीने चिरडला तर पुढे होणारा विध्वंस कोणालाही थांबवता येणार नाही. वेळ निघून गेल्यानंतर उपरती होऊन काहीही फायदा होणार नाही. आणि कोणी कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरी त्याची भरपाई होऊ शकणार नाही. आज जे हा प्रकल्प राबवण्यासाठी झटत आहेत तेही कोणाचे ना कोणाचे प्यादे आहेत, त्यांना तात्पुरता फायदा होईल पण कधी ना कधी त्यांनाही पश्चात्ताप करायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. जे प्रकल्पाचे समर्थन करत आहेत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. त्यांनी तात्पुरता फायद्याच्या विचार न करता शाश्वत फायद्याचा विचार करायला हवा. परक्यांना आपल्या उरावर बसू देऊ नका, येणाऱ्या पिढ्यांचा विचार करा. त्यांच्यासाठी काहीतरी वारसा जपून ठेवा. आपल्याच गावात, तालुक्यात त्यांना उपरे म्हणून कोणाच्या हाताखाली हमाली करायची वेळ येऊ देऊ नका. 

                  शेवटी शासन प्रशासनाला विनंती आहे, हा भूमिपुत्रांवरचा जुलमी अत्याचार त्वरित थांबवावा. हा बळजबरीचा विकास त्यांच्या माथी मारू नका. तुमची विकासाची तळमळ ज्यांना अशा विकासाची आवड आहे त्या ठिकाणी दाखवा. या भूमिपुत्रांच्या स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची, हक्काची, न्यायाची बूज राखा. त्यांच्या आत्मसन्माला, मानवीहक्कांना ठेच पोहचेल असे दुष्कृत्य करू नका. छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मभूमीचा दैदिप्यमान वारसा तसेच जी आय मानांकन असलेला अंजीर, सीताफळ, डाळिंब, वाटाणा इत्यादी दर्जेदार फळांची, माळव्याची निर्यात करणाऱ्या भूमीचा वारसा त्यांना जपू द्या. खरंतर या मातीच्या कर्तृत्वाचा दैदिप्यमान इतिहास अन् वारसा जपण्याचे कर्तव्य केवळ येतील भूमिपुत्रांचेच नाहीतर भारत देशातील सर्व विवेकवादी देशप्रेमींचे आहे, एवढा जाज्वल्य इतिहास असताना तुम्ही हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करून गद्दारीचा शिक्का तुमच्या भाळी लागण्याचे पाप घेऊ नका, तुमच्या येणाऱ्या शेकडो पिढ्यांना हा गद्दारीचा शिक्का नाईलाजाने मिरवावा लागल्यावर ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहतील काय?. 

                                  संतोबा (संतोष गांजुरे)...

Wednesday, April 2, 2025

गद्दार

सशाचे काळीज अन् सिंहाची माझी डरकाळी,
खबरदार, जर कोणी हसाल अन् वाजवाल टाळी.

आहे बेनामी जरी, तरी झोंबते आहे मज हे विडंबन.
लख्ख माझी बेईमानी, कसे करू मी तिचे खंडन.

दलाली अन् खंडणी मागणं, अजीर्ण झाले मज खाणं.
टिका करणं, दोष देणं, हे एवढेच आता माझे रडगाणं.

पोसल्या पिढ्या ज्याने, लाथाडले मी ते ताट.
अनाजीशी साठगाठ, ही समृद्धीची वाट सुसाट.

करकरीत चलनी कागदावरी जडली माझी प्रीती.
टीचभर नोटीशीच्या कागदाने, भरली मनी भीती.

गाफील ठेऊनी स्वकीयांना, असंगाशी संग केला.
वेळ बदलता, कावेबाजाने केसाने गळा कापला. 

बोगस कर्तुत्वाची, दिखाऊ पताका भिडवली आभाळी,
तरी दिसे बेदखल होण्याची, चिंता माझ्या कपाळी.

वाढीव माझे कर्तृत्व अन् वाढीव माझे कार्यकर्ते.
गद्दारीचा शिक्का भाळी, आता बाकी काय उरते.

मिळाली संधी नेतृत्वाची, ज्या भूमीचा वारसा शूरवीरांचा.
लाभली सारी पदं, पण उरलो केवळ म्होरक्या गद्दारांचा.                         

                                           संतोबा...

Sunday, March 2, 2025

विरोधाभास

स्वायत्ता नसलेली, विद्वत्ता काय कामाची.
अभिव्यक्ती दडपणारी, सत्ता काय कामाची
पंख छाटून कैदेतून, मुक्तता काय कामाची.
नवनिर्माण नसलेली, सृजनशीलता काय कामाची.
उचलेगिरीतून भासवलेली, अभिजातता काय कामाची.

कोणाचेच भले न करेल ती, नीतिमत्ता काय कामाची.
गरजवंताला याचक बनवणारी, दानशूरता काय कामाची.
काही चांगला बदल न घडवणारी, महानता काय कामाची.
पीडितास वणवण भटकवणारी, न्यायदेवता काय कामाची.
दुष्कृत्यासाठी माफी मिळेल ही, विश्वासार्हता काय कामाची. 

जगण्यासाठी वेठीस धरणारी, उद्योजकता काय कामाची.
दुसऱ्याच्या हक्काची लुबाडलेली, मालमत्ता काय कामाची.
व्यवस्थेत फेरफार करून आणलेली, सुबत्ता काय कामाची.
न्यूनगंडाची भावना निर्माण करणारी, भव्यता काय कामाची.
स्वछत्रछायेत दुसऱ्यांस खुंटवणारी, विशालता काय कामाची.

सुखाची आसक्ती ठेऊन, दिखाऊ विरक्तता काय कामाची.
दुसऱ्याला नामोहरम करण्याची, कल्पकता काय कामाची.
वंदून शिकवण पायदळी तुडवणारी, कृतज्ञता काय कामाची.
जबाबदारीतून पळवाट काढणारी, अलिप्तता काय कामाची.
संकट, संधीची चाहूल न लागणारी, दूरदृष्टिता काय कामाची. 

ठराविक बाजू घेणारी, निवडक निरपेक्षता काय कामाची.
अन्यायात निर्विकार राहणारी, निरागसता काय कामाची.
असुरक्षितता निर्माण करणारी, सहिष्णुता काय कामाची.
आदेशच पाळावी लागणारी, सार्वभौमत्वता काय कामाची.
भल्याबुऱ्याची जाणच नसणारी, बुद्धिमत्ता काय कामाची.

                                                   संतोबा...

Tuesday, January 14, 2025

संघटीत गुन्हेगारीचा फास

                सरकार कोणाचेही असले तरी गुन्हेगारी समूळ नष्ट होऊ शकत नाही. रागा-लोभातून घडणारे वैयक्तिक गुन्हे बऱ्याचदा उत्स्फूर्त(spontaneous) असतात. अशा गुन्हेगारीला शासन-प्रशासन कोणीच पूर्णपणे रोखू शकत नाही. गुन्हेगारांना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा देऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक ठेऊन अशा उत्स्फूर्त वैयक्तिक गुन्ह्यांवर सरकार काही अंशी नियंत्रण ठेवू शकते. अर्थात यासाठी सरकारचा कारभार समाजाभिमुख असायला हवा आणि सरकारची गुन्हे रोखण्याची इच्छाशक्ती असायला हवी. त्याचबरोबर सक्षम पोलिसयंत्रणा, स्वायत्त न्यायव्यवस्था असायला हवी म्हणजे गुन्हेगार कितीही मोठा असला, त्याचे कोणाशीही लागेबंध असले तरी प्रशासनाला तो डोईजड होणार नाही आणि त्यांना योग्य ती शिक्षा देता येईल. दुसऱ्या प्रकारची गुन्हेगारी संघटीत गुन्हेगारी आहे जी पूर्वनियोजित आणि समाजाला अत्यंत धोकादायक आहे.  Measure for Measure या शेक्सपियरच्या नाटकात एक वाक्य आहे  'काहींचा पापाने उत्कर्ष होतो, तर काहींचा पुण्याने ऱ्हास!' (Some rise by sin, and some by virtue fall). आजकाल पापाने उत्कर्ष होण्याचा काळ आहे. श्रीरामांनी म्हणले आहेच 'ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना तिनका कौआ मोती खाएगा'. 

                      नीतिमत्तेने आयुष्यभर कष्ट करणाऱ्याला त्याची कमाई दैनंदिन गरजा भागवण्यात खर्ची पडते, महिन्याचा खर्च भागत नाही अन् त्याचा हिशोब लागता लागत नाही त्यामुळे त्याच्याकडे अडीअडचणीला उपयोगी पडण्यासाठी काही ठेव शिल्लक उरत नाही. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अनैतिक धंदे करणारे गैरमार्गाने खोऱ्याने पैसा ओढत असतात. बेहिशोबी उधळपट्टी करत असतात. ज्ञान तेथे मान अर्थात विद्वान सर्वत्र पूज्यते अशी उक्ती आहे पण सत्ता, संपत्ती ज्याचाकडे आहे त्यालाच मानमतराब, प्रतिष्ठा मिळतो भले ती संपत्ती, सत्ता वाममार्गाने मिळवलेली असो. आडमार्गाने अल्पकाळात कमावलेली संपत्ती त्यामुळे तिचा  झगमगाट अन छानछौकी ओघाने आलीच, सोशल  मीडियावर चिथावणीखोर व्हिडिओ व्हायरल करणे, दहशत निर्माण करण्यासाठी आणि तुरुंगातून सुटका झाल्यावर रॅली काढणे, वाढदिवसाचे परिसरात मोठमोठे फ्लेक्स लावणे, तलवारीने केक कापणे हा सगळा डामडौल पाहून नाही रे गटातील उपेक्षित तरुणांना, identity crisis असलेल्यांना त्याची भुरळ न पडली तरच नवल. गुन्हेगारीचा प्रभाव समाजातील तरुण वर्गावर पडतो आणि ते अशा टोळ्यांकडे आकर्षित होतात. गुन्हेगारांचे असे हे उदात्तीकरण समाजासाठी घातक आहे. नाही रे गटाच्या कोयता गँग, चड्डी गँग, अमुक ग्रुप, तमुक ग्रुप काही काळासाठी दहशत माजवतात, त्यांचा आवाका मर्यादित असतो अन् काही दिवसात अशा हंगामी गँग संपतात कारण त्यांच्यावर प्रशासकीय व्यवस्थेवर हुकूमत असलेल्या आकाचा वरदहस्त नसतो. वाटमारी, दरोडे, खंडणी, हत्या, लुबाडणूक एवढ्यापुरतीच संघटीत गुन्हेगारी मर्यादित नाही. 

                     समाजाला, पर्यावरणाला घातक असलेल्या गोष्टीवर कायदेशीर बंदी घातली जाते. अशा बंदी असलेल्या गोष्टींचा भाव मग कितीतरी पटीने वाढतो. अशाच बंदी घातलेल्या गोष्टीतून बेकायदेशीर गोष्टींचा काळाबाजार करून अमाप पैसा कमावला जातो. हा काळाबाजार रोखणे ज्यांच्या अधिकारात आहे त्यांच्याशी(प्रशासन) संगनमत आणि ज्यांना ते उत्तरदायी(जवाबदेही,answerable) असतात त्यांचा(शासन) वरदहस्त याच्या जोरावर असे अवैध, बेकायदेशीर धंदे फोफावतात. बऱ्याचदा राजकीय, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या वजनदार असलेल्या आणि समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यक्ती आपल्या एखाद्या विश्वासू व्यक्तीला हाताशी धरून असले घोटाळे करत असते जेणेकरून कधी घोटाळे उघड झालेच तर त्याचे बालंट आपल्यावर येऊ नये, करून सवरून आपण नामानिराळे रहावे व आपल्या प्रतिष्ठेस धक्का लागू नये. हळूहळू अशाप्रकारे एक समांतर परिसंस्था(ecosystem) निर्माण होते. ज्यांना हाताशी धरून असे घोटाळे केले जातात त्यांचा हव्यास वाढत जातो आणि ते शासन,प्रशासनाला इतके शिरजोर होतात की शासन, प्रशासन ही या परिसंस्थेच्या हातचे बाहुले बनून जाते. परस्पर हितसंबंध आणि साटंलोटं यामुळे गुन्हेगार अडकले तरी स्वतः चे हातच अडकले असल्यामुळे गुन्हेगारांना मुक्त करण्याच्या पळवाटा काढल्या जातात. कुंपणच शेत खायला लागल्यावर वचक तरी कोणाचा राहणार?.  

                    बरं एक दोन नव्हे तर शेकडो अवैध धंदे आहेत. अवैध सावकारी धंदा,अमली पदार्थ विक्री, रेशन धान्याचा काळाबाजार, अवैध लॉटरी-जुगार, अवैध वाळूउपसा, डोंगर-टेकड्या पोखरून अवैध उत्खनन करून मुरूम-खडीचा बेकायदेशीर धंदा, सार्वजनिक साधन संपत्तीचा अपहार, शाळा, बगीचे, मैदाने यांसाठी आरक्षित असलेल्या जागा हडपून अवैध बांधकामे, सार्वजनिक सरकारी, सहकारी, निमसरकारी उद्योगधंद्यातील दुय्यम उत्पादन(byproduct) जसे साखर कारखान्यातील मळी, औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील उत्सर्जित राख यांचे निविदा न काढता परस्पर विक्री अशी न संपणारी यादी आहे.  या अवैध, बेकायदेशीर धंद्यात निर्माण होणाऱ्या स्पर्धकांचा आणि निरपेक्षपणे अनैतिक, अवैध गोष्टींना विरोध करणाऱ्या पत्रकार,सामाजिक कार्यकर्ता, किंवा जो कोणी त्यांच्या धंद्याच्या आड येईल त्याचा बंदोबस्त निर्दयी, निर्घृणपणे हत्या करून केला जातो. त्यांना संपवण्यामागे केवळ वाटेतील काटा काढणे नसून आमच्या मार्गात आलात तर काय हाल होऊ शकतात याची दहशत बसावी हा उद्देश असतो. अमानुष, विकृत गुन्हे करून देखील गुन्हेगार सहीसलामत सुटतात, अगदीच प्रकरण अंगलट येऊ लागले तर एखाद्या प्यादाचा बळी देऊन प्रकरण शांत केले जाते. Justice delayed is justice denied अर्थात उशिरा मिळालेला न्यायही एकप्रकारचा अन्यायच असतो असे म्हणतात पण बऱ्याचदा उशिरा का होईना न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. सर्वसामान्य जनता अशा प्रकारांकडे असहाय्य, हतबलपणे पहात असते.

                सर्वसामान्यांची ही हतबलता त्यांच्याच गाफीलपणाचा परिपाक आहे. येवढ्या- तेवढ्याने काय होते असे म्हणत छोट्या मोठ्या अनैतिक, बेकायदेशीर गोष्टींकडे कानाडोळा करून त्या खपवून घेतल्याने हळूहळू त्या गोष्टी  हाताबाहेर जातात. एकदा टोळीचा म्होरक्या गडगंज श्रीमंत झाला की मग तो समाजाचा मासिहा, तारणहार बनण्याचा प्रयत्न करतो. दानशूरपणाचा दिखावा करतो.  सामाजिक, धार्मिक उत्सवाचे आयोजन करतो, भरमसाट वर्गणी देतो, गरजूंना मदत करतो, लोकांना त्याचा आधार वाटू लागतो. खरंतर आपल्याला असल्या रॉबिनहूड टाईप संस्कृतीची गरज नाही. आपण असल्या गुन्हेगारांच्या उधळपट्टीचे लाभार्थी व्हायचं नाही आणि त्याची आपल्याला गरज नाही. आपल्याकडे लोकशाही आहे, ती सशक्त करणे आणि लोकशाही च्या माध्यमातून आपला उत्कर्ष करणे, आपले जीवन सुरक्षित करणे आपल्या हिताचे आहे. कोणतीही गोष्ट फुकट किंवा अनासाये भेटत नाही, अनैतिक व्यवहारातून आणि दुसऱ्याच्या हक्काचे लुबाडून त्यातला गुंजभर वाटा तुम्हाला देणारा हिंस्र गुन्हेगार त्या वाटणीचा मोबदला म्हणून तुम्हाला न मोजता येणारी किंमत कधी ना कधी वसूल करणारच. फुकट मिळणारी कोणतीही गोष्ट आवळा देऊन कोहळा काढण्याची क्लृप्ती असते हे कायम लक्षात ठेवायला हवे. वेळच्यावेळी शासन-प्रशासनाला बेकायदेशीर गोष्टी निदर्शनास आणून देऊन त्या बंद करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. शासन, प्रशासन हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आहे याचे भान शासन, प्रशासनाला असायला हवे आणि जनतेलाही त्याची जाण असायला हवी. आपण निरपेक्षपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. त्यांचा सन्मान केला पाहिजे म्हणजे बाकीचे अधिकारी ही निरपेक्षपणे, नैतिकतेने काम करण्यासाठी प्रेरित होतील. एक दिवस नक्की येईल ज्यावेळी समाज गुन्हेगारी कृत्य करणाऱ्याला आपल्या धर्माचा, जातीचा, भाषेचा, प्रांताचा म्हणून त्याला पाठीशी न घालता, त्याचा उदोउदो न करता त्याला विरोध करेन, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करेन. सत्य, न्याय, नितीमत्तेने काम करणाऱ्यांचा गौरव होईल, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. अर्थात यामध्ये आपल्या सर्वांचा आपआपल्यापरीने सातत्यपूर्ण सक्रिय सहभाग गरजेचा आहे.           


                                                               संतोबा..

Saturday, January 11, 2025

भांडवलशाहीचे ठेकेदार -२

                          आम्हाला रविवारी कामाला बोलवता येत नाही याची तुम्हाला खंत वाटते. रविवारच्या सुट्टीमुळे आम्ही कितीवेळ बायकोकडे आणि बायको आमच्याकडे एकटक बघत बसणार याची तुम्हाला चिंता वाटते. तुमची ही चिंता आणि खंत बघून आम्हाला रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे यांचा अजूनच जास्त अभिमान वाटतो, ज्यांनी तुमच्या सारख्या नाठाळांना वठणीवर आणणारी, आणि आमच्यासारख्या कष्टकरी, शोषित कर्मचाऱ्यांना आठवड्याभराच्या ढोर मेहनतीनंतर एक दिवस सुटका म्हणून रविवारी आठवड्याची हक्काची सुट्टी मिळवून दिली. या हक्काच्या साप्ताहिक सुट्टीमुळे तुम्हाला कितीही वाटले की आठवड्याचे सातही दिवस रोज १२-१५ तास अन् आठवड्याचे ९० तास राबवून घ्यावे तर ते तुम्हाला किंवा तुमच्या आकाला शक्य नाही. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या नैसर्गिक, मानवी हक्काची जाण आणि त्या हक्काचे संविधानाच्या माध्यमातून संरक्षण, सर्वांना ज्ञानाची कवाडे खुली करून सक्तीचे शिक्षण, वंशश्रेष्ठत्वाचा बागुलबुवा करून मलईदार क्षेत्रात प्रस्थापित कंपुशाहीच्या अघोषित मक्तेदारीला शह देण्यासाठी आरक्षण देऊन फुले, शाहू, आंबेडकरांनी देशातील सर्वसामान्य जनतेला मानवी अधिकार बहाल केले त्यामुळे भांडवलदारांना आणि वंशश्रेष्ठत्वाचा वांझोटा टेंबा मिरवणाऱ्यांना या तिघांचा द्वेष वाटणे साहजिक आहे. आता तिघांबरोबर कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी, कामाच्या वेळा मर्यादित करण्यास भाग पाडणाऱ्या रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे यांचा पण द्वेष वाटू शकतो. 

                    तुम्हाला सर्वसामान्य जनतेला हतबल, लाचार करायचे आहे. कर्मचाऱ्यांनी आपला चरितार्थ चालवण्यासाठी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून राहावे, त्यांनी समाजापासून, कुटुंबापासून फारकत घ्यावी. त्यांनी हूं की चू न करता तुमच्यासाठी गुलामांसारखे रात्रंदिन राबावे. त्यांनी कसल्याही मागण्या करू नयेत. कर्मचाऱ्यांना एवढे जखडून ठेवायचे, त्यांची सतत एवढी मानहानी करायची की त्यांना आपण एकदम टाकाऊ, निरूपयोगी आहोत, आपला इथे सोडून कुठेच निभाव लागणार नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण करायची. त्यांना टार्गेट, डेडलाईन्स यामध्ये इतके गुरफटून ठेवायचे की त्यांनी दुसरा कोणातच विचार करता कामा नये. त्यांच्या डोक्यावर कायम नोकरी जाईल की काय याची टांगती तलवार लटकवत ठेवायची, ज्यामुळे कुटुंबापेक्षा कर्मचारी कामाला प्राथमिकता देईल. आपण कर्मचाऱ्यांसाठी खूप काही करतोय हे दाखवण्यासाठी त्यांच्यासाठी वर्षातून एखाद दुसरा कार्यक्रम ठेवायचा, आरोग्य तपासणी करायची, प्रेरणादायी व्यक्तीची भाषणे ठेवायची. फारसा आर्थिक लाभ न देता केवळ प्रमाणपत्रे, ट्रॉफी वाटून कर्मचाऱ्यांना अजून उत्साहाने काम करण्याची प्रेरणा देऊन शक्य होईल तेवढी वेठबिगारी करायला लावायची. 

                      तुमच्या असल्या विकृत विचारसरणीमुळे लोक तुम्हाला विरोध करू लागले, तुम्ही अडचणीत येऊ लागलात की तुम्हाला राष्ट्रनिर्मिती, राष्ट्रवाद आठवतो. आतापर्यंत गोष्टी अंगलट आल्या की देव, देश, धर्माची ढाल पुढे करण्यात राजकारण्यांचा हातखंडा होता. आता तुम्ही राष्ट्रवादाची ढाल पुढे करून आपला बचाव करू लागला आहात, केवळ बचाव नाही तर तुमची उत्पादने गुणवत्तेच्या तराजूत तोलण्याऐवजी ' देश की/ देश का अमुक तमुक' म्हणत उत्पादने देशभक्तीच्या तराजूत तोलत जाहिरात करत असता. राष्ट्रनिर्मितीच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका अन् राष्ट्रवाद शिकवण्याचा प्रयत्नही करू नका. ज्या व्यक्तीकडे कपाळाला लावायला चिमुटभर माती नाही, देशातील कुठल्याच जमिनीच्या तुकड्याच्या सातबाऱ्यावर त्याचे नाव नाही त्यांनाही या देशावर तुमच्याहून अधिक प्रेम आहे आणि तुमच्या इतकाच त्यांचाही या देशावर आणि या देशातील नैसर्गिक स्त्रोत, साधनसंपत्तीवर हक्क आहे. राष्ट्रउभारणीसाठी उद्योगधंदे गरजेचे आहे म्हणून सरकारने तुम्हाला कवडीमोल दराने जमिनी दिल्या, सुविधा, सवलती दिल्या, कर्जे दिली. त्यातून रोजगारनिर्मिती करून तुम्ही केवळ स्वतःची भरभराट केली, गरज संपली की कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावले. तुम्ही इथली सार्वजनिक नैसर्गिक साधन संपत्ती ओरबाडून घेतली. एनजीओ, पीआर एजन्सीच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमासंवर्धन करून आपण सर्वसामान्य लोकांचे तारणहार आहात याचा आभास निर्माण केला.

                 तुम्ही स्वतःला कितीही कर्मचाऱ्यांचे तारणहार समजलात तरी तुमचे अस्तित्वच सर्वसामान्य कर्मचाऱ्यांमुळे आहे याची जाण ठेवा. तुम्ही ज्या कंपनीच्या शिखरपदावर आहात त्या कंपनीचा पाया तुमच्या कंपनीतील कर्मचारीवर्ग आहे, सर्वसामान्य माणूस जो तुमचा ग्राहक आहे तो तुमच्या कंपनीचा आत्मा आहे. हा पाया ढासला, आत्मा तुमच्यापासून दुरावला तर तुमच्या उद्योगाचा ढोलारा ढासाळायला वेळ लागणार नाही. जगभरात धोरणी, प्रागतिक विचारांच्या, देशहिताचा विचार करणाऱ्या उद्योगपतींनी आपापल्या देशाच्या प्रगतीला हातभार लावला. भारतातही काही प्रमाणात उद्योगपतींनी देशाच्या प्रगतीला हातभार लावला पण सध्या उद्योगपती टॅक्सचोरी, कर्जबुडवेगिरी करून, प्रस्थापित सार्वजनिक संस्था हडपून पुरेपूर धंदेवाईक झाले आहेत. ते राष्ट्रउभारणीचे नव्हे तर राष्ट्र, समाज उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत. धंदेवाईक उद्योगपती देशाची, लोकांची भरभराट नव्हे तर  लुबाडणूक करत आहेत. लुबाडणूक करता करता अर्धा भारत अशा मुठभर लोकांच्या मुठीत गेला आहे. त्यांच्याकडे असलेला अमाप पैसा, सत्तेचा वरदहस्त यामुळे देशातील सर्व सार्वजनिक व्यवस्था ज्या सर्वसामन्य लोकांच्या हितासाठी, रक्षणासाठी उभारल्या आहेत त्या सार्वजनिक व्यवस्था अशा बड्याधेंड्याच्या बटीक झाल्या आहेत.  त्यांना आपण काहीही करू शकतो हा आत्मविश्वास आला आहे, त्यामुळे अधूनमधून अशी विकृत विधाने हे लोक करत असतात. खरंतर कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही, सर्वसामान्यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्यास क्रांती घडण्यास वेळ लागणार नाही.

                 आपल्याला स्वातंत्र्य मिळून फार काळ लोटलेला नाही, आपल्या पूर्वजांनी मोठ्या संघर्षाने आणि बलिदान देऊन स्वातंत्र्य आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवला आहे. आपल्याला आपले स्वातंत्र्य, आपले हक्क टिकवायचे असतील तर गाफील राहून चालणार नाही. आपल्या स्वातंत्र्यावर, नैसर्गिक मानवी हक्कावर गदा आणू पाहणाऱ्या विकृती आपण वेळच्या वेळी ठेचल्या पाहिजेत त्यासाठी आपल्याला संघटित होणे गरजेचे आहे. उद्योगपतींनी आणि नेत्यांनी त्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या कामगार संघटना मोठ्या शिताफीने संपवल्या. आता पुन्हा कामगार संघटना पुनर्जीवित करण्याची वेळ आलेली आहे. असंघटित क्षेत्रात कामगारांची खूप पिळवणूक केली जाते. संघटित होऊन संघर्ष करून आपल्याला आपला उत्कर्ष करायचा आहे आपले स्वातंत्र्य टिकवायचे आहे. हा देश आपला आहे, या देशातील सर्व सार्वजनिक साधनसंपत्तीवर आपला हक्क आहे, ती कोणा एकाच्या मालकीची नाही. आपल्याला ही साधनसंपत्ती  आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवायची आहे. आपल्याला स्वातंत्र्य, न्याय, समताधारीत, सर्वांना समान संधी देणारा भारत घडवायचा आहे. त्यासाठी वेळप्रसंगी सर्वस्वपणाला लावण्याची तयारी ठेवायला हवी. अंतिम विजय हा सत्याचा, न्यायाचा आणि सर्वसामान्य जनतेचाच होईल.

                                                      संतोबा...


 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!