Ads 468x60px

Tuesday, October 2, 2018

मी आणि माझी अहंकारीक वचने - ९

बदल घडत नसतो, तो घडवायला लागतो.
नुसत्या शिळोप्याच्या गप्पा मारून काहीही साध्य होत नाही.

*********************************************************************************
स्वतःला स्वतःची ओळख नसली की जीवन जगणे अवघड होऊन बसते.

*********************************************************************************
भावड्या, समोर खड्डा आहे हे मी तुला सांगून सुद्धा तू तसाच पुढे जाणार असशील तर,
तू त्या खड्डयात पडल्यानंतर मी तुझ्या मदतीला यावे अशी अपेक्षा करू नको.

*********************************************************************************
बदल्याची भावना मनात ठेवून सर्वांगीण बदल(चांगला) घडवता येत नाही.

*********************************************************************************
ज्या कायद्याला तुम्ही वाकवू शकता तोच कायदा एखाद्या दिवशी तुम्हाला सरळ करू शकतो, 
हे कायदा वाकवण्याची भाषा करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.

*********************************************************************************
तुम्हाला दिलेल्या सेवेचा मोबदला तुमच्या खिशात पैसे असताना, 
आदरयुक्त प्रेमाने समोरचा नाकारतो ती तुमची श्रीमंती.
आणि तरीही तुम्ही कोणाचा एक रुपयाही देणे बाकी ठेवत नाही हा तुमचा मोठेपणा.

*********************************************************************************
पुण्याला देशातील जगण्यासाठी सर्वांत चांगले शहर घोषित करण्यापूर्वी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्याने हडपसर ते हिंजवडी प्रवास करून पहिला असेल का?

*********************************************************************************
उत्पादने देशभक्तीच्या तराजूत मोजण्याऐवजी गुणवत्तेच्या तराजूत मोजली तर.....

*********************************************************************************
तुम्ही प्रशासकीय अधिकारी झालात ! अभिनंदन!!!
आता आपले कर्तव्य नेकीने पार पाडा.
बोल बच्चनगिरीच्या फंदात पडू नका, त्यासाठी स्वयंघोषित तज्ञ आहेत.

*********************************************************************************
एमपीएससी, युपीएससी चा अभ्यासक्रम थोडा सोपा करायला काय हरकत आहे? उमेदीच्या काळातील चारदोन वर्षे अभ्यास करण्यात खर्ची घालवून चमकणारे भावी अधिकारी प्रत्यक्ष कर्तृत्व दाखवायची वेळ येते त्यावेळेस खच खात असतील का? कारण काही सन्माननीय अपवाद वगळता कोणी काही रचनात्मक, सृजनशील, आवाक्याबाहेरचे काम केल्याचे दिसून येत नाही. यांची सारी शक्ती, बुद्धी अभ्यास करण्यात तर खर्च होत नसेल?

*********************************************************************************
                                                                                                (संतोबा)संतोष गांजुरे.

Friday, August 3, 2018

शोधकथा

            फार फार वर्षांपूर्वीची नव्हे तर कालपरवाची कदाचित उद्याचीही गोष्ट असू शकते.सुराष्ट्र नावाचं एक महानगर होतं. महानगराच्या जवळच एक भलामोठा तलाव होता. अनेकवर्षं जेमतेम पर्जन्यमान असल्याने बराचकाळ तलाव कोरडाठाण असायचा. चार दोन वर्षांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे तलाव पूर्ण भरला होता. जोरदार पावसामुळे भरपूर प्रमाणात माती वाहून आल्याने तलावात गाळही बराच गाळ भरला होता. 

       वार्षिक परिक्षा नुकत्याच संपल्यामुळे शाळकरी मुले घरचांच्या विरोधानंतर देखिल लपूनछपून  दुपारी तलावावर पोहायला जाऊ लागली होती. सध्या पाणी फार खोल नसले तरी गाळ खूप होता.  तळ्यात बरोबर मध्यभागी एक फुलांचा ताटवा फुलला होता.दुपारच्या उन्हात तो भलताच आकर्षक वाटत होता. या अशाच फुलांनी काही वर्षांपूर्वी एका शाळकरी मुलाचा बळी गेला होता. त्यामुळे शाळकरी मुलांना तलावावर पोहायला बंदीच घातली होती पण तरीही घरच्यांच्या अपरोक्ष दुपारी मुले पोहायला जाऊ लागली होती. 

         सुरवातीला तलावाच्या कडेला पोहणाऱ्या मुलांना मध्यभागी फुललेली आकर्षक फुले खुणावत होती.मात्र पाणी आटत आल्यामुळे गाळात अडकण्याची भितीसुद्धा होतीच. तरीसुद्धा काही मुलांनी ती फुले आणण्याचे धाडस करण्याचे ठरवले. दुर्दैवाने त्यापैकी एक मुलगा गाळात अडकलाच, बाकीच्या मुलांनी आरडाओरडा करून इतर गावकऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. 

                खरंतर मुले त्या फुलांना भुलून भलते धाडस करतील म्हणून गावातील लोक मुलांना पोहायला जाऊ देत नव्हते आणि ही घटना घडली त्यामुळे गावातील जुन्याजाणत्या ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन मुलांना पोहायला न जाण्याचे आवाहन केले ती फुले ना सुवासिक आहेत ना त्याचा काही उपयोग आहे असेही सांगण्यात आले. कारण परत मुले त्या फुलांकडे जातील याची शंका होती.  मात्र एवढे सांगूनही दुसऱ्यादिवशी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली. शेवटी त्याच रात्री गावातील जुन्याजाणत्या मंडळींनी बैठक बोलावली व या समस्येवर उपाय म्हणून तो फुलांचा ताटवा उखडून फेकायला ठरवले व दुसऱ्यादिवशी भल्यासकाळी दोघाचौघांनी तो फुलांचा ताटवा उखडून नाहीसा केला.

           दुसऱ्यादिवशी दुपारी जेव्हा ती मुले पोहायला गेली त्यावेळी तो फुलांचा ताटवा गायब होता मात्र त्या फुलांबाबतचे मुलांचे कुतूहल कायम होते. कारण अशी फुले ना त्यांनी शेतात पाहिली होती ना कुठे बाजारात पहिली होती. त्यामुळे त्या मुलांच्या  चौकस बालमनाला त्या फुलांबद्दल जाणून घ्यायची इच्छा होती पण आता त्यासाठी किमान वर्षभर वाट पाहण्याची गरज होती. 
         गावातील कोणीच त्यांना त्या फुलांबद्दल माहिती दिली नाही पण तुम्हाला जर त्या जीवघेण्या फुलांबद्दल काही माहिती असेल तर ती माहिती त्या मुलांना सांगाल का?

Thursday, August 2, 2018

नको नको हो विमानतळ

नको नको हो विमानतळ.
फळां - फुलांचे फुलवू शिवार,
सोबत वाटाणा, भेंडी अन् गवार.
माळव्याचा असे बारामाही बहार,
घाला हो या ब्रह्मराक्षसास आवर.

नको नको हो विमानतळ.
सांगतो पुन्हा एकदा प्रेमाने,
शेतीच करू आम्ही जोमाने.
शेत सिंचतो आम्ही घामाने,
विकणार ना कसल्या दामाने.

नको नको हो विमानतळ.
कसले लागले हे ग्रहण,
गोरगरिबांचे होईल मरण.
काळया आईस ठेऊनी तारण,
कसे सुधारेल हो अर्थकारण.

नको नको हो विमानतळ.
जीव असा कासावीस होई,
प्राण आमुचा कंठाशी येई.
का करिता ही जीवघेणी घाई,
कशी विकावी हो काळी आई.

नको नको हो विमानतळ.
होईल आता लढाई आरपार,
जाईल प्राण पण न घेऊ माघार.
गोरगरिबांचा काळ झालंय सरकार,
त्याचा प्राणपणाने करू हो प्रतिकार.
                                    संतोबा (संतोष गांजुरे).


Thursday, June 21, 2018

मी आणि माझी अहंकारीक वचने --- ७

                 अपप्रवृत्तींना जेवढी मोकळीक द्याल तेवढी त्यांची ताकद वाढत जाते. आज आपण सुपात आहोत म्हणून गहाळ बसलो तर उद्या जात्यात भरडल्याशिवाय राहणार नाही! त्यामुळे अपप्रवृत्तींना वेळच्या वेळी ठेचून काढले पाहिजे नाहीतर त्या एकदा मानगुटीवर बसल्या तर आपली सुटका केवळ अशक्य !

******************************************************************

मानवाची प्रगती!!!
वाघ,सिंह म्हणलं की प्रतिष्ठा,
गाढव,माकड,कुत्रं म्हणलं की अपमान.
पण माणसाला माणूस म्हणून मान्यता आणि प्रतिष्ठा भेटेल काय? 

******************************************************************


श्रेष्ठत्वाचा अतिरेक फार वाईट! आपण वा आपला समूहच फार श्रेष्ठ हा अहंकार आपणांस दुर्मिळ बनवतो आणि दुर्मिळ गोष्टी फार काळ टिकत नाहीत.

******************************************************************

वेळेआधी आणि योग्यतेपेक्षा जास्त मिळाले की तोल ढासळतोच.

*****************************************************************

एकवेळ नितीमान शत्रूपासून बेसावध राहिलं तरी चालेल पण 
हीन मनोवृत्तीच्या लोकांपासून कायम सावध राहिले पाहिजे.

****************************************************************
                                                                                                               (संतोबा)संतोष गांजुरे.

मी आणि माझी अहंकारीक वचने --- ६

           आपणांस ज्या क्षेत्रात कार्य करायचे आहे त्या क्षेत्रातील ज्ञान,कौशल्य आणि अनुभव हा हवाच फक्त इच्छा आणि हौस असून चालत नाही. समजा तुम्हाला शेती करायची आहे अन तुम्हाला गवत आणि गव्हाचे तृण यातील फरक कळत नसेल, कलिंगडाचे मोठं झाड असते की वेल असतो हे माहित नसेल , गाजर जमिनीच्या खाली येतं की वर येते हे साधं माहिती नसेल तर कसं होईल?

या विषयी तुकोबाराय म्हणतात
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. 
राजहंस दोन्ही वेगळाली. 
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. 
येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.

येथे तुकोबारायांना जात अपेक्षित नसून कौशल्य अपेक्षित आहे.

***************************************************************************************************************

           डोळ्यांतील चमक आणि चेहऱ्यावरील तेज, भाव बुद्धिमतेची,संस्काराची आणि नेक कर्तृत्वाच्या दृष्टीची झाक दर्शवत असतात. ती झाक, ते तेज तूप रोटी खाऊन आणि ढोंगबाजी करून कोणा बुजगावण्याच्या चेहऱ्यावर येत नसतेय ते अंगभूत असावे लागतेय.

**************************************************************************************************************


                 अगदी सर्वसामान्य व्यक्तीला मिळालेलं एखादे पद त्या व्यक्तीची समाजातील प्रतिष्ठा, मानमतराब वाढवत असते व काही व्यक्ती इतक्या कर्तृत्ववान असतात की त्यांच्यामुळे त्या पदाची प्रतिष्ठा वाढते व त्या व्यक्तीचे कार्य एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे पुढे त्या पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शक ठरत असते. 
पण एखाद्या व्यक्तीची नियत आणि कुवतच इतक्या खालच्या दर्जाची असते की त्या व्यक्तीची नसलेली आणि पदाची असलेली प्रतिष्ठाही धुळीस मिळते.

*************************************************************************************************************

                                                                                                                      (संतोबा)संतोष गांजुरे.

Sunday, May 27, 2018

पहिल्या पंचवार्षिकचा आढावा

              लोकशाही मार्गाने(अँरेंज मॅरेज) सत्ता स्थापन (संसार) केलेल्या सरकारला पहिल्या पंचवार्षिकमधील चार वर्षे आज पूर्ण झाली. ही सत्ता कोणत्याही अटी शर्तीविना(मानपान), तसेच कोणताही घोडेबाजार(हुंडा) न करता स्थापन झाली. २६ मे २०१४ रोजी दोघांचे मंत्रिमंडळ असलेल्या सरकारचा शपथविधी(विवाहसोहळा) मोठ्या थाटामाटात आणि सहस्रावधी जनतेच्या(पै-पाहुण्यांच्या) उपस्थितीत पार पडला.सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाला ओढ असते ती अभ्यास दौऱ्याची(हनिमून) मात्र सरकारपुढील आव्हानांची जाणीव असल्याने कोणताही दौरा न काढता तात्काळ दैनंदिन कारभारास(नोकरी) प्रारंभ करावा लागला. अर्थव्यवस्था(पगार) आधीच नाजूक होती ती आता अगदीच डबघाईला आलेली त्यातच दोन्ही पक्षांकडेच्या फुटीर सदस्यांच्या(नातेवाईक), विरोधांमुळे(मालमत्ता वाद) यामुळे सरकार चालवणे म्हणजे अगदी तारेवरची कसरत करण्यासारखं होते. कोणत्याही सरकारचे पहिल्या पंचवार्षिक मधील ध्येय असते ते मंत्रिमंडळ विस्ताराचे(दोनाचे तीन-चार) आणि त्यावरच बहुदा सरकारचं यशापयश ठरवलं जाते कारण सगळ्यांच्या मनात लोकशाही असली तरी रक्तात घराणेशाहीच असते. आमचा मंत्रिमंडळ विस्तार ११ फेब्रुवारी २०१६ रोजी वरदाराजच्या रूपाने झाला साहजिकच दोन्हीकडची मंडळी प्रचंड खुश झाली. हीच ती काय ती सरकारची चार वर्षांची निर्भेळ कामगिरी. बाकी खूप मेहनत,संघर्ष करून इतर क्षेत्रात फारसं यश नाही भेटले.
             अनेक अडचणींचा सामना आणि प्रत्येक गोष्टीसाठी मोठा संघर्ष करावा लागत असताना देखील सरकारमध्ये फार कुरबुरी झाल्या नाहीत उलट आवश्यकतेनुसार अनेक जबाबदाऱ्या स्वतःहून घेतल्या गेल्या. दोन्हीकडच्या पक्षश्रेष्ठींचे(आई-वडील) योगदान मोलाचे ठरले. कोणत्याच बाबतीत अविश्वास, संशयाचे वातावरण कधीच निर्माण झाले नाही आणि अविश्वास ठराव कधीही मांडला गेला नाही.वाद अजिबातच झाले नाहीत असे नाही पण त्याची वाच्यता सभागृहाबाहेर(घराबाहेर) कधीही झाली नाही याचे श्रेय गृहमंत्र्यांचे (लाईफपार्टनर). कारण मी शीघ्रकोपी असल्याने बऱ्याचदा सभात्याग(गृहत्याग) करण्याचा धमक्या दिल्या. अर्थात सरकार स्थापन करण्याच्या आधीच ह्याची दिली होती की ज्यावेळी तीव्र इच्छा होईल त्यावेळी मी सर्वत्याग करून कायमचा तिच्याकडे जाईल(मुंबई मेरी जान). खरंतर माझ्यासोबत सरकार स्थापण्याची बऱ्याच पक्षश्रेष्ठींची इच्छा होती. पण मी असो वा नसो कशी ही परिस्थिती असो पण न डगमगता एकहाती सरकार ते ही तत्वाने आणि नितीमत्तेने चालवण्याची कुवत असणाऱ्या पक्षासोबत आघाडी करायची हे निश्चित होतं आणि म्हणूनच या पक्षाबरोबर आघाडी केली आणि चार वर्षांनंतर हा निर्णय मास्टरस्ट्रोक(योग्य) ठरला या प्रचिती आली.
             खरंतर एवढा संघर्ष, तडजोडी कराव्या लागल्या नसत्या पण तत्वाने, नितीमत्तेने वागायचे म्हणले की असे होणारच. जगासाठी चांगले असणे स्वतः साठी वाईट असते, पण आम्ही हे सारे स्वखुशीने स्वीकारलेलं आहे. नाहीतर तसे तर आमच्याकडे सगळं काही अगदी नजर लागण्यासारखे आहे पण आम्हांला काहीतरी शाश्वत आणि स्वतःच्या हिंमतीवर करून दाखवायचे आहे.  फक्त स्वतःचा स्वार्थ पहिला तर सगळा आनंदीआनंदच असता. त्यामुळेच दोघांचे सरकार आणि पक्षश्रेष्ठींचे कसलेही बंधन नाही त्यामुळे सर्वांना आमचे एकदम मस्त मजेत चाललेले असे वाटते आणि ते साहजिकच आहे. आमचे दुर्लक्ष होते असे वाटते असे बऱ्याच जणांना वाटते तर काहींचा जळफळाट होतो पण त्यांना हे कळत नाही की हे दोघांचे मंत्रिमंडळ असले तरी राज्यविस्तार मोठा आहे. भरीसभर म्हणून तिजोरीवर अनुदान(आहेर,गिफ्ट्स), बुडीत कर्जे(उधारी),  न्यायव्यवस्था(कोर्ट केसेस), शिक्षण(बीसीए), सभागृह भाडे(घरभाडे) इ. अनेक गोष्टींचा अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे कधीकधी नाईलाजाने पक्षश्रेष्ठींकडून(आई) फंड घ्यावा लागला पण क्राऊडफंडिंग(उधारी,उसणे) कधी केली नाही . याशिवाय दोन राजधान्या असल्याने थोडीफार ओढाताण होती ती वेगळीच. त्यामुळे यापुढे मंत्रिमंडळ विस्तार करायचा नाही, हम दो, हमारे दो हे तत्व न पाळता हम दो हमारा एक हे तत्व पाळणार आहोत त्यामुळे पुढे खातेवाटपचा (वाटण्या) घोळही होणार नाही.बऱ्याचदा मित्रपक्ष(अर्धांगिनी) आणि मी वेगवेगळ्या राजधानीत राहून राज्यकारभार करत असल्याने काहीतरी बिनसलं आहे असाही बऱ्याच जणांचा गैरसमज आहे पण वेगळे राहणे मंत्रिमंडळ विस्तारामुळे (वरदराज) आहे. बाकी काही मनभेद नाहीत.
          अगदी पुर्वीपासून आमचा फटकळपणा,तत्वनिष्ठपणा आणि अहंकारीपणामुळे मी कोणाबरोबरही सरकार स्थापन केले तरी ते टिकेल की नाही याची इतरांनाच काय मला स्वतःला पण शंकाच होती.  आमचे सरकार भरभक्कम स्थितीत आहे ते आमच्या मित्रपक्षाचा(अर्धांगिनी) समजूतदारपणा, त्यांच्या व आमच्या पक्षश्रेष्ठींचे, कार्यकर्त्यांचे(दोन्हीकडील आईवडील,भावंडे) फार मोठे सहकार्य आणि मार्गदर्शन व मित्रमंडळींचा पाठिंबा या जोरावरच हे शक्य झाले आहे. आमच्या मित्रपक्षाने जो समजूतदारपणा दाखवला आहे, जी तडजोड केली आहे त्याला तोडच नाही. हे जे काही आहे ते फक्त मित्रपक्षामुळेच. मागील चार वर्षाच्या कार्याचा आढावा घेताना हे सरकार यापुढे अजून चांगल्याप्रकारे कारभार करेल याची ग्वाही देतो. हे सरकार जसे चार वर्षे चांगल्या रीतीने चालले त्यापेक्षाही अजून उत्तम रीतीने पुढील पन्नास वर्षे कारभार करेल याबाबत कोणाच्या मनात शंका नसावी.      
                                                                                                               (संतोबा)संतोष गांजुरे.

Wednesday, April 11, 2018

काल मला देव भेटला- २

               हिंजवडीला ऑफिसला जायला लागल्यापासून आयुष्य यंत्रवत झालं आहे. हडपसर-हिंजवडी प्रवासामुळे दिवसातील चौदा-पंधरा तास कामात आणि प्रवासात जात असतात. अर्थात त्यामुळे मुंबईत घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऑफिसचे दिवस आठवतात. आपल्याला वैयक्तिक भूतकाळातील दिवस आठवून हळहळ व्यक्त करण्याचा तर सामाजिक भूतकाळ आठवून फुका अभिमान बाळगण्याचा आनुवंशिक, संसर्गजन्य रोग असल्यासारखे वाटते. आपण वर्तमानात कमी आणि भूतकाळातील इतिहासात आणि भविष्यकाळातील स्वप्नात जास्त रमत असतो. मुंबईत फक्त ऑफिसला जाण्याचेही ओझे वाटायचे त्यामुळे कधी पुढील शिक्षण पूर्ण करावे असा विचारही मनात आला नाही पण मे २०१४ मध्ये लग्नाच्या निमित्ताने मुंबई सोडावी लागली आणि अचानक जबाबदाऱ्याचा डोंगर आणि संकटांचे आभाळ कोसळले. विवाहानंतरच्या वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि नोकरीव्यतिरिक्त,  सुट्टीच्या दिवशी कोर्ट केसेस, कॉलेज, गावाकडे शेतीची कामे, तर कधी कौटुंबिक कार्यक्रम या सर्वांवर अपुरा असलेला वेळ आणि पैसा खर्च यांचा ताळमेळ घालण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे शिवाय आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय गोष्टी पाहून प्रचंड अस्वस्थ व्हायला होते ते वेगळेच.
                 अशाच विचारातून न पटणारी गोष्ट करण्याचे ठरवले कारण कोठून न कोठून सुरुवात करण्याची गरज होती. ह्याच हेतूने मागच्या चार-आठ दिवसांपासून कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी चालू होती, या धावपळीमुळे आज लवकरच गाढ झोप लागली होती. गाढ झोपेत असतानाच अचानक कोणीतरी संतोबा म्हणून हाक मारल्याचा भास झाला, खरं तर संतोबा नावाने फार कोणी मला हाक मारत नाही. त्यामुळे अचानक दचकून जागा झालो तर समोर तात्यासाहेब व सावित्रीमाई!मी उठून दोघांना साष्टांग दंडवत घातला. सावित्रीमाई धीरगंभीर होत्या तात्यासाहेब मात्र भयंकर क्रोधीत दिसत होते. त्यांनी रागातच विचारलं संतोबा काय चाललंय हे? त्यांच्या आवाजात जरब होती.
  खरं तर मला घामच फुटला होता पण असं काही न दाखवता मोठया हिंमतीने बोलू लागलो, तात्यासाहेब, आपली जयंती साजरी करण्याचे नियोजन आहे. गावातून आपल्या पुतळ्याची वाजतगाजत मिरवणूक काढाणार आहोत, आणि बुलेट रॅली काढण्याचे देखिल नियोजन आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांना गोळा करून मोठया जोशात हा सोहळा पार पडणार आहोत आम्ही.
            पण हे सगळं कशासाठी आणि मोठ्या प्रमाणावर लोक का येतील? त्याच जरबेत तात्यासाहेबांनी प्रतिप्रश्न केला.
            तात्यासाहेब हा एक शक्तीप्रदर्शनाचाच सोहळा आहे, आणि लोक का येणार नाहीत! लोकं येण्यासाठी जे लागते ते सारं करणार आहोत आम्ही, डिजेच्या दणदणाटात शांता, शालू लावल्यावर आणि झिंगाट होण्याची सोय केल्यावर लोक का येणार नाहीत ! बुलेटवाल्यांच्या आणि त्यांच्या गाड्यांच्या टाक्या फुल करणार आहोत! शिवाय आपला माळीसमाजही बहुसंख्येने आहे इथे, त्यांनाही एका युगपुरुषाचे वारसदार असल्याचा अभिमानच आहेच  तुम्ही बघाच कशी गर्दी होतेय ते. गर्दी होणारच आहे त्यामुळे स्थानिक पुढारी सहभागी होणार आहेतच पण मोठे नेते येण्याची पण शक्यता आहे शिवाय पत्रकार पण येणार आहेत. आपणांस "भारतरत्न" देण्याची आमची पूर्वीपासूनची मागणी आहे त्याचा पुनरुच्चार या निमित्ताने केला जाईल आणि तशी वातावरणनिर्मिती केली जाईल आणि हे राज्यात ठीक ठिकाणी हे असं घडणार आहे त्यामुळे या मागणीला बळ मिळणार आहे. मोठ्या नेत्यांनी ही संसदेत आणि विधानसभेत मागणी केली आहे आणि अनेकांचा पाठिंबा पण आहे. तात्यासाहेब आपणांस भारतरत्न मिळवण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.
                      आता तात्यासाहेबांच्या चेहऱ्यावर क्रोधाबरोबरच, चीड आणि हतबलता ही दिसत होती. खुर्चीवर बसत तात्यासाहेब बोलले, माझ्याकडे काय नव्हते?  पैसा होता, ताकद होती, लोकांचा पाठिंबा होता मला शक्ती प्रदर्शन करता येत नव्हतं का? आम्ही दोघांनी आणि आमच्या सहकाऱ्यांनी आयुष्य खर्ची केले ते मान-सन्मान मिळवण्यासाठी की नाव कमावण्यासाठी. संतोबा, बहुसंख्य समाज गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा, जातपात, मानसिक,सामाजिक,राजकीय गुलामगिरीत खितपत पडला होता. प्रचंड कष्ट, दुःख, अपमान त्यांच्या वाट्याला आले होते त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी आम्ही कार्य केले त्यावेळी आम्ही जातपात पाहिली का? आणि पहिली असती तर हे कार्य आमच्याकडून झाले असते का? असे कोणते कार्य माळ्यांसाठी केले पण इतर समाजासाठी केले नाही. शाळा माळ्यांसाठी काढल्या का?हौद खुला केला की त्यांच्या विधवांचा सांभाळ केला, आजारपणं काढली? असं नाही तर माझा माळीसमाज असे कसे म्हणतोस? आम्ही ना जात मानली ना कोणाबरोबर भेदभाव केला, आम्ही हे मिटवण्यासाठी झटलो असे असताना मग फक्त माळी म्हणून तू माझा वारसदार कसा? अरे मला आणि इतरांनाही त्या त्या जातीतीलच लोकांनी जास्त त्रास दिला आणि त्या त्रास देणाऱ्यात तुझे पूर्वज नसतील आणि तू त्यांचा वारसा चालवत नसशील हे कशावरून? तुम्ही सारे ढोंगी, मतलबी, स्वार्थी आहात, आम्हाला जाती जातीत विभागून जातीच्या नावावर टोळ्या उभारायचे उद्योग चालवले आहेत. तुमचे हे उद्योग आमच्या कार्यासच नव्हे तर तुमच्याही कर्तव्यात आणि कर्तृत्ववात बाधा आणत आहेत याचे भान कधी येणार? भारतरत्न  म्हणशील तर तो माझ्याकाळात अस्तित्वात तरी होता का रे? काहीही मुद्दे काढून लोकांची माथी का भडकवत आहात?
                 मी संयमितपणे आजचे वास्तव सांगण्याचा प्रयत्न करू लागलो. तात्यासाहेब, तुम्ही म्हणता तसा समाज आजही तसाच आहे काही बदल निश्चित झालेत, काही गोष्टींचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही, शिक्षणाची दुरवस्था, गोरगरिबांवरचा अन्याय, शेतकऱ्यांची पिळवणूक तसेच स्रियांना आजही इज्जतीच्या कोंदणात अडकवले आहे आणि विधवा विवाह नामंजूर आहे , आजही जातपात अस्तित्वात आहे  आणि शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणले की काही लोकांच्या मेंदूतून विखारी,जातीय विचारांच्या उलट्या होत असतात.  समाज अजूनही धर्म,जात,भाषा आणि प्रादेशिक अस्मितेत अडकला आहे. तुम्ही माणसांना माणसात आणलं याचा त्यांना राग आहे. कारण त्यांच्या  वर्चस्वाला तुम्ही सुरुंग लावलात, त्यांचे तथाकथित श्रेष्ठत्व तुम्ही नाकारलंत. तुम्ही समाजाच्या भल्यासाठी विद्रोह केलात म्हणून त्यांनी तुम्हाला देशद्रोही ठरवले. आपल्या थोर कार्याची जाण त्यांनाही आहे पण कोणता तरी एखादा मुद्दा घेऊन तुमच्या वर टीका करायची हे जातीच्या वर्चस्वातून नाही तर काय आहे अन्यथा आपण त्यांच्या जातीत जन्मास येता तर अद्यापपर्यंत आपणां उभयंताची अनेक पुस्तकेच काय एखादा धर्मग्रंथही लिहिला गेला असता व रोज त्याची पारायणे केली असती. मग त्याच जातीच्या दृष्टिकोनातून आम्ही आपली जयंती साजरी केली तर कुठं बिघडतंय.
              एकंदरीत अजून कार्य करण्यास बरीच संधी आहे तर , तात्यासाहेब मिश्किल हसत हसत म्हणाले. पूढे समजावणीच्या सुरात बोलू लागले, संतोबा आम्ही कमी का सहन केले आहे, आमचा मार्ग किती खडतर होता याची थोडी का होईना जाण तुम्हाला आहे. बदल एवढा सहज नसतो रे अगदी स्वतः मध्ये करायचा असेल तरी आणि समाजात असेल तरी. आपण कार्य करत असताना अनंत अडचणी येत असतील, त्या येणारच पण त्यांनी खचून न जाता मोठ्या धैर्याने पुढे वाटचाल करावी. जर तुमचे कार्य निस्वार्थ आणि तत्त्वनिष्ठ असेल तर टीका करणाऱ्याकडे कसल्याही बदल्याच्या भावनेने पाहू नये शिवाय त्या  टिकेला आपल्या कार्याची पोच समजावी, वाद घालण्यात वेळ व्यर्थ न दवडावा.
                 मला तात्यासाहेबांचे सारं काही पटत होते. ही एक अजाणतेपणी आणि प्रतिक्रियेतून झालेली चूक होती आणि त्याबद्दल मला माफी मागणे गरजेचे होते.  तात्यासाहेब मी असला थिल्लरपणा पुन्हा करणार नाही, निमुटपणे मी माझे कार्य करीत राहीन. कधी कधी वाईटातून ही चांगली गोष्ट घडते ती अशी. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला अपेक्षित असा जात आणि पक्षविरहीत समाज आपल्या खानवडी, पारगांव पंचक्रोशीत अस्तित्वासाठी लढा देण्यास एकत्र आला आहे, तात्यासाहेब सरकारने आपल्या खानवडी, पारगांव परिसरात शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता मोठं विमानतळ उभारणच्या घाट घातला आहे, विरोध कमी करण्यासाठी अनेक प्रलोभनाबरोबरच, अस्मितेचे ही राजकारण केले जात आहे. विमानतळाची घोषणा करतानाच त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा केली, कारण विमानतळाला विरोध म्हणजे धाकल्या छत्रपतींना विरोध असा समज व्हावा पण लोकांनी तेवढाच जोरदार विरोध केला म्हणून लोकांत फूट पाडण्यासाठी आम्ही फुलेंना भारतरत्न देऊ असे काही म्हणाले लोकांनी त्यांना हाकलून दिले, काहींनी विमानतळाला महात्मा फुलेंचे नाव देण्याची मागणी केली लोकांनी साधी दखल पण नाही घेतली. लोकांना दिखाऊ अस्मितेपेक्षा अस्तित्व महत्वाचे हे कळलंय हे ही खूप आहे, नाही का तात्यासाहेब.
संतोबा तुझं काय मत त्यासंदर्भात सांग? तात्यासाहेब हसत हसत म्हणाले.
               तात्यासाहेब माझा आणि सर्व शेतकऱ्यांचा विमानतळास विरोधच आहे, माझा अप्रत्यक्ष सहभाग तर आहेच पण लेखनाच्या माध्यमातून देखील विरोध दर्शवण्याचा प्रयत्न आहे.
डोक्यावरून हात फिरवत तात्यासाहेबांनी प्रेमाने यशस्वी हो आशिर्वाद दिला आणि मोठं कार्य कर, जातीपातीत अडकू नको. असा संदेश दिला व त्यानंतर आम्ही निघतो असे म्हणत तात्यासाहेब व सावित्रीमाई निघून गेले.
                 मी तात्यासाहेबांशी बोललो, भांडलो, त्यांचा आशिर्वाद घेतला पण सावित्रीमाईंशी बोलण्याची हिंमत मात्र झाली नाही. त्यांच्या कार्याला आपण न्याय तर देऊच शकलो नाही पण आपला स्रियांबाबतचा दृष्टिकोनही फारसा बदललेला नाही. त्याबाबतीत आपल्याला अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. सगळे महापुरुष हे हाडामासांची माणसेच होती. त्यांचा एक जीवनकाळ होता मात्र त्यांच्या कार्याला कोणत्याही काळात बंदिस्त करता येते ना ते कोणत्यातरी जातीत ते जन्माला आले म्हणून त्या जातीत त्यांना बंदिस्त करता येते. आणि तसे करण्याचा कोणी प्रयत्नही करून नये. त्यांचे कार्य अखंड मानवजातीच्या उन्नतीसाठी होतं आणि म्हणूनच ते चिरकाल टिकणारे आहे. त्यांनी भरभक्कम पाया रचलेला आहे, त्यांचे कार्य ,विचार यांना त्याच निष्ठेने पुढे नेणे हे सर्वांचे कर्तव्यच आहे. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथी साजऱ्या कराव्यात मात्र ते करताना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा ना की बदनामी व्हावी, सर्व समाज एकत्रित यावा ना की तो जातीत विभागला जावा, त्यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा सदैव एकदिलाने पुढे पुढेच न्यावा. कोणताही पुरस्कार त्यांच्या कार्यापेक्षा मोठा नाही म्हणून तो त्यांना मिळावा म्हणून कसलाही अट्टहास करू नये. त्यांना जर पुरस्कार भेटला तर तो त्यांचा नाही तर त्या पुरस्काराचा सन्मान असेल मग तो पुरस्कार भारतरत्न असो वा अन्य कोणताही. हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराबाई, क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि ते सर्व ज्यांनी ज्यांनी राजकीय, सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्राबरोबरच सर्वच समाजाला प्रगतीच्या दिशेला नेले त्या सर्वांचा हा महाराष्ट्र आहे. आणि होय हा शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. पुरोगामी बनणे एवढे सोपे नाही पण समतेचे तत्व अंगीकारून त्या मार्गावर वाटचाल चालू आहे हे निश्चित!
             क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलें  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस, कार्यास विनम्र अभिवादन.
                                                                                              संतोबा (संतोष गांजुरे)
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!