Ads 468x60px

Thursday, August 2, 2018

नको नको हो विमानतळ

नको नको हो विमानतळ.
फळां - फुलांचे फुलवू शिवार,
सोबत वाटाणा, भेंडी अन् गवार.
माळव्याचा असे बारामाही बहार,
घाला हो या ब्रह्मराक्षसास आवर.

नको नको हो विमानतळ.
सांगतो पुन्हा एकदा प्रेमाने,
शेतीच करू आम्ही जोमाने.
शेत सिंचतो आम्ही घामाने,
विकणार ना कसल्या दामाने.

नको नको हो विमानतळ.
कसले लागले हे ग्रहण,
गोरगरिबांचे होईल मरण.
काळया आईस ठेऊनी तारण,
कसे सुधारेल हो अर्थकारण.

नको नको हो विमानतळ.
जीव असा कासावीस होई,
प्राण आमुचा कंठाशी येई.
का करिता ही जीवघेणी घाई,
कशी विकावी हो काळी आई.

नको नको हो विमानतळ.
होईल आता लढाई आरपार,
जाईल प्राण पण न घेऊ माघार.
गोरगरिबांचा काळ झालंय सरकार,
त्याचा प्राणपणाने करू हो प्रतिकार.
                                    संतोबा (संतोष गांजुरे).


Thursday, June 21, 2018

मी आणि माझी अहंकारीक वचने --- ७

                 अपप्रवृत्तींना जेवढी मोकळीक द्याल तेवढी त्यांची ताकद वाढत जाते. आज आपण सुपात आहोत म्हणून गहाळ बसलो तर उद्या जात्यात भरडल्याशिवाय राहणार नाही! त्यामुळे अपप्रवृत्तींना वेळच्या वेळी ठेचून काढले पाहिजे नाहीतर त्या एकदा मानगुटीवर बसल्या तर आपली सुटका केवळ अशक्य !

******************************************************************

मानवाची प्रगती!!!
वाघ,सिंह म्हणलं की प्रतिष्ठा,
गाढव,माकड,कुत्रं म्हणलं की अपमान.
पण माणसाला माणूस म्हणून मान्यता आणि प्रतिष्ठा भेटेल काय? 

******************************************************************


श्रेष्ठत्वाचा अतिरेक फार वाईट! आपण वा आपला समूहच फार श्रेष्ठ हा अहंकार आपणांस दुर्मिळ बनवतो आणि दुर्मिळ गोष्टी फार काळ टिकत नाहीत.

******************************************************************

वेळेआधी आणि योग्यतेपेक्षा जास्त मिळाले की तोल ढासळतोच.

*****************************************************************

एकवेळ नितीमान शत्रूपासून बेसावध राहिलं तरी चालेल पण 
हीन मनोवृत्तीच्या लोकांपासून कायम सावध राहिले पाहिजे.

****************************************************************
                                                                                                               (संतोबा)संतोष गांजुरे.

मी आणि माझी अहंकारीक वचने --- ६

           आपणांस ज्या क्षेत्रात कार्य करायचे आहे त्या क्षेत्रातील ज्ञान,कौशल्य आणि अनुभव हा हवाच फक्त इच्छा आणि हौस असून चालत नाही. समजा तुम्हाला शेती करायची आहे अन तुम्हाला गवत आणि गव्हाचे तृण यातील फरक कळत नसेल, कलिंगडाचे मोठं झाड असते की वेल असतो हे माहित नसेल , गाजर जमिनीच्या खाली येतं की वर येते हे साधं माहिती नसेल तर कसं होईल?

या विषयी तुकोबाराय म्हणतात
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. 
राजहंस दोन्ही वेगळाली. 
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. 
येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.

येथे तुकोबारायांना जात अपेक्षित नसून कौशल्य अपेक्षित आहे.

***************************************************************************************************************

           डोळ्यांतील चमक आणि चेहऱ्यावरील तेज, भाव बुद्धिमतेची,संस्काराची आणि नेक कर्तृत्वाच्या दृष्टीची झाक दर्शवत असतात. ती झाक, ते तेज तूप रोटी खाऊन आणि ढोंगबाजी करून कोणा बुजगावण्याच्या चेहऱ्यावर येत नसतेय ते अंगभूत असावे लागतेय.

**************************************************************************************************************


                 अगदी सर्वसामान्य व्यक्तीला मिळालेलं एखादे पद त्या व्यक्तीची समाजातील प्रतिष्ठा, मानमतराब वाढवत असते व काही व्यक्ती इतक्या कर्तृत्ववान असतात की त्यांच्यामुळे त्या पदाची प्रतिष्ठा वाढते व त्या व्यक्तीचे कार्य एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे पुढे त्या पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शक ठरत असते. 
पण एखाद्या व्यक्तीची नियत आणि कुवतच इतक्या खालच्या दर्जाची असते की त्या व्यक्तीची नसलेली आणि पदाची असलेली प्रतिष्ठाही धुळीस मिळते.

*************************************************************************************************************

                                                                                                                      (संतोबा)संतोष गांजुरे.

Sunday, May 27, 2018

पहिल्या पंचवार्षिकचा आढावा

              लोकशाही मार्गाने(अँरेंज मॅरेज) सत्ता स्थापन (संसार) केलेल्या सरकारला पहिल्या पंचवार्षिकमधील चार वर्षे आज पूर्ण झाली. ही सत्ता कोणत्याही अटी शर्तीविना(मानपान), तसेच कोणताही घोडेबाजार(हुंडा) न करता स्थापन झाली. २६ मे २०१४ रोजी दोघांचे मंत्रिमंडळ असलेल्या सरकारचा शपथविधी(विवाहसोहळा) मोठ्या थाटामाटात आणि सहस्रावधी जनतेच्या(पै-पाहुण्यांच्या) उपस्थितीत पार पडला.सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाला ओढ असते ती अभ्यास दौऱ्याची(हनिमून) मात्र सरकारपुढील आव्हानांची जाणीव असल्याने कोणताही दौरा न काढता तात्काळ दैनंदिन कारभारास(नोकरी) प्रारंभ करावा लागला. अर्थव्यवस्था(पगार) आधीच नाजूक होती ती आता अगदीच डबघाईला आलेली त्यातच दोन्ही पक्षांकडेच्या फुटीर सदस्यांच्या(नातेवाईक), विरोधांमुळे(मालमत्ता वाद) यामुळे सरकार चालवणे म्हणजे अगदी तारेवरची कसरत करण्यासारखं होते. कोणत्याही सरकारचे पहिल्या पंचवार्षिक मधील ध्येय असते ते मंत्रिमंडळ विस्ताराचे(दोनाचे तीन-चार) आणि त्यावरच बहुदा सरकारचं यशापयश ठरवलं जाते कारण सगळ्यांच्या मनात लोकशाही असली तरी रक्तात घराणेशाहीच असते. आमचा मंत्रिमंडळ विस्तार ११ फेब्रुवारी २०१६ रोजी वरदाराजच्या रूपाने झाला साहजिकच दोन्हीकडची मंडळी प्रचंड खुश झाली. हीच ती काय ती सरकारची चार वर्षांची निर्भेळ कामगिरी. बाकी खूप मेहनत,संघर्ष करून इतर क्षेत्रात फारसं यश नाही भेटले.
             अनेक अडचणींचा सामना आणि प्रत्येक गोष्टीसाठी मोठा संघर्ष करावा लागत असताना देखील सरकारमध्ये फार कुरबुरी झाल्या नाहीत उलट आवश्यकतेनुसार अनेक जबाबदाऱ्या स्वतःहून घेतल्या गेल्या. दोन्हीकडच्या पक्षश्रेष्ठींचे(आई-वडील) योगदान मोलाचे ठरले. कोणत्याच बाबतीत अविश्वास, संशयाचे वातावरण कधीच निर्माण झाले नाही आणि अविश्वास ठराव कधीही मांडला गेला नाही.वाद अजिबातच झाले नाहीत असे नाही पण त्याची वाच्यता सभागृहाबाहेर(घराबाहेर) कधीही झाली नाही याचे श्रेय गृहमंत्र्यांचे (लाईफपार्टनर). कारण मी शीघ्रकोपी असल्याने बऱ्याचदा सभात्याग(गृहत्याग) करण्याचा धमक्या दिल्या. अर्थात सरकार स्थापन करण्याच्या आधीच ह्याची दिली होती की ज्यावेळी तीव्र इच्छा होईल त्यावेळी मी सर्वत्याग करून कायमचा तिच्याकडे जाईल(मुंबई मेरी जान). खरंतर माझ्यासोबत सरकार स्थापण्याची बऱ्याच पक्षश्रेष्ठींची इच्छा होती. पण मी असो वा नसो कशी ही परिस्थिती असो पण न डगमगता एकहाती सरकार ते ही तत्वाने आणि नितीमत्तेने चालवण्याची कुवत असणाऱ्या पक्षासोबत आघाडी करायची हे निश्चित होतं आणि म्हणूनच या पक्षाबरोबर आघाडी केली आणि चार वर्षांनंतर हा निर्णय मास्टरस्ट्रोक(योग्य) ठरला या प्रचिती आली.
             खरंतर एवढा संघर्ष, तडजोडी कराव्या लागल्या नसत्या पण तत्वाने, नितीमत्तेने वागायचे म्हणले की असे होणारच. जगासाठी चांगले असणे स्वतः साठी वाईट असते, पण आम्ही हे सारे स्वखुशीने स्वीकारलेलं आहे. नाहीतर तसे तर आमच्याकडे सगळं काही अगदी नजर लागण्यासारखे आहे पण आम्हांला काहीतरी शाश्वत आणि स्वतःच्या हिंमतीवर करून दाखवायचे आहे.  फक्त स्वतःचा स्वार्थ पहिला तर सगळा आनंदीआनंदच असता. त्यामुळेच दोघांचे सरकार आणि पक्षश्रेष्ठींचे कसलेही बंधन नाही त्यामुळे सर्वांना आमचे एकदम मस्त मजेत चाललेले असे वाटते आणि ते साहजिकच आहे. आमचे दुर्लक्ष होते असे वाटते असे बऱ्याच जणांना वाटते तर काहींचा जळफळाट होतो पण त्यांना हे कळत नाही की हे दोघांचे मंत्रिमंडळ असले तरी राज्यविस्तार मोठा आहे. भरीसभर म्हणून तिजोरीवर अनुदान(आहेर,गिफ्ट्स), बुडीत कर्जे(उधारी),  न्यायव्यवस्था(कोर्ट केसेस), शिक्षण(बीसीए), सभागृह भाडे(घरभाडे) इ. अनेक गोष्टींचा अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे कधीकधी नाईलाजाने पक्षश्रेष्ठींकडून(आई) फंड घ्यावा लागला पण क्राऊडफंडिंग(उधारी,उसणे) कधी केली नाही . याशिवाय दोन राजधान्या असल्याने थोडीफार ओढाताण होती ती वेगळीच. त्यामुळे यापुढे मंत्रिमंडळ विस्तार करायचा नाही, हम दो, हमारे दो हे तत्व न पाळता हम दो हमारा एक हे तत्व पाळणार आहोत त्यामुळे पुढे खातेवाटपचा (वाटण्या) घोळही होणार नाही.बऱ्याचदा मित्रपक्ष(अर्धांगिनी) आणि मी वेगवेगळ्या राजधानीत राहून राज्यकारभार करत असल्याने काहीतरी बिनसलं आहे असाही बऱ्याच जणांचा गैरसमज आहे पण वेगळे राहणे मंत्रिमंडळ विस्तारामुळे (वरदराज) आहे. बाकी काही मनभेद नाहीत.
          अगदी पुर्वीपासून आमचा फटकळपणा,तत्वनिष्ठपणा आणि अहंकारीपणामुळे मी कोणाबरोबरही सरकार स्थापन केले तरी ते टिकेल की नाही याची इतरांनाच काय मला स्वतःला पण शंकाच होती.  आमचे सरकार भरभक्कम स्थितीत आहे ते आमच्या मित्रपक्षाचा(अर्धांगिनी) समजूतदारपणा, त्यांच्या व आमच्या पक्षश्रेष्ठींचे, कार्यकर्त्यांचे(दोन्हीकडील आईवडील,भावंडे) फार मोठे सहकार्य आणि मार्गदर्शन व मित्रमंडळींचा पाठिंबा या जोरावरच हे शक्य झाले आहे. आमच्या मित्रपक्षाने जो समजूतदारपणा दाखवला आहे, जी तडजोड केली आहे त्याला तोडच नाही. हे जे काही आहे ते फक्त मित्रपक्षामुळेच. मागील चार वर्षाच्या कार्याचा आढावा घेताना हे सरकार यापुढे अजून चांगल्याप्रकारे कारभार करेल याची ग्वाही देतो. हे सरकार जसे चार वर्षे चांगल्या रीतीने चालले त्यापेक्षाही अजून उत्तम रीतीने पुढील पन्नास वर्षे कारभार करेल याबाबत कोणाच्या मनात शंका नसावी.      
                                                                                                               (संतोबा)संतोष गांजुरे.

Wednesday, April 11, 2018

काल मला देव भेटला- २

               हिंजवडीला ऑफिसला जायला लागल्यापासून आयुष्य यंत्रवत झालं आहे. हडपसर-हिंजवडी प्रवासामुळे दिवसातील चौदा-पंधरा तास कामात आणि प्रवासात जात असतात. अर्थात त्यामुळे मुंबईत घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऑफिसचे दिवस आठवतात. आपल्याला वैयक्तिक भूतकाळातील दिवस आठवून हळहळ व्यक्त करण्याचा तर सामाजिक भूतकाळ आठवून फुका अभिमान बाळगण्याचा आनुवंशिक, संसर्गजन्य रोग असल्यासारखे वाटते. आपण वर्तमानात कमी आणि भूतकाळातील इतिहासात आणि भविष्यकाळातील स्वप्नात जास्त रमत असतो. मुंबईत फक्त ऑफिसला जाण्याचेही ओझे वाटायचे त्यामुळे कधी पुढील शिक्षण पूर्ण करावे असा विचारही मनात आला नाही पण मे २०१४ मध्ये लग्नाच्या निमित्ताने मुंबई सोडावी लागली आणि अचानक जबाबदाऱ्याचा डोंगर आणि संकटांचे आभाळ कोसळले. विवाहानंतरच्या वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि नोकरीव्यतिरिक्त,  सुट्टीच्या दिवशी कोर्ट केसेस, कॉलेज, गावाकडे शेतीची कामे, तर कधी कौटुंबिक कार्यक्रम या सर्वांवर अपुरा असलेला वेळ आणि पैसा खर्च यांचा ताळमेळ घालण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे शिवाय आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय गोष्टी पाहून प्रचंड अस्वस्थ व्हायला होते ते वेगळेच.
                 अशाच विचारातून न पटणारी गोष्ट करण्याचे ठरवले कारण कोठून न कोठून सुरुवात करण्याची गरज होती. ह्याच हेतूने मागच्या चार-आठ दिवसांपासून कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी चालू होती, या धावपळीमुळे आज लवकरच गाढ झोप लागली होती. गाढ झोपेत असतानाच अचानक कोणीतरी संतोबा म्हणून हाक मारल्याचा भास झाला, खरं तर संतोबा नावाने फार कोणी मला हाक मारत नाही. त्यामुळे अचानक दचकून जागा झालो तर समोर तात्यासाहेब व सावित्रीमाई!मी उठून दोघांना साष्टांग दंडवत घातला. सावित्रीमाई धीरगंभीर होत्या तात्यासाहेब मात्र भयंकर क्रोधीत दिसत होते. त्यांनी रागातच विचारलं संतोबा काय चाललंय हे? त्यांच्या आवाजात जरब होती.
  खरं तर मला घामच फुटला होता पण असं काही न दाखवता मोठया हिंमतीने बोलू लागलो, तात्यासाहेब, आपली जयंती साजरी करण्याचे नियोजन आहे. गावातून आपल्या पुतळ्याची वाजतगाजत मिरवणूक काढाणार आहोत, आणि बुलेट रॅली काढण्याचे देखिल नियोजन आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांना गोळा करून मोठया जोशात हा सोहळा पार पडणार आहोत आम्ही.
            पण हे सगळं कशासाठी आणि मोठ्या प्रमाणावर लोक का येतील? त्याच जरबेत तात्यासाहेबांनी प्रतिप्रश्न केला.
            तात्यासाहेब हा एक शक्तीप्रदर्शनाचाच सोहळा आहे, आणि लोक का येणार नाहीत! लोकं येण्यासाठी जे लागते ते सारं करणार आहोत आम्ही, डिजेच्या दणदणाटात शांता, शालू लावल्यावर आणि झिंगाट होण्याची सोय केल्यावर लोक का येणार नाहीत ! बुलेटवाल्यांच्या आणि त्यांच्या गाड्यांच्या टाक्या फुल करणार आहोत! शिवाय आपला माळीसमाजही बहुसंख्येने आहे इथे, त्यांनाही एका युगपुरुषाचे वारसदार असल्याचा अभिमानच आहेच  तुम्ही बघाच कशी गर्दी होतेय ते. गर्दी होणारच आहे त्यामुळे स्थानिक पुढारी सहभागी होणार आहेतच पण मोठे नेते येण्याची पण शक्यता आहे शिवाय पत्रकार पण येणार आहेत. आपणांस "भारतरत्न" देण्याची आमची पूर्वीपासूनची मागणी आहे त्याचा पुनरुच्चार या निमित्ताने केला जाईल आणि तशी वातावरणनिर्मिती केली जाईल आणि हे राज्यात ठीक ठिकाणी हे असं घडणार आहे त्यामुळे या मागणीला बळ मिळणार आहे. मोठ्या नेत्यांनी ही संसदेत आणि विधानसभेत मागणी केली आहे आणि अनेकांचा पाठिंबा पण आहे. तात्यासाहेब आपणांस भारतरत्न मिळवण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.
                      आता तात्यासाहेबांच्या चेहऱ्यावर क्रोधाबरोबरच, चीड आणि हतबलता ही दिसत होती. खुर्चीवर बसत तात्यासाहेब बोलले, माझ्याकडे काय नव्हते?  पैसा होता, ताकद होती, लोकांचा पाठिंबा होता मला शक्ती प्रदर्शन करता येत नव्हतं का? आम्ही दोघांनी आणि आमच्या सहकाऱ्यांनी आयुष्य खर्ची केले ते मान-सन्मान मिळवण्यासाठी की नाव कमावण्यासाठी. संतोबा, बहुसंख्य समाज गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा, जातपात, मानसिक,सामाजिक,राजकीय गुलामगिरीत खितपत पडला होता. प्रचंड कष्ट, दुःख, अपमान त्यांच्या वाट्याला आले होते त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी आम्ही कार्य केले त्यावेळी आम्ही जातपात पाहिली का? आणि पहिली असती तर हे कार्य आमच्याकडून झाले असते का? असे कोणते कार्य माळ्यांसाठी केले पण इतर समाजासाठी केले नाही. शाळा माळ्यांसाठी काढल्या का?हौद खुला केला की त्यांच्या विधवांचा सांभाळ केला, आजारपणं काढली? असं नाही तर माझा माळीसमाज असे कसे म्हणतोस? आम्ही ना जात मानली ना कोणाबरोबर भेदभाव केला, आम्ही हे मिटवण्यासाठी झटलो असे असताना मग फक्त माळी म्हणून तू माझा वारसदार कसा? अरे मला आणि इतरांनाही त्या त्या जातीतीलच लोकांनी जास्त त्रास दिला आणि त्या त्रास देणाऱ्यात तुझे पूर्वज नसतील आणि तू त्यांचा वारसा चालवत नसशील हे कशावरून? तुम्ही सारे ढोंगी, मतलबी, स्वार्थी आहात, आम्हाला जाती जातीत विभागून जातीच्या नावावर टोळ्या उभारायचे उद्योग चालवले आहेत. तुमचे हे उद्योग आमच्या कार्यासच नव्हे तर तुमच्याही कर्तव्यात आणि कर्तृत्ववात बाधा आणत आहेत याचे भान कधी येणार? भारतरत्न  म्हणशील तर तो माझ्याकाळात अस्तित्वात तरी होता का रे? काहीही मुद्दे काढून लोकांची माथी का भडकवत आहात?
                 मी संयमितपणे आजचे वास्तव सांगण्याचा प्रयत्न करू लागलो. तात्यासाहेब, तुम्ही म्हणता तसा समाज आजही तसाच आहे काही बदल निश्चित झालेत, काही गोष्टींचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही, शिक्षणाची दुरवस्था, गोरगरिबांवरचा अन्याय, शेतकऱ्यांची पिळवणूक तसेच स्रियांना आजही इज्जतीच्या कोंदणात अडकवले आहे आणि विधवा विवाह नामंजूर आहे , आजही जातपात अस्तित्वात आहे  आणि शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणले की काही लोकांच्या मेंदूतून विखारी,जातीय विचारांच्या उलट्या होत असतात.  समाज अजूनही धर्म,जात,भाषा आणि प्रादेशिक अस्मितेत अडकला आहे. तुम्ही माणसांना माणसात आणलं याचा त्यांना राग आहे. कारण त्यांच्या  वर्चस्वाला तुम्ही सुरुंग लावलात, त्यांचे तथाकथित श्रेष्ठत्व तुम्ही नाकारलंत. तुम्ही समाजाच्या भल्यासाठी विद्रोह केलात म्हणून त्यांनी तुम्हाला देशद्रोही ठरवले. आपल्या थोर कार्याची जाण त्यांनाही आहे पण कोणता तरी एखादा मुद्दा घेऊन तुमच्या वर टीका करायची हे जातीच्या वर्चस्वातून नाही तर काय आहे अन्यथा आपण त्यांच्या जातीत जन्मास येता तर अद्यापपर्यंत आपणां उभयंताची अनेक पुस्तकेच काय एखादा धर्मग्रंथही लिहिला गेला असता व रोज त्याची पारायणे केली असती. मग त्याच जातीच्या दृष्टिकोनातून आम्ही आपली जयंती साजरी केली तर कुठं बिघडतंय.
              एकंदरीत अजून कार्य करण्यास बरीच संधी आहे तर , तात्यासाहेब मिश्किल हसत हसत म्हणाले. पूढे समजावणीच्या सुरात बोलू लागले, संतोबा आम्ही कमी का सहन केले आहे, आमचा मार्ग किती खडतर होता याची थोडी का होईना जाण तुम्हाला आहे. बदल एवढा सहज नसतो रे अगदी स्वतः मध्ये करायचा असेल तरी आणि समाजात असेल तरी. आपण कार्य करत असताना अनंत अडचणी येत असतील, त्या येणारच पण त्यांनी खचून न जाता मोठ्या धैर्याने पुढे वाटचाल करावी. जर तुमचे कार्य निस्वार्थ आणि तत्त्वनिष्ठ असेल तर टीका करणाऱ्याकडे कसल्याही बदल्याच्या भावनेने पाहू नये शिवाय त्या  टिकेला आपल्या कार्याची पोच समजावी, वाद घालण्यात वेळ व्यर्थ न दवडावा.
                 मला तात्यासाहेबांचे सारं काही पटत होते. ही एक अजाणतेपणी आणि प्रतिक्रियेतून झालेली चूक होती आणि त्याबद्दल मला माफी मागणे गरजेचे होते.  तात्यासाहेब मी असला थिल्लरपणा पुन्हा करणार नाही, निमुटपणे मी माझे कार्य करीत राहीन. कधी कधी वाईटातून ही चांगली गोष्ट घडते ती अशी. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला अपेक्षित असा जात आणि पक्षविरहीत समाज आपल्या खानवडी, पारगांव पंचक्रोशीत अस्तित्वासाठी लढा देण्यास एकत्र आला आहे, तात्यासाहेब सरकारने आपल्या खानवडी, पारगांव परिसरात शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता मोठं विमानतळ उभारणच्या घाट घातला आहे, विरोध कमी करण्यासाठी अनेक प्रलोभनाबरोबरच, अस्मितेचे ही राजकारण केले जात आहे. विमानतळाची घोषणा करतानाच त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा केली, कारण विमानतळाला विरोध म्हणजे धाकल्या छत्रपतींना विरोध असा समज व्हावा पण लोकांनी तेवढाच जोरदार विरोध केला म्हणून लोकांत फूट पाडण्यासाठी आम्ही फुलेंना भारतरत्न देऊ असे काही म्हणाले लोकांनी त्यांना हाकलून दिले, काहींनी विमानतळाला महात्मा फुलेंचे नाव देण्याची मागणी केली लोकांनी साधी दखल पण नाही घेतली. लोकांना दिखाऊ अस्मितेपेक्षा अस्तित्व महत्वाचे हे कळलंय हे ही खूप आहे, नाही का तात्यासाहेब.
संतोबा तुझं काय मत त्यासंदर्भात सांग? तात्यासाहेब हसत हसत म्हणाले.
               तात्यासाहेब माझा आणि सर्व शेतकऱ्यांचा विमानतळास विरोधच आहे, माझा अप्रत्यक्ष सहभाग तर आहेच पण लेखनाच्या माध्यमातून देखील विरोध दर्शवण्याचा प्रयत्न आहे.
डोक्यावरून हात फिरवत तात्यासाहेबांनी प्रेमाने यशस्वी हो आशिर्वाद दिला आणि मोठं कार्य कर, जातीपातीत अडकू नको. असा संदेश दिला व त्यानंतर आम्ही निघतो असे म्हणत तात्यासाहेब व सावित्रीमाई निघून गेले.
                 मी तात्यासाहेबांशी बोललो, भांडलो, त्यांचा आशिर्वाद घेतला पण सावित्रीमाईंशी बोलण्याची हिंमत मात्र झाली नाही. त्यांच्या कार्याला आपण न्याय तर देऊच शकलो नाही पण आपला स्रियांबाबतचा दृष्टिकोनही फारसा बदललेला नाही. त्याबाबतीत आपल्याला अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. सगळे महापुरुष हे हाडामासांची माणसेच होती. त्यांचा एक जीवनकाळ होता मात्र त्यांच्या कार्याला कोणत्याही काळात बंदिस्त करता येते ना ते कोणत्यातरी जातीत ते जन्माला आले म्हणून त्या जातीत त्यांना बंदिस्त करता येते. आणि तसे करण्याचा कोणी प्रयत्नही करून नये. त्यांचे कार्य अखंड मानवजातीच्या उन्नतीसाठी होतं आणि म्हणूनच ते चिरकाल टिकणारे आहे. त्यांनी भरभक्कम पाया रचलेला आहे, त्यांचे कार्य ,विचार यांना त्याच निष्ठेने पुढे नेणे हे सर्वांचे कर्तव्यच आहे. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथी साजऱ्या कराव्यात मात्र ते करताना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा ना की बदनामी व्हावी, सर्व समाज एकत्रित यावा ना की तो जातीत विभागला जावा, त्यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा सदैव एकदिलाने पुढे पुढेच न्यावा. कोणताही पुरस्कार त्यांच्या कार्यापेक्षा मोठा नाही म्हणून तो त्यांना मिळावा म्हणून कसलाही अट्टहास करू नये. त्यांना जर पुरस्कार भेटला तर तो त्यांचा नाही तर त्या पुरस्काराचा सन्मान असेल मग तो पुरस्कार भारतरत्न असो वा अन्य कोणताही. हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराबाई, क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि ते सर्व ज्यांनी ज्यांनी राजकीय, सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्राबरोबरच सर्वच समाजाला प्रगतीच्या दिशेला नेले त्या सर्वांचा हा महाराष्ट्र आहे. आणि होय हा शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. पुरोगामी बनणे एवढे सोपे नाही पण समतेचे तत्व अंगीकारून त्या मार्गावर वाटचाल चालू आहे हे निश्चित!
             क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलें  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस, कार्यास विनम्र अभिवादन.
                                                                                              संतोबा (संतोष गांजुरे)

Sunday, October 15, 2017

एक पत्र भुजबळसाहेबांना....

          बऱ्याच दिवसांपासून आपल्याबद्दल लिहायचे मनात होते, पण आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहितोय. हो वाढदिवसाचे निमित्तच, कारण मी कोणाला कधी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाही. शिवाय सध्याची आपली अवस्था पहाता कोणी आपणांस शुभेच्छा देण्याचा धोका पत्करेल असे वाटत नाही. तुमच्याबद्दल लिहितोय म्ह्णून काही लोकांना माझा विटाळ होऊ शकतो पण म्हणून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकीय त्यापेक्षाही सामाजिक क्षेत्रातील आपल्या योगदानाकडे कानाडोळा करणे करंटेपणाचे ठरेल.
        आपण सामान्य शिवसैनिकांपासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा महापौर व इतरही महत्वाची पदे शिवसेनेतील २५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत भूषवली. आपण १९८५ मध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार व दोनच महिन्यांनी सेनेचे मुंबई महानगरपालिकेचे पहिले महापौर झालात. शिवसेनेने  आपल्याला भरभरून दिले एवढंच काय तर सत्ता आली तर आपणच मुख्यमंत्री होणार अशी सर्वानाच खात्री होती. तरीही आपण सेनेला जय महाराष्ट केलंत. अजाणत्या वयात बाळासाहेब आणि शिवसेनेबद्दल आम्हालाही सुप्त आकर्षण होते, त्यामुळे आमच्या लेखी तुम्ही गद्दारचं होता, ज्यांनी शिवसेना सोडणे फक्त राजकीय दृष्टिकोनातून पाहिले त्यांना त्यामागची सामाजिक कारणे, प्रेरणा तर ज्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले त्यांना त्यामागची राजकीय कारणे व प्रेरणा लक्षात आपल्या नाहीत. ज्या काळात सेना सोडणे म्हणजे मोठ्या संकटाला प्रसंगी मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे होते. त्याकाळात फक्त सामाजिक वा फक्त राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिवसेना सोडली नसून सामाजिक आणि राजकीय या दोन्हींच्या घुसमटीतून सोडली असण्याची शक्यता जास्त वाटते.
          आपण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालात कारण त्यांचे आणि आपले विचार जुळत होते. मराठीचा मुद्दा-बॉम्बे चे मुंबई नामकरण आपल्याच महापौर पदाच्या काळात व आपल्या पुढाकाराने झाले, सुंदर मुंबई मराठी मुंबई अभियान चालवून त्याची सुरूवात म्हणून हुतात्मा स्मारकाजवळ उद्यान शिल्प उभारले.  कर्नाटक-महाराष्ट्र्र सीमावाद- वेष बदलून नेतृत्व केलं प्रसंगी तुरुंगवास भोगला. हिंदुत्ववाद- रिडल्स प्रकरणात दलितांच्या मोर्च्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भव्य मोर्च्याचे आयोजन केले. त्याला प्रतिउत्तर म्हणून दलितांनी अतिभव्य मोर्चा काढला व मोर्चाचा संयम सुटून आपण उभारलेल्या  हुतात्मा स्मारकाची मोडतोड  करण्यात आली. आपणही हुतात्मा स्मारकाचे शुद्धीकरण करून आगीत तेलच ओतले. अनेक प्रस्थापित नेत्यांना मागे सारून आपण शिवसेनेत अगदी वरचे भक्कम स्थान निर्माण केले. एखादी व्यक्ती लोकप्रिय झाली कि त्याचे पंख छाटले जातात याचा आपण पहिल्यांदा अनुभव १९८९ मध्ये घेतलात. १९८९ च्या शिवसेनेच्या पुणे अधिवेशनात ग्रामीण भागात काम करण्यासाठी शेतकरी सेना नावाची संस्था स्थापन करण्याची घोषणा केली व त्या संघटनेची सूत्रे आपल्याच हातात दिली जातील याबाबत कोणाच्याही मनात तिळमात्र शंका नव्हती. खुद्द बाळासाहेबांनीच तसे सूचित केले होते, मात्र ऐनवेळी अनपेक्षितपणे नंदू घाटे यांना शेतकरी आघाडीचे प्रमुख केले. आपण शिवसेनेचा मुंबईबाहेर विस्तार करण्यात मोठा हातभार लावला याबाबत कोणाचेही दुमत नाही, त्याच आशेवर १९९० मध्ये शिवसेना सत्तेवर येईल असा आशावाद होता पण सत्ता मिळाली नाही मात्र ५२ आमदारांच्या बळावर शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले पण तुम्हाला डावलून मनोहर जोशींना विरोधी पक्षनेतेपद तर आपली दुसऱयांदा मुंबई महापौर पदावर बोळवण करण्यात आली. बहुदा सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री पदाची अशीच हुलकावणी मिळेल अशी शंका आपल्या मनात निश्चित आली असेल. अर्थात आपण मुख्यमंत्री झाला असता तरी आपणास रिमोट कंट्रोलवरच काम करायला लागले असते हे उघडच होते.
       इंदिरा गांधीजींनी बासनात गुंडाळलेला मंडल आयोग  व्ही. पी. सिंग सरकारने १९९० मध्ये लागून करण्याची घोषणा केली. बाळासाहेबांनी आयोगाला कडाडून विरोध केला. बाळासाहेबांनी आपली भूमिका मांडण्याआधीच  आपण मात्र मंडल आयोगाच्या बाजूने असल्याचे जाहीर केले. यावर आपली व बाळासाहेबांची खडाजंगी देखील झाली. अखेर आपल्या राजकीय, सामाजिक घुसमटीवर फुंकर घालून पवारसाहेबांनी आपल्याला काँग्रेस मध्ये खेचले. पुढे आपण महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली व त्यामाध्यमातून देखिल मंडल आयोग लागू करण्याबाबत दबाव निर्माण केला.  मंडल आयोगाच्या शिफारशी २३ मार्च १९९४ पासून सरकारी नोकऱ्या व शिक्षण क्षेत्रात लागू झालया. मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र्र हे देशातील पहिले राज्य होते. तत्कालीन मुख्यमंत्री पवारसाहेबांसोबतच याचे श्रेय आपणांस ही जाते. आपले हे योगदान बहुजन वर्ग कायम स्मरणात ठेवील. आपण कट्टर हिंदुत्ववादी, गोडसेंचे गुणगान गाणारे, पुरोगाम्यांवर आगपाखड करणारे, काहीशी दलित विरोधी भूमिका असणारे आपण उपरतीने म्हणा किंवा नाईलाजाने म्हणा बदललात. धार्मिक, जातीयवादी विचार बहुजनाना मारक आहेत व फुले-शाहू-आंबेडकर विचार समाजात रुजवल्याशिवाय प्रगती होणार नाही हे जाणले.  समता परिषदेच्या माध्यमातून आपण दलित- ओबीसी सामाजिक एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रतिगामित्वाकडून पुरोगामीत्वाकडेचा प्रवास आपल्या वैचारिक प्रगल्भतेची साक्ष होती. 
                        लहानपणासूनच आपल्याला प्रचंड संघर्ष करावा लागला ,  लहानपणीच आपण आई-वडिलांच्या मायेचं छत्र हरवले. आईचा फोटो पाहण्याचे भाग्य देखील आपणास लाभले नाही. पुढे विविध  पक्षात आपले  सामर्थ्य वाढले कि पंख छाटण्याचे काम करण्यात आले. तेलगी घोटाळ्यात आपले नाव आले, आपण सहीसलामत बाहेर पडलात पण बदनामी व्हायची ती झालीच. पक्षात पीछेहाट झालीच. आताही  महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणात एक वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात आहात. आपण जी कामे केली मग ते फ्लाय ओव्हर असोत वा महाराष्ट्र्र सदन अगदी विरोधी पक्षांनी देखील आपल्या कामाचे कौतुक केले.  अगदी कधी काळी आपल्या जीवावर उठलेल्या शिवसेनेने देखील महाराष्ट्र सदनाचे कौतुक केले.  बाळासाहेबांना तांत्रिक का होईना अटक करण्याची हिम्मत आपण दाखवलीत असं महाराष्ट्रात कोणी करू शकले नसते. बाळासाहेबांवर आपल्या इतकी टीका कोणीच केली नसेल पण तरीही शेवटी आपल्या मनात शिवसेनेबद्दल व बाळासाहेबांबद्दल तसेच शिवसैनिकांना व बाळासाहेबांना  ही आपल्याबद्ल कायम एक सॉफ्ट कॉर्नर होता. त्यामुळेच शेवटी आपली व बाळासाहेबांची मातोश्रीवर भेट होऊ शकली.  शिवसेना सोडल्यानंतर आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा खटला आपण मागे घेतला तेव्हा अनेक शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी आले. ही आपल्या कामाची पोच होती. आपण गुन्हेगार असाल किंवा नसाल पण आपल्याला बळीचा बकरा बनवला आहे असे साऱ्या महाराष्ट्राला वाटते आहे. घोटाळे करणारे आपण पहिले नाही किंवा शेवटचे ही नाहीत ना आपला  घोटाळा सगळ्यात मोठा आहे. असे असताना फक्त आपणच तुरुंगात आहात. चौकशी टाळावी म्हणून लोक देश सोडून पलायन करतात आपण मात्र चौकशीसाठी परदेशातून भारतात आलात व चौकशीला पूर्ण सहकार्य केलं पण तरी चौकशी करायला येऊन थेट आपणांस अटकच केली. आपण जर दोषी असाल तर आपणास योग्य ती शिक्षा निश्चित होवो. मात्र तसे नसेल तर सध्या सूडबुद्धीने चालवलेली आपली अवहेलना थांबावी एवढीच इच्छा. कुजबुज अशीही ही ऐकायला येतेय कि महाराष्ट्र्र सदनात फक्त शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले, शाहू महाराज, भारतरत्न आंबेडकरांचेच पुतळे बसवले इतरांचे नाही तसेच दमणगंगा-पिंजाळ आणि तापी-नारपार या दोन नदीजोड प्रकल्पांद्वारे गुजरातला महाराष्ट्राचे पाणी देण्यास आपण विरोध केला होता. आपण एकटे असले तरी आपला विरोध किती जोरदार असतो हे १९८५ ला आपण शिवसेनेचे एकमेव आमदार असताना साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. 
                      आपल्यासारख्या झुंझार नेत्यावर वयाच्या सत्तरीत अशी वेळ येणे आणि आपले असे इतके हतबल होणे आपल्या विरोधकांना देखील पहावत नाही. आज महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झालेली असताना आपले तुरुंगात खितपत पडणे दुर्दैवी आहे. आपले जी बदनामी झाली, जे हाल झाले ते व्हायला नको होते. ज्याप्रमाणे पवारसाहेबांच्या अनुभवाचा फायदा अगदी विरोधकांना होतोय तसाच आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना झाला तर त्यात गैर ते काय? आपण चुकला असाल, आपल्याकडून काही गुन्हा घडलाही असेल पण आपण केलेला संघर्ष,  अतुलनीय आहे. आपली ही रोमांचकारी कारकीर्द इतरांना निश्चित मार्गदर्शक ठरेल, आपल्या जीवनाच्या धड्यातुन  काय घ्यायचं आणि काय नाही हे ज्याचे त्यांनी ठरवायचे.    
    आपणांस सत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (उगीचच गैरसमज होऊ नये म्हणून लक्ष,कोटी,अनंत असे शब्द वापरले नाहीत). 
                                                          ....संतोबा (संतोष गांजुरे)
   

Wednesday, July 19, 2017

राजाची कर्जमाफी- १

     राजाची कर्जमाफी म्हणजे साधंसोपे काम नव्हे, आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खूप अभ्यास करून कर्जमाफीच्या मागणीला सरसकट तत्वतः एवढ्या गाठी मारून ठेवल्या आहेत व रोज नवनवीन अटी शर्ती घालून त्या इतक्या घट्ट केल्या आहेत कि आपण कर्जमाफीसाठी पात्र होऊ कि नाही याचा तिढा सर्वसामान्य व्यक्तीला सुटणे शक्य नाही. त्यातच परवा शंभर टक्के शेतीवर उपजीविका असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं सांगून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरसकट कर्जमाफीला तत्वतः पाचर मारली आहे. सरकार नेहमीच कर्जमाफीच्या विरोधात होते. कर्जमुक्ती वैगेरेचे शब्दच्छल करून कर्जमाफीला वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचाच सरकारचा प्रयत्न होता. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या संपामुळे जनतेचा उद्रेक होईल, सरकारविरोधात जनमत तयार होईल केवळ यामुळेच अनेक मागण्यांपैकी केवळ कर्जमाफीच्या मागणीला प्रकाशझोतात आणले व इतर मागण्यांना बरोबर कात्रजचा घाट दाखवला. कर्जमाफीला तत्वतः का होईना मान्यता देऊन सरकारने आपल्या विरोधातील जनतेचा रोष तात्पुरता शांत केला व नंतर अनेक अटीशर्ती टाकून व अपमानास्पद वक्तव्य करून भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था केली आहे.
         सरकारने आपले राजकीय कसब पणाला लावून पद्धतशीरपणे जनतेचा असंतोष तात्पुरता दाबण्यात यश मिळवले आहे. कर्जमाफीच्या घोळात स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्याची मागणी शेतकरी-शेतमजूर , ग्रामीण-शहरी, शेतकरी-नोकरदार, थकबाकीदार-नियमित कर्ज भरणारे असे निरर्थक वाद, वक्तव्य करून तूर्तास मागे पाडण्यास सरकारला यश आलेले आहे. समाजातील एका घटकाला कर्जमाफी मिळत असताना दुसरा घटक नाराज होणार हे स्वाभाविकच आहे शेतकरी व इतर कष्टकरी यांची आर्थिक परिस्थिती फार काही वेगळी आहे असे नाही. श्रमप्रतिष्ठा आणि  श्रममुल्यांचे अवमुल्यन यामुळे कष्टकरी समाजाची होरपळ होतेय. शेतकऱ्यांना आस्मानी-सुल्तानी  संकटाबरोबर पायाभूत सुविधांचा अभावाचा सामना करावा लागतो. तृतीय-चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना देखिल पायाभूत सुविधांचा अभावाचा सामना करावा लागतो. स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने नीट पुरवली जात नाही. उघड्या अंगाने मॅनहोल मध्ये उतरणारे कर्मचारी आपण पहिले असतील. सुरक्षासाधनांच्या अभावी बऱ्याच कर्मचाऱ्यांचा विविध आजारांनी चाळीशी-पन्नाशीत मृत्यू ओढवतो.  सरकार या सर्वांचे गुन्हेगार आहे. सगळी सत्ताधारी थोड्याबहुत फरकाने एकाच माळेचे मणी असतात पण सध्याच्या मंत्र्याची बेताल वक्तव्ये आणि चुकीची धोरणे आणि त्यांची निर्ल्लज भलामण आणि त्यांचे उत्सवी कार्यक्रम, सर्वसामान्य जनतेपर्यंत न पोहचलेल्या विकासाच्या जाहिरातींचा भडीमार. या सर्वांचा परिपाक म्हणून जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होत आहे.  
     मूठभर लोकांकडे ढीगभर संपत्ती आणि मूठभर लोकांकडेच ढीगभर कर्ज आहे हे सर्वज्ञात असताना कर्जवसुली अथवा बेहिशोबी संपत्तीचा विषय निघतो त्यावेळी या मूठभर लोकांकडे दुर्लक्ष करून ढीगभर लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. डिजिटल इंडियामध्ये मूठभर ब्लॅकमनीवाल्यांना शोधण्यापेक्षा सरसकट नोटाबंदी करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्यात आले. याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांनाच बसला.  शेती मालाचे भाव प्रचंड पडले. मला स्वतःला २०१५ च्या  नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये पावट्याला ६०० रुपये ते शेवटी ३५० रुपये प्रती दहाकिलो भाव मिळाला तर पिवळा मूग सरासरी ७५ रुपये किलोने विकला गेला. तर २०१६ च्या नोटाबंदीनंतरच्या  नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये पावटा  २४० रुपये ते १२० रुपये प्रती दहाकिलो भावाने तर पिवळा मूग ४० रुपये किलोने विकावा लागला. शंभर रुपयांत आठवड्याचा भाजीपाला येऊ लागला म्हणून अच्छे दिन आल्याचा जयघोष करणारे बौद्धिक दिवाळखोर शेतकऱयांची क्रूर चेष्टाच करत होते. गोहत्याबंदीचेही तसेच एकीकडे गोहत्याबंदी करायची तर दुसरीकडे चारा छावण्या बंद करायच्या, सुपीक जमिनी उद्योगधंदे, अनावश्यक विमानतळ, महामार्ग यासाठी उद्योगपतींच्या, भांडवलदारांच्या घशात घालायच्या. अहो महोदय  तुम्ही ज्या गायीला आई म्हणता ती आमचीच. आम्ही तिला पिढ्यानपिढ्या सांभाळतो आहे, आम्ही फक्त गायीचीच नव्हे तर अगदी बैलांची देखिल पूजा करतो. गायींचे पालन-पोषण करणाऱ्या काळ्या जमिनीला आम्ही आमची काळी आई मानतो, आणि तुम्ही त्याच आमच्या काळ्या आईला उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागला आहात. ज्यांचे गायींशी घेणेदेणे नाही ते बोगस गोरक्षक बिनधक्तपणे गोरक्षणाच्या नावाखाली दिवसाढवळ्या खून करत आहे. अनेक अडचणी आणि चाऱ्याअभावी  शेतकर्याना कवडीमोल दराने गायी विकाव्या लागल्या आहेत..  
         आताही सरकारने नाईलाजाने केलेली हि कर्जमाफी निव्वळ धूळफेक आहे, या मृगजळाच्या मागे लागून काहीही प्राप्त होणार नाही. सरकारने जे कष्टकरी वर्गाचे शोषण केले आहे त्याबदल्यात सरसकट गोरगरीब जनतेस आर्थिक परिस्थितीनुसार  तीन ते पाच लाख तात्काळ देऊन आपले आणि पूर्वीच्या सरकारचे पापक्षालन करावे. इथून पुढे तात्काळ सर्वांना पायभूत सुविधा पुरवाव्यात. शेतीमाल, दूध यांना योग्य भाव द्यावा आणि त्याचबरोबर नियमित वीज-पाणी पुरवठा केला तर आम्हाला तुमच्या कर्जमाफीची कुबड्यांची आम्हाला गरज पडणार नाही. येथून पुढे आंदोलन,संप केला तर शेतकऱयांबरोबर इतर सर्व कष्टकरी वर्ग त्यात सामील होतील व सर्वांच्या वतीने एकत्रित मागण्या करण्यात येतील.  सरकारला ना फूट पाडता येईल ना पळ काढता येईल.  
         राजकारण फक्त निवडणुकीपुरते मर्यादित नाही. राजकारण म्हणजे सत्ता,पैसा, प्रसिद्धी मिळवण्याचे साधन नव्हे किंवा गरिबांच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणे नव्हे वा आंदोलनांना पाठिंबा देऊन नंतर मांडवली करणे नव्हे तर राजकारण म्हणजे दैवीकार्य. आपल्याला लाभलेल्या दूरदृष्टीच्या आणि लोकशाहीतील अधिकाराच्या जोरावर बहुसंख्य गोरगरीब रंजल्या-गांजल्या जनतेला सुखासमाधानाने, मानाने जगात यावे अशी व्यवस्था निर्माण करणं. राजकीय पक्ष काही तत्व,निष्ठा, ध्येय धोरणाच्या आधारवर स्थापित होत असतात त्याचा नेत्यांनी विसर न पडू नये व त्यांनी शह-काट शहाचे, घोडेबाजाराचे राजकारण न करता, कसलाही भेदभाव न समाजकल्याणाची कामे करणे अपेक्षित आहे. ज्यावेळी शेतकरी, कष्टकरी वर्ग सधन होईल तेव्हाच अखंड राष्ट्र सुखी झाले असे म्हणता येईल. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना ज्यावेळी याची जाणीव होईल व त्यानुसार त्याचे कार्य केलं जाईल तो समस्त जनतेसाठी सुदिनच म्हणावा लागेल.
                                                   संतोबा (संतोष गांजुरे)
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!