Ads 468x60px

Tuesday, December 23, 2025

विचारधारा आणि द्वेषधारा.

                 माणसांमाणसांत भेदाभेद न करता अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी, चांगला बदल स्विकारणारा सर्वसमावेशक प्रवाही आणि प्रभावी विचार म्हणजे विचारधारा. वंशश्रेष्ठत्वाचा अहंकारातून माणसांमाणसांत भेदाभेद करणारा, विकृत नरसंहार करण्याची इच्छा बाळगणारा रक्तपिसासू विचार म्हणजे द्वेषधारा. नैसर्गिक हक्क आणि न्यायाचा स्विकार म्हणजे विचारधारा तर त्यास नकार म्हणजे द्वेषधारा. विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध, तर्कनिष्ठ मांडणीच्या आधारे प्रगतीचा मार्ग दाखवणारी पद्धत म्हणजे विचारधारा. भ्रामक, काल्पनिक अंधश्रध्देच्या जोखडाखाली बहुसंख्य जनतेला अडकवून स्वतः वंशपरंपरागत विशेषाधिकार पदरात पाडून घेणारी व्यवस्था म्हणजे द्वेषधारा. द्वेषधारा मूठभर लोकांच्या विशेषाधिकाराच्या संवर्धनासाठी बहुसंख्य लोकांना मानसिक गुलामगिरी बंदिस्त करण्याचा कावेबाजपणा करते. विचारधारा पिढ्यान् पिढ्यांच्या अन्याय रूढी- परंपरांना झुगारून सर्वसामान्य जनतेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी झटत असते. द्वेषधारा विरोधकांचा तिरस्कार करते, त्यांना संपवण्याचा प्रयत्न करते. विचारधारा विरोधकांनाही मार्गदर्शन करते, त्यांच्याही हिताचा विचार करते. द्वेषधारावाले कधीही सकारात्मक कार्य करू शकत नाही, अगदी आपण बरोबर आहोत हे पटवून देण्यासाठी सुद्धा ते दुसरे कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. जबाबदारी झटकण्यात द्वेषधारावाल्यांचा हातखंडा असतो. अस्मिताचे भांडवल करून आपले दुकान कसे चालवायचे याचे कसब त्यांनी आत्मसात केलेले असते. थोडक्यात असे म्हणता येईल विचारधारा ही प्रागतिक पुरोगामी तर द्वेषधारा ही अधोगतीक प्रतिगामी असते. 
                        विचारधारा बहुतेकदा समाजकल्याणाच्या चिंतनातून उगम पावते. त्यासाठी सखोल अभ्यास, सर्वांगीण बाजूचा विचार करावा लागतो. पारंपारिक, कालबाह्य, अन्याय्य गोष्टींना छेद देत नवीन समाजकल्याणाचा विचार रुजवावा लागतो. विचारधारा समानता, सामाजिक न्याय आणि सामूहिक हिताचा विचार करते.विचारधारा समाजाला दिशा देते, समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करते आणि लोकांना जोडण्याचे काम करते. विचारधारा ही सकारात्मक शक्ती आहे जी समाजाच्या उन्नतीसाठी आणि न्यायासाठी काम करते. विचारधारा ही संपूर्ण समाजाच्या हिताची असते अगदी विचारधारेला विरोध करणाऱ्याच्याही हिताची असते. द्वेषधारा बहुतेकदा भेदभाव, ईर्षा, पूर्वग्रह किंवा वर्चस्ववादातील संघर्षांमधून उगम पावते (वर्णभेद, जातीयवाद, धार्मिक कट्टरता). द्वेषधारा समाजात दुही निर्माण करते, नकारात्मक वातावरण निर्माण करते. द्वेषधारा नकारात्मक आहे, ती विनाश घडवते, सामूहिक दंगली किंवा युद्धांना जन्म देते. द्वेषधारा कोणाचा ना कोणाचा तिरस्कार करून हिंसा करण्यास प्रोत्साहन देत असते. द्वेषभावनेने भारलेली व्यक्ती कायम समोरच्याच्या चुका शोधते, दुसऱ्यांच्याबाबत कायम संशयी असते. सततच्या तिरस्कारामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास गमावते. अशी व्यक्ती समोरच्याशी एकटी लढू शकत नाही, त्यासाठी तिला समद्वेषीविचारी समूहाचा आधार लागतो. त्याचप्रमाणे द्वेषधारेला निर्बुद्ध झुंडींची गरज असते, झुंडीशिवाय द्वेषधारेचे अस्तित्व शून्य असते. दुसरीकडे ठाम विचारधारेचा व्यक्ती कितीही मोठ्या झुंडीला एकट्याने सामोरे जाण्याचे सामर्थ्य बाळगून असतो.
                       द्वेषधारा कधीही कोणाचे कायमस्वरुपी कल्याण करू शकत नाही. द्वेषधारा प्रत्येकासाठी घातकच असते, आज जे लोक अशा विचारधारेचे समर्थन करतात आणि या विचारधारेच्या बरहुकूम काम करणाऱ्या लोकांच्या कोणत्याही द्वेषपूर्ण कृतीचे, विकृतीचे समर्थन करतात त्यांना आज ना उद्या त्यांना तशाच विकृतीला बळी पडावे लागणार असते. प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचा शेर याचे चपखल उदाहरण देतो "लगेगी आग तो आएंगे कई घर जद मे, यहा पे सिर्फ हमारा मकान थोडी है..!". द्वेषधारा म्हणजे उन्माद अन् विचारधारा म्हणजे संवाद. द्वेषधारा आपसूकच आत्मसात केली जाते कारण त्यासाठी काही तर्क, विचार करण्याची गरज नसते. त्यामुळे द्वेषधारेच्या उन्मादी, विखारी प्रचाराला बहुसंख्य लोक सहज बळी पडतात आणि त्यांच्या निर्बुद्ध झुंडी निर्माण होतात. जिथे झुंडी होतात तिथे विवेक हरवतो. या उन्मादी झुंडी सारासार विचार न करता एखाद्या झोंबीप्रमाणे सारं काही उद्ध्वस्त करतात. त्यांची विकृत कृत्ये सोडा अगदी त्यांच्या वागण्याबोलण्यातही सुसंगतता नसते, ते ज्यांचा विरोध करतात त्यांचाच त्यांना नाईलाजाने का होईना उदोउदो करावा लागतो. उदाहरणार्थ भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या समतावादी विचारांमुळे आणि कार्यांमुळे काही राजकीय, सामाजिक संघटनांकडून प्रचंड द्वेष केला जातो. या द्वेषी लोकांचे आदर्श एवढे खुजे आहेत की त्यांचे कितीही उदात्तीकरण केले तरी आणि ते त्यांच्यासाठी कितीही पूजनीय असले तरी त्यांच्या अंधभक्तांच्या कोंडाळ्या बाहेर जगजाहीर त्यांचा उदोउदो ते करू शकत नाही. जेव्हा हे द्वेष करणारे लोक परदेशात जातात तेव्हा देशात ते ज्यांचा द्वेष करतात त्यांचाच परदेशात उदोउदो करतात कारण या महापुरुषांचे कार्य एवढे उत्तुंग आहे की जगभरात त्यांना मान्यता आहे. विविध देशाचे प्रतिनिधी आपल्या देशात येतात तेव्हा त्यांना गांधीजींच्या समाधी स्थळावर राजघाटावर घेऊन जातात, बुद्धाची प्रतिमा, फुले - आंबेडकरांची पुस्तके भेट देतात पण चुकूनही द्वेषधारासमर्थक अनुयायांच्या आदर्शांचा उल्लेख करत नाहीत एवढे त्याचे आदर्श खुजे असतात. 
                       द्वेषधारा प्रवर्तक आणि समर्थक दुतोंडी गांडूळांसारखी असतात. दुसऱ्यावर अन्याय करताना कसलाही विधिनिषेध न बाळगणारे, नितीनियम पायदळी तुडवणारे, दुसऱ्यांवर अन्याय होत असताना, दुसऱ्यांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असताना त्या शोषितांची खिल्ली उडवणारे, एखादी घटना त्यांच्या अंगलट आल्यावर त्यांना लगेच मानवाधिकार, लोकशाही आणि संविधान आठवते. व्हिक्टिम कार्ड खेळण्यात त्यांचा हातखंडा असतो. त्यांना दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. खरंतर विचारधारा आणि द्वेषधारा यांचे मूठभर प्रवर्तक असतात, सर्वसामान्य लोक आपापल्या वैचारिक कुवतीनुसार विचारधारा आणि द्वेषधारेचे समर्थक बनतात. द्वेषधारेच्या प्रवर्तकांनाही विचारधारेचे महत्व आणि द्वेषधारेचा फोलपणा माहीत असतो. ते स्वतः विचारधारेच्या मार्गाचे पालन करून आपला फायदा करून घेतात पण आपल्या समर्थकांना द्वेषधारेचे पालन करण्यास भाग पाडतात. त्यांना वांझोट्या, निरुत्पादक गोष्टीत गुंतवून सार्वजनिक संसाधनांचा वापर करण्यातील स्पर्धा संपवून आपला स्वार्थ साधून घेतात. द्वेषधारेचे प्रवर्तक मूलभूत गरजा,आरोग्य, शिक्षण, रोजगार, याबद्दल बोलणार नाहीत, ते तुम्हाला शिक्षण घ्या, व्यवसाय करा, त्यासाठीचे कला कौशल्य आत्मसात करा असे सांगणार नाही. ते तुम्हाला कोणाला तरी तुमच्या दुरावस्थेला जबाबदार ठरवून त्यांचा द्वेष करायला भाग पाडतील. ते लोकांना पाखंडी त्यांचे तारणहार म्हणून भासवतील, त्यांची सेवा करायला भाग पाडतील , दानधर्म करायला सांगतील, पाखंडी, अनिष्ट रूढी यांचे पालन करायला भाग पाडतील.
                      नरसंहार, विध्वंस करणाऱ्या रक्तपिसासूपेक्षा रचनात्मक कार्य करणाऱ्या, नवनिर्मिती करणाऱ्याला कायम लक्षात ठेवलं जाते. पिढ्यान् पिढ्यासाठी त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असते. त्यांच्या कर्तुत्वाचा प्रकाशात कित्येक पिढ्यांचे जीवन उजळून निघते. असे असले तरी द्वेषधारेच्या समर्थकांच्या तुलनेत विचारधारेचे समर्थक फार कमी असतात. सांख्यिकदृष्ट्या एकजूट असल्याने लोक सामाजिक स्वीकृतीसाठी द्वेषधारेच्या गटाच्या विचारांशी लोकं जुळवून घेतात. विचारधारा विनाकारण लोकानुनयन करत नाही. त्यामुळे विचारधारा स्विकारण्यासाठी आपला विवेक जागृत करावा लागतो, स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा लागतो. त्यासाठी पुरावे, तर्क आणि वस्तुनिष्ठतेनुसार विचार करणे, निर्णय घेणे आवश्यक असते आणि पूर्ण तार्किक विचार करायला वेळ आणि मेहनत लागते. मेंदू उत्क्रांतीने जलद आणि भावनिक विचारासाठी तयार झाला आहे, ना की पूर्ण तार्किकतेसाठी. मानवी मेंदूचे दोन भाग असतात : सिस्टम १(जलद, भावनिक, स्वयंचलित) आणि सिस्टम २ (हळू, तार्किक, प्रयत्नपूर्ण). बहुतेक वेळा सिस्टम १ चालते, कारण सिस्टम २ वापरणे ऊर्जा खूप खर्च करते (मेंदूला ग्लुकोज लागते). भावना (राग, भीती, प्रेम) तर्काला मागे टाकतात. उदाहरणार्थ आपल्या आवडत्या व्यक्तीच्या चुकीला समर्थन देणे. विचारधारा परिवर्तनीय, प्रवाही असते ती कायम नवनवीन चांगला बदल स्विकारत असतात. द्वेषधारा मात्र द्वेष, भेदाभेद, वर्चस्ववाद, वंशश्रेष्ठत्ववादाच्या डबक्यातून बाहेर पडू शकली नाही. समाजातील विवेकवादी लोकांचे कर्तव्य आहे की तरुण पिढीला त्यांच्या प्रगतीसाठी, व्यक्तीस्वातंत्र्यासाठी, मूलभूत हक्कांसाठी कोण झटले आहेत आणि कोणी विरोध केला आहे याची सतत जाणीव करून द्यायला हवी. त्यांना विचारधारेच्या मार्गावर आणून विवेकवादी बनवणे गरजेचे आहे. अर्थात या गोष्टीला वेळ लागले किंबहुना ही निरंतर चालणारी प्रकिया आहे आणि या प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांना सामावून घेणे वैयक्तिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी गरजेचे आहे.
                                                 संतोबा...

Monday, December 22, 2025

कावेबाज पाखंडी धर्ममार्तंड


                       आयुष्यातील-भविष्यातील अनिश्चितता. गूढ-रहस्यमयी, अनाकलनीय गोष्टींचा न होणारा उलगडा. अनामिक संकटांची भीती, मोठ्या संकटातून  अविश्वासनीयरित्या सुखरूपपणे बाहेर पडल्यानंतर आलेली  कृतज्ञतेची भावना. सततच्या अपयशातून आलेली हतबलता. आर्थिक - सामाजिक दुर्बलतेमुळे आलेली ओळखशून्यता. कळत-नकळत घडलेल्या चुकीमुळे,अपराधामुळे आलेल्या अपराधीपणाच्या भावनेतून सुटका व्हावी म्हणून तसेच अलौकिक सुखाच्या प्राप्तीच्या ओढीतून. तसेच कौटुंबिक वारसा, प्रथा, परंपरा यांचा प्रभाव, अन् समाजाने आपापल्या स्वीकारावे, समाजाचे पाठबळ मिळावे या भावनेतून आणि हे सारं नाकारले तर समाजातून बहिष्कृत होण्याचा दबाव आणि त्यायोगे होणाऱ्या टीकेपासून वाचण्यासाठी आणि अशा अनेक अपरिहार्यतेतून  सर्वसामान्य लोकं रूढी, परंपरा पर्यायाने धार्मिकतेकडे ओढली जातात. सर्वसामान्य माणसांच्या या भावनांचा, विश्वासाचा अन् बिकट परिस्थितीचा गैरफायदा हे त्या त्या धर्मातील पाखंडी धर्ममार्तंड घेत असतात. जगातील बहुतेक सर्वच धर्माचे धर्ममार्तंड आपापल्या धर्माच्या उदात्तीकरणासाठी काहीतरी अतार्किक,अनाकलनीय, आभासी गोष्टी आपल्या ओघवत्या वाणीने प्रसवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतात. निसर्गात अनेक चमत्कारिक, रहस्यमय गोष्टी आहेत तसेच कधी चमत्कारिक, रहस्यमय घटना घडत असतात. या चमत्कारिक, रहस्यमय गोष्टी , घटनांचा संबंध आपल्या धर्माशी जोडून आपला धर्म सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा करतात. असा हा सर्वश्रेष्ठ धर्म कायमच धोक्यात असतो आणि तो वाचवण्यासाठी धर्ममार्तंड सर्वसामान्य लोकांना आवाहन करत असतात. निस्वार्थ सेवाभावाला धर्माचा पाया बनवणे हे धर्ममार्तंडांचे मुख्य ध्येय असते.
                     खरंतर या पाखंडी धर्ममार्तंडांना धर्माशी आणि त्या धर्माच्या अनुयायांच्या अडचणींशी काही देणंघेणं नसते. त्यांना धर्माचा आणि त्यांच्या अनुयायांचा वापर करून आपला स्वार्थ साधून घ्यायचा असतो. ते स्वर्ग दाखवतील पण मार्ग दाखवणार नाहीत. देवाधर्माचे अवडंबर माजवून फक्त पाखंडी धर्ममार्तंडांचा फायदा होतो. सर्वधर्मांमध्ये सर्वधर्मसमभाव असेल किंवा नसेल पण सर्वधर्मीय बहुसंख्य पाखंडी धर्ममार्तंडांमध्ये स्वतःच्याच धर्माच्या अनुयायांना लुबाडण्याची कला वादातीत असते. हे धर्ममार्तंड काल्पनिक आख्यायिका रचून, अख्ख्या समाजाला पिढ्यान् पिढ्यां आपल्या नियंत्रणाखाली ठेवतात. स्वतःच्या कुळातील मूठभर लोकांना जन्मजात श्रेष्ठ ठरवतात आणि बहुसंख्यांना कायमस्वरुपी जन्मजात दुय्यम ठरवले जाते. आश्चर्य म्हणजे हे सर्व त्या बहुसंख्य समाजच्या एवढे अंगवळणी पडते आहे की हाच बहुसंख्य समाज त्या अन्यायाला पिढ्यान् पिढ्यां दैवी कर्तव्य मानून इमानेइतबारे निभावतो. धर्म संकटात नसतो पण धर्माच्या नावाने दुकानदारी चालवणारे संकटात यायला लागले की त्या धर्माचे धर्ममार्तंड त्या त्या धर्मातील सर्वसामान्य लोकांना परधर्मियांमुळे आपला धर्म संकटात आहे आणि तुम्ही जागृत नाही असा दोषारोपण करत सर्वसामान्य लोकांना डिवचत असतात. जेणेकरून त्यांना हवी ती स्फोटक परिस्थिती निर्माण करता येईल आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना आपली पोळी भाजता येईल. धर्माच्या आचरणाने माणसाच्या अंगी नैतिकता, कृतज्ञता, नीतिमत्ता, आध्यात्मिक शांतता यायला हवी पण धर्ममार्तंड मात्र त्यास अपवाद असतात कारण धर्म हा त्यांचा धंदा असल्यामुळे त्यांच्या धंद्याच्या आड येणाऱ्या कोणालाही ते सोडत नाही भले तो धर्माचा अन कट्टर अनुयायी का असेना. एवढेच काय ज्या धर्माचा या धर्ममार्तंडांनी ठेका घेतला आहे त्याच धर्माचा संस्थापक जरी प्रकट झाला आणि त्याने या धर्ममार्तंडाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले, विरोध केला तर त्या धर्मसंस्थापकाला देखील ते संपवल्याशिवाय राहणार नाही. अनुयायांपेक्षा धर्म मोठा आहे, धर्माने त्याच्या अनुयायांना सदमार्ग दाखवून वाचवायला हवं, पण धर्ममार्तंडाच्या कृपेने धर्मच कायम धोक्यात असतो आणि त्याला वाचविण्याची जबाबदारी धर्माच्या अनुयायांवर असते. 
                    धर्म धोक्यात आहे म्हणून पाखंडी धर्ममार्तंडाचे ऐकून धर्माच्या अनुयायांनो तुम्ही धर्म वाचवायला गेलात की तुम्ही अडचणीत याल. कारण बहुसंख्य धर्ममार्तंडांमध्ये ढोंगीपणा, दुटप्पीपणा ठासून भरलेला असतो. डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवणारे अनुयायी हे त्यांचे भांडवल आहे. तुम्हाला जगण्यासाठी शाश्वत आणि आवश्यक असणाऱ्या गोष्टींबद्दल ते बोलणार नाही आणि त्यादृष्टीने काही प्रयत्नही करणार नाही. ते तुम्ही काय खाऊ -पिऊ नये, कोणते कपडे घालू नये याबद्दल बोलतील पण ते तुमच्या मूलभूत प्रश्नांबद्दल कधी बोलणार नाहीत. ते रोजगार, महागाई, शिक्षण, भ्रष्टाचार, गोरगरीबांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलणार नाहीत ते बिघडलेल्या सामाजिक व्यवस्था, शासनप्रशासनाच्या मनमानीवर बोलणार नाहीत. कसलेही प्रश्न न विचारता मनोभावे सेवा करणारे अनुयायी धर्ममार्तंडाची संपत्ती आहे, त्यात वाढ होणे त्यांच्या फायद्याचे आहे. अनुयायांच्या जीवनातील अनिश्चितता, भिती आणि चमत्कारांचे आमिष हे ह्या त्यांच्या धंद्याचे भांडवल आहे. त्यामुळे अनुयायांनी स्थिरस्थावर, सुखी, स्वावलंबी होणे त्यांना हितकारक नाही. दर्जेदार शैक्षणिक व्यवस्था ही सामाजिक समतेचा आणि शाश्वत उन्नतीचा मार्ग आहे. आर्थिक स्थैर्य हे स्वाभिमानी,स्वावलंबी जीवनाचा पाया आहे. तुमचं ज्यामुळे भलं होऊ शकणार आहे, तुमचे आयुष्य सुखासमाधानाचे होऊ शकणार आहे अशा शिक्षण, आर्थिक स्थैर्य अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याऐवजी तुमच्या मनात या भौतिक गोष्टींबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण करतात. पैशाअभावी माणूस हतबल होतो आणि हतबल माणूस नाईलाजाने कोणालाही शरण जातो. जीवनातील अनिश्चितता हे त्यांच्या जगण्याचे भांडवल आहे. भौतिकसुख हे तुमच्या मोक्ष प्राप्तीतील मोठा अडथळा आहे हे तुमच्या मनावर ठसवण्यात त्यांचा हातखंडा असतो. पैसा कमावणे, गुंतवणूक करणे हे त्यामुळे पाप समजले जाते. स्थिरस्थावर असणाऱ्या लोकांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करण्यात ते यशस्वी होतात.                
                     धर्ममार्तंड तुम्हाला साधन संपत्तीचा मोह सोडण्याचा उपदेश करत असतात मात्र जगभरातील अनेक धार्मिक संस्था, धार्मिक समुदाय यांच्याकडे मात्र प्रचंड संपत्ती असते. याबाबतीत आफ्रिकन धर्मोपदेशक(Bishop) डेस्मंड टूटू यांनी मजेशीररीत्या एक विसंगत वाटू शकणारे पण वास्तववादी सत्य कथन केले आहे, ते म्हणतात, ज्यावेळी धर्ममार्तंड आमच्याकडे आले त्यावेळी त्यांच्याकडे धर्मग्रंथ होता आणि आमच्याकडे जमिनी होत्या. त्यांनी आम्हाला प्रार्थना करण्यास सांगितली, आम्ही डोळे मिटून प्रार्थना केली. आम्ही जेव्हा डोळे उघडले त्यावेळी आमच्या हातात धर्मग्रंथ होता आणि त्यांच्याकडे जमिनी होत्या.  'When the missionaries came to Africa, they had the Bible and we had the land. They said, ‘Let us pray.’ We closed our eyes. When we opened them, we had the Bible, and they had the land.’   खरंतर अध्यात्मिकेमुळे अनासक्ती यायला हवी होती पण पाखंडी धर्ममार्तंड अनुयायांना साधन संपत्तीच्या मोहापासून दूर राहायला सांगून स्वतः करोडोंची संपत्ती बाळगतात, महागड्या गाड्या, वस्तूंचा वापर करतात, ऐशो आरामात राहतात. खरंतर  संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात पाखंडी लोकांचे अचूक वर्णन केले आहे.
                                      लोकां सांगे ब्रम्हज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥१॥
                                       तेणें ज्ञान कां सांगावें । ज्ञानासारिखें वर्तावें ॥२॥
                                       नित्य वाची ज्ञानेश्वरी । दारीं भिकार्‍यासी मारी ॥३॥
                                       तुका म्हणे ऐसे धर्ममार्तंड । आम्ही देखिले उदंड ॥४॥
ह्या पाखंडी लोकांची मजल फक्त अफाट संपत्ती कमावण्या आणि उपभोगण्यापर्यंतच आहे असे नाही तर अनेक विकृत दुष्कृत्ये हे लोक करत असतात. जगभरात अनेक धर्ममार्तंडावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
               सर्वधर्मीयांनी हे लक्षात घ्यायला हवं की धर्म आणि धर्ममार्तंड हे वेगवेगळे आहेत. हे धर्ममार्तंड धर्माचे दलाल झाले आहेत त्यांच्याकडून तुमची लूट होऊ नये म्हणून सर्वांनी सजग राहिले पाहिजे. खरंतर हे धर्ममार्तंड धर्माला बंदिस्त करतात आणि धर्माच्या अनुयायांवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध घालतात. धर्म, धर्ममार्तंड आपले असो वा दुसऱ्याचे त्यांना आपल्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे पण धर्माच्या दलालांना तुमच्या श्रद्धेचा बाजार मांडू देऊ नका. तुमची विचारशक्ती जागृत करा, तुमच्या मेंदूचा वापर दुसऱ्याला करू देऊ नका. आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या भल्याबुऱ्याचा विचार करा. चांगले शिक्षण घ्या, नोकरी व्यवसायात पारंगत व्हा, स्वावलंबी व्हा. नितीनियमाने संपत्ती कमवून आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर व्हा. दान धर्म करण्याची भावना निर्माण झाली तर गरजवंताना मदत करा, आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवून समाजातील दीनदुबळ्या घटकांना आत्मसन्मानाने जगता येईल यासाठी प्रयत्न करा. नेहमी सत्याची, न्यायाची बाजू घ्या, अन्यायाला विरोध करा. आपआपला धर्मसमृद्ध करण्यासाठी आपआपल्या धर्मातील वाईट प्रवृत्ती ठेचून काढा, कालबाह्य झालेल्या गोष्टी सोडून द्या. कालबाह्य गोष्टींना चिकटून राहून धर्माचे डबके होऊ देऊ नका. नवीन चांगल्या लोककल्याणकारी गोष्टींचा स्वीकार करून धर्म प्रवाही ठेवा.आपल्या धर्मातील लोक सुखी, समाधानी, समृद्ध झाली तर आपलाच धर्म आपोआप समृद्ध होईल. अनुयायांनी निर्भय, सुखी, समाधानी, समृद्ध, स्वावलंबी ,नीतीवान असणे यापेक्षा दैवीकृपा वेगळी काय असू शकते?.

                               संतोबा.....

Sunday, December 7, 2025

सत्तासूत्र

                        प्राचीन काळापासून जगभरातील बलाढ्य साम्राज्यांचे सम्राट, हुकुमशहा, भांडवलदार, राज्यकर्ते आपली सत्ता आणि वर्चस्व टिकवण्यासाठी आणि जनतेने आपल्या मनमानी कारभाराविरोधात बंड करू नये यासाठी विविध युक्त्या, तंत्र वापरून जनतेला आपल्या अधिपत्याखाली ठेवत आले आहेत. प्राचीन आणि मोठया असलेल्या रोमन साम्राज्यात(इ.स.पू. २७) भाकरी आणि मनोरंजन ही युक्ती वापरली जायची(Bread and Circuses (Panem et Circenses)). सत्ताधारी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवत. जनतेसाठी ग्लॅडिएटर लढाया, रथांच्या शर्यती यांसारखे मोठे सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करत. अशा कार्यक्रमांमुळे जनता आपल्या मूलभूत समस्यांपासून विचलित होऊन उदरनिर्वाहासाठी सत्ताधाऱ्यांवर अवलंबून रहात. मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदत देऊन जनतेला सत्ताधाऱ्यांचे मिंधे बनवल्यावर त्यांना सत्ताधाऱ्यांची जी हुजुरी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्याच बरोबर धर्म, जात, प्रदेश आणि सामाजिक वर्गाधारित फूट पाडून आपापसात लढवत ठेवण्याचा फोडा आणि राज्य करा (Divide et impera" (डिव्हाइड एट इम्पेरा)) या युक्तीचा वापर करत रोमन साम्राज्य परकीय प्रांतांमध्ये स्थानिक गटांना एकमेकांविरुद्ध लढवून रोम साम्राज्याविरोधात बंड होऊ न देण्याची काळजी घेत. तसेच कायदेशीर हेराफेरी (Legal Manipulation) ज्यामध्ये सत्ताधारी सत्ता बळकट करण्यासाठी कायद्यात बदल करतात आणि आपल्या समर्थकांना अधिकचा लाभ मिळवून देतात. तसेच प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना लढायची संधी सुद्धा देत नाही, विरोधकांनी जिंकणे तर दूरची गोष्ट. उदाहरणार्थ रोममध्ये नागरिकत्वाचे विशेषाधिकार फक्त काहींनाच दिले गेले. जनतेला लुबाडून आपल्या गोतावळ्याचा हितसंबंध जोपासत फक्त त्यांचीच भरभराट करणारे आणि जनतेची वाताहत करणारे सत्ताधारी जनतेला भुलवण्यासाठी काहीतरी भव्यदिव्य करून त्याचे प्रदर्शन करून जनतेला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. भव्य इमारती, पुतळे, संग्रहालये, सार्वजनिक समारंभ, किंवा शासकीय प्रकल्पांद्वारे आपली शक्ती आणि वर्चस्व दाखवतात, ज्यामुळे जनता त्यांच्यावर प्रभावित होते. इजिप्तमधील पिरॅमिड्स, फ्रान्समधील व्हर्सायचा राजवाडा आणि अनेक देशात उभारलेली भव्य राष्ट्रीय स्मारके,धार्मिक स्थळे भव्यता आणि प्रदर्शनाचे (Spectacle and Grandeur) उदाहरण आहे.            

                सत्तेचा खुंटा मजबूत करण्याचे अजून एक प्रभावी तंत्र म्हणजे प्रचारतंत्र (Propaganda). हे तंत्र समाज आणि लोकमानस आपल्या दिशेने वळवण्याचे एक कौशल्यपूर्ण साधन आहे. यामध्ये विशिष्ट विचारधारा, अजेंडा(कार्यसूची) पुढे रेटण्यासाठी आणि लोकांच्या मतांवर आणि विचारांवर प्रभाव पडण्यासाठी हेतुपुरस्सर अर्धसत्य, वाढीव माहिती आणि अफवा पसरवल्या जातात. फक्त आपल्या विचारसरणीला पूरक माहिती देणे, आपल्याविरोधी माहिती टाळणे. विरोधकांवर सातत्याने हल्ला करणे अशा गोष्टी केल्या जातात. याचा उद्देश विशिष्ट विचारसरणी, राजकीय अजेंडा किंवा हितसंबंधांना चालना देणे हा असतो. भीती, देशभक्ती, आनंद यांसारख्या तीव्र अस्मितावादी भावना जागृत केल्या जातात. हा प्रचार वस्तुनिष्ठ नसतो आणि यामध्ये विशिष्ट धारणांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडक तथ्ये सादर केली जातात. तसेच तर्कसंगत प्रतिसाद देण्याऐवजी भावनिक भाषा वापरली जाते आणि जटिल समस्या सोप्या करून सादर केल्या जातात. उद्देश हा की लोकांनी एक विशिष्ट दृष्टिकोन स्विकारावा आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आपल्यासोबत राहावे. या तंत्राचा सर्वात प्रभावी वापर हिटलरने जर्मनीमध्ये केला (गोबेल्स नीती). प्रचारतंत्राचा पुढचा आणि सर्वात प्रभावी भाग म्हणून सम्राट, सत्ताधीश हा ईश्वरी अवतार (non-biological) आहे, त्याला खुद्द देवाने लोकोद्धारासाठी पाठवले आहे असा प्रचार करायचा. आणि तो जे काही करतोय ते दैवी कार्य आहे तो प्रजेला किंवा कोणत्याही मानवी सत्तेला जबाबदार नाही.  त्यामुळे राज्याची कितीही दुरावस्था झाली तरी राजाला ईश्वराचा प्रतिनिधी मानल्यामुळे आपल्याला जे काही भोगावे लागतेय एका उदात्त हेतूसाठी, त्याच्या विरोधात जाणे म्हणजे देवाच्या इच्छेविरुद्ध जाणे अशी भावना जनतेत निर्माण होऊन मोठ्या भक्तिभावाने जनता सर्व भोग भोगत असते आणि राजा राज्य उपभोगत असतो. प्राचीन इजिप्तमध्ये फारोला देव मानले जायचे. मध्ययुगात युरोपात याप्रकारे राजांचा "दैवी हक्क" (Divine Right of Kings) प्रचारला गेला आणि राज्यांनी आपल्या अनियंत्रित राज्यकारभाराचा नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त करून दिले.

              सत्ताधारी आपल्या अधिकारांचा वापर करून आपल्या निष्ठावान समर्थकांना आणि प्रभावी घटकांना जसे की उद्योजक, प्रसार माध्यमे, कलाकार यांना कवडीमोल दराने जमिनी, मोठमोठी कंत्राटे, पुरस्कार, आर्थिक लाभ देऊन त्यांची निष्ठा खरेदी करतात. त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालून त्यांना संरक्षण देतात(Clientelism and Patronage) त्याबदल्यात हे लोक सत्ताधाऱ्यांची तळी उचलून परस्पर हितसंबंध जोपासतात . वैयक्तिक स्तरावर क्लायंटलिझम जबरदस्तीद्वारे देखील केला जाऊ शकतो जिथे नागरिकांना विशिष्ट राजकारणी किंवा पक्षाला मतदान न केल्यास वस्तू किंवा सेवा खंडित करण्याची धमकी दिली जाते. हे सत्तेचे दलाल आपल्या मिळकतीमधील छोटासा हिस्सा सत्कार्यासाठी खर्च करून आपली प्रतिमा उजळवत असतात. शोषित लोकं या सर्वांचा जयघोष करत राहतात त्यांना हे कळत नाही की फक्त त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेचा एक भाग त्यांना परत मिळत आहे आणि शासक आणि सत्तेचे दलाल ते जनतेच्या हिश्यातून घेतल्याशिवाय परत जनतेला देऊ शकत नाही. थोडक्यात ही मूठभर लोकं मणभर मेवा खातात आणि कणभर मेव्याच्या उष्ट्या पत्रावळ्या ढीगभर जनतेच्या वाट्याला येतात.प्राचीन रोममध्ये, सम्राटांनी आपल्या निष्ठावानांना जमिनी आणि विशेषाधिकार दिले. मध्ययुगात सामंतांनी आपल्या समर्थकांना संरक्षण आणि जमिनी दिल्या ही बेकायदेशीर संरक्षण आणि पक्षपाती लाभाची(Clientelism and Patronage ) काही उदाहरणे आहेत.

                           कमी खटाटोपी करून, जनतेला टोपी घालणारी आणि जनतेची मती गुंग करणारी राजसत्तेची अन् धर्मसत्तेची युती ही सत्ता राखण्याची सगळ्यात जालीम युक्ती आहे. या दोहोंचा परस्पर संबंध हा मानवी इतिहासातील एक गुंतागुंतीचा, दीर्घकालीन चाललेला मुद्दा आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातील नाते हे एकमेकांना मजबूत करण्यासाठी असते. धर्मसत्ता राजसत्तेला नैतिकता, वैधता प्राप्त करून देते तर राजसत्ता धर्मसत्तेला राजाश्रय मिळवून देते. पाखंडी धर्ममार्तंडांना राजाश्रय मिळाला की जनतेच्या भावना बोथट करण्याचे काम करत असतात. धर्ममार्तंड धर्माचा वापर जनतेला भ्रमात ठेवण्यासाठी करतात. धर्मसत्ता पाप-पुण्य, स्वर्ग-नरक यांच्या भीतीने जनतेवर मानसिक वर्चस्व गाजवतात, ज्यामुळे लोक स्वतंत्र विचार करू शकत नाहीत आणि सत्ताधाऱ्यांच्या शोषणाला बळी पडतात. जनतेला भ्रमात ठेवून त्यांचे अधिकार हिरावले जातात, विकास रोखला जातो आणि सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांचा वापर केला जातो. जनतेची धार्मिक श्रद्धा सत्तेच्या समर्थनासाठी वापरली जाते. धर्ममार्तंड आणि राज्यकर्ते धर्माच्या, धर्म वाचवण्याच्या, वाढवण्याच्या गोष्टी करतात पण त्या धर्मातील लोकं वाचवण्याच्या, त्यांचा उत्कर्ष करण्याच्या गोष्टी करत नाहीत. मध्ययुगात युरोपात कॅथलिक चर्च आणि राजसत्तेची युती होती. इटलीमध्ये पोप पायस ११ आणि मुसोलिनी यांची युती होती, ज्यात चर्चने मुसोलिनीच्या हुकूमशाही राजवटीला पाठिंबा दिला आणि ज्यूंविरोधी कायद्यांना अप्रत्यक्ष संमती दिली. जागतिक स्तरावर, धर्माचा दुरुपयोग अतिरेकवाद वाढवण्यासाठी होतो, ज्यात राजकीय नेते धार्मिक भाषेचा वापर करून आपले अजेंडे पुढे रेटतात.

               कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थाचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी, जनतेत भीती निर्माण करण्यासाठी करतात. शासनाला अडचणीत आणणाऱ्या घटकांना नेस्तनाबूत करण्यासाठी या संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या संपत्तीवर टाच आणली जाते, त्यांच्या स्थावर मालमत्ता जमिनीदोस्त केल्या जातात, त्यांची सगळी कृत्ये बेकायदेशीर ठरवून त्यांना तुरुंगात डांबले जाते. प्राचीन अ‍ॅसिरियन साम्राज्याने निष्ठुरपणे दडपशाहीद्वारे लोकांना आपल्या अधिपत्याखाली ठेवले होते. राज्यकर्ते शिक्षणातून आपल्या विचारसणीचा प्रसार करून जनतेच्या विचारावर नियंत्रण ठेवतात आणि त्यांना आपल्या बाजूला वळवतात.  प्राचीन स्पार्टामध्ये तरुणांना सैनिकी प्रशिक्षण आणि विचारसरणी शिकवली जायची. आधुनिक काळात काही देश पाठ्यपुस्तकांद्वारे इतिहासाची हेराफेरी करून आपल्या सोईस्कर इतिहास शिकवतात. याशिवाय कोणी बंडखोरी करू नये म्हणून अशा लोकांवर पाळत ठेवली जाते. जगभरातील सर्वच सरकारांच्या गुप्तचर यंत्रणा मजबूत असतात त्या परकियांवर पाळत ठेवतातच अंतर्गत विरोधक आणि विवेकवादी लोकांवर देखील पाळत ठेवतात. खरंतर जगभरातले सर्वच हुकुमशहा क्रूर असले तरी प्रत्यक्षात ते खूप घाबरट असतात. विरोधकच काय पण आपल्या समर्थकाबद्दल पण त्याच्या मनात शंका असते.

               या अशा अनेक युक्त्या वापरून सत्ता टिकवता येत पण यशस्वी होता येईलच असे नाही. त्यामुळे चोहोबाजूंनी अपयशी ठरल्यानंतर आपल्या अपयशाचे खापर कोणावर तरी फोडावे लागते, कोणाला तरी जबाबदार धरावे लागते त्यासाठी बाह्यशत्रू आणि अंतर्गत विरोधकांना बळीचा बकरा बनवले जाते (Scapegoating and External Enemies). राज्यकर्ता आपल्या नाकर्तेपणासाठी, अपयशासाठी स्वतःला जबाबदार न धरता त्या अपयशासाठी कारणीभूत नसलेल्या एखाद्या व्यक्तीला, समुदायाला, पक्षाला जबाबदार धरतो आणि त्यांच्यावर सतत टीका करत राहतो. असल्या टीकेमुळे त्याला त्याच्या अपराधीपणाच्या भावनेपासून सुटका मिळते आणि समाधानाची भावना मिळते ही एक प्रकारची मानसिक संरक्षण यंत्रणा आहे (psychological defense mechanism). सर्व गोष्टींत अपयशी ठरल्यामुळे हतबल झालेला वांझोटा सत्ताधारी आपली प्रतिमा संवर्धन करण्यासाठी पॉवर डायनॅमिक्सचा खेळ खेळतो. ज्याने खरोखर चांगले कार्य केले आहे त्यांच्यापेक्षा आपण कसे वरचढ आहोत हे भासवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. तो त्या पूर्वसुरी व्यक्तीची बदनामी करतो, त्याची प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतः नकारात्मक, विध्वसंक वृत्तीचा असल्यामुळे त्याला सकारात्मक, रचनात्मक काम करता येत नाही. त्यामुळे त्या थोर पूर्वसुरीच्या प्रत्येक गोष्टीला, कार्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःला एवढा असुरक्षित समजतो की आपण सर्वोच्चपदी विराजमान असताना आपल्याच मंत्रिमंडळातील कनिष्ठमंत्र्याच्या कार्याचे श्रेय स्वतः कडे घेतो, कामाची उद्घाटने स्वतः करतो. बाकी सर्वांना नामधारी बनवतो जेणेकरून त्याच्यापेक्षा कोणी मोठा दिसू नये आणि तसे झाल्यास अशा आपल्याच  नेत्याचे, मंत्र्याचे पद्धतशीर खच्चीकरण करतो. स्वतःची लायकी नसताना प्रत्येक गोष्टीत आपले नसलेले ज्ञान पाजळून आपल्या पदाचा प्रतिष्ठा पणाला लावतो. सर्व व्यवस्था उद्ध्वस्त झाल्यानंतर, वाताहत झाल्यानंतर जनतेला आपल्यासोबत एकत्र ठेवण्यासाठी विशेषतः निवडणुकीच्या काळात देशात अतिरेकी हल्ले, देशावर परकीय आक्रमण, युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करून लोकांच्या मध्ये राष्ट्रवादाची भावना प्रबळ करून आणि त्याचा फायदा सार्वत्रिक निवडणुकीत घेतो.

                           अशा अनेक युक्त्या हजारो वर्षांपासून सत्ता टिकवण्यासाठी, वर्चस्व राखण्यासाठी वापरल्या जात आहेत पण या युक्त्या अद्यापपर्यंत कालबाह्य झालेल्या नाहीत. नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन संशोधन याचा वापर करून या युक्त्या अजून प्रभावी बनवल्या जात आहेत आणि नवनवीन युक्त्यांची त्यात भर पडली जात आहे. या बलाढ्य सैतानी शक्तीपुढे सर्वसामान्य लोकांनी हतबल होऊन त्यांचे गुलाम होऊन राहायचे हा एकमेव पर्याय आहे का?. या सर्व युक्त्या निष्फळ करण्यासाठी एकमेव प्रभावी मार्ग म्हणजे बहुसंख्य जनतेने आपली सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवणे. अर्थातच याची जाण वर्चस्ववाद्यांना आहे म्हणून ते कधीच जनतेला त्यांच्या सद्सदविवेकबुद्धीचा वापर करण्याची संधी मिळू देत नाही. योग्य शिक्षणाने लोकांना चांगल्या - वाईटाची पारख करता येते, आपला उत्कर्ष करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याची जाणीव होते म्हणून सर्वप्रथम ते शिक्षणाचा बट्ट्याबोळ करतात. जनतेला कायम कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त, वांझोट्या गोष्टीत अडकून ठेवतात, एक चांगले, सुरक्षित जीवन जगण्यासाठी जनतेला सतत संघर्ष करायला लावतात. सर्व लोककल्याणकारी योजनांचा, पायाभूत सुविधांचा बोजवारा उडवून जीवनावश्यक गोष्टींसाठी जनतेला सरकारचे मिंधे होण्यासाठी भाग पाडतात. यावर एकमेव उपाय म्हणजे समाजातील विवेकवादी लोकांनी सातत्याने जनतेला सत्य, वास्तविक तथ्ये, सरकारच्या प्रत्येक कृती मागचा कार्यकारण भाव समजावून जनजागृती करत राहणे आवश्यक आहे. कोणी सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलेला नाही. बदल ही एकमेव चिरंतन गोष्ट आहे फक्त तो बदल आधीच्याच मार्गाने जाणार नाही याची काळजी सर्वांनीच घेणे गरजेची आहे. 

                                                                                                                                संतोबा.

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!